Sunday, October 4, 2015

साहित्य परिषदेला अध्यक्षांकडूनच चपराक

डॉ. प्र. चिं. शेजवलकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद)
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत राजकारण, कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांचा गैरव्यवहार आणि समन्वयाचा अभाव यामुळे साहित्य परिषद म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे. सातत्याने भ्रष्टाचार उघडकीस येऊनही कार्याध्यक्ष वैद्यबाई चुकीचे राजकारण करत असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष कसा दबाव आणतात हेही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले. तसेच म.सा.प. चे साहित्य विषयक धोरण कसे असावे याबद्दलही त्यांनी आपले विचार परखडपणे व्यक्त केले. डॉ. शेजवलकर यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी देत आहोत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आदरणीय विश्‍वस्त आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर नितांत प्रेम करणारे माननीय सदस्य मित्रहो,
माझा अध्यक्षीय पदाचा कार्यकाल सुमारे सहा महिन्यांनी संपणार असल्यामुळे आणि त्याआधीची होणारी वार्षिक सभा माझ्या कार्यकाळात शेवटची असल्यामुळे मनात केलेले प्रकट चिंतन आपल्यापुढे सादर करीत आहे. हे करताना कोणत्याही व्यक्तिवर टीका करणे माझ्या स्वभावाला धरून नाही. आज मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर निवेदन करताना मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही. मात्र गेल्या काही दिवसात अनेक सदस्य मला भेटले आणि काहींनी मला पत्रेही पाठवली. त्यांच्याकडून कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी गेल्या चार वर्षातला त्यांनी केलेला कारभार पाहता त्यांच्यामुळे म.सा.प.ची प्रचंड बदनामी झाली आहे. त्यामुळे परिषदेच्या सत्कीर्तीस प्रचंड हानी पोहोचली आहे. त्यांचा महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून  असलेला कारभारसुद्धा अत्यंत आक्रस्ताळेपणाचा आणि हटवादी आहे असे माझ्या कानावर आलेले आहे. घुमान आणि अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात जे गैरप्रकार झाले त्यालाही महामंडळाच्या अध्यक्षा याच जबाबदार आहेत असे मला वाटते.
गेल्या चार वर्षात अध्यक्ष म्हणून मला आलेला अनुभव हा देखील अतिशय क्लेषदायक आहे. आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सध्याच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष ही  फक्त मानाची जागा असून अंतर्गत धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर कार्याध्यक्षांनी लगेचच सांगितले. खरे म्हणजे त्यांचे सांगणे योग्य नव्हते. हे मलाही आणि इतरांनाही पटलेले नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभाराबद्दल लक्ष घालणे हे अध्यक्षांच्या अधिकारात असते. जेव्हा जेव्हा अनेक सदस्यांकडून कार्याध्यक्षांबद्दल प्रचंड नाराजी असलेल्या तक्रारी माझ्याकडे येऊ लागल्या तेव्हा आपण स्वतः त्यात लक्ष घालावे असे मला वाटू लागले. माझ्या आधीचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी एकच वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘‘विद्यमान कार्याध्यक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे अतिशय उबग येऊन मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला’’ असे मला मिरासदार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मी फारसे लक्ष न घातल्यामुळे कार्याध्यक्षांनी मनमानी कारभार सुरू केला. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात मलाही उदामपणा आणि अहंकार जाणवला. त्यातच त्यांनी जे गैरप्रकार केले त्याबद्दल काही सदस्य जे बोलले त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेला कारभारसुद्धा अतिशय चुकीचा आणि धक्कादायक होता. सासवड आणि घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी त्यांनी छोटीशी संहिता लिहिल्याबद्दल भरपूर मानधन घेतले असे माझ्या कानावर आले आणि माझ्या मते ही त्यांनी केलेली अक्षम्य अशी चूक होती. चॅरिटी कमिशनर यांच्याकडून त्यांना चारवेळा नोटीस येऊनदेखील त्यांनी कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्यांना चॅरिटी कमिशनरने पाच हजार रूपयांचा दंड केला. त्यांनी आणि सुनील महाजन यांनी चेकवर सह्या करून रोख पैसे काढले आणि ते संस्थेतर्फे भरले हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवावे. कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनीही दोन्ही संमेलनाच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे भरपूर पैसे घेतले असे मला सांगण्यात आले. या संबंधीचे पत्रही माझ्याकडे आले आहे. पदाधिकार्‍यांनी लाभार्थी होणे योग्य नाही. कार्याध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांपैकी डॉ. श्रीपाल सबनीस या एका उमेदवारासाठी जाहीर प्रशस्ती दिली. हेसुध्दा योग्य झाले नाही. शरणकुमार लिंबाळे अध्यक्षीय उमेदवारीकरता फॉर्म भरावयास आले तेव्हा ‘तुमचे नाव यादीतच नाही’ असे कार्याध्यक्ष म्हणाल्या. त्यांनी जेव्हा पैसे भरल्याची पावती दाखवली तेव्हा कार्याध्यक्षांनी चूक मान्य केली. अनेकांनी माझ्याकडे अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या. माननीय सदस्यांची अपेक्षा मात्र अध्यक्षांनी क्रियाशील रहावे असे वाटल्यामुळे ते मला अनेक प्रकारच्या सूचना करीत असतात. त्या जशाच्या तशा अमलात आणणे माझ्या हातात नसते. महामंडळावरसुद्धा आमच्यापैकी कोणी जावे या संबधीची धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर लगेचच सांगण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या कार्यात अध्यक्षांना, म्हणजे मला, सहभागी होता आले नाही. महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व आवश्यक आहे का, याबाबत अनेक सदस्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. महामंडळाच्या ऐवजी त्या त्या घटक संस्थेतील सर्व पदाधिकार्‍यांनी कामकाज बघावे असे अनेक सदस्यांना वाटते. त्यात कार्यकारिणीच्या तीन सदस्यांनी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिकांपैकी दोन साहित्यिकांना स्वीकृत करून व्यापक स्थानिक समिती स्थापन करावी आणि या समितीने साहित्य संमेलने आयोजित करावीत असे अनेकांना वाटते. सध्या ज्या पद्धतीने पदाधिकारी निवडले जातात त्यामध्ये कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांची निवड थेट सदस्य करतात. अध्यक्षांची निवड मात्र कार्यकारिणी तर्फे केली जाते. त्यामुळे अध्यक्ष म्हणजे एक ’अडगळ’ आहे असेच कार्याध्यक्षांना वाटत आले असावे. कधी कधी तर अध्यक्ष म्हणजे ’असून अडचण आणि नसून खोळंबा’ असे वाटण्या इतपत आपण तेथे  आहोत अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. कारण गेल्या चार वर्षात कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष काय व्यवहार करतात ते मला कधीही सांगण्यात आले नाही. मी शक्यतोवर परिषदेत येऊच नये असेच कार्याध्यक्षांच्या मनात असावे. परिषदेतील जाहीर कार्यक्रमांनादेखील कार्याध्यक्षाच अध्यक्ष म्हणून बसत. डॉ. सदानंद मोरे यांच्या सत्काराच्या वेळी मी आपणहून गेलो होतो तेवढेच. माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा आपण स्वतः कोणकोणत्या गोष्टी कराव्यात यासंबधी मी काही योजना मनात मांडल्या होत्या. मात्र त्या मला अमलात आणता आल्या नाहीत. उदा. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा मराठी शाळांची अवस्था केविलवाणी झाली आहे आणि त्यामध्ये शासनाने सुधारणा करावी म्हणून साहित्य परिषदेने जोरात प्रयत्न करावा असे मला नेहमी वाटत आले आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी या दृष्टीने प्रकाशकांनी ललित वाङ्मयांखेरीज इतर विद्याशाखातील विषयांची पुस्तके मराठीत प्रसिद्ध करावीत असे माझे मत आहे. महाविद्यालयीन तरूणांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आकर्षित व्हावे यासाठी त्यांच्याकरता परिषदेने विशेष कार्यक्रम आयोजित करावेत म्हणजे नव्या पिढीचा मराठी साहित्य वाचण्याकडे ओढा राहील. अन्यथा आजच्या तरूण मुलांचे, सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलचा वापर खूप वाढल्यामुळे, मराठी वाचन एकदम कमी झाले आहे. ज्या दिवशी तरूणांची हॉटेलकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल. समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आजचे साहित्य अनेकदा घाईघाईत लिहिले जाते. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रे गंजत चालली आहेत. त्यांची धार बोथट झाली आहे. कन्नडमधील भैरप्पांच्या कादंबर्‍यांवर मराठीत उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादीत पुस्तके खपतात. मात्र आपल्याकडील मराठी साहित्य त्याप्रमाणात खपत नाहीत. महाराष्ट्रात एकही प्रकाशक एकाही लेखकाच्या कादंबरीची दहा हजाराची आवृत्ती प्रकाशित करू शकत नाही याचा विचार साहित्य परिषदेने केला पाहिजे. पण याही बाबतीत कार्याध्यक्षांनी मला काहीही करू दिले नाही.

सध्याचा जीवन कलह खूप वाढल्यामुळे आणि अनेकांची घरे यांच्या कचेर्‍यांपासून लांब असल्यामुळे ते घरी आल्यावर थकून जातात आणि मग त्यांचे वाचनच होत नाही. यावर काही उपाय सुचतात का याचा परिषदेने विचार करायला हवा. हल्ली मराठीतील अनेक मालिकांमध्ये वापरली जाणारी भाषा अशुद्ध असते. यावर देखील साहित्य परिषदेने अंकुश ठेवणे मला गरजेचे वाटते. साहित्य प्राज्ञ आणि साहित्य विशारद या परीक्षांकडे तरूणांचा ओढा कसा वाढेल यासाठी साहित्य परिषदेने महाविद्यालयात जाऊन या परीक्षा लोकप्रिय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्याध्यक्षांनी याबाबतीत काहीही केले नाही. याचा विचार कार्याध्यक्षांच्या मनात का आलेला नाही याचे मला आश्‍चर्य वाटत आहे. म्हणून ज्येष्ठ साहित्यिकांचे एक सल्लागार मंडळ कार्यकारिणीनेे स्थापन करावे आणि त्यांचे मार्गदर्शन गंभीरपणे विचारात घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी इतरांचाही सल्ला घेऊन आपले धोरण अमलात आणावे. मराठी समाजाला अंतर्गत दुहीचा एक प्रकारचा शाप मिळालेला आहे. तो कमी होण्यासाठी विविध स्तरातील लोकांना साहित्य परिषदेकडे आकर्षित केले पाहिजे. आता दलित समाजातील अनेक नवे लेखक आणि कवी नावारूपाला आले आहेत. याचप्रमाणे श्रमिक वर्गातही अनेक साहित्यिक आहेत. त्यांचा सहभाग आपण वाढवायला हवा. या बाबतीतही कार्याध्यक्षांनी माझी मते कधीही जाणून घेतली नाहीत.
माझ्या कार्यकाळात प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा प्रमुख कार्यवाह पदाचा राजीनामा ही एक दुर्दैवी घटना घडली याचे मला फार वाईट वाटले. मिलिंद जोशी हे प्रसिद्ध साहित्यिक, उत्तम वक्ते आणि  प्रशासकीय जाण असलेले प्राध्यापक आहेत. त्यांचा सहभाग परिषदेला उपयोगी पडला असता. त्यांनी पुढील निवडणुकीनंतर साहित्य परिषदेत पुन्हा पदार्पण करावे असे मला मनापासून वाटते. कोणाशीही दीर्घकाळ  दुरावा ठेऊ नये, हे मी यशस्वी नेतृत्व करणार्‍या अनेकांपासून शिकलो.  स्वामी विवेकानंद, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे जे काही माझ्या वाट्याला काम आले ते मानसिक ताण न ठेवता प्रसन्न मनाने जेवढे करता येईल तेवढे करावे अशीच माझी धारणा आहे. त्यामुळेच इतर सामाजिक संस्थांमध्ये आणि पुणे विद्यापीठातही बिनविरोध निवडून येऊन आणि सगळ्यांची मने जिंकून मला काम करता आले. त्या मानाने महाराष्ट्र साहित्य परिषदेत मला स्वतःला अपेक्षित असलेले माझे योगदान मला नीट करू देता आले नाही. कारण येथेही कार्याध्यक्षांनी मला जाणूनबूजून एखाद्या खड्यासारखे दूर ठेवले. सर्वांची नाराजी पत्करून कार्याध्यक्षांनी गैरकारभार करीत राहणे कितपत योग्य आहे याचा त्यांनी स्वतः विचार करावा असे मला वाटते. काहीजण डॉ. माधवी वैद्य यांच्याविरूध्द अविश्‍वासाचा ठरावही मांडणार होते; पण त्यासाठी पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागते. डॉ. माधवी वैद्य यांनीच आता सदस्यांचा आणि अध्यक्षांचा विश्‍वास बसण्यावर आपण पात्र आहोत का याचा विचार केला पाहिजे. कार्याध्यक्षपदी खरे म्हणजे नामवंत साहित्यिक असावा पण तसे झालेले नाही.
सध्याच्या कार्याध्यक्षांचे साहित्यिक योगदान नगण्य आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते. मंगला गोडबोले, अच्चुत गोडबोले, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. अरूणा ढेरे ही व अशी नामवंत साहित्यिक मंडळी कार्याध्यक्षपदी शोभून दिसली असती. गेल्या वर्षभरात विश्‍वस्तांची एकही सभा बोलावण्यात आली नाही. विश्‍वस्तांची सभा  घेण्यासंबधी कोषाध्यक्षांनी मला एक पत्र लिहिले होते. मी त्यांना तारखाही दिल्या होत्या पण पुढे काय झाले हे मलाही कळले नाही. असो.
1953 मध्ये, म्हणजे 62 वर्षांपूर्वी, त्यावेळी माझे निवासस्थान साहित्य परिषदेच्या जवळ असल्यामुळे, मी नियमितपणे वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याकरता परिषदेत येत होतो आणि परिषदेच्या त्यावेळच्या सर्व  कार्यक्रमांना उपस्थित राहत होतो, तसेच 1956 मध्ये म्हणजे एकोणसाठ वर्षांपूर्वी मी कै. गं. भा. निरंतर यांच्या प्रेरणेने आणि कै. म. श्री. दीक्षित यांच्या पाठींब्यामुळे साहित्य परिषदेच्या परीक्षा दिल्या, त्याच साहित्य परिषदेमध्ये आपण सर्वांनी मला अध्यक्षपदी नियुक्त केले याची कृतज्ञतेने मला आज आठवण येत आहे. मराठी हा माझा आवडता विषय असल्यामुळे मी तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेला दैवत मानत आलेलो आहे. 

(साप्ताहिक 'चपराक', ५ ऑक्टोबर २०१५)


Saturday, October 3, 2015

वादळी जीवनाची कहाणी!

प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे 160, मूल्य 175 रुपये
संपर्क 020-24460909/7057292092
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विविधांगी आणि विविधरंगी जीवनपट उलगडून दाखविणारा बाळासाहेब एक अंगार हा एक आगळावेगळा चरित्रग्रंथ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी नुकताच वाचकांसाठी आणला आहे. कादंबरी, ललितलेखन, नाट्य, कथालेखन आणि चरित्रलेखन इत्यादी साहित्यप्रकार सारख्याच ताकदीने हाताळणारे नागेश शेवाळकर यांनी सिद्ध केलेला बाळासाहेब एक अंगार हा तिसरा चरित्रग्रंथ. या आधी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि नामवंत साहित्यिक तथा फर्डे वक्ते आदरणीय राम शेवाळकर यांच्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
चरित्रलेखन करताना लेखकाला बरीच पथ्ये पाळावी लागतात. तसेच काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. विशेषत: एखाद्या महान व्यक्तिसंबंधी लिहताना तर खूपच जागरूक राहावे लागते. शब्दांचा वापर करताना जसे तारतम्य बाळगावे लागते तसेच संदर्भग्रंथातील मते, घटना आपल्या पुस्तकात समाविष्ट करताना मूळ ग्रंथातला आशय न बदलता तो विषय स्वत:च्या शब्दांमध्ये मांडण्याची कसरत लेखकाला करावी लागते. त्यासाठी तशी हातोटी लेखकापाशी असावी लागते. या सर्व गोष्टींचे भान नागेश शेवाळकर यांनी पुरेपूर बाळगलेले आहे, याची प्रचिती वाचकास हे पुस्तक वाचल्यानंतर येते. इतकेच नव्हे तर लेखक या सर्व बाबतीमध्ये सजग असल्याचे वाचकास सुरुवातीलाच लेखकाचे मनोगत-ज्याला त्यांनी ’अक्षरांजली’ असा समर्पक शब्द योजला आहे-वाचताना कळते.
बाळासाहेबांसारख्या अष्टपैलू आणि हिमालयाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे म्हणजे कुणासाठीही शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड काम आहे. पण शेवाळकरांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये लिहिलेले हे चरित्र वाचकाला खिळवून ठेवते हे मात्र नक्की.
समीर नेर्लेकर यांनी या चरित्रग्रंथाच्या विषयाला साजेसे असे सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. तसेच पुस्तकाच्या मलपृष्ठावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक महेश मांगले यांनी यथोचित भाष्य केलेले आहे. पुस्तकाचे बाह्यरंग जेवढे आकर्षक आहेत तेवढेच अंतरंगदेखील शेवाळकरांच्या लेखनशैलीमुळे वाचनीय आणि मननीय झाले आहे. लेखकाने या पुस्तकाची सुरुवात ठाकरे घराण्याच्या इतिहासापासून केलेली असून शेवट बाळासाहेबांच्या ’विचार संजीवनीने’ केला आहे. बाळासाहेबांची ही विचार संजीवनी तर नुसती प्रेरणादायी आहे असे नव्हे तर निडरपणे कसे जगावे याचा आपणा सर्वांना दिलेला तो कानमंत्रच आहे.
ठाकरे घराणे म्हणजे उच्च प्रतीचे देशप्रेम, समाजसेवा, निरपेक्ष भावना, त्यागवृत्ती, निर्भयता, धाडस, कणखरपणा, प्रामाणिकता इत्यादी भावनांनी ओतप्रोत असलेले घराणे आहे याची वाचकास सुरुवातीलाच ओळख होते. लेखकाने मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे, बाळासाहेब त्यांच्या पिताश्रीसाठी बाळ होते, आईसाहेबांचा जीव तर मॉंसाहेबांचे सर्वस्व होते. ते कुटुंबाचे भाग्यविधाते, मुंबईकरांचे देवदूत, मित्रांचे मित्र तर लबाड विरोधकांचे कर्दनकाळ आणि शिवसैनिकांचे दैवत होते. इतके सारे असूनही ते गर्दीतले नेते होते आणि म्हणूनच माणूस, नव्हे देवमाणूसच होते. लोकांनी त्यांना प्रेमापोटी किती उपाध्या दिल्या याची तर गणतीही होणार नाही. हिंदुहृदयसम्राट, लोकनेता, महानायक, सेनापती, रेषाप्रभू, ढाण्या वाघ, शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, युगपुरुष, युगप्रवर्तक, श्रीमंत योगी, दैवी पुरुष, क्रांतिकारक, कट्टर राष्ट्रभक्त या आणि अशा अनेक उपाध्या त्यांना लोकांनी दिल्या होत्या. पण ते वारंवार सांगत की, मी सर्वात आधी एक शिवसैनिक आहे.
बाळासाहेबांचे पिताश्री केशवराव ठाकरे उपाख्य दादासाहेब यांनी सामाजिक बांधिलकी, समाज सुधारणा याविषयीचे स्वत:चे विचार मांडून समाजाचे प्रबोधन करता यावे यासाठी ’प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू केले. हे पाक्षिक, त्यातील सडेतोड विचार आणि अपार देशप्रेम यामुळे कमालीचे लोकप्रिय झाले. तेव्हापासून केशवराव ठाकरे हे ’प्रबोधनकार’ या नावाने सर्वांना परिचित झाले.
कणखरपणा, बाणेदारपणा आणि सडेतोड वृत्ती ही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली देणगी होती. प्रबोधनकारांनी स्वत:चे विचार बाळासाहेबांवर कधीच लादले नाहीत. बाळासाहेबांनी संगीतात रुची दाखवावी असे त्यांना वाटत असताना बाळासाहेबांचा व्यंग्यचित्रांकडे असलेला कल बघून त्यांनी बाळासाहेबांना व्यंग्यचित्रांसाठी प्रोत्साहन दिले. या सर्व गोष्टी लेखकाने अगदी सविस्तर या पुस्तकामध्ये वर्णिल्या आहेत.
‘मार्मिक’ या व्यंग्यचित्र साप्ताहिकाची सुरुवात असो की शिवसेनेच्या जन्माची गोष्ट असो, बाळासाहेबांचे वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसाला जागे करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले. मार्मिक आणि बाळासाहेब यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचंड प्रमाणात एकत्र येणार्‍या तरुणांचे संघटन करण्याची योजना प्रबोधनकारांच्या मनात कशी आकार घेऊ लागली आणि त्यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म कसा झाला याचे अत्यंत सुंदर वर्णन आपणास या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये बाळासाहेबांनी नुसते महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले  नाही तर शिवसेनेला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचविले. त्यांचा हा सर्व प्रवास, तसेच दैनिक सामना हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या अग्रलेखांमधून व्यक्त होणारे त्यांचे ज्वलंत आणि परखड विचार या सार्‍यांचा परामर्श लेखकाने अत्यंत सविस्तरपणे या पुस्तकामध्ये घेतला आहे.
बाळासाहेबांच्या राजकीय तसेच खासगी जीवनातील अनेक चढउतार या पुस्तकात वाचायला मिळतात. सार्वजनिक जीवनामध्ये वाघाचे काळीज घेऊन वावरणारे बाळासाहेब, मॉंसाहेबांच्या अंतिम श्वासाच्या वेळी किती हतबल, किती अगतिक आणि किती हळवे झाले हे वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत आणि शेवटी बाळासाहेबांचे जाणे. ते तर आपल्या मनाला चटका लावून जाते. पण त्यांच्या जाण्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना कशी जोरदारपणे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या हितासाठी जात आहेच याचेही छान वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूणच, हे पुस्तक म्हणजे नुसते बाळासाहेबांचे चरित्र नसून त्यांच्या वादळी जीवनावरील एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरावा.

(मासिक साहित्य चपराक, ऑक्टोबर २०१५)
- उद्धव भयवाळ
19, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड, शहानूरवाडी संभाजीनगर
मोबाईल: 88889 25488

Friday, October 2, 2015

अशी माणसं! असे ऋणानुबंध!!

डावीकडून तुषार उथळे पाटील, कवी माधव गिर, 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील, सुप्रसिद्ध लेखक सदानंद भणगे, महादेव कोरे, महेश मांगले आणि डॉ. देवदत्त केतकर.
हात उंचच उंच करून मुंग्या आणायला मला फार आवडतं
आणि मग आपल्याच शरीरापासून दूर झालेला
आपलाच हात पाहून फार गंमत वाटते
अगदी सेन्सेशनलेस
असं डोक्याचं असतं तर फार बरं झालं असतं
फार वर काढलं असतं मी डोकं
आपल्या समाजात दारू न पिता
डोक्यात मुंग्या आणता आल्या असत्या ना
तर जग पोखरून काढण्याची ताकत आहे आमच्यात


त्या साठीतल्या जिंदादिल कवीनं या काव्यपंक्ती म्हटल्या व आम्हीही दाद देऊन मोकळे झालो. त्या कवीचं नाव सदानंद भणगे. खरंतर कवितांची त्याची ती खूप जूनी डायरी. त्याचं ते वयच कॉलेजमधलं. मग या डायरीत त्याच काळात तो कविता लिहू लागला. सुंदर कविता लिहून काढल्या. मग एका टप्प्यावर कविता थांबल्या. बँक ऑफ महाराष्ट्रमधली नोकरी व इतर गद्य व नाट्यलेखन. त्यामुळं कवितांच्या जगात पुन्हा जाता आलं नाही त्याला. मग ती डायरी? ती मात्र त्यानं जपून ठेवली. अगदी तळहाताच्या फोडासारखी. खूप काळानंतर त्यानं ती हातात घेतली परवा. मग आम्हीही उत्सुकतेनं ऐकत राहिलो व तोही ऐकवत राहिला. सौ. क्षमा भणगे होत्याच तिथं. त्यांच्या डोळ्यात अश्रू व आमच्याही मनात कालवाकालव. त्या दोघांना पहिल्यांदा पाहताक्षणी एकच वाटलं, साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा!! दुसरी उपमाच नाही. काकू शिक्षिका. नगरच्याच एका शाळेत. तरूण वयात कितीतरी देखणे दिसत असतील दोघंही. मात्र मुद्दा फक्त दिसण्याचा नसतोच. सौंदर्य दिखाऊसुद्धा असू शकतं. या दोघांचं तसं नाही. दोघांची मनं त्याहून सुंदर! लहान मुलासारखे निष्पाप दोघंही! मनाचा मोठेपणाही खूप! दोघं राहतात नगरला. थोडासा शहराबाहेर त्यांचा सुंदर बंगला!! बंगल्याचं नाव काय ठेवलंय दोघांनी? कल्पना करता येईल? ‘पसायदान’! ‘नाव सोनुबाई व हाती कथलाचा वाळा’ असला प्रकार नाही तो. त्या दोघांच्या स्वभावातच ‘पसायदान’ आहे. ते अगदी क्षणोक्षणी जाणवत राहतं. ‘‘भणगे सरांकडं जायचंय नगरला. खूप दिवसांपासून बोलवताहेत ते’’ घनश्याम पाटील कधीतरी म्हटल्याचं आठवतं. त्यादिवशी सकाळी निघालो तेव्हा खास भणगे सरांकडेच निघालो आहे याची मला कल्पना नव्हती. पाटील एखाद्या कवीसंमेलनाला घेऊन जात आहेत, असंच वाटत होतं. त्यावेळी लक्षात आलं नाही, पसायदानचा खरा अर्थच समजून घेण्यासाठी आपण जात आहोत. नगरमधलं महाराजा हॉटेल. मुख्य हमरस्त्यावरचं. तिथून डाव्याबाजूला आत कारनं वळण घेतलं आमच्या. दोन्ही बाजूला छोटेमोठे सुंदर बंगले. उजव्या बाजूला ‘पसायदान’ ही अक्षरे शोधत होतो. एक-दोन चौक ओलांडले. मग ती अक्षरे दिसली. मनातच म्हटलं, घरातली माणसं कशी असतील?

घनश्याम पाटील यांचा सत्कार करताना श्री. सदानंद भणगे आणि डॉ. देवदत्त केतकर. सोबत सौ. क्षमा सदानंद भणगे.
मात्र काही माणसं भेटताक्षणीच अंदाज येतो. स्वभावाचा अंदाज! तर त्या दिवशी गाडी ‘पसायदान’पुढे उभी राहिली व त्या सुंदर, टुमदार बंगल्याचं फाटक ओलांडून आत गेलो. समोरच सदानंद भणगे उभे. चेहर्‍यावर प्रसन्नता व आनंद! आम्ही त्यांच्या घरी आल्याचा आनंद! त्यांनी प्रेमभरानं हातात हात घेतला व जाणवलंच, माणूस अतिशय प्रेमळ आहे. हॉलमध्ये स्थानापन्न झालो. ‘‘अगदी निवांत बसा. आपलंच घर आहे’’ भणगे सर म्हणाले. त्या दिवशी सरांनी खरं तर लवकर यायला सांगितलं होतं. काकूंनी तर नाश्ता करून ठेवला होता आमच्यासाठी; मात्र आम्ही पोहचेपर्यंत दुपारचे साधारण साडेबारा वाजले असावेत. मग सर सांगत राहिले. सकाळपासूनच तुमची वाट पाहतोय म्हणून. अचानक टेबलवर लक्ष गेलं तर ‘शककर्ते शिवराय’चा पहिला खंड. नागपूरच्या विजय देशमुखांनी लिहिलेला. त्यावरून चर्चा सुरू झाली. लगेच जाणवलं, सदानंद भणगे हा माणूस अत्यंत निष्कपट, निरागस आहे. आतल्या गाठीच्या वृत्तीचा साधा अंशही नाही. काकूसुद्धा अगदी तंतोतंत तशाच. सुईच्या टोकाएवढीही बेरकी, कावेबाज वृत्ती नाही. गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात काकू स्वयंपाकघराकडे वळल्यासुद्धा. दहाव्या मिनिटाला गरमागरम उपीटाच्या डीश समोर हजर. सोबत ढोकळा, गुलाबजाम! नंतर चहा! मनसोक्त गप्पा व पाठोपाठ घरातच भरलेलं कवीसंमेलन! महादेव कोरे, माधव गिर व सरांचं काव्यवाचन!  

नगरला जायचंय म्हणून मी आदल्या दिवशी डॉ. देवदत्त केतकरांनाही फोन केलेला. आता हे केतकर कोण? तर हा माणूस मराठी साहित्यातला एक उत्कृष्ट भाषांतरकार! पेशानं डॉक्टर; मात्र साहित्यात रमणारा स्वभाव. त्यांनी ‘शूट टू किल’ या पुस्तकाचं भाषांतर केलं. केवळ सुरेख भाषांतर! ‘चपराक’साठी त्याचं परीक्षण मी लिहिलं. आयर्लंडमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक होतं ते. नंतर त्यांना एकदा फोनही केला होता. भणगे सरांशी बोलताना केतकरांचा उल्लेख केला, तर केतकर हे सरांचे मित्रच निघाले. अगदीच चांगले मित्र! एकाच शाळेत होते दोघंही. इतकी जुनी मैत्री! मात्र मधल्या काळात फारसा संपर्क नव्हता दोघांचा. भणगे सरांच्याइथून पुन्हा केतकरांना फोन केला. पंधराव्या मिनिटाला ते ‘पसायदान’मध्ये हजर! मग काव्यशास्त्रविनोदाची मैफलच जमली. बोलताना समजलं, केतकरांनी बरीच भाषांतरं केली आहेत. मग आम्ही मराठीतल्या काही उत्कृष्ट भाषांतराबद्दल बोललो. अपर्णा वेलणकरांच्या ‘शांताराम’पासून ते दोस्तोयवस्कीच्या विश्राम गुप्त्यांनी भाषांतर केलेल्या ‘हाऊस ऑफ डेड’पर्यंत. केतकर भेटतील असं जणू मला आतून कुठंतरी वाटत होतं. मी एक इंग्रजी ग्रंथ सोबत नेला होता त्यांना दाखवायला. सोव्हिएत युनियनचा हुकुमशहा जोसेफ स्टॅलिन. त्याचं हे चरित्र. लेखक एडवर्ड रॅडझिन्स्की. हा सगळा रशियाचाच इतिहास. प्रचंड उलथापालथींचा!! ‘‘अशा पुस्तकांची भाषांतरं आपल्याकडे होत नाहीत’’ केतकरांना पुस्तक दाखवत मी म्हणालो. त्याच्या भाषांतराबद्दल मग त्यांनीही उत्सुकता दाखविली. सध्या ‘मेहता प्रकाशन’साठी केतकर भाषांतरं करतात. मेहतांनी काही उत्तम ग्रंथांची भाषांतरं प्रकाशित केली आहेत; मात्र इंग्रजीतून मराठीत आणण्यासारखं खूप काही आहे. अगदी विल्यम शिररच्या ‘द राईज ऍन्ड फॉल ऑफ थर्ड राईश’चे देखील आपल्याकडे अद्याप भाषांतर झालेलं नाही. तीच तर्‍हा अल्बर्ट स्पिअरच्या ‘इन साईड द थर्ड राईश’ची. हे दोन्ही ग्रंथ हिटलरचं समग्र चरित्रच सांगणारे. जर्मनीचा तो महत्त्वाचा काळ सगळा. त्यात प्रचंड जागतिक राजकारणसुद्धा! शिवाय दुसर्‍या महायुद्धातल्या असंख्य घटना! नाझीझम किंवा फॅसिझम कसा असतो त्याची ही कहानी! हे सगळं मराठी वाचकांनी कधी वाचायचं? ते उत्कृष्ट मराठीत आलं तर ना? आपल्याकडे मात्र आजही भाषांतरकाराला लेखकासारखी लोकप्रियता मिळत नाही. त्यांचं महत्त्व लक्षात घेतलं जात नाही. स्वत: भाषांतराकारांनाही तसंच वाटतं. खरं म्हणजे चांगला भाषांतरकार हा चांगला लेखक असतोच. नाहीतर भाषांतराची वाट लागते.
तर त्यादिवशी या विषयावर आम्ही बोलत राहिलो. मग भणगे सर उठले व त्यांची कवितांची डायरी घेऊन आले. कविता वाचू लागले. सहज वहीत डोकावून पाहिलं तर मोत्यासारखं अक्षर! अत्यंत शिस्तबद्ध लेखन! ‘‘बरं, जेवणाचं कसं करायचं? बाहेर हॉटेलमध्ये जायचं का?’’ सरांनी नंतर विचारलं. हॉटेलमध्ये जाण्याचा कुणाचाच मूड नव्हता. काकूंच्या ते लक्षात आलं व त्या पुन्हा किचनकडे वळल्या. तासाभरात छान जेवण तयार! त्याआधी सरांनी त्यांचा सगळा बंगला दाखवला. केवढा मोकळेपणा हा वागण्यातला!! घरसुद्धा इतकं सुंदर की, कुणालाही हेवा वाटावा! कसलाही भपका नाही! श्रीमंतीचं प्रदर्शन नाही. नीटनेटकेपणा व स्वच्छता! कुठंही धुळीचा साधा कण नाही! फर्निचरचा फाजिल अट्टाहास? तो तर मुळीच नाही. घरात ग्रंथांना आवर्जून जागा! अगदी हॉल व बेडरूममध्येही पुस्तकांना महत्त्वाचं स्थान! नंतर किचनमध्ये डायनिंग टेबलवर आम्ही जेवायला बसलो व काकू गरमागरम पोळ्या वाढत राहिल्या. त्या दिवशीच्या त्यांच्या हातच्या खिचडी भाताची चव तर ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी! सरांची मुलगी पुण्यात. तिचं लग्न झालेलं. मुलगा अधूनमधून परदेशात. सरांना मात्र इतक्याच भौतिक गोष्टी महत्त्वाच्या नाही वाटत. त्यांना  माणसं प्रिय! जेवताना किचनमधल्या देवघराकडे लक्ष गेलं. प्रसन्न देवघर. तुपाची वात अखंड जळत असलेलं. तो देवही या कुटुंबावर आभाळागत माया करणारा व हे कुटुंब त्याचं ऋण मानणारं!! जिथं देवघर व ग्रंथ नाहीत ते घर काय घर असतं का? मनात विचार आला. जेवण करून पुन्हा गप्पा मारत बसलो व काकूंनी पुन्हा चहा ठेवलासुद्धा. शिवाय दोघं आग्रह करत राहिले. आजचा दिवस रहा म्हणून. खरंतर त्या घरातून पाय निघत नव्हता आमचा; मात्र घनश्याम पाटलांपुढे कामाचे डोंगर वाढून ठेवलेले. दिवाळी अंकाची तयारी, पुढच्या साप्ताहिक व मासिकाची छपाई. कामाचे असे अखंड व्याप. मग दोघांचे चरणस्पर्श करत आम्ही निरोप घेतला. दोघं निरोप देण्यासाठी बाहेर आले. भारावलेल्या मनानं आम्हाला निरोप दिला. महादेव कोरेंनी पुण्याच्या दिशेनं कार वळवली व आमच्या मनात व नजरेपुढं तिच अक्षरं उमटत राहिली ‘पसायदान’!
नगरहून पुण्यात आलो. घनश्याम पाटील दिवाळी अंकासाठी धावपळ करू लागले. मी काही महत्त्वाची ग्रंथपरीक्षणं लिहिण्याच्या मागं. बेळगाव दौरादेखील झाला मधे आमचा. त्यावर लेखही लिहायचा होता. दुसरीकडं सगळ्या राज्यात दुष्काळानं हाहाकार माजलेला! नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे. ही दोन माणसं! फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावत होती ती! सरकारही सरकारचं काम करत होतं; मात्र तसंही प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर आपण राजकारण्यांवर फोडतो. त्यात काही अर्थ नसतो. नागरिक म्हणून आपली जबाबदारी सर्वात महत्त्वाची. महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी. त्यातली पाच पंचवीस लाख माणसं एकत्र आली तरी मोठा निधी उभा राहू शकतो. खारीचा वाटा महत्त्वाचा असतो अशावेळी  प्रत्येकाचा. अशातच संगमनेरच्या पत्रकारांनी ठरवलं, वीस हजार रूपयांचा निधी नाना पाटेकरांकडे सोपवायचा. त्यांनी त्यानिमित्त घनश्याम पाटलांचं व्याख्यान ठेवलं. ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’ या विषयावर.
दि. 20 सप्टेंबर. सकाळी साडेनऊची वेळ. महादेव कोरेंची कार अप्पा बळवंत चौकात येऊन थांबली. लगबगीनं मी त्यांना तिथं गाठलं. मोरेश्‍वर ब्रह्मे काका, तुषार उथळे पाटील हेदेखील घनश्याम पाटलांबरोबर होतेच. आमची कार संगमनेरमध्ये पोहचली तेव्हा दुपारचा एक वाजला असावा. त्याच्याआधी नारायणगाव लागलं. तिथल्या एका साध्या पण प्रसिद्ध हॉटेलसमोर पाटलांनी गाडी थांबवली. तिथं पाटलांनी ‘कढीवडा’ खाऊ घातला. कढी व त्यात ताजा चविष्ट बटाटा वडा! इतकी अप्रतिम चव की विचारता सोय नाही! नंतर अप्रतिम चहा!! पाटलांना पुण्यातल्या एकूणएक खाऊगल्ल्या ठाऊक! मात्र इतर शहरातलीही दर्जेदार हॉटेलं तोंडपाठ! माझ्या आयुष्यात एक मित्र आला होता पूर्वी. धनंजय शिंदे. अगदी तोंडातला घास काढून देणारा मित्र! खिशातले असेल नसेल तेवढे सगळे पैसे काढेल व मित्रांना खाऊपिऊ घालेल. पाटीलही तसेच.
तर संगमनेरमध्ये पोहोचलो व दै. ‘सामना’चे राजाभाऊ वराट तिथं भेटले. तिथलं सरकारी विश्रामगृह. तिथं राजाभाऊंनी रूम बूक केलेली. तिथं जाऊन टेकलो. संगमनेरमधली पत्रकार मंडळी प्रचंड उत्साही! मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारी. राजाभाऊ वराट अतिशय अभ्यासू माणूस! मग भरभरून बोलत राहिले ते. नगर जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल, तिथल्या पाणीप्रश्‍नाबद्दल. मग तिथं श्याम तिवारी आले. ते राजाभाऊंचे जवळचे मित्र व सहकारी. ‘सकाळ’चे नंदकुमार सुर्वे आणि ‘पुण्यनगरी’चे वसंत बंदावणेदेखील आले तेवढ्यात. बोलता बोलता वैभव पिचडांचा विषय निघाला. वैभव पिचड अकोल्याचे आमदार. अकोला संगमनेरपासून अवघ्या वीसएक किलोमिटर अंतरावर. पिचडांचा विषय निघाला व मी चमकलो. कारण काय? तर वैभव माझा वर्गमित्र. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधला. पाचवी ते आठवी अशी चार वर्षे एकत्र होतो आम्ही. एकाच वर्गात. हॉस्टेलमध्येही एकत्र. आता त्याची माझी काही जिगरी मैत्री वगैरे नव्हती तेव्हा; मात्र कसलाही दुस्वास वा हेवादावाही नव्हता आम्हा दोघात त्या शाळकरी वयात. वैभव माझ्या आठवणीत का राहिला? आमचं मिलिटरी स्कूल. कडक शिस्त. जरा काही झालं की शिक्षक सडकून काढायचे. वैभवनेही शिक्षकांचा मार खाल्ला त्या काळात; मात्र त्याचं एक वैशिष्ट्य होतं. मधुकरराव पिचड हे त्याचे वडील. ते अगदी आमदार व मंत्रीही असावेत त्या काळात! मात्र वैभवने कधीही त्यांच्याकडे शिक्षकांची तक्रार केली नाही किंवा शाळा सोडली नाही. मधुकर पिचडांनीही या गोष्टीचा बाऊ केला नाही. एकदा तर ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते शाळेत तेव्हा. असो.काही पत्रकार मंडळी भेटायला येत होती सरकारी विश्रामगृहात. त्यात दैनिक सकाळचे श्री. नंदकुमार सुर्वे होते. थोड्याच वेळात तिथे मुरारीभाऊ देशपांडे आले. ते संगमनेरमधील प्रसिद्ध कवी. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून सतत प्रसिद्ध होतात. पाटलांना त्यांनी पाहिलं व खूप आनंदले. ‘चपराक’नं त्यांना ओळख दिली ही त्यांची भावना. ती कृतज्ञता होती. घडाघडा बोलत राहिले ते. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून यायचा अवकाश, त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येतात. क्वचित महाराष्ट्राबाहेरूनही येतात. अगदी इंदौर, बडोदा व हैद्राबाद येथूनसुद्धा. मुळातच अतिशय ताकतीचा हा कवी; मात्र ‘चपराक’नं पुढे आणेपर्यंत तो अंधारातच होता. त्यांची बहिणही उत्कृष्ट कविता करते. मुरारीभाऊंनीच हे सांगितलं; मात्र तिच्या कवितांकडेही अद्याप कुणाचं लक्ष नाही.

संगमनेर पत्रकार मंचने आयोजित केलेल्या 'दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता' या विषयावर व्याख्यान देताना 'चपराक'चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील.

सायंकाळी पाचची वेळ. रेस्टहाऊसमधून खाली आलो. जवळच्या टपरीवर चहा घेतला व कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी गेलो. संगमनेर व्यापारी असोसिएशनची ही नवीन इमारत. संगमनेर रेस्टहाऊसपासून अगदी हाताच्या अंतरावर. ‘संगमनेर पत्रकार मंच’. कार्यक्रमाचे आयोजक होते ते. सुरूवातीला मुरारीभाऊ बोलले. ‘सव्यसाची संपादक’ असा त्यांनी घनश्याम पाटलांचा उल्लेख केला. ‘साहित्यातला अत्यंत दर्दी मनुष्य’ अशीही पावती त्यांनी पाटलांना दिली. ‘‘साहित्याची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही व ‘चपराक’ची टीम साहित्याला वाहिलेली टीम आहे’’ मुरारीभाऊ म्हणाले. ‘‘चुका होणं हे मानवी आहे. पन्नास पन्नास वर्षे पत्रकारितेत घालवलेल्या माणसांनाही अनेक विषय नव्यानं समजून घ्यावे लागतात’’ मुरारीभाऊ पुढे म्हणाले. ‘‘संगमनेरला अनंत फंदी या शाहिराचा वारसा लाभला आहे. हे सांस्कृतिक शहर आहे व इथं सर्वधर्मसमभाव जपला जातो’’ त्यांनी संगमनेरची अशी ओळख करून दिली. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश टाकळकर व श्री. प्रकाश कलंत्रीही होते. कलंत्री हे संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष . तरूण पोरगा. उमद्या मनाचा. चांगले विचार मांडणारा. त्यांनीच संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँकेचं हे सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं. गौतम गायकवाड हे संगमनेरमधले आणखी एक पत्रकार. त्यांनी घनश्याम पाटलांची ओळख करून दिली. ‘‘पाटील हे महाराष्ट्रातले वयाने सर्वात लहान असलेले स्वतंत्र संपादक आहेत’’ ते म्हणाले. पाटलांनी दहावीत असतानाच पत्रकारिता सुरू केली होती. तेव्हा ते दै. ‘तरूण भारत’चे पत्रकार होते. गायकवाडांनी हे सांगितलं तेव्हा उपस्थितांची उत्सुकता वाढली. मग पाटील बोलले. विषय होता ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’.
गेली पंधरा वर्षे सतत पत्रकारितेत वावरणारे पाटील. वय बत्तीस. त्यांना व्याख्यानासाठी सतत निमंत्रणं येतात. तीही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून. पुण्यातल्या मोठमोठ्या शिक्षणसंस्था. त्याही त्यांना आदरानं बोलवतात. ‘‘अन्नधान्याच्या अभावी माणसं, जनावरं मरतात व संस्कारांअभावी मानवता मरते. संगमनेरच्या पत्रकारांनी ही मानवता मरू नये म्हणून छोटं का होईना पाऊल उचललं’’ पाटील म्हणाले. ‘‘मराठवाड्याला चार-चार मुख्यमंत्री मिळाले तरीही मराठवाड्यावर ही वेळ का आली?’’ पाटलांचा प्रश्‍न होता. ‘‘बिहारसाठी पंतप्रधानांनी सव्वाशे कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मग विदर्भाचं काय? मराठवाड्याचं काय?’’ पाटलांचा पुढचा प्रश्‍न होता. ‘‘शेतकर्‍यांना आर्थिक मदत तात्पुरती मलमपट्टी आहे; मात्र सध्या ती गरजेची आहे’’ पाटील पुढं म्हणाले. ‘‘कर्जमाफी हाही तात्कालिक उपाय आहे. त्यापेक्षा दुष्काळी भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे’’ पाटलांचं मत होतं. ‘‘दुष्काळावर मात करणार्‍या शेतकर्‍यांच्या बातम्याही समाजापुढं ठेवल्या पाहिजेत’’ पाटील म्हणाले. त्यांचं आणखी एक वाक्य तर फार महत्त्वाचं होतं ‘‘गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणं हा राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा ठरवला पाहिजे’’ ते म्हणाले. ‘‘नांगरणी, पेरणी, कोळपणी यासाठी शेतकर्‍याला थेट मदत केली पाहिजे’’ ते पुढं म्हणाले. ‘‘हुंडा घेण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे’’ त्यांचा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. ‘‘मरण स्वस्त होणं व भाकरी महाग होणं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही!’’ त्यांचं आणखी हे एक वाक्य. ते तर हादरवून टाकणारं होतं. शेतकर्‍यांच्या वारंवार होणार्‍या  आत्महत्या. त्या रोखायच्या कशा? त्यासाठी व्यवस्थेचीच नीट झाडाझडती व्हायला हवी असं पाटलांना सुचवायचं होतं.
यावेळी पाटलांनी ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने दुष्काळनिधी म्हणून पाच हजार रूपये ताबडतोब जाहीर केले. ते तिथल्या तिथं राजाभाऊ वराटांकडे सोपवलेसुद्धा. घनश्याम पाटील मराठवाड्यातले. शेतकरी कुटुंबातले. शेती केलेले. शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेली सगळी दु:खं भोगलेले.
कार्यक्रमस्थळाहून पुन्हा रेस्टहाऊसवर आलो. आयोजकांनी मांसाहारी जेवणाचा बेत केला होता. पाटलांना हे समजलं. ‘‘मी दुष्काळावर व्याख्यान द्यायला आलो आहे. अशावेळी मांसाहारी जेवणाची मेजवाणी झोडणं बरोबर नाही’’ पाटलांनी आयोजकांना स्वच्छ सांगितलं. ‘‘साधी पोळी भाजी चालेल. नपेक्षा तसंच परत गेलेलं बरं’’ पाटील म्हणाले तेव्हा सगळेच थक्क झाले. संगमनेरच्या पत्रकारांच्या भावना. त्या आम्ही समजू शकत होतो. त्यांचं प्रेम. ते आम्ही समजू शकत होतो; मात्र पाटलांच्या मते जे औचित्याला धरून नाही ते कधीच करायचं नाही. मग रेस्टहाऊसवर साधं का होईना जेवण आम्ही घेतलं. जेवण छान होतं व सगळ्याच पत्रकार बंधूंनी तिथं अगत्यानं काय हवं नको ते पाहिलंसुद्धा. गोरक्ष नेहे, स्थानिक चॅनलच्या एक पत्रकार निलिमा घाटगे, प्रशांत शर्मा, मनोज गाडेकर, रियाज सय्यद, रवी महाले, प्रकाश आरोटे, नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, अमोल वैद्य, शेखर पानसरे, उल्हास पाटील, सुशांत सातपुते, विकास वाव्हळ, अंकुश बुब, गंगाधर शिंदे ही सगळी मंडळी. सगळेच धडपडत होते या  कार्यक्रमाच्या नियोजनासाठी. रात्री जेवणाच्या वेळी यातले बरेचजण रेस्टहाऊसवरसुद्धा जातीनं हजर होते. निघताना सगळे गाडीजवळ जमले. माणसांमधली आपुलकी. ती लगेचच जाणवते. एका क्षणात जाणवते. त्याला वेळ लागत नाही. पत्रकार बांधवात दै. ‘लोकमत’चे रियाज सय्यदही होते. निघण्यापूर्वी आम्ही एकमेकांना प्रेमभरानं मिठीच मारली. रियाज सय्यद हा माणूसच अतिशय प्रेमळ व सज्जन! ‘‘पुढच्या वेळी भंडारदर्‍याला जाऊ. तिथं मुक्काम करू. त्यासाठी मुक्कामाच्या तयारीनंच या’’ राजाभाऊ वराट पुन्हा पुन्हा हेच सांगत होते. हा माणूसही खूपच प्रांजळ. शेवटी वराटांनी बळेबळे दोन हजार रूपये पाटलांच्या हातात ठेवले. ‘‘पेट्रोलसाठी असू दे. खर्च थोडे असतात का तुमचे?’’ ते म्हणाले.
गाडीनं पुण्याचा रस्ता धरला. डोक्यात एकाच गोष्टीनं तुफान माजलेलं. पाटलांनी मांसाहारी जेवण नाकारलं? मी केलं असतं हे? नसतं केलं! अगदी दोनशे टक्के नसतं केलं. मुळात सुचलंच नसतं असलं काही. बुद्धीच चालेना. ‘‘दादा, तू पाच हजार रूपये खिशातून काढून दिलेस. त्याबद्दल आम्हाला एका शब्दानं बोलला नाहीस. एका विशिष्ट गंभीर प्रसंगासाठी आलोय म्हणून ‘नॉनव्हेज’ खायचं नाकारलंस. या गोष्टींसाठी माझा तुला खरोखर सलाम आहे!’’ मी पाटलांना म्हणालो. यावर काहीशा संकोचाने पाटील हसले फक्त. ‘‘सर, आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जायचंय’’ त्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली. विचार करत राहिलो मी.
या जगात सर्वश्रेष्ठ गोष्ट कुठली? ‘माणसांचे माणसांशी असलेले ऋणानुबंध’ याइतकी श्रेष्ठ गोष्ट या जगात दुसरी कुठलीही असू शकत नाही हेच खरं!

-महेश मांगले 
संपर्क: ९८२२०७०७८५
हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले....!
पाहुणा बोलावून एखादा कार्यक्रम करणे फारच खर्चिक झाले आहे... पाहुण्याची बडदास्त ठेवणे हाच एक कार्यक्रम होऊन बसतो... पाहुण्यांची येण्याजाण्याची व्यवस्था, दिवसभराची शाही बडदास्त आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे मान आणि धन यातच आयोजकांची धावपळ होते...
दुष्काळनिधी व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांना बोलावले. आम्हीसुद्धा वरील प्रमाणेच तयारीत होतो... पण पाटील यांनी कोणताही बडेजाव दाखवला नाही.. खास ठेप नाही... आणि ऊलट आम्हालाच त्यांनी दुष्काळ निधीसाठी पाच हजार रूपये रोख दिले..
काय बोलणार...? काय प्रतिक्रिया देणार...?
फक्त एवढंच सांगेन, ‘‘हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले...’’

- राजा वराट
पत्रकार, दै. ‘सामना’



Friday, August 21, 2015

'खुदा खैर करे...'

  • 'तपोभूमी नाशिक'चे प्रकाशन करताना डावीकडून 'चपराक'चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील, उद्योजक गिरीश टकले, समीक्षक प्राचार्य श्रीपाल सबनीस, कुलगुरु माणिकराव साळुंखे, आप्पा पोळ आणि लेखक रमेश पडवळ. 
 
  आयी जंजीर की झंकार खुदा खैर करे 

  दिल हुआ किसका गिरफ्तार खुदा खैर करे
मध्यरात्रीची वेळ. पुणे-नाशिक बस वार्‍याच्या वेगानं धावते आहे. कवी समीर नेर्लेकर व मी एका सीटवर बसलोय. त्यांच्याकडच्या छोट्या टेपरेकॉर्डरची एक पिन माझ्या कानात व एक नेर्लेकरांच्या. ’रजिया सुलतान’ या चित्रपटातलं हे गीत मला भूतकाळात घेऊन गेलंय. अगदी शाळकरी वयात हा चित्रपट पाहिलेला.
खूप काळानंतर त्यातली गाणी ऐकण्याचा आलेला हा अनपेक्षित योग! आम्ही सगळे नाशिकला निघालेलो. 'तपोभूमी नाशिक' हे 'चपराक प्रकाशन'चं सहासष्टावं पुस्तक. त्याच्या लोकार्पणाचा सोहळा होता नाशिकला. प्रकाशक व संपादक घनश्याम पाटील, कवी माधव गिर, तुषार उथळे पाटील, नेर्लेकर व मी. रात्री दहा वाजता बस पकडली आम्ही. त्या आधी सर्वांना जेवायला घालायला पाटील विसरले नव्हते. त्यांचा हा नेहमीचाच शिरस्ता!! ‘भूक लागली आहे, चहाची तल्लफ झालीय’ असं त्यांना कधीही सांगावं लागत नाही. असो. रात्रीचा प्रवास. बसचा. झोपेचं नाव नाही. मग नेर्लेकरांनी त्यांच्याकडचा गाण्याचा खजिना उघडला. 'हे घाला कानात’ म्हणत एक पिन त्यांनी माझ्याकडे दिली.
जाने ये कौन मेरी रुह को छूकर गुजरा
इक कयामत हुई बेदार खुदा खैर करे

‘‘बेदार म्हणजे जागरुक होणे किंवा जागे होणे. कयामत म्हणजे वादळ.’’ नेर्लेकर खुलासा करतात. मग ते या विलक्षण गाण्याचा इतिहास सांगतात. जां निसार अख्तरनं लिहिलेलं हे गीत. संगीतकार खय्याम. गायक कब्बन मिर्झा. हा चित्रपट काढला होता कमल अमरोही यांनी. हा कब्बन मिर्झा कुठला तर चक्क पाकिस्तानमधला! अमरोहींना दमदार अशा पहाडी आवाजाचा गायक हवा होता. हा शोध घेत ते पाकिस्तानमध्ये गेले. एक दिवस चक्क रस्त्यावर कब्बन गाताना दिसला त्यांना. उचलला सरळ त्याला व घेऊन आले इकडे. नेर्लेकर सांगत असतात. मी आश्चर्यानं ऐकत असतो.
   लम्हा लम्हा मेरी आँखोमें खिंचा जाती है
   इक चमकती हुई तलवार खुदा खैर करे
   काळ आमच्यासाठी थांबलेला असतो.
   खून दिल का ना चला जाये कही आँखोंसे
   हो ना जाये कही इजहार खुदा खैर करे

  ‘‘तुमच्याकडे याच चित्रपटातलं 'हे दिले नादॉं’ हे गाणं आहे का ? असेल तर ऐकवता का जरा?’’ माझी अधाशी विनंती. नेर्लेकर पाहतात. त्यांच्याकडे त्या गाण्याचा फक्त मुखडा असतो. खूप निराशा होते; मात्र त्यांच्या खजिन्यात बरीच हिरे माणकं असतात. मग असाच एक हिरा ते बाहेर काढतात.
    इस मोड से जाते है
    कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे
    पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदो में
    तिनकोंके नशेमन तक, इस मोडसे जाते है।

चित्रपट ‘आँधी’. गीतकार गुलजार. संगीत आर. डी. बर्मन, गायक किशोर कुमार व लतादीदी. हा चित्रपट संपुर्ण पाहिल्याचं आठवत नाही. अधलेमधले प्रसंग पाहिलेले, मात्र त्या प्रसंगांचंच मनावर प्रचंड गारुड!! तो संजीवकुमार व ती सुचित्रा सेन! कसं विसरायचं या दोघांना? काय म्हणतोय तो तिला?
   आँधी की तरह उडकर, एक राह गुजरती है
   शरमाती हुई कोई, कदमोंसे उतरती है
   इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
   तुम तक जो पहुँचती है, इस मोडसे जाते है

   यावर तिचं उत्तर
   एक दूर से आती है, पास आके पलटती है
   एक राह अकेली सी, रुकती है ना चलती है
   ये सोच के बैठी हूँ, एक राह तो वो होगी
   तुम तक जो पहुँचती है, इस मोड से जाते है

नेर्लेकरांकडे अनेक मराठी हिरेमाणकंही असतातच. मग ते त्यांच्याकडे वळतात.
   प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्‍याची मंजुळ गाणी
   रोमांच सर्वांगी, गेले मी वाहूनी

   गायक शैलेंद्र सिंग. गायिका उषा मंगेशकर. ‘‘हा शैलेंद्र सिंग कोण माहितीये का? ’बॉबी’ चित्रपटातलं ’मै शायर तो नहीं’ हे गाणे म्हटलेला.’’ नेर्लेकर. बापरे! एकेक आश्चर्यच! मी नकळत उद्गारतो. एका अमराठी गायकाच्या तोंडी काय शब्द आले आहेत!

   हा जीव वेडा होई थोडा थोडा
   वेड्या मनाचा बेफाम् घोडा
   दौडत आला सखे तुझा बंदा
   चल प्रेमाचा रंगू दे विडा

  यावर तिची प्रतिक्रिया
   मी धुंद झाले मन मोर डोले
   पिसार्‍यातूनी हे खुणावित डोळे
   डोळ्यात जाळे खुळी मीच झाले
   स्वप्न फुलोरा मनात झुले.
   प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्‍याची मंजुळ गाणी

   ‘‘लता-आशा पेक्षा उषा कुठे कमी आहे सांगा मला?’’ नेर्लेकर बॉंबच टाकतात. मी अवाक ! तथ्य जाणवत रहातं त्यांच्या बोलण्यातलं. मधला चहाचा वेळ सोडला तर गाण्यांची ही मैफल सलग तीन एक तास सुरु असते. नाशिक कधी आलं ते कळतही नाही.
दि. 9 जुलै. पहाटे साधारण तीनची वेळ. नाशिकमध्ये उतरलो. 'तपोभूमी नाशिक’चे लेखक रमेश पडवळ. उमदा माणूस. प्रांजळ  व मेहनती! ते स्टँडवर घ्यायला आले होते. तिथून रिक्षा. सरळ पडवळांच्या घरापर्यंत. महालक्ष्मीनगरला पडवळांचा फ्लॅट आहे. पडवळांच्या पत्नी संगीता. कमालीचा मनमिळावू व बोलघेवडा त्यांचा स्वभाव! त्यामुळे घरी पोहचताच गप्पा रंगल्या. पहाटे पाच साडेपाचला डोळा लागला. सात साडेसातला जाग. सकाळी सकाळी चहाची सवय, पण वहिनी आपुलकीनं अखंड बोलतच होत्या. मग घनश्याम पाटलांनी प्रेमळ विनंती केली. ‘‘वहिनी, चहा.’’ चहा झाला. थोड्या वेळानं अप्रतिम पोहे! पुस्तकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संध्याकाळी होता. स्थळ होतं कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारक. हे स्थळ पाहण्याची उत्सुकताही खूप होती. त्याआधी थोडं फिरायचं ठरलं. मग तिथं लेखक संजय वाघ देखील आले. संजय वाघ हे ‘चपराक’ टीमचेच लेखक! एक चांगला मित्र! ते ‘लोकमत’ मध्ये आहेत. आम्हाला आणखी एक अतिशय महत्त्वाची भेट घ्यायची होती. सुप्रसिद्ध लेखिका व भाषांतरकार अपर्णा वेलणकर यांची. त्याआधी पडवळांनी आग्रहानं पांडवलेणी पहायला नेलं. नाशिक हे शहरच सुंदर! प्रेमात पडावं असं. पडवळांच्या पुस्तकात तर एक श्लोकच दिलाय.
    पंचवट्यां पंच रत्नानि, सदासुख प्रदानिही
    गोदावरी कपालेशो, रामो वायुस्तपोवन

गोदावरी नदी, कपालेश्वराचं मंदिर, प्रभु श्रीरामचंद्राचं काही काळ वास्तव्य, तपोवन या सगळ्या गोष्टींमुळे नाशिकमध्ये विसावण्यासाठी माणसं आतुर होतात, असा या श्लोकाचा अर्थ. यात पांडवलेणीचाही समावेश करायला हवा. महालक्ष्मीनगरपासून पांडवलेणीपर्यंत कारनं गेलो. पडवळांनी कारची सोय केलेली. उंच डोंगरात कोरलेली ही लेणी. पुण्यातील पर्वतीच. भारतातल्या लेणी जैन, बौद्ध व वैदिक (हिंदू) धर्मियांनी कोरलेल्या आहेत. त्यात बौद्धधार्मियांच्या लेण्यांची संख्या सर्वात जास्त. डोंगर चढून जाताना पडवळ या लेण्यांचा सगळा इतिहासच सांगत होते. पांडवलेणी ही सुद्धा बौद्धलेणीच. तिचा पांडवांशी काही संबंध नाही. बौद्ध भिक्खु या लेण्यांमध्ये राहत. अखंड पाषाणात कोरलेल्या या लेण्यात अनेक गुहा आहेत. पडवळांनी या सगळ्या गुहा फिरुन दाखवल्या. इथलं शिल्पकाम खूपच सुंदर! गुहा क्र. 2 मध्ये बुद्ध व बोधिसत्वाच्या मूर्ती आहेतच शिवाय महादेवाची पिंड व नंदीदेखील कोरलेले आहेत. उडत असलेला मारूती सुद्धा. हा आश्चर्यकारकच प्रकार आहे. ‘‘या गोष्टी बौद्धांनी कोरलेल्या नाहीत. इ. स. सोळाशेनंतर या गोष्टी तिथं कोरल्या गेल्या’’ पडवळ म्हणतात. या लेण्यासंदर्भात पडवळांना कुठलाही प्रश्न विचारा, उत्तर हजर. लेण्यांवरुन संपूर्ण नाशिक शहर नजरेस पडतं. पर्वतीवरुन पुणं दिसतं अगदी तसंच. लेण्यांच्या इथं आमचं छोटं कविसंमेलनही झालं. स्वच्छ, मोकळी हवा वाहत होती. हलका पाऊस. समोर खाली नाशिक-मंबई हायवे अखंड वहात होता. पांडवलेणीच्या पायथ्यालाच एक प्रचंड बौद्ध स्तुप आहे. अर्थात तो अगदी अलीकडे बांधलाय. त्यात बुद्धाची प्रचंड मूर्ती! शंकराच्या मंदिरात घुमतो तसा आतमध्ये हलक्या आवाजाचाही नाद घुमत होता. इथं बुद्धाची चित्रं आहेत. त्या चित्रांसह बुद्धाचा सगळा इतिहासच इथं सांगितलाय. गौतम बुद्ध नेमका होता कसा? तर त्याच्या स्वभावाची व शरीराची सगळी वैशिष्ट्यच इथं सांगितली आहेत. उदा. बुद्ध अजाणूबाहू होता वगैरे. इथून दादासाहेब फाळके स्मारक जवळच होतं. मात्र वेळेअभावी ते पाहता आलं नाही. लेखिका अपर्णा वेलणकरांनी भेटीची वेळ दिलेली.
दुपारी साधारण बाराचा सुमार. संजय वाघ हे आम्हाला लोकमत कार्यालयात घेऊन गेले. 'लोकमत’च हे प्रशस्त कार्यालय. त्यांचा प्रेसही (छापखाना) तिथंच आहे. वाघांनी तो प्रेस व सगळं कार्यालय फिरुन दाखवलं. कार्यालय पाहून आम्ही आवारात आलो तोच एक कार मुख्य प्रवेशद्वारातून सफाईदारपणे आत आली. ‘‘आल्या अपर्णा मॅडम’’, वाघ उद्गारले. ड्रायव्हिंग सीटवर एक चाळीशीची महिला ओझरती दिसलीच होती. त्याच अपर्णा वेलणकर. मराठी साहित्यात मुशाफिरी करणार्‍यांना हे नाव नवीन नाही. अत्यंत ताकतीची भाषांतरकार. बाईंनी ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’च मराठीत भाषांतर केलं. त्याला ’साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला. त्यांचं गाजलेलं भाषांतर म्हणजे ’शांताराम’. शांताराम ही मूळ नऊशे पानी आत्मचरित्रात्मक कादंबरी. जगभरातल्या तीसपेक्षा अधिक भाषात तिचं भाषांतर झालेलं. पन्नासएक लाख प्रती या सर्व भाषात विकल्या गेलेल्या. ग्रेगरी डेविड रॉबर्टस् हा 'शांताराम’ चा लेखक. मूळचा ऑस्ट्रेलियन. या ग्रेगरीचं हे आत्मचरित्रच आहे. अपर्णानं रसरशीत भाषांतर केलं शांतारामचं. तब्बल चौदाशे पानांचं भाषांतर. मी तीनदा वाचलं हे भाषांतर. घनश्याम पाटलांनी एक दोन रात्रीतच ’शांताराम’ चा फडशा पाडला. एक साधी चूक दाखवता येणार नाही या भाषांतरात. पहिल्यांदा भाषांतर वाचलं तेव्हाच चाट पडलो होतो. मूळ आत्मचरित्र भन्नाटच आहे. त्यात जीव ओतून केलेलं सहज सुंदर भाषांतर! दुधात साखर! त्याचवेळी अपर्णा मॅडमना चारचार पानी पत्रं लिहिली होती. त्यांना भेटण्यासाठी नाशिकमध्ये पायपीटही केली होती. मात्र त्यावेळी योग आला नाही. यावेळी घनश्याम पाटलांना मी आग्रहानं सांगितलं होतं, ‘‘अपर्णा मॅडमच्या भेटीशिवाय परत यायचंच नाही दादा.’’ पाटलांनी सूत्रं फिरवली. संजय वाघांना त्यांनी ही बाब सांगितली. अपर्णा मॅडम वाघांच्या 'दै.लोकमत’ मधील ज्येष्ठ सहकारी. त्यामुळं भेटीचा योग आला. 'दै. लोकमत’च्या प्रशस्त कार्यालयातील मिटींग हॉल किंवा कॉन्फरन्स रुम म्हणूया! अपर्णा मॅडम व संजय वाघ आम्हाला तिथं घेऊन गेले. आम्हाला पाहताच 'या या’ म्हणत अपर्णानं उमदेपणानं स्वागत केलंच होतं. त्यामुळं मनावरचं दडपण गेलं. कॉन्फरन्स रुममध्ये छान गप्पांना सुरुवात झाली. ‘‘मित्र कसा आहे तुमचा?’’ मी त्यांना पहिलाच प्रश्न केला. ‘‘मित्र? कोण?’’ त्यांच्या चेहर्‍यावर थोडे प्रश्नचिन्ह उमटलं. ‘‘ग्रेगरी डेविड रॉर्बटस.’’ मी. ‘‘हां. तो होय! तो काय, मजेत आहे तो.’’ त्या प्रसन्नपणे उद्गारल्या. अपर्णा मॅडमनं 'शांताराम’चं भाषांतर केलं व ग्रेगरी त्यांचा मित्र झाला. ग्रेगरीची 'शांताराम’ मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आहे; मात्र त्याचा राजकारणाचा अभ्यासही तुफान! अगदी भारताचं राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण तो उत्तम जाणतो. ‘शांताराम’मध्ये हे सगळं काही आलंय. अपर्णादेखील पत्रकार. जागतिक घडामोडींचं देखील उत्तम भान असलेली! त्यामुळं दोघांचं मैत्र जुळलं यात आश्यर्य काहीच नाही. ‘‘शांताराम आता दुसर्‍यांदा वाचतोय’’ घनश्याम पाटील म्हणाले तशा अपर्णा खुलल्या. ‘शांताराम’बद्दल भरभरुन बोलू लागल्या. आम्ही त्यांना ’शॅडो ऑफ माउंटन’ बद्दल छेडलं. हा ’शांताराम’चा पुढील भाग. ‘‘ग्रेगरी आता सारखा आग्रह करतोय. ’शॅडो ऑफ माउंटन’चं भाषांतर तुच कर म्हणून.’’ त्या म्हणाल्या. ‘‘मात्र ‘शॅडो ऑफ माउंटन’ हा शांतारामचा पुढचा भाग नाही. तो शांतारामच्या आधीचा भाग आहे.’’ त्या म्हणाल्या. ‘‘शक्य तितक्या लवकर त्याचं भाषांतर करा मॅडम. आम्ही वाट पाहतोय अक्षरशः’’ मी म्हणालो. ‘‘ग्रेगरीला एकदा भेटायची इच्छा आहे. एकदा पाय धरायचेत त्याचे.’’ मी पुढं म्हणालो. ‘‘बघूया त्याला पुण्याला वगैरे आणता आलं तर. मुंबईत तर येतच असतो तो.’’ त्या म्हणाल्या. तेवढ्यात चहा आला. नेर्लेकरांनी जुनी ओळख सांगितली. ‘‘मला वाटतंच होतं तुम्हाला कुठंतरी भेटल्याचं.’’ अपर्णा मॅडम म्हणाल्या. शेवटी घनश्याम पाटलांनी केलेला फोटोचा आग्रहही त्यांनी हसत हसत मान्य केला. अपर्णा मॅडमची ही भेट घडवून आणल्याबद्दल मी संजय वाघ व घनश्याम पाटलांचे आभार मानत राहिलो. ‘‘सर, तुम्हाला आता ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस्ची सुध्दा भेट घालून देतो.’’ पाटील म्हणाले. भारावलो. कित्येक वर्षे साहित्याचा अभ्यास करतोय. त्याचं महत्त्व घनश्याम पाटलांइतकं कुणी जाणलं असेल काय? मनात प्रश्न आला. दैवाचे आभार मानत राहिलो.

 

लोकमत कार्यालयातून बाहेर पडलो. ‘‘इथं आलोच आहे तर त्र्यंबकेश्वरला जाऊया.’’ घनश्याम पाटील म्हणाले. मलाही तो खूप चांगला संकेत वाटला. गाडी त्र्यंबकेश्वराकडे वळली. वाघांनी तिथं फोन केला. तिथले माजी उपनगराध्यक्ष भेटले. त्यांनी तातडीनं दर्शन होईल अशी व्यवस्था केली. त्या त्र्यंबकेश्वरानेच आयुष्यात हे सुंदर योग आणले होते. आम्ही त्याच्यापुढं नतमस्तक झालो.
त्र्यंबकेश्वराहून रमेश पडवळांच्या घरी आलो तर संगीता वहिनींनी सगळ्यांचा स्वयंपाक करुन ठेवलेला. पुण्याहून डॉ. श्रीपाल सबनीस, सौ. ललीता सबनीस, महादेव कोरे, मोरेश्‍वर ब्रह्मे काका ही मंडळी कारनं आलेली. सबनीस सर उत्तम कांबळ्यांना भेटायला गेले होते. आम्ही जेवण उरकलं. सुमारे दहा जणांचा स्वयंयाक! बाकीचीही काम! त्यात दोन लहान मुलं! मात्र संगीता वहिनींचा आनंद मनात मावत नव्हता. त्यांच्या नवर्‍यानं नाशिक शहरावर अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं होतं. अत्यंत सुंदर शैलीत लिहिलं होतं. त्याचं लोकार्पण होणार होतं. त्यापुढं सगळे कष्ट त्यांना हलके वाटत होते.
संध्याकाळी पाचची वेळ. पडवळांच्या घरातून आम्ही बाहेर पडलो. डॉ. सबनीस, सौ. सबनीस, नेर्लेकर, पाटील व मी एका कारमध्ये होतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारकाकडे कार निघाली. जाताना माझी शाळा दिसली. भोसला मिलिटरी स्कूल. चार वर्ष होतो या शाळेत हॉस्टेलमध्ये. नाशिकशी असलेले हे जुने ऋणानुबंध!! त्यावेळी कुसुमाग्रजही नाशिकमध्येच होते; मात्र त्यांना भेटण्याचा योग कधीच आला नाही. आज ते असते तर कदाचित त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचं लोकार्पण झालं असतं. असो.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आम्ही आलो. ती टूमदार वास्तू पाहून खूश झालो. अभ्यासिका, ग्रंथालय, प्रकाशन किंवा इतर साहित्यिक कार्यक्रमांसाठी असलेले हॉल, कँटीन अशा सुविधांनी युक्त असं हे कुसुमाग्रज स्मारक. साहित्याचा कुठलाही अभ्यासक खुश होईल असं तिथलं प्रसन्न वातावरण सुध्दा!
आमचा प्रकाशनाचा कार्यक्रम होता त्या हॉलमध्ये वेळेआधी आम्ही पोहोचलो होतो. थोडीफार पूर्वतयारी केली. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा अवधी होता. तेवढ्या वेळात महादेव कोरे हे माझ्याशी नारायण सुर्वेंच्या कवितांवर बोलत राहिले. सुर्वेंच्या कवितांवर ते छान बोलतात. साडेसहाच्या आसपास कार्यक्रमाला सुुरुवात झाली. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, अभ्यासक गिरीश टकले, डॉ. श्रीपाल सबनीस, रमेश पडवळ ही सगळी मंडळी होती. सुरुवातीला घनश्याम पाटील बोलले. पाटलांनी ’चपराक’च्या माध्यमातून असंख्य माणसं जोडली आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र जोडला आहे. पडवळांचंच उदाहरण घेऊ. ’तपोभूमी नाशिक’ हे आपलं पुस्तक घेऊन पडवळांनी अनेकांचे उंबरे झिजवले. इतकं सुंदर लेखन; मात्र प्रत्येक ठिकाणी  वाईट वागणूक मिळाली. एका राजकीय पुढार्‍यानं तर त्यांचा अपमानच केला. पडवळ पाटलांना कुठं भेटले? तर घुमानच्या साहित्य संमेलनात! तिथं त्यांनी त्यांची वेदना पाटलांना बोलून दाखवली. ‘‘तुमच लेखन पाठवून द्या. मला आवडलं तर नक्की छापेन.’’ पाटलांनी शब्द दिला. पडवळांनी ते पाठवलं. पाटलांनी ते सर्व एका रात्रीत वाचून काढलं. ताबडतोब होकार कळवला. पैशांची जुळवाजुळव केली. लेखकाकडून एक नवा रुपयाही न घेता रात्रंदिवस मेहनत घेतली. पुस्तक तयार केलं. ’चपराक  प्रकाशन’चा झेंडा पाटलांनी नाशिकमध्ये रोवला तो असा. वयाच्या अवघ्या तिशीत कुठला तरुण असा प्रकाशक होतो? किंवा अशी निर्णयक्षमता व तडफ दाखवतो? पाटलांचं हे काम व त्याचं महत्व महाराष्ट्राला आज ना उद्या कळणारच आहे. गरज आहे ती इतरांनी यापासून काही शिकण्याची. कार्यक्रमातलं पाटलांचं मनोगतही सुंदर होतं. त्यांचे वडील वसंतराव पाटीलही कार्यक्रमाला हजर होते. ’पूत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा महाराष्ट्रभर झेडा!’ असो. डॉ. सबनीसांनी पुस्तकाची माहिती सांगितली. सबनीसांचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे. चांगल्या लेखकांचं हा ज्येष्ठ समीक्षक अतिशय मनमोकळेपणे कौतुक करतो. कौतुक करताना काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यांनी पडवळांना प्रोत्साहन दिलं. त्याआधी गिरीश टकले बोलले. गिरीशजी हा माणूस साक्षात बृहस्पती आहे! प्रकांड पंडित! त्यांनी नाशिकचा सगळा इतिहास सोप्या व ओघवत्या भाषेत सांगितला. पडवळांचे एक मार्गदर्शक आप्पा पोळ. ते देखील व्यासपीठावर होते. त्यांचंही मनोगत झालं. अगदी थोडकं, मात्र भावपूर्ण बोलले ते. मग पडवळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अभ्यासपूर्ण बोलले ते सुद्धा. त्यांची एक मागणी त्यांनी डॉ. साळुख्यांकडे व्यक्त केली. नाशिकच्या संदर्भातील जुनी कागदपत्र एकत्रपणे जतन करण्यासाठी कुलगुरू म्हणून साळुंखे सरांनी पुढाकार घ्यावा, अशी ती मागणी. साळुंख्यांनी ती मान्य केली. साळुंख्यांचं ंव्यक्तिमत्वही गोड व लोभस! एखाद्या लहान मुलासारखं. तेही दिलखुलास बोलले व एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम संपला. मी व नेर्लेकरांनी आधी गिरीश टकल्यांना गाठलं. ’टकले ज्वेलर्स’हे नाशिकमधलं प्रसिद्ध नाव. ज्वेलरीचा व्यवसाय सांभाळून हा माणूस अफाट अभ्यास करतो. अफाट म्हणजे किती? तर त्यांच्या घरात पंधरा हजार ग्रंथ आहेत! अनेक महत्त्वाच्या शेकडो चित्रफिती आहेत! भारत-चीन संबंध, दुसरं महायुद्ध, पानिपतचं युद्ध अशा विषयांवर ते तासंनतास बोलतात. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा आणखी एक त्यांच्या अभ्यासाचा विषय. इतकं असून पाय जमिनीवर असलेला हा माणूस! ‘‘सर, तुमच्यासारखी विद्वत्ता पुण्यातसुुद्धा फारशी पहायला मिळत नाही.’’ मी त्यांना म्हणालो. ‘‘आम्हालाही बरं वाटतं पुणेकरांनी कौतुक केल्यावर.’’ ते निष्पापपणे हसत म्हणाले. टकले सर कार्यक्रमानंतर बराच वेळ आमच्याशी बोलत राहिले. त्यांचा नंबर घेतला व त्यांनीही तो मोकळेपणानं दिला. जगभर फिरलेला व नुकताच जर्मनीला जाऊन आलेला हा माणूस; मात्र ’केव्हाही आलात नाशिकमध्ये तर भेटा’ असं सांगायला विसरला नाही.
रात्री घनश्याम पाटलांनी सर्वांना हॉटेलमध्ये जेवण दिलं. वय तरी किती असं या माणसाचं; मात्र मनाचा हा मोठेपणा यानं आणला कुठून? मी विचार करत राहिलो. रात्री अकराच्या दरम्यान आमच्या कारनं पुण्याचा रस्ता धरला. हे सगळं नीट घडावं म्हणून पाटलांनी आपलं तन, मन, धन पणाला लावलं. त्यामुळंच गिरीश टकले, अपर्णा वेलणकर, डॉ. माणिकराव साळुखे, संजय वाघ, रमेश पडवळ अशी सोन्यासारखी माणसं कमवून आम्ही पुण्याला परतलो होतो. मनात असलीच तर एक भावना होती,'

'खुदा खैर करे...'
- महेश मांगले, पुणे 
९८२२०७०७८५

Monday, July 6, 2015

'मसाप'चे बेगडी सावरकरप्रेम!

प्रत्येक कार्यक्रमात 'मिरवण्यासाठी' प्रसिद्ध असलेल्या अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य
साहित्य संमेलन आणि वाद यांचं नातं अगदी अतूट आहे. फेव्हिकॉलच्या जाहिरातीत ‘ये तूटेगा नही, फेव्हिकॉलका जोड है’ असं एक वाक्य असायचं. साहित्य संमेलन आणि वाद यांचा जोड तसाच आहे. विश्‍व साहित्य संमेलन आणि वाद हे तर जुळे भावंडं आहेत. पहिल्या विश्‍व साहित्य संमेलनापासून जे वाद सुरू झाले आहेत, ते आजही सुरू आहेत. विश्‍व साहित्य संमेलन भरवता येते का नाही या मुद्यापासून वाद सुरू झाला होता. त्यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील होते. त्यांनी हे संमेलन भारताबाहेर होणे कसे आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आकांडतांडव केले. आता अंदमानात होणारे विश्‍व साहित्य संमेलन कसे बरोबर आहे हे महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य सांगत आहेत.
अंदमानात विश्‍व साहित्य संमेलन भरवणे ही फक्त चुकीची बाब आहे. कारण अंदमान हा भारताचा भाग आहे. विश्‍व संमेलन हे परदेशातच घेतले जाईल अशी आजपर्यंत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची भूमिका होती. मात्र आता स्वत:ला मिरवून घेण्यासाठी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंदमानला संमेलन होणे कसे बरोबर आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सावरकरांना त्यांनी निर्लज्जपणे वेठीस धरले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षानिमित्त हे संमेलन आम्ही अंदमानात घेत आहोत’, अशी भूमिका माधवी वैद्य यांनी मांडली आहे. मात्र, ज्या दोन संस्थांनी अंदमानात संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव दिले होते त्यापैकी ज्या संस्थेने सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम गेली काही वर्षे अव्याहतपणे केले आहे त्याच संस्थेचा प्रस्ताव नाकारला आहे. निलेश गायकवाड यांच्या संस्थेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर जी कारणे समोर आली आहेत, ती अत्यंत धक्कादायक आहेत. ‘महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा विमान प्रवास, राहण्याची सोय आणि तेथे खर्चासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये महामंडळाने मागितले. ते देण्यास नकार दिल्याने आमचा प्रस्ताव नाकारला’ असा दावा निलेश गायकवाड यांनी केला आहे. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी खर्चासाठी पाच हजार रुपये मागणे हे त्यांना निवडून देणार्‍या सर्व मतदारांचा अपमान करणारे आहे. आपल्या पदाचा असा दुरुपयोग आणि तोही साहित्य क्षेत्रातील मंडळीनी करावा हे किळसवाणे आहे. जर हे खरे असेल, तर महामंडळाच्या सदस्यांनी वैद्य यांच्यावर अविश्‍वास ठराव आणावा आणि तसे झाले नाही तर त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरावा. जर निलेश गायकवाड खोटे बोलत असतील तर महामंडळाने त्यांच्यावर अबू्र नुकसानीचा खटला दाखल करावा. आपण निरपराध आहोत हे त्यांनी सिद्ध करावे.
माधवी वैद्य यांनी यापुर्वी अशा विविध प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाईचा आग्रह धरला आहे. अर्थात वैद्य यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तासमोर सुरू असलेल्या खटल्यांचे काय झाले ते अद्याप कळलेले नाही. मात्र या प्रकरणी वैद्य यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा ‘दूध का दूध और पानी का पानी‘ हे सिद्ध करण्यासाठी गायकवाड यांच्याविरुद्ध खटला दाखल करावा. मुळात अंदमानात असो की जगाच्या पाठीवर कुठंही जर साहित्य संमेलन भरवायचं असेल तर साहित्य विषयक संस्था किंवा साहित्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देणार्‍या संस्थेला संधी मिळाली पाहिजे. इथं वैद्य यांनी दोन व्यावसायिक संस्थांची निवेदने स्वीकारून पहिली चूक केली आहे. आता त्याची भरपाई कशी करणार हा खरा प्रश्‍न आहे. उद्या कोणीही धनदांडगा उठेल आणि संमेलनाचा खर्च करण्याची हमी देऊन संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव देईल.
ज्या सावरकरांचे नाव वैद्यबाई घेत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे प्रेम हे जर खरं असेल तर सावरकरांच्या साहित्यिक कार्याची माहिती देणारी स्मरणिका काढावी, तसेच त्यांच्या स्मृतिनिमित्त पुण्यात कविसंमेलन घ्यावे, त्यासाठी दुसर्‍याच्या खर्चाने अंदमानला जाण्याचा खटाटोप करू नये.
माधवी वैद्य आणि त्यांच्या आजवरच्या भूमिका याबद्दल वेगळा लेख करता येईल. पण आता अंदमानच्या संमेलनावरून जो वाद पेटला आहे त्याचे निराकरण व्हायला हवे. सावरकर प्रेमींना देणगीचे आवाहन करणार्‍या वैद्यबाईंनी जर अंदमानात संमेलन घेण्यात योग्य भूमिका बजावली असती तर लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या असत्या. सावरकरांचे नाव घेऊन स्वत:ची प्रतिमा उजळ करण्याचा उद्योग तातडीने थांबवावा. सावरकरांची अप्रतिष्ठा होऊ नये यासाठी सावरकर प्रेमींनीच महामंडळाला या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी जाब विचारावा.

- देवदत्त बेळगावकर, पुणे 

Thursday, July 2, 2015

‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाची परखड चिकित्सा करणारे पुस्तक

- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
सांस्कृतिक समृद्धीसाठी कार्यरत असलेल्या आणि मराठी मासिकाच्या परंपरेत मोठे योगदान देणार्‍या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या जुलै 2015 च्या अंकात ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे परीक्षण आले आहे. संपादक भानू काळे आणि हे परीक्षण लिहिणारे महाराष्ट्रातील विख्यात वक्ते आणि लेखक, सन्मित्र प्रा. मिलिंद जोशी यांचे आभार. 

 1995 साली महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साडेचार दशकांची कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. युतीचे राज्य आले. ‘ग्रंथाली’तर्फे ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी हे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’च्या वतीने या पुस्तकाची ‘समकालीन राजकारणावरील अभ्यासपूर्ण व खळबळजनक ग्रंथ. तो वाचायला रोचक आहे आणि संग्रहालाही उपयुक्त आहे’ अशी जाहिरातही करण्यात आली. प्रत्यक्षात या पुस्तकात अनेक चुकीचे संदर्भ आहेत हे जाणवल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखकद्वयींशी आणि प्रकाशकांशी पत्रव्यवहारही केला. त्यावर प्रकाशकांनी ‘आपण लेखकांना लिहिलेल्या पत्राची प्रत वाचून थक्क झालो. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून पुढे काय करायचे ते ठरवतो आणि कळवतो’ असे पत्राद्वारे सांगितले. तर लेखकांनी ‘तुमची आणि आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशन होण्यापूर्वीच दाखविले असते परंतु ते होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या आणि न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ती पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यासाठी काही दिवस लागतील. तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत,‘ अशा आशयाचे पत्र पाठवले.
या पुस्तकाची कौतुकाची परीक्षणे सर्वत्र छापून आली. ‘पुढच्या आवृत्तीत चुकांची दुरूस्ती करण्यात येईल’ असेही लेखक आणि प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात आले. मे 1997च्या सुमारास ‘महाराष्टचतील सत्तांतर’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात आली. भाऊ तोरसेकरांनी ती पाहिली. त्यात चुकांची पुनरावृत्ती होती. या पुस्तकामुळे वाचकांची दिशाभूल आणि बुद्धिभेद झाला असे मानणार्‍या भाऊ तोरसेकरांनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची परखड चिकित्सा केली आहे.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात सडेतोड आणि परखड राजकीय  विश्‍लेषक म्हणून स्वतंत्र ओळख असलेले भाऊ तोरसेकर गेली शेहेचाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’तून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली. अनेक दैनिकांत आणि साप्ताहिकांत त्यांनी उपसंपादक आणि स्तंभलेखक म्हणून लेखन केले. श्री, ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपूत्र या साप्ताहिकांत तसेच दै. सकाळ, नवशक्ती, आपला वार्ताहर अशा दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली. जनशक्ती, नवनगर या दैनिकांचे आरंभीचे संपादक असलेल्या तोरसेकरांचे आजवर दहा हजारांपेक्षा जास्त सामाजिक, राजकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘कोरी पाटी’, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’, ‘मोदीच का?‘ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ हे पुस्तक म्हणजे मतभेदाचे रूपांतर मनभेदात न होऊ देता प्रतिवाद कसा करावा  याचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या आणि राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना आहेत. त्याची माहिती अथवा संदर्भ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ या पुस्तकात नाही. उदाहरणार्थ, शालिनीताई पाटील यांची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा. पी. के. सावंत, राजारामबापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (70-74), शंकराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, 1960पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडलेली कॉंग्रेस संघटना आणि त्यांनी टाळलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, मुंबईतील ऐतिहासिक गिरणीसंप आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेली पालिकेतील सत्ता, औरंगाबाद महापालिकेत सेनेचा दणदणीत विजय, 1991 साली पवारविरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल आणि रूपकुंवर सतीचे वादळ यांकडेही तोरसेकरांनी लक्ष वेधले आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकात लेखकांनी ‘1985च्या राजवस्त्रविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने अल्पकाळ शरद जोशी, दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते’ असे म्हटले आहे. ते कसे चुकीचे आहे हे देखील तोरसेकरांनी दाखवून दिले आहे.
इतिहास म्हणजे केवळ घटना, प्रसंगांची जंत्री नसते. ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचे संचित असते. त्यामुळे इतिहास कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता त्रयस्थपणे, तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे मांडला गेला पाहिजे. अनेकदा उपलब्ध साधने, अभ्यासाच्या मर्यादा आणि व्यक्तीचा आवाका यांमुळे इतिहासलेखनाला मर्यादा येतात. चुकाही राहून जातात पण त्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुरूस्त करणे महत्त्वाचे असते. अन्यथा चुकीच्याच गोष्टी पुढील अभ्यासकांपर्यंत जातात. असे घडू नये यासाठी भाऊ तोरसेकरांनी हा लेखनप्रपंच केला आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
पृष्ठे :148, किंमत : 150 रू.

Wednesday, July 1, 2015

भंपक नेमाडे

'साहित्य चपराक' मासिकाच्या जुलै २०१५ अंकातील उमेश सणस यांचा हा विशेष लेख अवश्य वाचा.


मराठीमध्ये सर्वाधिक कंटाळवाण्या कादंबर्‍या कोणी लिहिल्या आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोपे आहे. मराठीतील सर्वात कंटाळवाण्या कादंबर्‍या या भालचंद्र नेमाड्यांच्या आहेत. नव्या पिढीतील कोणत्याही मुलाला भालचंद्र नेमाड्यांची कोणतीही कादंबरी वाचावयास दिली तरी 20 पानांच्यापुढे ती कादंबरी वाचणे शक्य नाही. त्यांच्या कादंबर्‍या जेवढ्या कंटाळवाण्या आहेत तेवढीच त्यांची सार्वजनिक जीवनातील वक्तव्येही आकर्षक असतात.
भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. ‘बिढार,’ ‘कोसला’ आणि अगदी अलीकडची म्हणजे ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ या कादंबर्‍यामध्ये मराठी वाचक नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून ओळखतात. त्यांची ओळख कादंबरीकार म्हणून असली तरी निरस, बोजड व अर्थहीन कादंबर्‍यामुळे मराठी कादंबरीची फारशी प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. त्यांच्या या अनाकर्षक कादंबर्‍यामुळे उलट मराठी वाचक मराठी कादंबरीपासून दूर गेला असं म्हणायलाही हरकत नाही.
नेमाड्यांची कुठलीही कादंबरी संपूर्ण वाचणारा वाचक आजच्या पिढीतच नव्हे तर यापुर्वीच्या पिढीतही दुर्मिळ म्हणावा लागेल. नेमाड्यांच्या कादंबर्‍या वाचवत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या अत्यंत कंटाळवाण्या आहेत. कुठल्याही निर्मात्यानं नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न आजतागायत केला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांना कथाच नसते, तेव्हा निर्माते चित्रपट कोठून निर्माण करणार? नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर नाटकं झाली नाहीत. नेमाड्यांच्या कादंबर्‍या दूरदर्शन निर्मात्यांनी विचारात घेतल्या नाहीत. सशक्त कलाकृती ही विविध माध्यमात फिरत राहते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांबद्दल असं होत नाही. नेमाड्यांच्या एखाद्या कादंबरीवर चित्रपट काढावयाचा म्हटलं तर नेमकं काय दाखवायचं हा प्रश्‍न आहे. तीच गोष्ट दूरदर्शनवर एखादी मालिका काढायची म्हटली तरी निर्माण होवू शकते.
अशा कादंबर्‍या लिहूनही नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून समीक्षकांनी गौरवले आहे. समीक्षकांची मतं काही असतील ती असू देत, पण नेमाड्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही हे सत्य स्वीकारायला हरकत नाही. नेमाड्यांना स्वत:ला याची जाणीव आहे का नाही हे माहीत नाही. फार मोठी साहित्यनिर्मिती न करताही नेमाडे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले. कादंबरीकार म्हणून अलीकडे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असला तरी नेमाड्यांच्या कादंबर्‍या फारश्या गांभिर्याने घ्याव्यात अशातला भाग नाही. प्राध्यापक नायक असलेल्या नेमाड्यांच्या प्रत्येक कादंबरीमधली निरस चर्चा, कंटाळवाणे वातावरण यामुळं त्यांच्या कादंबर्‍या वाचकाला नेमकं काय देवून जातात हा भला मोठा प्रश्‍न निर्माण होतो.
 काही कलाकृती या सर्वकालीन कलाकृती असतात. प्रत्येक पिढीतील वाचक त्याचा आनंद घेवू शकतात. असा प्रकार नेमाड्यांच्या कादंबर्‍याच्या बाबतीत कधीही झाला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍या आवडणारी एकच पिढी होती. प्राध्यापक फडक्यांच्या खोट्या, ओढून ताणून तयार केलेल्या प्रेमकथांनी कंटाळलेला वाचकवर्ग काहीतरी नवीन शोधत होता. वि. स. खांडेकराच्या अतेरिकी ध्येयवादाचा मराठी वाचकांना त्रास होवू लागला होता. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांना तत्कालीन वाचकांकडून थोडाफार प्रतिसाद मिळाला इतकेच पण सर्वकालीन यशस्वी कलाकृती मराठी साहित्याला देण्यात नेमाडे अयशस्वी ठरले. फार गाजावाजा करून आलेली त्यांची ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ ही कादंबरी मराठी कादंबरी विश्‍वातली एक ‘अडगळ’ ठरावी इतकी रसहानी करणारी आहे.        
 नेमाडे हे कादंबरीकार म्हणून सामान्य मराठी वाचकाला परिचित आहेत ते असे. त्यांच्या कादंबर्‍या कोणी वाचल्या नाहीत. त्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट, मालिका अगर नाटके निघाली नाहीत, असे कंटाळवाणे कादंबरीकार अशी नेमाड्यांची ओळख मराठी साहित्यात सर्वकाळ राहील. मात्र सार्वजनिक जीवनात सातत्यानं चर्चा होईल अशी विधानं करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. साहित्य संमेलनाबद्दलची त्यांची मते सर्वश्रुत आहेत.
गेल्या 25 वर्षात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी भालचंद्र नेमाड्यांना मिळाली. ते दरवर्षी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य संमेलनाबद्दलची आपली मतं प्रगट करतात. ‘साहित्य संमेलनाचा साहित्याला काहीच उपयोग नाही, साहित्य संमेलन हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे,’ अशी सहजी विधाने करून भालचंद्र नेमाडे खळबळ उडवून देतात. भालचंद्र नेमाड्यांच्या या योगदानाचा विचार मात्र मराठी साहित्याला जरूर करावा लागेल. भालचंद्र नेमाडे सार्वजनिक जीवनात जी विधान करतात त्यामुळे साहित्य, सांस्कृतिक व मराठी जगतात त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होते हे त्यांचं कौशल्य अत्यंत वादातीत म्हटलं पाहिजे. भाषा जिवंत रहावी असं वाटत असेल तर त्या भाषेत सतत वाद, संवाद, प्रतिवाद झाले पाहिजेत, नवी मतं मांडली गेली पाहिजेत आणि काहीतरी वेगळ्या विषयाची मांडणी केली गेली पाहिजे! हे काम गेली काही वर्ष नेमाड्यांच्या विधानांमुळं होत आहे, हे निश्‍चित.
साहित्य संमेलनांच मराठी भाषेसाठी असलेलं योगदान फारसं चांगलं नाही. साहित्य संमेलनांनी मराठी साहित्याला फार काही दिलं अशातलाही भाग नाही. साहित्य संमेलन म्हणजे ‘बैलबाजार’ आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणानं म्हटलेलं होतं. ते अगदी खरंही आहे.  शिवसेनाप्रमुखांच्या या विधानाला एकाही मराठी साहित्यिकाने विरोध केला नाही, याचं महत्त्वाचं कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हे विधान सर्व साहित्यिकांना मान्य होतं एवढाच आहे. अशा सर्व परिस्थितीत भालचंद्र नेमाड्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल व्यक्त केलेली मतं गांभिर्यानं घ्यायला हरकत नाही. भालचंद्र नेमाडे हे वेळोवेळी विविध विषयांवर अशा प्रकारची मत व्यक्त करतात आणि त्यामुळं भालचंद्र नेमाडे चर्चेत राहतात.
एखाद्या कादंबरीकारानं बोलायचं तर स्वत:च्या कलाकृतीतून बोललं पाहिजे, कादंबरीकाराची कलाकृती बोलली पाहिजे, असं अभिप्रेत आहे. भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या कादंबरीतून फारसं बोलत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही. त्यामुळं त्यांनी कादंबरीतून बोलायचं ठरवलं तरी ते पोहोचणार कोणापर्यंत हा फार मोठा प्रश्‍न आहे. चांगल्या लेखकाच सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याच्या कलाकृतीतून बोलत असतो. त्याची कलाकृती त्याला काय म्हणायचंय ते सांगत असते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांनी त्यांना काय म्हणायचंय ते कधीच सांगितलं नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यातून त्यांना जे काही सांगायचं, ते लोकांपर्यंत फारसं प्रभाविपणानं कधी पोहोचलंही नाही. मात्र सार्वजनिक व्यासपीठावर नेमाडे जेही बोलले त्याच्या अनुषंगानं अनेकदा चर्चा झाल्या, अनेकदा लोकानी वाद केले, संवादही झाले, प्रतिवादही झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, काही वेळा नेमाड्यांना गांभीर्यानंही घ्यावं लागलं.
अलीकडं मात्र नेमाडे यांनी मराठी माणसाचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी विधाने करून चर्चेत राहण्यात नेमाडेंना गंमत वाटत असेल पण त्यामुळे मराठी समुहाचा अपमान होत असेल तर, नेमाडे काय बोलतात हे त्यांना समजावून सांगावे लागेल. सवंग व उथळ विधानांमुळं लोकप्रियता मिळत असेलही पण तेवढ्यासाठी सतत तशीच विधाने करणे चांगले नाही.
 कलाकार म्हणून, लेखक म्हणून, बोलणारा पण साहित्यकृतीद्वारे न बोलू शकणारा लेखक म्हणून भालचंद्र नेमाड्यांचं नाव घ्यावं लागेल. पण साहित्यकृतीतून न बोलताही, त्या बाहेरील व्यासपीठावर बोलल्यानंतरही ज्याच्या बोलण्याचा गांभिर्यानं विचार करावा लागतो, असे लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाड्यांचे हे एक वैशिष्ट्य मान्य केलं पाहिजे. नेमाडे जे बोलतात, त्यापासून ते कधी दूर होत नाहीत. म्हणजेच साहित्य संमेलनांबद्दल त्यांनी जे मत व्यक्त केलं, त्या मतापासून नेमाडे कधी ढळले नाहीत. नेमाड्यांना साहित्य संमेलनाच्या एखाद्या कार्यक्रमास बोलावलं किंवा साहित्य संमेलनात त्यांना मोठा सन्मान दिला तरी नेमाडे बदलतील असं आजच्या घडीला वाटत नाही. स्वत:च्या मताशी व विचारांशी ठाम राहणं हे भल्याभल्यांना जमत नाही. नेमाडे त्याबाबतीत मात्र ठाम आहेत. त्यांनी आपले विचार कधी बदलले नाहीत. ही गोष्ट आवर्जून मान्य करावी लागेल.
 इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमाडे अनेक वर्षे काम करीत होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळा म्हणजे खाटीकखाने आहेत, असं जाहीरपणांनं बोलायला नेमाडे कचरत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी संस्कृतीवर आक्रमण करतात, असाही एक आरोप नेमाड्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमांची संस्कृती रूजविणारे कुणी नेमाड्यांच्या विरोधात बोलायला पुढे आले नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणार्‍यांना नेमाड्यांचे विचार बरोबर आहेत की चूक आहेत, हे सांगावेसे वाटत नाहीत पण मराठी भाषा आणि संस्कृती मोठी व्हावी यासाठी विचारमंथन करणार्‍या प्रत्येकाला त्यांच्या या विधानाचा गांभिर्याने विचार करणं भाग पडतं.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दिलं जाणारं शिक्षण, या शाळांमधली संस्कृती, या शाळांमध्ये साजरे होणारे सण, या शाळांमधले उत्सव हे सर्व मराठी संस्कृतीपासून दूर जात आहे, ही गोष्ट खरीच आहे. ही गोष्ट अत्यंत प्रभावीपणानं आपल्या एखाद्या कादंबरीत नेमाड्यांनी मांडली असती, तर त्याचं स्वागत फार चांगलं करता आलं असतं. पण नेमाड्यांना स्वत:च्या कांदबरीत काहीच मांडता येत नाही. पानामागून पानं कंटाळवाण्या भाषेत लिहीणं यात नेमाड्यांइतका हातखंडा लेखक नाही आणि अत्यंत मोजक्या शब्दात सार्वजनिक व्यासपीठावर आपला विषय लोकांपर्यत पोहोचवणं यातही नेमाड्यांइतका चतुर संभाषक नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळांद्दल नेमाड्यांनी केलेली विधानं गांभीर्यानं घेवून त्या अनुषंगानं त्यावर चर्चा झाली पाहिजे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळं मराठी संस्कृतीवर अतिक्रमण झालं का? हा विचाराचा मुद्दा आहे. मराठी भाषा व संस्कृती ही कुणाच्या आक्रमणानं कधी दबलेली नाही पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा अडथळा ठरू पाहतात, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. भालचंद्र नेमाडे हे सार्वजनिक व्यासपीठावरून असे सारखे बोलतात, त्यांचं बोलणं काही वेळा विचारात घ्यावं असं असतं.
मध्यंतरी नेमाड्यांनी पुण्यामध्ये येवून, ‘‘ओळख टिकवण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा झाला’’, असं विधान केलं. आपल्याकडे राष्ट्रवादाचा अतिरेक वाढत चालला आहे. फक्त आपलीच ओळख टिकावी यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत आहे आणि त्यामुळंच व्यवस्थेचा चुराडा होत आहे, असं नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभात जाहीरपणानं सांगितलं. ओळख टिकविण्याची धडपड ही प्रत्येक सजीवाची त्याच्या जन्मापासून अंतापर्यत चालू असते. स्वत:च्या ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं तो समाज, तो समूह, ती भाषा समृद्ध होत असते. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो. हे नेमाड्यांनी कोठून शोधून काढलं हे माहिती नाही.
नेमाडे हे प्राध्यापक आहेत. अर्धवट अभ्यास करून अर्धवट विधानं करण्याची त्यामुळं बहुदा त्यांना सवय असावी. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं ती ती भाषा समृद्ध झालेली आहे. इंग्रज जगभर पोहोचले. इंग्रजांनी स्वत:ची ओळख टिकवणं आणि विस्तृत करणं यावर भर दिला आणि इंग्रजी भाषा समृद्ध झाली. स्वत:ची ओळख पटल्यानंतर कालीदासांसारखा कवी हा महाकवी झाला. स्वत:ची ओळख टिकविण्याच्या संघर्षातून वाल्मिकीचं रामायण निर्माण झालं, ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं हिंदवी स्वराज्य सतराव्या शतकाचं आपल्याला पहायला मिळालं, हा सारा इतिहास समोर असताना ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो, असं नेमाडे कशाच्या आधारे म्हणतात, हे समजून येत नाही. इतिहासाचा अर्धवट अभ्यास, समाजशास्त्राचं तोकडं असलेलं ज्ञान आणि प्राध्यापकी जीवनाशिवाय बाहेरच्या जगाचा नसलेला अनुभव यामुळं अशाप्रकारची अर्धवट विधानं नेमाड्यांकडून होत असतात, ही गोष्ट तर स्पष्ट आहे.
आत्तापर्यंत नेमाड्यांची विधानं अनेकदा फारशी गांभिर्यानं घेतली जात नव्हती. नेमाडे विधानं करतात त्यावरून चर्चा होतात, वाद होतात, चहाच्या प्याल्यातली वादळंही होतात. हे मराठी साहित्य जगताला माहिती होतं. पण त्यांचा विचार गंभीरपणाने करण्याची गरज नाही, असं नेमाड्यांच्या अनेक समर्थकांनाही वाटत होतं. पण नेमाड्यांना भारतीय साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत प्राध्यापक म्हणून त्यांनी व्यक्त केलेली अर्धवट मतं, त्यांच्या अर्धवट अभ्यासातून आली आहेत असं समजून त्याकडं दुर्लक्ष केलं जात होतं. त्यांच्या कादंबर्‍या कंटाळवाण्या असल्यामुळे,त्या फारश्या विचारात घेतल्या जात नसल्यामुळं नेमाड्यांची इतर मतही फारसं कोणी विचारात घेत नव्हतं. मात्र आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळं त्यांची मतं गांभिर्याने घेतली जाताहेत. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी स्वत:ही जबाबदारीनं विधानं करण्याची गरज आहे.
नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात आणखी एक विधान केलं. मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे हा शोध त्यांनी नेमका कुठं लावला हे समजून येत नाही. नेमाडे नेमके असं म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे. 1901 पूर्वी मराठा अशी जात नव्हती. सर्वजण कुणबी म्हणजे शेतकरी होते. त्यावेळी ब्राह्मणी राष्ट्रवादाचा उदय झाला. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवाद मांडला होता. त्याला अटकाव करण्यासाठी मराठा जात तयार झाली, हे सगळे इंग्रजांनी केले. जाट समाजाचेही असेच आहे.’’ नेमाड्यांच्या या अभ्यासाशी इतिहासाचा संबध नाही. त्यांच्या या विधानाशी समाजशास्त्राचा संबंध नाही. त्यांनी ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे,’ असे म्हटले आहे. याच्याशी इंग्रजांचाही संबंध नाही. आपण असं काही केलेलं आहे, हे इंग्रजांनाही माहिती नाही. ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे’ हे संशोधन नेमाड्यांनी नेमकं कशाच्या आधारे केले हे समजून येत नाही.
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भालचंद्र नेमाड्यांनी सलमान रश्दींच्या लेखनाबद्दल अशीच काही विधानं केली. सलमान रश्दींनी अगदी मोजक्या शब्दात नेमाड्यांचा समाचार घेतला. त्याला पुन्हा नेमाड्यांनी उत्तर दिले नाही. सलमान रश्दींच्या साहित्याबद्दल नेमाडे नेमके का बोलले, हेही समजून आलं नाही. सलमान रश्दी गप्प न बसता अंगावर आल्यानंतर नेमाड्यांनी तो विषयच बंद करून टाकला.
‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे. जाट समाज ही पण त्यांचीच निर्मिती आहे,’ हे नेमाड्यांना बहुदा इंग्रजांनी स्वप्नात येवून सांगितले असावे. इंग्रज त्यांना म्हणाले असणार ‘मराठा समाज व जाट समाजाची निर्मिती आम्ही केली आहे.’ अन्यथा त्यांना कळायला अन्य मार्ग उपलब्ध नव्हता व नाही. त्यांनी इतिहासाचे अवलोकन व अभ्यास थोडा जरी बारकाईने केला असता तरी त्यांना मराठा समाज ही इंग्रजांची निर्मिती नाही हे स्पष्टपणे समजून चुकले असते. परंतु परिपूर्ण अभ्यास करायचे, व्यासंगीपणाने प्रकट व्हायचे हे नेमाड्यांसारख्या उथळ विधानं करणार्‍या व्यक्तिला माहिती नाही. त्यातूनच त्यांची असंख्य चुकीची विधानं वेळोवेळी येतात. आत्तापर्यंत या विधानांबद्दल चर्चा झाली. काही वेळा त्या विधानांशी सहमत होण्याचा प्रसंग आला, काही वेळा त्यांची ही विधानं चुकीची आहेत, हेही लक्षात आलं. पणं त्यांची अर्धवट विधानं करण्याची सवय त्यामुळं कधीच गेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मूल्यमापन करताना आज्ञापत्र लिहिणारे रामचंद्र अमात्य लिहीतात, ‘चालीस हजार पागा, साठ हजार सिलेदार व दोन लक्ष पदाति, कोट्यवधी खजाना, तैसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुज्यात संपादिल्या. शहाण्णव कुलीचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. देशदुर्गादि सैन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन सृष्टीच निर्माण केली.’
छत्रपती शिवाजी महाराजांनी असा पराक्रम केला की शहाण्णव कुळीचे मराठ्यांचा उद्धार झाला, असा स्पष्ट उल्लेख आज्ञापत्रात होता. आज्ञापत्र लिहिणार्‍या रामचंद्र अमात्यांना आज्ञापत्र लिहिण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व व्यवस्थेची प्रेरणा होती. आज्ञापत्रातील बहुतांश मजकूर हा छत्रपती पे्ररणेने लिहिला गेला आहे, असेही इतिहासाचे अभ्यासक सांगतात. भालचंद्र नेमाडेंना रामचंद्रपंत अमात्याचे आज्ञापत्र वाचण्याचा प्रसंग आलेला नाही. अर्धवट इंग्रजी व अर्धवट मराठी शिक्षणातून नेमाडे आपली मतं तयार करतात व बिनदिक्कत मारतात.
नेमाडेंच्या एका धाडसाचं कौतुक करावयास हवं. आपण जे विचार मांडतो आहे त्याला इतिहासाचा, समाजशास्त्राचा काही आधार आहे का? याबद्दल कसलाही विचार ते करत नाहीत. कसलाही विचार न करता रेटून बोलण्याची नेमाडे यांची शक्ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेखकात नाही. हे नेमाडेंचं वेगळेपण ठरायला पाहिजे. रामचंद्र अमात्याला ‘शहाण्णव कुळीचे मराठे’ हा शब्द माहिती होता. मराठा ही जात माहिती होती. याचा उल्लेख त्याने सतराव्या शतकाच्या अखेरीस आज्ञापत्रात केलेला आहे. मात्र इंग्रजांनी मराठा समाजाची निर्मिती केली, हा शोध नेमाडेंनी लावला. आपण कुठला शोध लावला याबद्दलची माहिती ब्रिटिशांनाही नाही. मात्र ही माहिती ब्रिटिशांनाही व्हावी यासाठी नेमाडे आपली मतं मांडत असतात. नेमाडे या असल्या पोरकट विचारांचं प्रदर्शन करतात व त्यातून चर्चा होतात, वाद होतात. मराठी भाषा आणि संस्कृती आहे याचं प्रत्यंतरही येतं. खरं तर या पलीकडे फारसा विचार करण्याचं कारण नसतं.
आतापर्यंत नेमाडेंच्या मताकडं व अशा सवंग विधानाकडं दुर्लक्ष केलं जायचं. नेमाडेंच्या मताकडं दुर्लक्ष होण्याचं कारण ते प्राध्यापक होते व अर्धवट वाचनावर आपली विधाने व्यक्त करीत होते. पण आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना गांभिर्याने घेणे भाग आहे. नेमाडेंनी आणखी एक विधान केलं. ‘न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणे हे हिंदू समाजाचे लक्षण आहे’ त्यांचे हे मत अत्यंत हास्यास्पद आहे. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करत हिंदू समाज बसला असता तर हिंदू समाज काळाच्या ओघात असा टिकला नसता हे समाजशास्त्राचे अभ्यासकही मान्य करतात. जगाच्या इतिहासात अनेक प्रगत संस्कृती उदयास आल्या आणि अनेक प्रगत संस्कृती संपूनही गेल्या. सर्व बदल व परिवर्तनाला सातत्याने सामोरे जात टिकलेली संस्कृती म्हणजे हिंदू समाज आहे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मान्य करावं लागतं. हिंदू समाजानं न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण आहे हे खरं नव्हे. स्वत:च्या आयुष्यातील सामान्य प्रश्‍न सोडविण्यात हिंदू माणसाचा बहुतांश वेळ जात असतो. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण कधीही नव्हतं आणि नाही. हेही विधान कशाच्या आधारे नेमाडेंनी केलं हे समजून येत नाही. हिंदुत्ववाद्यांना चपराक ओढण्यासाठी व समाजवाद्यांना खूष करण्याकरीता नेमाडे असे बोलत आहेत की काय, हे त्यांचं त्यांनाच माहिती. नेमाडेंच्या याही विधानाला कसलाही आणि कोणताही आधार नाही. सदरचे विधान हे इतिहास, तर्कशास्त्र आणि समाजशास्त्र याच्या कुठल्याही कसोटीत बसत नाही. अडगळीत टाकावं असं हेही विधान नेमाडेंनी केलेलं आहे.
मध्यंतरी शोभा डे नावाच्या बाईंनी मराठी चित्रपटांबद्दल काही विधानं केलीत. ‘मल्टीप्लेक्सला मराठी सिनेमे लावले तर आम्हाला दहीमिसळ खावी लागेल, वडा खावा लागेल, पॉपकार्न खाता येणार नाहीत,’ असं बोलणार्‍या डे बाई. शोभा ताई आणि नेमाडे यांच्यात नेमका काय फरक आहे, हे समजून येत नाही. नेमाडे यांनी केलेले हे विधान शोभाताईंच्या विधानाच्या जवळपास जाणारंच आहे. मराठी समाज हा गेल्या 100 वर्षात चिंताग्रस्त झालेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं या समाजात दिसत नाहीत. मराठी माणसांचं नेमाडेंनी केलेलं हे विश्‍लेषण समग्र मराठी माणसांचं नक्कीच नाही. मराठी माणसांचा नेमाडेंच्या या विधानांशी सहमत होण्याचा प्रश्‍न येत नाही. नेमाडेंच्या कादंबरीतला नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा होता. चांगदेव पाटील हा त्या पिढीतील मराठी माणसांचंही प्रतिनिधित्व करत नव्हता आणि आजच्या पिढीतील मराठी मुलांचं प्रतिनिधित्व चांगदेव पाटीलनं करण्याचा प्रश्‍नच येत नाही. नेमाडेंचा नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा चिंताग्रस्त होवून जगणारा युवक म्हणून त्याचं वर्णन कदाचित करता येईल परंतु मराठी समाजाचं असं वर्णन करणं हे सर्वथा चूक आहे.
‘मल्टिप्लेक्सला मराठी सिनेमे दाखवू नयेत, मला पॉपकार्न खात हिंदी आणि इंग्रजी सिनेमे बघता यावेत’, अशी अपेक्षा बाळगणार्‍या शोभाताई आणि ‘100 वर्षात मराठी समाज हा चिंताक्रांत झालेला आहे आणि सुखी समाजाची लक्षणं या समाजात दिसत नाहीत’, हे हास्यास्पद मत मांडणारे भालचंद्र नेमाडे यांच्यात कोणताही फरक नाही.
मराठी माणसांचा द्वेष औरंगजेबापासून अनेकांनी केला. मराठी माणसाच्या मर्यादा दाखविण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. पण मराठी संस्कृतीचा असा चुकीचा उपहास करण्याचा, उपमर्द आजतागायत कोणाकडून घडलेला नाही. मराठी समाज कधी चिंताक्रांत नव्हता आणि चिंताग्रस्तही नव्हता. सतराव्या शतकात चारही बाजूनी अंधार असताना मराठी समाजानं स्वत:चं स्वत्व, अस्तित्व दाखवून जगण्याचा संघर्ष करून भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिलेली आहे. ब्रिटिशांशी शेवटपर्यत लढणारा समाज हा मराठी समाज आहे हा इतिहास भालचंद्र नेमाडेंना माहिती नसावा.
गेल्या शंभर वर्षात मराठी समाज चिंताक्रांत झाला आहे आणि सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात दिसत नाहीत, हे भालचंद्र नेमाडेंचं कथन तितकचं हास्यास्पद आहे. गेल्या शंभर वर्षात मराठी माणसानं अनेक क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती साधलेली आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात मराठी माणूस जावून पोहोचलेला आहे. मराठी माणसाच्या कार्याला आणि कर्तृत्वाला प्रदेशाच्या, देशाच्या, प्रांताच्या आणि भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मराठी माणसांचं कर्तृत्व विज्ञानापासून सहकारापर्यंत आणि उद्योगापासून ते कलेपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये प्रकर्षानं पाहता येत असताना मराठी समाज चिंताक्रांत झालेला आहे व गेल्या 100 वर्षात सुखी समाजाचं कोणतंही लक्षण मराठी माणसांत दिसत नाही, हे भालचंद्र नेमाडे कशाच्या आधारे म्हणाताहेत, हे समजून येत नाही.
बर्‍याचदा लेखक स्वत:ची प्रतिमा आरशात पाहतो व तीच समाजाची प्रतिमा आहे, असा त्याचा भ्रम व गैरसमज होतो. भालचंद्र नेमाडेंचंही असंच झालेल असावं. गेल्या शंभर वर्षात मराठी समाज मुळीच चिंताक्रांत झालेला नाही. सत्तेचाळीस साली देशाचा स्वातंत्र्य लढा असू देत, नाहीतर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसांनं केलेलं आंदोलन असू देत. मराठी माणूस हा सतत संघर्षाला तयार आहे. मराठी मुलखावर गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या दुष्काळाच्या संकटाशी झुंजारपणानं मुकाबला करणारा इथला सामान्य शेतकरी असो किंवा गिरणी कामगारांच्या संपानंतरही मुंबईमध्ये पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करणारा गिरणी कामगार असू देत. चिंताक्रांत जीवन मराठी माणूस कधी जगलेला नाही. स्वत:चं स्वत्व आणि स्वत:ची ओळख कायम ठेवत मराठी माणूस जीवनाला सामोरा गेलेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात नेमाडेंना दिसत नाहीत, हा त्यांच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यांनी स्वत:च्या जीवनाच्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. नेमाडेंची निरीक्षण शक्ती कमी आहे, हे त्यांच्या कांदबर्‍यांवरून जाणवतं. पण सध्याच्या त्यांच्या मतांवरून नेमाडे हे केवळ मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे निश्‍चित होत आहे.
मराठी माणसांचा उपमर्द औरंगजेबापासून लॉर्ड कर्झनपर्यंत अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. ज्याही वेळी मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न कोणी केला त्यावेळी मराठी माणसांनी त्याला खणखणीत उत्तर दिलं. मराठी समाज हा 100 वर्षात चिंताक्रांत कधीही नव्हता. कितीही मोठं संकट आलं, तरी त्या संकटाशी झुंजण्याची क्षमता आणि सामर्थ्य मराठी समुदायात 500 वर्षापूर्वी होती, आजही आहे आणि यानंतरच्या 5000 वर्षानंतरही राहील कारण मराठा समाज हा जगातल्या मोजक्या लढाऊ समाजापैकी आहे, संघर्ष करणार्‍या समाजापैकी आहे. लढणारा योद्धा आणि संघर्ष करणारा माणूस कधीही चिंताक्रांत होत नाही. मराठी समाज हा सातत्यानं लढत होता, संघर्ष करीत होता, त्यामुळं त्याला चिंताक्रांत होण्याची कोणतीच वेळ कधीच आली नाही.
युरोपियन संस्कृती आणि अमेरिकन संस्कृतीचा विचार करता याच्याशी मराठी समाजाची तुलना करता मराठी समाजात आजही कुटुंब व्यवस्था चांगल्या प्रमाणात टिकून आहे. मध्यम वर्गाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं मराठी समाज हा एका निश्‍चित चांगल्या दिशेनं वाटचाल करतो आहे. सतत चिंता करीत राहणं हे विचारवंतांचं लक्षण आहे. एखाद्या समाजाचं अगर समूहमनाचं नव्हे. सतत चिंता करीत रहाणं, हे रोगट प्रवृत्तीच्या माणसांचं प्रतीक आहे, एखाद्या समाजमनाचं प्रतीक नाही. ज्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कवच लाभलं, ज्या समाजात ज्ञानेश्‍वर तुकारामांसारखे कर्ते संत होवून गेले, तो समाज चिंताक्रांत जीवन जगण्याची शक्यता नाही आणि त्या समाजात सुखी जीवनाची कोणतीही लक्षणं नाहीत हे म्हणणंही हास्यास्पद आहे.
मराठी समाज चिंताक्रांत झालेला नाही. 100 वर्षात मराठी समाज जिद्दीनं जगण्याच्या संघर्षाला तोंड देत उभा आहे. 12 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला मराठी समाज हा प्रगती पथावर असून मराठी समाजाची प्रगती अव्याहतपणानं होत राहील, हे सांगण्यासाठी कोणा नेमाड्यांची आवश्यकता नाही. मराठी समाजावर जेव्हाही आक्रमण झाली तेव्हा मराठी समाजाची जिद्द, पराक्रम आजवर इतिहासानं अनुभवलेला आहे. असा मराठी समाज चिंताक्रांत जीवन जगतो, हे नेमाड्यांचं कथन त्यांच्या स्वत:च्या चिंताक्रांत मानसिक अवस्थेचं वर्णन करतो. मराठी समाज हा चिंताक्रांत न होता जिद्दीनं आणि आत्मविश्‍वासानं वाटचाल करतो आहे. सुखी समाजाची असंख्य लक्षणं मराठी समाजात दिसत असताना ती नेमाड्यांना दिसत नाहीत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण केवळ सवंग लोकप्रियतेसाठी नेमाडे अशी विधानं करत असतात. त्यातून नेमाड्यांना सवंग लोकप्रियता मिळेलही पण मराठी माणसाचा उपमर्द करणं योग्य नव्हे. मराठी समाजाच्या भवितव्याची आपणास काळजी आहे, असं दर्शवित मराठी समाजाबद्दल चुकीचे निष्कर्ष मांडणंही योग्य नव्हे, हेही नेमाड्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. नेमाड्यांच्या अनेक मतांबद्दल व विचारांबद्दल आत्तापर्यंत चर्चा होत राहिल्या मात्र अशाप्रकारची पोरकट विधानं नेमाडे करत राहिले तर यानंतरच्या काळात त्यांच्या कंटाळवाण्या कादंबर्‍यांकडं सहजी दुर्लक्ष आजच्या पिढीनं केलं त्याहीपेक्षा अधिक दुर्लक्ष आजची मराठी पिढी केल्याशिवाय राहणार नाही याचं भान नेमाड्यांनी ठेवायला हवं.
आपल्या मृत्यूसमयी औरंबजेबानं आपल्या मुलांना बोलावून सांगितले होते की, ‘‘मी माझ्या आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे मराठ्यांशी केलेलं युद्ध.’’ मराठ्यांशी युद्ध करून औरंगजेबाला पश्‍चाताप झाला होता. ‘मराठ्यांच्या नादाला लागू नका’ असा सल्लाही औरंबजेबाने आपल्या मृत्यूपुर्वी आपल्या मुलांना दिला होता. औरंबजेबाने आपल्या मुलांना दिलेला सल्ला हा भालचंद्र नेमाड्यांना माहिती नसावा. शोभाताईंचा तर त्यांच्याशी काहीच संबंध येत नाही, याची थोडी जरी माहिती या दोघांना असती तरी मराठी समाजाचा, मराठी माणसांचा असा उपमर्द करण्याचे धाडस त्यांनी केले नसते. मराठी माणूस संयमी आहे. मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. तुमचे आजवर भरपूर कौतुक मराठी माणसाने केले आहे. पण त्याचा गैरफायदा घेवू नका. एका प्रगत समाजाचा असा उपहास करू नका. प्रेम करणारी मराठी माणसे तुम्ही अनुभवली आहेत. उपहास आणि उपमर्द केल्यानंतर पेटून उठणारा मराठी माणूस तुमच्या परिचयाचा नाही. याला आवर घातला नाही तर, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

- उमेश सणस, वाई 
७३८५९९८१४७