
पूर्वी रूपयाचा बंदा आकाराने थोडा थोराड, वजनदार असायचा. त्याला त्याच्या अगदी अरूंद कडेवर प्रयत्नपूर्वक उभं करायचं आणि पडू द्यायचं नाही असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. दुसर्याचा बंदा पडला की खूप आनंद व्हायचा, मजा वाटायची, हसू यायचं; स्वतःचा पडला की मात्र मन हिरमुसलं, खट्टू व्हायचं. पुढे वय वाढलं तरी हा खेळ काही सुटला नाही; सुटत नाही. मोठेपणी हा खेळ सगळेचजण खेळत असतात. फक्त या बंद्याचं रूप तेवढं बदललेलं असतं. लहानपणीच्या धातुच्या, गोल बंद्याची जागा मोठेपणी त्याच्या स्वप्नांनी, मुल्यांनी आणि नातेसंबंधांनी घेतलेली असते. स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा हा बंदा रूपया त्याच्या काही मी. मी. च्या अरूंद कडेवर उभा करून प्रत्येकाच्या तळहातावर अदृश्य रूपात ठेवलेला असतो. त्याला पडू न देता तोल सांभाळत चालणं म्हणजेच आयुष्य! जरा पावलं डळमळली की हा बंदा धप्पकन पडलाच म्हणून समजा. उभा असतो तोवर हलका असतो तो पण पडला की कोण जड होतो; पावलं डळमळीतच होतात चालणार्याची! वेळीच त्याला सावरून परत सरळ उभं केलं तर बरं नाही तर मग पुढे कायम भेलकांडतच राहतं जीवनाचं गाडं.
अगदी अजाणत्या वयापासूनच माणसाला स्वप्न पडायला सुरू होतात आणि आयुष्यभर ती पडतच रहातात. फक्त मोठेपणी स्वप्ने पाहण्यासाठी प्रत्येकच वेळेस झोप लागायची गरज मात्र नसते. ही स्वप्नच तर आपला चालण्याचा वेग आणि दिशा नियंत्रीत करत असतात. स्वप्ने मनात आहेत म्हणून तर जीवनाला अर्थ आहे; मनात जगण्याची ऊर्मी आहे. स्वप्ने संपली की आयुष्यातला रामही संपला. जोवर ही स्वप्ने बंद्या रूपयासारखी त्याच्या अरूंद काठावर तोल सांभाळत उभी आहेत तोवर जीवन आहे, जीवनाला अर्थ आहे. हा रूपया पडला की जीवन डळमळीत. ही स्वप्नं काहीही असू शकतात; भौतिक सुखसुविधा स्वतःसाठी, कुटुंबासाठी मिळवण्याचं स्वप्न, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवायचं स्वप्न, ऊत्तुंग, भव्यदिव्य काही घडवायचं स्वप्न इत्यादी.
व्यक्तिमत्वाची ऊंची त्या व्यक्तिच्या स्वप्नांच्या ऊंचीवरून तर ठरत असते. जगण्याची, चांगलं जगण्याची ऊर्मी ही स्वप्नेच तर देत असतात. कधीतरी चालताना हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन खाली पडतो आणि मग सगळच डळमळीत होतं.
स्वप्नं योग्य चाकोरीतली पडताहेत, योग्य दिशेने पडताहेत तोवर जीवनही योग्य दिशेनं चालत राहतं. चुकीची स्वप्नं मनात जन्मली, त्यांचा तोल ढासळला की मग त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आटापिटा चालू होतो, पावलांचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू होतो आणि मग कडेलोट निश्चीत!
कधी हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन कोसळला की जगण्याचा दर्जा खालावतो; माणुस समाजासाठी आणि स्वतःसाठीही हानीकारक पद्धतीने जगायला लागतो. तर कधी जगण्यातली ऊर्मीच घालवून बसतो.
माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर स्वप्नाइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका त्याने जाणता अजाणता मनात जोपासलेल्या मुल्यांची पण असते. अगदी अजाणत्या वयापासून आपल्या आत कुटूंब, आपण वावरत असलेला परिवेश, वाचन अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या मुल्यांची बीजे पेरली जात असतात. पुढे या मुल्यांची बाग आपल्या व्यक्तिमत्वात, जीवनात माणुस जोपासत रहातो. जीवनाचा सुक्ष्मपणे विचार केल्यास माणसाचं जीवन म्हणजे त्याने नकळतपणे मनात जपलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक मुल्यांची त्याने जीवनात केलेली अंमलबजावणीच तर असते. बंद्या रुपयासारखी खणखणीत, अरूंद काठावर रूबाबदारपणे, ठाम रोवून उभी असलेली मूल्ये असली की माणूस सकारात्मक, प्रशंसनीय जीवन जगतो. परंतु मनात नकारात्मक मुल्यांची साठवणूक झालेली असेल तर त्याचा प्रभाव जीवन जगण्याच्या पद्धतीवर, वर्तनावर निश्चीतच पडतो. बीजच शुद्ध नसेल तर मिळणार्या फळांचा दर्जा कसा चांगला राहील? हा मूल्यांचा बंदा कोसळला की जीवन भेलकांडतच राहतं.
माणसाची स्वप्ने, त्याने जोपासलेली मूल्ये याबरोबरच त्याचे नातेसंबंधही जीवनावर परिणाम करतात. चांगले जोपासलेले सकारात्मक नातेसंबंध ऊर्जा प्रदान करतात तर तोल ढासळलेले नातेसंबंध त्याला नामोहरमही करतात. माणसाच्या भावविश्वाशी त्याच्या नातेसंबंधांचा अगदी थेट संबंध असतो. आनंद आणि दुःख दोन्ही प्रसंगात आपली माणसे सोबत हवीत; ती नसतील तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. माणसाच्या मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी चांगले नातेसंबंध ही मुलभूत गरज असते.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर हा नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर उभा ठेवून, पडू न देता जपणे हे महाकठीण! माणूस एकतर हातातोंडाची मिळवणी करण्यात त्रस्त किंवा ‘आणखी हवे’ची हाव त्याला स्वस्थ बसू देईना. कधी नव्हे इतका माणूस आज नातेसंबंधांच्या बाबतीत बेफिकीर झालाय. त्यातून नातेसंबंधांचा मामला जरा जास्तच नाजूक. जरा कुठे तिळमात्र इकडे तिकडे झाले की हा बंदा धप्पकन कोसळलाच म्हणून समजा. लगेच सावरून उभा केला तर ठीक नाहीतर पुन्हा तो उभा टाकणे दुरापास्तच. कितीही यशोशिखरे सर केली तरी अशा दुरावल्या नातेसंबंधांच्या स्मृति मात्र काटा बनून सलतच राहतात.
तर असा हा स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर वागवतच संपूर्ण जीवन वाटचाल करायची असते. कधी हा बंदा पडला की थांबायचं जरासं; करायचं त्याला सरळ उभं आणि मग पुढचा प्रवास सुरू!!
पुढच्या काही ओळी लक्षात ठेवल्या ना की हा बंदा रूपया सतत तळहातावर उभा ठेवणे सोपे जाते-
प्रत्येकाला काट्यांसोबत
काही फुले देतोच ईश्वर
उधळून द्यावा गंध थोडासा
येता जाता जीवन वाटेवर
मृत्यू तर अटळच असतो
काहीच नसते मृत्युला उत्तर
नेता नेता मृत्यूनेही
हताशपणे थांबावे क्षणभर!
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- विद्या बयास/ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर
भ्र. 9637146156
सुवर्णाक्षरे

पळवाट
उपसरपंच साहेबांची शेतीच्या कामामुळे चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं पर्यावसान मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. एक दिवस ते म्हणाले, ‘’आता तुम्हाला माझ्या घरी यायलाच हवं. बघा तरी आम्ही किती डेव्हलपमेंट केली आहे ते!’’ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सारं प्रसन्न करणारं. घराकडे जो रस्ता जातो त्याच्या दुतर्फा छान नारळाची झाडं लावली होती. आंबा, चिक्कू, पपई सगळी फळझाडं होती पण विशेष म्हणजे डाळींबाची बाग केली होती. त्याला अर्धा-अर्धा किलोचं एक अशी पंधरा-वीस डाळींब लगडलेली. शेतात सार्या आधुनिक सोयी केलेल्या. सर्वत्र ठिबक सिंचनाने सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली.
कलींगड, ढोबळी मिरची यांना मल्चींग पेपर लावून घेतलेला. सगळ्या पिकांना वेळच्यावेळी खत, पाणी... पाणी कमी पडू नये यासाठी मोठी विहिर होतीच. शिवाय दोन बोर सुद्धा घेतलेल्या. त्यामुळे एकदम छान, आधुनिक शेती. सारं सारं हिरवंगार. मन खरंच खूप प्रसन्न झालं आणि इतकी शेती सांभाळायची म्हणजे गडी हवेच! पण त्यांच्या घरातली माणसेच सर्व शेतात आवडीने काम करत असल्याने गडी एकच! सिझन आला... खूप काम वाढले की प्रसंगानुसार कामावर गडी बोलवायचे. खरंच पाहून खूप समाधान झालं.
आणि केवळ शेती दाखवली असे नाही तर जेवणही अगदी झक्कास केलं. त्यांनी सांगितलं, ‘‘शेतातल्यासारखं जेवण करा.’’ रानातली ताजी भेंडी तोडून आली. भरली वांगी, मिरचीचा ठेचा, भाकरी, कांदा, सोबत रानमेवाही दिला. मनाबरोबर पोटही तृप्त झालं. सारं झाल्यावर ‘वानावळा’ म्हणून घरच्या भाज्या भेंडी, गवार, मिरची, वांगी, लिंबू, मेथीही सोबत भरभरून दिले...
निघताना उपसरपंचाच्या बायकोला, उमा वहिनींना मी सवयीनं विचारलं, ‘‘वॉशरूम कुठं आहे?’’ त्यांनी प्रश्नार्थक चेहरा केला. मी समजले आणि विचारले की, ‘‘शौचालय कुठं आहे?’’ त्या एक मिनिट माझ्याकडं पाहतच राहिल्या. मग म्हणाल्या, ‘‘त्या तिकडं, लांब आहे.’’ मी म्हटलं, ‘‘चालेल, जाऊया.’’ त्या तिकडे न्यायला अजिबात उत्सुक नव्हत्या पण मी पुन्हा म्हटले की, ‘’जाऊ या, चला...’’ तेव्हा त्या नाईलाजास्तव मला तिकडे घेऊन गेल्या. बाहेरून तर शौचालय चांगले बांधलेले दिसत होते पण त्याला कुलूप होते. शेत ह्यांचं, माणसंही इथं घरातलीच राहणारी, गडी केवळ एक, मग कुलूप का लावलं मला कळेना... तोवर उमा वहिनींनी शौचालयाचं दार उघडून दिलं... तर प्रथमदर्शनी नजरेत भरल्या त्या आधुनिक टाइल्स लावलेल्या. तोपर्यंत उमा वहिनी म्हणाल्या, ‘’थांबा जरा...’’ आणि त्यांनी बोरजवळून एक बादली भरून आणली. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘आत पाण्याची सोय नाही? टाकीही दिसत नाही. मग तुम्ही?’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कोणीच वापरत नाही.’’ मग मी म्हणाले, ‘‘अहो, मग बांधला कशाला?’’ त्यांचे उत्तर ऐकून मला काय बोलावे तेच कळेना. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही सारे वावरात जातो पण सरकारचा फतवा निघाला ना शौचालय नसले तर फॉर्म भरता येणार नाही, म्हणून बांधून ठेवला. तेवढ्यासाठी तिकिट नको जायला.’’ म्हणजे एकप्रकारची पळवाटच वाटली मला.
यासंदर्भात टीव्हीवर विद्या बालन एक जाहिरात करते. ती खूपच बोलकी आहे. सून पाणी प्यायला घुंघट बाजूला करते तर लगेच सासरा सूचवतो, ‘आपल्याकडे असं चालत नाही.’ त्यावर विद्या बालन छान, मार्मिक प्रश्न विचारते, ‘‘घुंघटही काढलेलं चालत नाही मग सून अशी उघड्यावर शौचाला जाते तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही...?’’ अशा आशयाची बोलकी, झणझणीत अंजन घालणारी जाहिरात...
इथं तर केवळ नियम आहे म्हणून, केवळ दाखवण्यासाठी शौचालय बांधले. याला काय म्हणावे? सारी आधुनिकता मग मला फिकी वाटू लागली.
नियम काढतात... पण पळवाटाही शोधतात. मूळ उद्देश साध्य होत नाही, हेच यावरून दिसते. यासाठी मानसिकता बदलायला हवी...
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- सुवर्णा जाधव, मुंबई
मुलुखमैदानी तोफ असलेल्या ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची 12 डिसेंबर ही जयंती. या महानेत्याच्या आठवणी जागवल्या आहेत साखर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रा. लि.’चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी. साप्ताहिक ‘चपराक’मधील हा लेख अवश्य वाचा.
आम्हा साखर उद्योगात सक्रिय असलेल्यांना सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी सातत्याने संपर्क होत असतो. महाराष्ट्रात तर ‘सहकार’ गावागावात, खेडोपाडी रूजलेला. सहकाराच्या माध्यमातूनच साखर कारखाने, सुत गिरण्या, दूध संघ, सहकारी संस्था असे भव्यदिव्य प्रकल्प उभे राहिलेले. याच सहकाराच्या माध्यमातून एक साखर तज्ज्ञ म्हणून, साखर कारखान्यांचे मशिनरी उत्पादक म्हणून अनेक दिग्गजांशी गेली अनेक वर्षे मी सतत संपर्कात असतो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आपल्या राजकीय नेत्यांच्या अधिकारात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक यांच्याशी माझा परिचय आहे आणि म्हणूनच त्यांना जवळून पाहण्याची संधी देखील मला अनेकवेळा मिळाली आहे. त्याचमुळे या राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असेलेले मोठेपण, कसब, त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि लोकसंचयाचं रहस्य माझ्या लक्षात आलंय.
असाच कामाच्या निमित्ताने सन 2007 मध्ये माझा दिवंगत ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्याशी संपर्क आला होता. निमित्त होते परळी वैजनाथ येथील त्यांच्या साखर कारखान्याला यंत्रसामग्री पुरवण्याबाबत. त्यावर्षी या कारखान्याला हव्या असणार्या यंत्रसामग्रीबाबत रीतसरपणे वृत्तपत्रात टेंडर प्रकाशित झाले. त्यात आम्ही करत असलेल्या यंत्रसामग्रीचा उल्लेख असल्याने आम्ही ते टेंडर घेऊन भरून पाठवले. टेंडर मुंबईला साखर संघात पास होऊन ज्या कोणा उत्पादकाची किंमत सर्वात कमी असेल त्या निकषावर ते काम देण्यात येणार होते. एकदम पारदर्शक व्यवहार होता. प्रत्येक उत्पादकाने आपापल्या उत्पादनाची आपल्याला परवडेल अशी किंमत घालून टेंडर जमा करायचे ही सर्वसाधारण पद्धत असते. ज्या दिवशी मिटींग असते त्यादिवशी सर्वांसमक्ष टेंडर खोलून वर सांगितलेल्या निकषाप्रमाणे कार्यपद्धती होते. तरीपण हे टेंडर ओपन होण्यापूर्वी मुंडेजींची एकदा तरी भेट घ्यावी असे मला वाटले. कारण यापूर्वी मी त्यांच्या कारखान्यात कधीच काम केले नव्हते. शिवाय मला माझ्या उत्पादनाचे वैशिष्ट्य त्यांना विषद करायचे होते. मी केलेल्या अथक, संशोधनात्मक कार्यातून माझे यंत्र कसे वेगळे व कारखान्यास उपयुक्त आहे मला मुंडेजींना सांगायचे होते. म्हणून मी मुंबईला वरळीस्थित त्यांच्या ‘पूर्णा’ या निवासस्थानी गेलो व काही वेळेच्या प्रतिक्षेनंतर मुंडेजींनी मला त्यांच्या कक्षात बोलावले. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावेळी ते ‘पर्चेसर’ खरेदी करणारा व मी ‘सप्लायर’ म्हणजे माल पुरवणारा या भूमिकेत होतो.
जेव्हा मुंडेजींना मी सप्लायर आहे असे कळले तेव्हा ते म्हणाले, ‘‘ मी सप्लायरला भेटत नसतो. माझ्या अंडर सतरा कारखाने आहेत. त्यांच्या प्रत्येक सप्लायरला भेटायला लागलो तर राजकारण केव्हा करायचे?’’ त्यांचे हे वाक्य ऐकताच मी ताडकन उठून उभा राहिलो. ‘‘सॉरी साहेब, मला माहीत नव्हतं. निघतो मी. उगाच तुमचा वेळ व्यर्थ जायला नको’’ असे म्हणून मी जायला वळलो. तोच मुंडेजी म्हणाले, ‘‘आता आला आहात तर बसा बेलसरे’’ आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. साखर कारखाना, त्यातील तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कारखान्याला होणारे फायदे अशा अनेक बाबींवर आमचा वार्तालाप झाला. मुंडेजी मंत्रमुग्ध होऊन व लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकत होते. मधूनच ते आपल्या कारखान्यात आणखी काय केल्याने उत्पादन वाढेल, कारखाना सक्षम होईल, त्रुटी दूर होतील या बद्दलही आस्थेने विचारपूस करत होते. या चर्चेत दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. मुंडेजींशी ती भेट अपूर्व होती. कोणत्याही राजकीय नेत्याने इतका रस घेऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दल इतकी सखोल माहिती यापूर्वी घेतलेली माझ्या तरी अनुभवात अथवा ऐकीवात नव्हती. राजकारणात सक्रीय असताना देखील, संघर्ष करीत असताना देखील आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचा तपशील ठेवणे, त्याचा बारकाईने अभ्यास करणे व विकासाच्या दृष्टिने पावले उचलने ही मुंडेजींची विचारसरणी, खासीयत मला भावली. या व्यक्तिच्या कारखान्यात काम करायची संधी मिळावी असे मला मनोमनी वाटले व मी तशी इच्छा देखील मुंडेजींना बोलून दाखवली पण आता निकाल साखर संघाकडे होता. त्यात जो सर्वात कमी किंमत घेणारा त्याचीच वर्णी लागणार होती. कारखाना पातळीवर हा व्यवहार होणारा नव्हता नाहीतर ‘लोएस्ट’च्या ऐवजी ‘क्वालीटी’चा देखील निकष लावता आला असता. म्हणून आता सर्व टेंडर ओपनींगच्या वेळीच कळणार होतं पण म्हणतात ना ‘जहॉं चाह वहॉं राह होती है’. मनापासून इच्छा होती म्हणूनच की काय आमचेच टेंडर लोएस्ट निघाले व परळी वैजनाथ या कारखान्यात काम करण्याची मला संधी मिळाली. टेंडर ओपनींगच्या वेळी मुंडेजींशी झालेली माझी दुसरी भेट. कामाच्या संदर्भातील. एरवी त्यांचा पुण्यातील सहकारी संदीप खर्डेकर याच्याकडील अनेक समारंभात मुंडेजींशी भेट व्हायची पण ती औपचारिक.
यथावकाश त्यांच्या कारखान्यातील आम्ही आमचे काम ठरलेल्या वेळात उत्कृष्टपणे पार पाडले. मशिनच्या उद्घाटनाला स्वत: मुंडेजी जातीने हजर होते. त्यांच्याच हस्ते पूजा करून यंत्र सुरू केले. आज या गोष्टीला सात वर्षे झालीत तरीही तेथील कर्मचारी वर्ग, वरीष्ठ यांच्याशी आमचे स्नेहाचे व सौहार्दाचे संबंध आहेत. त्यानंतरही अनेकवेळा मुंडेजींशी भेट व्हायची. त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी माझी जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा त्यांना मी माझे भेटपत्र देऊ केले होते. त्यावेळी ते म्हणाले होत, ‘‘बेलसरे आता कार्डची काही गरज नाही. ठेवा ते तुमच्याजवळच. येथून पुढे कितीही वर्षांनी भेटलात तरी मी तुम्हाला नावासकट ओळखेन’’ आणि खरोखरीच जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा अगदी न चुकता नावाने संबोधायचे. इतका अफाट जनसंपर्क असणार्या या नेत्याला ही किमया, इतकी स्मरणशक्ती नक्कीच दैवी देणगीच असावी.
दि. 3 जून 2014 रोजी सकाळी ‘चपराक’चे संपादक श्री. घनश्याम पाटील यांचा फोन आला व त्यांनी मुंडेंजींचे अपघाती निधन झाल्याची बातमी दिली आणि धक्काच बसला. अनेक वर्षाच्या अथक संघर्षानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते. महाराष्ट्राला मोदीजींच्या राज्यात चांगलेच वजन प्राप्त झाले होते. मुंडेजी ग्रामीण विकास मंत्री झाल्यामुळे बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ग्रामीण विकासाचे, विशेषत: शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळणार होता. खेड्यांचा पर्यायाने देशाचा विकास साध्य होणार होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तसे पाहता अपघात किरकोळ होता, त्यात जीव जाण्याची शक्यतापण कमीच होती पण म्हणतात ना ‘परमेश्वर स्वत:कडे दोष घेत नसतो’ म्हणूनच हे अपघाताचं कारण घडलं असावं. मृत्युलाही शेवटी काही कारण असावं लागतं. अनेक मोठ्या अपघातातूनही अनेकजण वाचतात पण येथे उपचाराची देखील संधी मिळाली नाही आणि हा जननायक पाहता-पाहता आपल्यातून निघून गेला. आपली विजयी सभा घेण्यासाठी, आपल्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनाशी अनेक स्वप्ने घेऊन देशाच्या भवितव्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन हा नेता आपल्या ‘कुटुंबात’ परतत होता पण आज ती स्वप्ने फक्त स्वप्नेच राहिलीत. त्या ठोस निर्णयांना आता शब्दात व्यक्त होता येत नाही. खरोखरीच नियतीच्या या करणीने अंतमुर्ख व्हायला होतंय. एक उमदं, बहारदार नेतृत्व अनंतात विलीन झालंय. मराठवाड्यातील तिसरं रत्न हरपलंय. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यानंतर सैरभैर झालेल्या मराठवाड्याला सावरणारा, जनसामान्यांचा आत्मविश्वास जागवणारा आणि शेतकरी, कष्टकर्यांना आधार वाटणारा दुवा निखळलाय. त्यांच्या अकाली जाण्यानं पालातला शेतमजूर धाय मोकलून रडलाय, पिडलेला शेतकरी हाय खाऊन बसलाय, सहकारी मित्रांना धक्का बसलाय तर बुजुर्ग नेत्यांनाही अश्रू आवरेनासे झाले. असं सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर फुलेलेलं सर्वस्पशी नेर्तृत्व क्वचितच पाहायला मिळतं. येत्या 12 डिसेंबर रोजी मुंडे साहेबांची जयंती. माझ्याकडून व साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून त्यांना अभिवादन!
- प्रमोदकुमार बेलसरे, पुणे
9822053371

तो पूर्वी नियमित यायचा; कधी कल्पना देऊन तर कधी आगंतुकासारखा! पण आता लहरी झालाय तो. येत नाही; आता राहीलाय शिल्लक फक्त आठवणीत. त्याची खूप रूपे अनुभवलीत कळायला लागल्यापासून! पहिल्यांदा कधी भेटला ते नाही सांगता येत नक्की पण तो आठवणीत खोलवर रूतलाय एवढं मात्र नक्की. कधी पडायचा झिमझिम, संथ, मंद लयीत. जणू त्याच्या सहस्त्र धारांनी गोंजारायचा अंगअंग. तर कधी झोडपून काढायचा आडवा तिडवा; आई रागावली की झोडपते तसं. तो तसा पूर्ण सुखदही नव्हता आणि पूर्ण दुःखदही. कधी असा तर कधी तसा.
तो जेव्हा आगंतुकासारखा यायचा ना तेव्हा त्याचं येणं खूप आनंददायी भासायचं. आभाळात लख्ख ऊन पडलेलं असायचं. दुपारची शाळा भरायची वेळ झालेली. जेवण उरकून आमचा घोळका शाळेकडे रमत गमत निघालेला किंवा दुपारच्या मध्यांतरात आमचा मैदानावर खेळाचा डाव रंगलेला असायचा. तो यायचा; अचानक ध्यानीमनी नसताना. कोण तारांबळ उडायची, एकच गलका, त्याच्यापासून बचावासाठी पळापळ. त्या ही धांदलीत कोणीतरी ओरडायचं, ‘‘ए, चिमणीचं लगन लागायल की असला पाऊस पडतय बाळ!’’ तो जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच त्वरेने थांबायचाही. तेवढ्याच वेळात चिंब भिजवून मात्र काढायचा. तो गेला की कुणाचीतरी नजर इंद्रधनुष्याच्या सुंदर कमानीवर पडायची. सोबतच एक आनंदभरीत चित्कार, ‘‘ए, ते बघ.’’ सर्वांच्या माना वळायच्या तिकडे. काही वेळ मग तो गलका चालायचा. आपसुकच मग वर्गात पोहचायला उशीर आणि छडीचा प्रसाद. तरी पण त्याचं ते येऊन जाणं इतकं सुखद असायचं की छडी लागायचीच नाही.
जेव्हा तो आगमनाची वर्दी देऊन यायचा ना तेव्हा मात्र तो तितकासा सुखद भासायचा नाही. आभाळ झाकोळून यायचं, काळेभोर ढग आणि लकाकणार्या वीजा. सोबतीला ढगांचा गडगडाट. आभाळ झाकोळायला लागलं की विचीत्र कालवाकालव सुरू व्हायची मनात; उदास वाटायचं, कधी एकदा हे मळभ दूर होईल असं वाटायचं.
बरेच दिवस कळतच नव्हतं असं का होतय. पावसानं सार्यांची मनं प्रफुल्लीत झालेली असायची. तेव्हा मी मात्र विमनस्कपणे पावसाकडे बघत रहायची. नकोनकोसा वाटायचा तो पाऊस अन् ते वातावरण. एक दिवस अचानकच कारणाचा उलगडा झाला. त्या दिवसापासून आभाळ झाकोळल्यानंतर होणारी माझी तगमग कायमची थांबली.
आईवडीलांचं पहिलं अपत्य मी. आईवडील खेड्यातले आणि आजोळ शहरातलं. म्हणजे तालुक्याचं ठिकाण. आजोळी इंग्रजी माध्यमाची नवीन शाळा सुरू झाली आणि माझी रवानगी वयाच्या तिसर्या वर्षीच इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी आजोळी झाली. दोनेक वर्ष काढली आजोळात; शाळेत कमी आणि दवाखान्याच्या चकरा करण्यात जास्त. शेवटी डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; ’लेकरू हळवं आहे, आईवडीलांपासून दूर ठेवू नका, आपोआप होईल तब्बेतीत सुधारणा.‘ झाली आमची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या झकपक शाळेतून गावाकडच्या झेड. पी. च्या शाळेत.
शाळा आठवते अजूनही स्पष्ट. शाळेला दोन खोल्यांची इमारत (?) आणि समोर व्हरांडा. एका खोलीत पार्टीशन करून कार्यालय आणि एक वर्ग भरायचा दुसर्या खोलीत. एक वर्ग, खोल्यांसमोरच्या व्हरांड्यात दोन वर्ग; अशी चार वर्गांची सोय व्हायची. मग उरलेले तीन वर्ग; पहिली, दुसरी आणि तिसरी सेवा सोसायटीच्या गोदामात एकत्रच. थोड्या थोड्या अंतराने बसवले जायचे. अध्यापन करणारे आमचे गुरूजी आणि अध्ययन करणारे आम्ही विद्यार्थी सारेच धन्य धन्य! माझी अवस्था तर हरितगृहातील कुंडीतून उपटून उघड्या बोडक्या, खडकाळ माळरानावर एखादं रोपटं लावावं तशी.
या सार्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचा माझा केविलवाणा प्रयत्न चालू होता. नुकताच जून महिन्यात शाळेत प्रवेश झालेला. दिवस पावसाळ्याचे. गावातलं सगळं पाणी वाहत येऊन शाळेच्या मैदानात जमायचं आणि तसंच पुढे वाहत जाऊन शाळेच्या खालच्या बाजूने वाहणार्या ओढ्याला जाऊन मिळायचं. त्या दिवशीही दुपारी असाच खूप मोठा पाऊस आला. गावातून वाहत आलेल्या पाण्याचा मोठा प्रवाह शाळेच्या मैदानातून ओढ्याकडे झेपावू लागला. शाळेची इमारत गावाच्या शेवटी होती. पाण्याच्या प्रवाहानं शाळा गावापासून वेगळीच केली. शेतातून परतणारी गुरं, माणसं अन् शाळा प्रवाहाच्या या कडेला अन् विरूद्ध कडेवर गाव. प्रवाहाची खोली कमी असली तरी रूंदी खूप जास्त होती. शहराच्या आखिव रेखीव परिवेशातून आलेल्या माझ्या नजरेला ते दृश्य नवीन होतं. भयचकित नजरेनं मी ते दृश्य न्याहाळत होते. बाकी सारी शाळा पावसाचा आनंद घेत होती. तितक्यात एक शेळीचं पिल्लू चुकून पाण्यात पडलं आणि वाहून जाऊ लागंल.
त्याला पकडायला त्याचा दहा बारा वर्षाचा मालक लगोलग पाण्यात शिरला. अलगद त्या शेळीच्या पिलाला पकडून त्याने छातीशी कवटाळलं आणि दुसर्या कडेला गेलाही. पाण्यात शिरलेला तो पोरगा, त्यानं पोटाशी कवटाळलेलं ते शेळीचं पिल्लू, त्या पोराच्या कमरेपर्यंत येणारा पाण्याचा प्रवाह! झालं, मी मोठ्यानं रडायला सुरूवात केली. माझ्या बालनजरेला तो तीनेक फुट खोल पाण्याचा प्रवाह खवळलेल्या समुद्रासारखा वाटत होता. कदाचित माझ्या पावसाविषयीच्या नावडीला या आठवणीचा संदर्भ असावा.
दुसरी अशीच आठवण एकोणीसशे ब्याऐंशीच्या अतीवृष्टीची. आई आणि मी एक रात्र एका पाहुण्याकडे मुक्कामाला होतोत. घरापाठीमागून एक मोठा ओढा वहायचा. सायंकाळी सर्व काही ठीकठाक होतं. अर्ध्या रात्रीनंतर मात्र त्या घराची पाठभींत गायब झाली. जीव मुठीत धरून ओसरीत कुडकुडत रात्र काढलेली अस्पष्टशी आठवते.
पुढे वाढत्या वयाबरोबर त्याचं महत्त्व पटत गेलं. उदास का वाटेना मनाला पण तो वेळच्यावेळी यायला हवा हे बुद्धीला पटायला लागलं पण तो वरचेवर कमी कमी होत गेला. या अलीकडच्या दोन तीन वर्षात तर इतका दुर्मिळ झालाय की त्याच्या जराशा डोकावून जाण्याचीही आता बातमी होते.
पूर्वी त्याच्या आगमनाचं फारसं स्वागत वगैरे नव्हतं कुणी करत कारण तो आपलाच होता, जिव्हाळ्याचा होता. सहज, आत्मीयतेने, नियमित यायचा. नाही म्हणायला आई मिरगाचा लाल लुसलुशीत किडा दिसला तर हळद कुंकु तेवढं वहायची. आता मात्र तो जरा कुठं डोकावला म्हटलं की त्याला उतरवून घ्यायला विमान काय, रडार काय, शास्त्रज्ञांची फौज काय! पण मानवाच्या सगळ्या प्रयत्न, विनंत्या अन् अर्जवांना भीक घालणं बंद केलंय त्यानं. तो हुलकावणी देत, चकवत रहातोय. झड, मुसळधार, धोधो हे शब्द आता शब्द कोशातच बंदिस्त होणार की काय अशी भीती वाटते.
अत्यंत प्रगत अशा माया संस्कृतीचा विनाश त्याच्या न येण्यानं झाल्याचं कुठंतरी वाचलं होतं; ते आठवतं. मन चिंतेनं भरून येतं. हा असाच हुलकावत राहीला; आलाच नाही तर?
कसा पोहचवावा निरोप त्याच्यापर्यंत? खूप चुकलोय रे आम्ही! करतो सगळ्या चुका दुरूस्त पण तू ये; पूर्वीसारखाच आपुलकीने, प्रेमाने; पुन्हा एकदा भीजव, चिंब चिंब होऊ दे. मानव जातीशी तुझा स्नेह कायम राहू दे, युगायुगांपर्यंत!!
भेगावलेल्या भूईतून उगवलेले
शेकडो शेकडो हात
दीनपणे तुझ्या पुढे पसरलेले
दुर्लक्षू नकोस त्यांची याचना
युगायुगांच नातं तुझ्याशी जोपासणारी धरणीमाता
लेकरांच्या चिंतेनं व्याकुळ, सैरभैर
तुझ्या सहस्त्र बाहूंनी
तिला घे कवेत अन्
संपू दे हा विरह ...........जीवघेणा !!
-विद्या बयास /ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर 413514
भ्र. 7038665684

सुवर्णाक्षरे
माणसाचं मन खरंच अनाकलनीय असतं. कधी तो छोट्या गोष्टींसाठी राईचा पर्वत करून भांडत बसतो तर कधी पैशाला महत्त्व देईल आणि जिथून खरंच पैसे मिळवता येतील तिथे तो पैशावर पाणी सोडतो. कुणाच्या तरी शब्दाखातर... माणसाला यशस्वी होण्यासाठी, कर्तृत्व फुलवण्यासाठी आयुष्यात पाठीवर थाप ही फार महत्त्वाची. म्हणूनच ‘कणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी गुरूजींना म्हणतो.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊनि नुसते लढ म्हणा
आणि कर्तृत्व फुललं, कुठल्याही कार्यात यश मिळालं की होणारं कौतुक हे फार महत्त्वाचं. कौतुकामुळे उत्साह वाढीला लागतो आणि कौतुक केलेेलं प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं.
आपल्या बालपणात डोकवा बरं जरा. आठवा आपण काही चांगलं काम केलं, आईला कामात मदत करून तिचं काम कमी केलं तर ती जरी काही बोलली नाही तरी तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं कौतुक जाणवलं की काम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. काम करण्यासाठी उत्साह यायचा. कॉलेजमध्ये गुरूवर्यांनी केलेले कौतुक, मित्रमैत्रिणींनी केलेले कौतुक यामुळे विद्यार्थी दशेत प्रगतीपथाची वाटचाल आनंददायी होते. परिवारात, संसारात घरच्यांनी केलेले कौतुक जीवन आनंददायी करतं. आपण घरच्यांसाठी आहोत आणि घरातले आपलेच आहेत ही भावना जपली जाते. घरातल्या लहानग्यांचं आपण कौतुक करतो. मुलं चुकली तरी त्यांच्या प्रयत्नांचं, धडपडीचं कौतुक करतो आणि त्या कौतुकाच्या बोलानं मुलं अपयशावर मात करत पुढं पुढं चालत राहतात. कौतुकाचे बोल त्यांना उभारी देतात.
ज्याप्रमाणे खासगी आयुष्यात, परिवारात, मित्रमैत्रिणींकडून माणसाला जशी कौतुकाची भूक असते तशीच व्यावसायिक जीवनातही असते. बॉसचे कौतुकाचे दोन बोल कर्मचार्याचा उत्साह द्विगुणीत करण्यास निश्चितच सहाय्य करतात. खरं पाहिलं तर आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो तो उदरनिर्वाहासाठी, अर्थार्जनासाठी आणि सगळ्यांनाच आपापल्या आवडीचा व्यवसाय वा नोकरी मिळेलच असे नाही. थोडेच भाग्यवान असतात की ज्यांना आयुष्यात जे करायचं होतं ते इप्सित साध्य होतं. खूपदा माणूस ठरवतो काही आणि घडतं काही. खूपदा खूपजण ठरवतात की, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हायचं. कलाप्रांतात यश मिळवायचं पण आर्थिक अडचणी, आयुष्याला कलाटणी देणार्या घटना घडणे, घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन, त्यामुळे अचानक येऊन पडणारी कुटुंबाची जबाबदारी, त्यामुळं अर्धवट सोडावं लागणारं शिक्षण आणि मूळ आवड सोडून जमेल ती नोकरी, व्यवसाय अर्थार्जनासाठी करावा लागतो आणि तो मग आवडीचे काम मिळाले नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम आवडीने करतो. मग असं काम चांगलं केल्यावर त्याचं कौतुक झालं तर? हे कौतुक त्याला समाधानही मिळवून देते पण असं फार कमी वेळा घडतं. नोकरी करणार्यांना तर हे निश्चितच जाणवत असेल! काही चुकलं तर बॉस रागवायला अजिबात विसरत नाही पण खूप चांगलं, व्यवस्थित काम केलं, कमी वेळात उल्लेखनीय काम केलं तर बॉस कौतुक करेलच असं नाही. चांगल्या कामाचं कौतुक केलं तर कर्मचार्यांचा उत्साह वाढतो. तो जोमाने काम करतो. त्याला श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं!
कौतुक कुठल्या गोष्टीचं करावं? आवडलेल्या, भावलेल्या कुठल्याही गोष्टीच करावं! एखाद्या नृत्याचा कार्यक्रम झाला, आपण नर्तिकेचं कौतुक केलं की तिचा उत्साह वाढतो. कवितेचा कार्यक्रम झाला, आवडलेल्या कवितांचं कवींजवळ कौतुक केलं की त्यांनाही बरं वाटतं. विविध कार्यक्रम होत असतात. ते यशस्वी होण्यामध्ये सूत्रसंचालकाचा सिंहाचा वाटा असतो. सूत्रसंचालक छान चारोळ्या, शेर, चांगली वाक्यं प्रसंगावधान राखून पेरत असतो. काही प्रासंगिक, समर्पक शेर मारून, कॉमेंटस् करून कार्यक्रमाची लज्जत वाढवतो. याचं श्रेय त्याला दिलं, थोडे कौतुकाचे बोल ऐकवले की त्याच्या चेहर्यावर कार्यक्रमाचे सार्थक झाल्याचे स्पष्ट दिसते, जाणवते.
एकदा मी शिवनेरीने मुंबईहून पुण्याला आले. चालकाने गाडी अगदी वेळेत व छान, सुरक्षित चालवत आणली. मी गाडीतून उतरताना त्याचे कौतुक केले. ‘तुम्ही छान, सुरक्षित, वेळेवर आणलीत गाडी’. त्यावर ‘कौतुक केल्याबद्दल तुमचेही आभार’ तो म्हणाला.
अशाप्रकारे कौतुक हे उत्साहवर्धक टॉनिक आहे. आपण दुसर्यांसाठी कौतुकाचे बोल वापरायला हरकत नाही. चला तर आजपासून सुरूवात करूया!
- सुवर्णा जाधव
(साप्ताहिक चपराक, पुणे)
www.chaprak.com
ऋचा पोतदार या अवघ्या नऊ वर्षाच्या चित्रकर्तीनं चित्रकला क्षेत्रात आपली
वेगळी ओळख निर्माण केली आहे. नामवंत चित्रकारही हरखून जातील इतकी छान चित्र
तिनं साकारलीत. आजवर वेगवेगळ्या स्पर्धातही तिनं घवघवीत यश मिळवलंय.
सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका अंजली कुलकर्णी यांनी ‘चपराक’च्या वाचकांना
करून दिलेली ऋचाची ही ओळख.
बालचित्रकर्ती ऋचा पुष्कराज पोतदार. वय वर्षे नऊ. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार श्री. बबन पोतदार यांची नात. इव्हेंटस्चे मॅनेजमेंट बघणारे पुष्कराज आणि वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉ. दिप्ती यांची एकुलती एक लाडकी कन्या. मात्र लाडकी असली तरी लाडावलेली नाही तर गुणांनी लगडलेली सुपुत्री.
घरात साहित्य संस्कृतीचा दरवळ झेलतच ऋचा वाढते आहे. त्यामुळे कलागुणांची जोपासना करण्याचं बाळकडू तिला घरातंच मिळालंय. चित्रकलेचा वारसा तिला तिच्या आजोळच्या घराण्याकडून मिळाला. सध्या ऋचा श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे; मात्र तिनं साकारलेली सुंंदर सुंदर चित्रं बघितली तर लक्षात येतं की, चित्रकलेतली तिची इयत्ता फार वरची आहे. केवळ नऊ वर्षांच्या मुलीनं चितारलेली ही चित्रं आहेत, यावर विश्वास बसू नये एवढी जिवंत आणि रसरशीत चित्रं ऋचानं काढली आहेत.
अवघ्या तिसर्या वर्षी ऋचानं बोटात कुंचला पकडला. सुंदर सुंदर रंगांच्या रेघोट्यांनी तिला मोहून टाकलं आणि तेव्हापासून ऋचा रंगांच्या दुनियेेत मनापासून रमू लागली. तिच्या आईबाबांनी तिची चित्र काढण्याची आवड ओळखली आणि चित्रकलेचं सामान तिच्यासमोर ठेवलं. बाबांनी कॅनव्हास आणून दिला. ऋचा हरखूनच गेली. ऑईल पेस्टल, वॉटर कलर, पोस्टर कलर, चारकोल, ऍक्रॅलिक अशा विविध प्रकारांमध्ये ती स्वतःची चित्रकला खुलवू लागली. तशी जात्याच ती गुणवान पण आईने आवर्जून करून घेतलेल्या सरावामुळे आणि महालक्ष्मी पवार, बापू घावरे, स्वप्ना जोशी, सुहास पंडित, आदित्य बेगमपुरे, जयंत बेगमपुरे अशा मोठ्या कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे ऋचाच्या बोटांत सफाई आणि नजरेत समज निर्माण झाली. गेल्या सहा वर्षांत या एवढ्याशा चिमुरडीने चित्रकलेच्या क्षेत्रात घेतलेली झेप पाहिली तर आपण थक्क होतो.
ऋचाला नेहरू युवा केंद्र भारत सरकार कला आणि क्रीडा मंत्रालयाने ‘उत्कृष्ठ बालकलाकार’ म्हणून गौरविलं आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या अ. भा. चित्रकला स्पर्धेत तिला ‘सुवर्णपदक’ प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘बालश्री पुरस्कार’ आणि सुवर्णपदकाचीही ती मानकरी ठरली आहे. गुजरात राज्यातील एका सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतही तिला सुयश मिळाले आहे, तर दै. ‘केसरी’च्या चित्रकला स्पर्धेत तिने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत तिला पहिला नंबर मिळाला होता तर ‘ऍरेजमेंट इव्हेंटस् मॅनेजमेंट’तर्फे झालेल्या ‘बालमनातील चित्र’ या प्रदर्शनात तिच्या चित्रांचे जाणकारांनी कौतुक केले होते. ‘आर्ट मॅजिक’ नावाच्या संस्थेनं आयोजित केलेल्या प्रदर्शनातूनही सलग दोन वर्षं तिनं उत्साहानं भाग घेतला होता. ‘भारती ऍक्सा’च्या वतीने आयोजित स्पर्धेत तब्बल पाच हजार चित्रांतून तिच्या चित्रांची सार्थ निवड झाली होती; एवढंच नाही तर अवघ्या पाचव्या वर्षी दै. ‘पुढारी’ने तिची पाच चित्रं प्रकाशित केली होती. तसंच श्री शिवाजी स्काऊट ग्राऊंडतर्फे गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत तिने पहिला क्रमांक सोडला नव्हता. त्याशिवाय चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धेतही तिने उज्ज्वल यश प्राप्त केलं होतं.
ऋचाची चित्रं बघितली तर साधारणपणे ऋचा निसर्गचित्रांमध्ये अधिक रमते असं दिसतं. निसर्गातले सूक्ष्म तपशील ती अगदी बारकाईनं भरताना दिसते. त्यावरून तिच्या सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची कल्पना येते. तिची चित्रांची जाणही उत्तम आहे. याशिवाय मानवी चेहरे आणि मानवी आकृती काढण्यातही ती वाकबगार आहे.
चित्रकलेतील ऋचाचा सफाईदारपणा, कष्ट करण्याची तयारी आणि प्रगल्भता खरोखर वाखाणण्याजोगी आहेच परंतु शाळेच्या अभ्यासातही ती बिलकूल मागे नाही. श्री श्री रविशंकर विद्या मंदिरातील शुभांगी करवीर, स्मिता राहणे, जितेंद्र मोडवे, संदीप वानखेडे, दुर्गा मेनपुरे हे शिक्षक तिचे सतत कौतुक करत असतात, तिला प्रोत्साहन देत असतात.
खरोखर अशा शांत, समंजस, हुषार, गुणवान बाल कलावतीचं कौतुक कुणाला वाटणार नाही? ऋचाची कला दिवसेंदिवस अशीच बहरत जावो हेच तिला शुभाशीर्वाद!
- अंजली कुलकर्णी, पुणे
99220 72158
सध्या संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो तो उठतोय आणि अर्ज भरतोय. आपला साहित्याशी कसा संबंध आहे हे ठासून सांगतोय. इथून पुढे रद्दीवाले आणि बारवालेही अर्ज भरायला कमी करणार नाहीत. ते ही आपला साहित्याशी असलेला संबंध सांगतीलच. संमेलनाच्या समकालीन वास्तवावर खुशखुशीत शैलीत भाष्य करणारा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांचा हा खमंग लेख!
आज 'साहित्य चपराक' दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्यात होत आहे. मिलिंद जोशी हे आजच्या सोहळ्यातील प्रमुख वक्ते आहेत. त्यांचा या अंकातील लेख मुद्दाम देतोय. अवश्य वाचा.

साहित्यचावडी येथे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची वार्ता पसरली तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. या संमेलनाचे वेगळेपण म्हणजे मर्तिकाचे (मयतीचे) सामान विकणार्या ‘वैकुंठ साहित्य संघ’ या व्यापारी कंपनीला संमेलनाचे यजमानपद मिळाले. तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली. यांचा आणि साहित्याचा संबंध काय? असा प्रश्नही विचारला गेला; तेव्हा वैकुंठ साहित्य संघाचे संचालक डॉ. यम म्हणाले, ‘‘साहित्याशी संबंध नसताना पदाधिकारी साहित्य महामंडळावर काम करू शकतात तर आमची पात्रता त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण आम्ही अंत्यविधीचे सामान थेट विकतो. आमचा या ना त्या प्रकारे साहित्याशी संबंध आहे.’’ तेव्हा सर्वांचीच बोलती बंद झाली. महामंडळाच्या पदाधिकार्यांनी साधी नाराजीही व्यक्त केली नाही कारण डॉ. यम ही मालदार पार्टी असल्याने त्यांना दुखावले तर आपल्या फुकटेगिरीला चाप बसेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची कंत्राटे मिळणार नाहीत. तीन पानांच्या संहितेसाठी तीस हजार रूपये उकळता येणार नाहीत. म्हणून त्यांनी (फुकटचे) मूग गिळून गप्प असण्यातच धन्यता मानली. कारण समन्वयाशिवाय ‘अनन्वयाचे’ दुकान चालणार नाही, याची त्यांना खात्री होती. साहित्य संमेलनांना मिळणारी अफाट प्रसिद्धी कॅश करण्यासाठी डॉ. यम यांनी वयस्कर साहित्यिकांसाठी एक भन्नाट योजना जाहीर केली. ‘निरोपाचा क्षण जवळ आला आहे हे कळताच आम्हाला फोन करा. तुमची पुढची सगळी व्यवस्था वैकुंठ साहित्य संघातर्फे केली जाईल. तुमच्या फोटोसह बातम्या छापून आणू. मृत्युलेख प्रसिद्ध होईल याची जबाबदारी घेऊ. श्रद्धांजली सभेचे आयोजन करू. साहित्यिक इतमामात (अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत) तुमचे अंत्यसंस्कार करू. तुमच्या नावे एक स्मृती प्रतिष्ठान काढू. दरवर्षी साहित्यिकाला पुरस्कार देऊ, वगैरे, वगैरे.... या योजनेत अंत्यसंस्काराखेरीज प्रत्येक गोष्टीसाठी रेट कार्ड होते. त्यामुळे माध्यमांनी बरीच टीका वगैरे केली. तेव्हा डॉक्टर यम यांनी ‘‘तुम्ही लेखक मानधनाशिवाय लिहिता का? एकतरी गोष्ट मोफत करता का? मग आम्ही तरी मोफत का द्यावी?’’ असा सवाल उपस्थित केल्यानंतर साहित्यिकांनी हू की चू सुद्धा केलं नाही. कारण संमेलनाच्या काळात पंचतारांकित सुविधांवर गदा येण्यापेक्षा मौन राखलेलेच बरे, असा पवित्रा अनेकांनी घेतला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रत्येकाला आपण आजवर केलेल्या अतुलनीय साहित्यसेवेचे स्मरण होऊ लागले. पहिल्याच दिवशी मनोहर रद्दीवाले यांनी अर्ज दाखल केला. पत्रकारांनी त्यांना उमेदवारीमागची भूमिका विचारली तेव्हा ते म्हणाले, ‘‘नव्या साहित्याला जागा करून देण्याचे काम गेली अनेक वर्षे मी निष्ठेने करीत आलो आहे. आम्ही रद्दीचा व्यवसाय केला नसता तर साहित्य क्षेत्रात कचर्याचे ढीग लागले असते. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला असता! आजकाल पूर्वीच्या तुलनेत रद्दीचे प्रमाण कमी झाले आहे, कारण त्याकाळात लेखकांना एखादे पुस्तक किमान चारपाचवेळा तरी लिहून काढावे लागायचे. संपादकीय संस्कार करणार्या संपादकांच्या धाकामुळे ते करायचेही. कारण त्याशिवाय पुस्तकच प्रसिद्ध व्हायचे नाही. आज पैसे फेकले की प्रकाशक पुस्तक काढायला तयार होतात. त्यामुळे रद्दी तयार होत नाही. अर्थात ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बातम्या आणि परीक्षणे छापून आली की लेखकाची बायको ती पुस्तके रद्दीत घालते हा भाग वेगळा; पण सृजनाच्या रद्दीची सर निर्मितीनंतरच्या रद्दीला येत नाही. गेली पन्नास वर्षे केवळ मराठी हस्तलिखिते, मराठी पुस्तके आणि मराठी वृत्तपत्रे यांच्याच रद्दीचा व्यवसाय मी करत आलो आहे. हे माझे भाषाप्रेम आपण लक्षात घेतले पाहिजे. नव्या सृजनासाठी अवकाश निर्माण करण्याचे काम रद्दीवाले करीत आहेत. समीक्षकांनीही रद्दी साहित्याकडे दुर्लक्षच केले आणि आम्हा रद्दीवाल्यांकडेही! पण त्यांनी एक लक्षात ठेवावे. त्यांच्या ग्रंथांना नेहमी आमच्याकडेच मोठी जागा मिळालेली आहे. तेव्हा साहित्य परिसर स्वच्छ करणार्या आणि नवतेच्या स्वागतासाठी आसुसलेल्या आम्हा सर्व रद्दीवाल्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढविणार आहे.’’ त्यांची भूमिका ऐकून पत्रकारही अचंबित झाले.
एक पत्रकार धीर एकवटून म्हणाला, ‘‘आपण संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर संमेलनाच्या स्वरूपात काय बदल करणार आहात?’’
मनोहर रद्दीवाले नम्रपणे म्हणाले, ‘‘रद्दीसाहित्य ः कालचे आणि आजचे’ या विषयावर परिसंवाद घ्यायला लावणार आहोत. मराठीतल्या नामवंत समीक्षकांच्या सहकार्याने ‘रद्दी ः एक अन्वयार्थ’, ‘पुनःरद्दी’ असे ग्रंथ संपादित करणार आहोत. रद्दीवाले आणि साहित्यिकांच्या पत्नी यांच्यात सुसंवाद घडवून त्यांची घरे धूळ आणि वाळवीपासून कशी सुरक्षित राहतील याची काळजी घेणार आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठीची मतदार यादी बदलली पाहिजे असा आग्रह आम्ही धरणार आहोत. कारण त्यात रद्दी लोकांना स्थान आहे पण रद्दीवाल्यांना नाही. हा सांस्कृतिक भेद आम्ही कधीही सहन करणार नाही. आपण नेहमी साहित्य संस्थेच्या पदाधिकार्यांना नावे ठेवतो. फुकटे म्हणून त्यांचा उल्लेख करतो. त्यांना इतर काही कामे नसल्यामुळे ते आपला वेळ संस्थेसाठी देतात हे खरे असले तरी वेळ देतात ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा सन्मान आमच्या संघटनेतर्फे केला जाईल. साहित्यिकांची आपण ग्रंथतुला करतो आणि ते ग्रंथ आपण एखाद्या ग्रंथालयाला भेट म्हणून देतो. आम्ही पदाधिकार्यांची रद्दीतुला करणार आहोत आणि त्यांच्या वजनाएवढी रद्दी विकून ते पैसे त्यांनाच देणार आहोत.’’
त्यावर जनमान्य जनशक्ती या वृत्तपत्राचा पत्रकार खोचकपणे म्हणाला, ‘‘अशा उपक्रमांतून संमेलन ‘अर्थपूर्ण’ करण्याचा आपला मानस आहे का?’’ त्यावर मनोहर रद्दीवाले म्हणाले, ‘‘संमेलनातून ‘अर्थ’वजा केला तर संमेलनाला पूर्णत्व येईल का? या अर्थाचा अनर्थ करण्याची सवयच तुम्हा मंडळींना लागली आहे.’’
‘‘आणखी कोणता अभिनव उपक्रम करणार आहात?’’ या पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता मनोहरपंत म्हणाले, ‘‘भाषा भवनाप्रमाणेच रद्दी भवनाच्या उभारणीसाठी मी पुढाकार घेईन. त्याशिवाय नवतेच्या प्रतिष्ठेची सद्दी निर्माण होणार नाही.’’
रद्दीवाल्यांच्या संघटनेचे मनोहर रद्दीवाले यांची वाङमयीन आणि वैचारिक बैठक पाहून पत्रकार आवाक झाले.
रद्दीवाले अर्ज भरून बाहेर पडणार एवढ्यात त्यांना निवडणूक अधिकार्यांनी बोलावून घेतले. अर्जात काही चूक तर राहिली नाही ना? असा प्रश्न रद्दीवाल्यांना पडला. तेव्हा निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘अर्ज भरल्यानंतर मी प्रत्येक उमेदवाराला खडीसाखर देतो. ती देतानाचा फोटो मग आम्ही वृत्तपत्राकडे पाठवतो. कारण अलीकडे अर्ज स्वीकार करतानाचे वगैरे फोटो ते छापत नाहीत... त्यांना ऑफ बीट फोटो लागतात ना! आम्ही निवडणुकीच्या काळात मरमर काम करायचे, आमचा फोटो नको का छापून यायला?’’
रद्दीवाल्यांना अधिकार्यांची दया आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही उमेदवार सारखे फोटोत झळकत असतो. प्रसिद्घी तर इतकी मिळते की विचारूच नका. निवडणूक लागल्यापासून ती संपेपर्यंत आलेल्या बातम्यांचा कॉलम सेंटीमिटरच्या जाहिरातीच्या स्वरूपात विचार केला तर काही कोटींची प्रसिद्धी मिळते आम्हाला. तुम्हाला तर मिळालीच पाहिजे. पण खडीसाखरेऐवजी पेढा ठेवला असता तर?’’
निवडणूक अधिकारी हताशपणे म्हणाले, ‘‘बजेटमध्ये नाही ना बसत!’’
त्यावर रद्दीवाले म्हणाले, ‘‘स्पॉन्सर बघा ना एखादा!’’
निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘नको हो, त्यामुळे पदाधिकार्यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर गदा येते. एकवेळ लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार नाही झाला तरी चालेल पण पदाधिकार्यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर मात्र घाला येता कामा नये अशी आमची भूमिका आहे.’’
निवडणूक अधिकार्यांनी रद्दीवाल्यांना खडीसाखर घालताना मस्त पोज दिली. कॅमेर्यांचा लखलखाट झाला. रद्दीवाले खूश झाले. पत्रकारांनी काढता पाय घेतला. रद्दीवालेही त्यांच्या दुकानात गेले.
दुसर्या दिवशी चार वाजता पेगेन बारवाला संमेलनाध्यक्ष पदासाठी अर्ज भरतात हे समजताच एकच खळबळ उडाली. पेगेन बारवाला यांचा स्वतःच्या मालकीचा बार असला तरी ‘मद्यार्क निर्मिती-व्यवसायाच्या नव्या वाटा’, ‘मद्यालयातील आचारसंहिता’ यासारखी त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली होती. त्यांच्या ‘मद्यधुंद’ या कादंबरीला सर्व नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळालेले होते. ‘मी आज मद्य प्याले’ या त्यांच्या कवितासंग्रहावर वाङमय चौर्याचा आरोप झाल्यामुळे तो बराच गाजला होता. पेगेन बारवाला यांची ख्याती होती ती त्यांच्या बारमध्ये त्यांनी साहित्यिकांसाठी केलेल्या स्वतंत्र दालनामुळे. आजवर अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित साहित्यिकांनी त्यांच्या बारमध्ये हजेरी लावून सवलतींचा लाभ घेतला होता. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी ममत्त्व वाटत होते.
ते अर्ज भरण्यासाठी कार्यालयात आले तेव्हा त्यांचे सूचक आणि अनुमोदक त्यांच्या आदरातिथ्याचा आणि तीर्थाचा लाभ घेऊन आल्यामुळे डोलत होते. ललित साहित्याच्या भाषेत सांगायचे तर त्यांची प्रतितिविक्षांनी सुरू होती. त्यांच्या आरक्त डोळ्यात निवडणुकींचीच धुंदी होती.
पेगेन बारवालांनी आपला अर्ज अधिकार्यांकडे सुपूर्त केला. नेहमीप्रमाणे खडीसाखर खाऊ घालण्याचा कार्यक्रम झाला. फोटो निघाले. पत्रकार परिषद सुरू झाली.
‘‘आपला आणि साहित्याचा संबंध काय? आपण ही निवडणूक का लढवित आहात?’’ पत्रकारांनी विचारले.
पेगेन बारवाला म्हणाले, ‘‘केवळ ललित साहित्यालाच साहित्य म्हणण्याची जी चुकीची प्रथा पडली आहे ती बदलण्याची गरज आहे. मद्य साहित्य हेही एक प्रकारचे साहित्यच आहे. तेच आद्य साहित्य आहे. हेच मी संमेलनाच्या व्यासपीठावरून सांगणार आहे. मद्य हे केवळ आद्य साहित्य नाही तर सद्य साहित्य आहे. एकाअर्थाने ते समकालीन आहे. स्फूर्तिची अभिव्यक्ती हेच साहित्याचे प्रयोजन आहे. त्या साहित्यिकाची मती गुंुग करून त्याच्या निर्मितीची गती वाढविण्याची स्थिती निर्माण करणे हे काम मद्य साहित्याने आदीम काळापासून केलेले आहे. साहित्य निर्मितीत दोन प्रेरणा महत्त्वाच्या असतात. एक आतली आणि दुसरी बाहेरची. आतल्या प्रेरणेला बाहेर आणण्यासाठी बाहेरून एका प्रेरणेचे अंतर्गमन आवश्यक आहे. माझ्या ‘प्रेरणेचा सिद्धांत’ या ग्रंथात त्याचे मी साधार विवेचन केलेले आहे. ‘अंतःप्रेरणा आणि बाह्यप्रेरणा ः मद्याच्या साक्षीने - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर माझ्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी पीएचडीही करीत आहे. साधे कथेचे उदाहरण घ्या. आम्ही नेहमी सांगतो, कथेत ‘कलाद्रव्य’ आणि ‘कथाद्रव्य’ असले पाहिजे. तरच ती कथा ताकतीची होते. या दोन्ही शब्दप्रयोगात आस्वादक समीक्षकांनी ‘द्रव्य’ या गोष्टीला तितकेच महत्त्व दिले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. एखाद्या साहित्य प्रकारामागची तात्त्विक भूमिका समजाऊन न घेता त्या साहित्य प्रकाराला निकालात काढणे हा वाङमयीन दहशतवादच आहे. तो आम्ही कधीही सहन करणार नाही.’’
पेगेन बारवालांच्या सूचक आणि अनुमोदकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी काहीही बरळू नये यासाठी त्यांनी त्यांना वाईनची चॉकलेट दिली. ती खाताच ‘ग्लानी येणे’ या वाक्प्रचाराची अनुभूती त्यांनी घेतली.
पत्रकारांना पेगेन बारवालाची भूमिका पटत नव्हती. एक पत्रकार त्यांना म्हणाला, ‘‘आपण एकदम मोठ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच उभे राहता आहात! विभागीय संमेलनातून सर्वांची एकप्रकारची मनोभूमिका तयार करून मगच आपण या निवडणुकीत उतरायला हवे होते असे वाटत नाही का?’’
त्यावर बारवाला म्हणाले, ‘‘मद्य आणि साहित्य यात हाच मूलभूत फरक आहे. मद्य प्राशन करताना सतत आपल्या मर्यादांचे भान ठेवावे लागते. साहित्यात ते ठेवण्याची गरज नसते. बेभान झाल्याशिवाय साहित्यनिर्मिती करता येत नाही. आजच्या काळात प्रत्येक लेखकाने आपल्या मर्यादेचे भान ठेवायचे ठरवले तर संमेलने अध्यक्षांशिवायच पार पाडावी लागतील. आपली मर्यादा माहीत असूनही लोक या निवडणुकीत उतरतात. म्हणूनच गंमत आहे.’’
तात्त्विक विवेचनात पेगेन बारवाला कुठेच कमी पडत नाहीत हे पत्रकारांच्या लक्षात आले.
‘‘आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण कोणता मुद्दा मांडणार आहात?’’
‘‘मित्रहो, जागतिकीकरणाने आपल्या जगण्याचे वैराण वाळवंट करून टाकले आहे. आपल्या मुळांपासून आपण तुटत चाललो आहोत. रूटस् नष्ट होणं म्हणजे संस्कृतीच्या मुळावरच घाव आहे असं मी मानतो. माझ्या अध्यक्षीय भाषणात या ‘मुळांविषयी’ मी मूलभूत विचार मांडणार आहे.’’
‘‘आपल्याकडे साहित्यिकाचे साहित्यिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात कारण नसताना गल्लत केली जाते. वैयक्तिकांकडून विश्वात्मकाकडे पाहता आले पाहिजे. मी या संमेनाध्यक्षपदासाठी उभा आहे तो साहित्यिक आणि साहित्यिक कार्यकर्ता म्हणून. मी निर्माण केलेली ‘मद्यसाहित्य’संपदा आपण वाचलीच आहे. मराठी साहित्यात हा नवा प्रवाह आणण्याचे श्रेय मलाच आहे.
साहित्यिक कार्यकर्ता या नात्याने सर्जनाच्या मुळाशी माझा जवळचा संबंध आहे. माझा स्वतःच्या मालकीचा बार आहे, हे आपण जाणताच. लोक जाहीरपणे त्याचा उल्लेख टाळतात पण बरेच विचारवंत, लेखक जाहीर कार्यक्रम संपला की आमच्याच बारमध्ये येतात. त्यांची सार्वजनिक कुचंबना होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे. थोडेसे रसपान झाले की या प्रतिभावंतांना भन्नाट कल्पना सूचतात. त्या कल्पना सूचण्याची प्रक्रिया इथेच घडते. सर्जनाचा कोंब इथेच फुटतो. अनेक थोर साहित्यिकांना त्यांच्या कादंबर्यांची, कथांची, नाटकांची बीजं इथंच सूचलेली आहेत. त्या सर्जनाच्या मुळाशी आमच्या बारचा जवळचा संबंध आहे. प्रसिद्ध समीक्षक वा. ह. भरकटू यांनी ‘मद्यस्थान माहात्म्य’ या ग्रंथात त्यासंबंधीचे अर्थपूर्ण विवेचन केलेले आहे. मी एका अर्थाने साहित्यिक आहे. बारच्या माध्यमातून मी साहित्य आणि साहित्यिकांची सेवा करीत आहे. त्यामुळे मी साहित्यिक कार्यकर्ता आहे आणि मुख्य म्हणजे साहित्यनिर्मितीच्या उगमाशी माझा थेट संबंध आहे. हा त्रिविध अन्योन्य संबंध विचारात घेऊन मतदार मला निवडूण देतील याची मला खात्री आहे.’’
पेगेन बारवालांचे चिरेबंदी विवेचन ऐकून सर्वांचीच बोलती बंद झाली. साहित्य आणि साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, सर्जनाची उगमस्थानं याविषयीचं इतकं साधार व्याख्यान यापूर्वी कोणीच ऐकलं नव्हतं.
तेवढ्यात कार्यालयातला फोन वाजला. सेवकाने तो उचलला.
‘‘कोण बोलताय?’’ सेवकाने विचारले.
‘‘मी हॉटेल एकांतचा मालक बोलतोय. प्रा. सतत प्रकरणे.’’
‘‘काय काम आहे आपलं?’’
‘‘मी संमेलनाध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यासाठी उद्या येतोय. उद्या किती वाजेपर्यंत मुदत आहे?’’
‘‘पाच वाजेपर्यंत’’ सेवकाने त्याला सांगितले.
कार्यालयातील सेवकाने ही वार्ता सर्व पत्रकारांना सांगितली तेव्हा सर्वांना चक्कर यायचीच बाकी होती. ‘हॉटेल आणि साहित्यिक’, ‘हॉटेल आणि साहित्य निर्मिती’ यासंदर्भातले कोणते विवेचन ऐकायला मिळणार आहे, या विचारांचा भोंगा सर्वांचीच डोकी पोखरत होता. एका नवोदित पत्रकाराला चक्कर आली. सर्वांनी त्याच्या नाकाला कांदा लावला. शुद्धीवर आल्यानंतर अधिकार्यांनी त्याच्या तोंडात खडीसाखर घातली. साखर गोड असूनही संमेलनाचे समकालीन वास्तव पाहून त्याने तोंड कच्चे कारले खाल्ल्याप्रमाणे कडू केले.
- प्रा. मिलिंद जोशी
९८५०२७०८२३