Sunday, November 6, 2016

एक वेगळंच राजकारण

लोकांची लोकांकडून लोकांसाठी ही लोकशाहीची व्याख्या बदलली असून समाजातील काही घटक मिळून एक वातावरण तयार करतात आणि हे वातावरण म्हणजेच जनमत असल्याचं भासवलं जातं. एक चौकडी निर्णय घेते. नंतर टारगेट ठरविले जाते. त्यानुसार झपाट्याने हल्ला चढविला जातो. सर्व बाजूंनी माहोल तयार केला जातो. हितसंबधी गट, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांचा एक गट, राजकीय विश्‍लेषक, विद्यापीठातील तज्ज्ञ असे एका सुरात बोलायला लागतात.
हे वर्णन आहे चिलकॉट यांच्या अहवालातील. अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यात इंग्लड सहभागी झाले होते. या युद्धात इंग्लंडचे 179 जण मृत्युमुखी पडले होते. या युद्धात अमेरिकेसोबत सहभागी होणे संयुक्तिक होते का, याचा विचार करण्यासाठी इग्लंडमध्ये सर जॉन चिलकॉट यांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालातील हे निरीक्षण आहे. गेले दोन वर्षे देशात आणि महाराष्ट्रात जे सुरू आहे ते पाहता चिलकॉट यांनी केलेल वर्णन किती चपखलपणे बसते हे लक्षात येते.
उथळ, बेछूट, बिनबुडाचे आरोप करत सुटायचं आणि प्रसारमाध्यमातील एका गटाच्या सहाय्याने आरोपांचा धुराळा उडवायचा. न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर आलं तरी ते सत्य नाही, तर आपण म्हणतो तेच आणि फक्त तेवढेच सत्य या भूमिकेतून सरकारवर आरोप करायचे. गोंधळाचे वातावरण तयार व्हावे यासाठी तशा चर्चा करत रहायच्या, यासाठी अनेक जणांमध्ये अहमिका लागली आहे. येनकेन प्रकारेण सरकारची बदनामी, या एकमेव हेतूने अशा आरोपांची राळ उठविण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.
खरंतर साधारणतः दोन वर्षापूर्वी केंद्रात तीस वर्षांनंतर प्रथमच संपूर्णपणे बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं आणि वर्षानुवर्षे सत्ता साम्राज्यात राहणार्‍या काही मंडळींना अकाली वैधव्याची भावना निर्माण झाली. निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाला मात्र समाजवादी आणि कम्युनिस्ट यांना भाजपाचं यश पराकोटीचं बोचू लागलं आणि त्यातून सुरू झालं एक वेगळंच राजकारण.
खरंतर रा. स्व. संघाने सर्वसमावेशक हिंदुत्त्व नेहमीच मांडले; पण या हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्ववादी विचारांना, राष्ट्रवादी विचाराला कायमच जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू आहे. या विचारधारेबद्दल लोकांमध्ये सातत्याने खोट्या प्रचाराद्वारे अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःला सेक्युलर म्हणवणारी ही मंडळी सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्त्ववादी विचारांबद्दल जमेल तितकी खोटी माहिती पसरवत होती आणि तरी या सर्व खोट्या प्रचाराला बळी न पडता राष्ट्रवादी विचारधारा मानणारं सरकार सत्तेवर आलं हे या मंडळींचं सगळ्यात मोठं दुखणं होतं.
मुळात लोकशाहीच्या गप्पा आणि विचारस्वातंत्र्याच्या नावाने कंठशोष करणारी ही मंडळी प्रत्यक्षात मात्र दुसरा विचार स्वीकारायला तयार नसतात. एकतर तुम्ही डावे किंवा समाजवादी असले पाहिजे नाहीतर तुम्ही हिंदुत्त्ववादी असा स्पष्ट शिक्का आणि विभागणी इथे केली जाते आणि हिंदुत्त्ववादी म्हणजे तो बुरसटलेला प्रतिगामी हा पुढचा शिक्का तयारच असतो. त्यातून आम्ही म्हणतो तेच खरं हा डाव्यांचा, समाजवाद्यांचा गंड. बाता लोकशाहीच्या; मात्र आम्ही सांगतो ती लोकशाही आणि फक्त तेच बरोबर ही प्रत्यक्षातली वागण्याची रीत होती. त्यातून दुसर्‍या विचारांचं अस्तित्वही स्वीकारायला ही मंडळी तयार होत नाहीत. परस्पर संवाद आणि सहअस्तित्व ही संकल्पना फक्त आपल्या चौकडीपुरती मर्यादित असते. आपल्या विचाराला अनुकूल अशा मंडळींचा कंपू करून रहायचा आणि थोडा वेगळा विचार आला की सर्वांनी मिळून तुटून पडायचं, झोडपून काढायचं ही प्रसिद्ध रीत होती. त्यामुळे कंपुबाहेर कुणाला मान्यता मिळणार नाही याची दक्षता ही मंडळी वर्षानुवर्षे घेत आहेत.
कॉंग्रेसचा ‘सत्ता’ हाच विचार होता. त्यामुळे त्यांना वैचारिक भूमिकेबद्दल कधी आस्था नव्हती. त्यातून 1950 दरम्यानच्या चेन्नईजवळ झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केला आणि त्याचा पुरेपूर फायदा या समाजवादी-डाव्या मंडळींनी उचलला. राजाश्रय मिळाल्याने पुरोगामित्त्वाची झुल पांघरत, प्रगतीशीलतेचा मुखवटा चढवून म्हणता म्हणता महत्त्वाची क्षेत्रे काबीज केली. शैक्षणिक, प्रसारमाध्यमं, साहित्यिक क्षेत्रात कंपू निर्माण केले आणि हे कंपू एकमेकांची काळजी घेत वाढतील याची काळजी घेतली. कॉंग्रेसने दिलेल्या राजाश्रयाचा परतावा म्हणून हिंदुत्त्ववादी चळवळीला बदनाम करण्याचं, त्यावर कडाडून टीका करण्याचं काम मात्र ही मंडळी मनापासून करत होती.
पण तरीही या मंडळींच्या विखारी प्रचारानंतरही हिंदुत्त्ववादी विचार या देशात वाढत राहिला. त्यातून प्रथमच या देशात हिंदुत्त्ववादी विचारांचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि या मंडळींची पूर्ण पंचाईत झाली. त्यामुळे या सरकारच्या विरोधात काहीही करून वातावरण करण्याचा निर्धार काहीजणांनी केला. त्याचा परिपाक सध्या आपण पाहत आहोत. गेल्या दोन वर्षातील आपण या देशातील प्रश्‍न पाहिले तर हेच दिसून येतं.
गेल्या दोन वर्षात सर्वात चर्चेत राहिलेले प्रश्‍न कोणते? पुरस्कार वापसी, पुण्यातील एफटीआय, जेएनयूतील देशविरोधी घोषणा आणि हैद्रबाद विद्यापीठातील दुर्देवी आत्महत्येवरून झालेलं राजकारण.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हे निवडणुकीतील आश्‍वासन वास्तवात आणायला सुरूवात केली होती. सरकारच्या एखाद्या योजनेबद्दल आक्षेप असतील तर त्यावरून सरकारला प्रश्‍न विचारण्याचा, टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे; मात्र त्याऐवजी सरकारला विरोध, तर कधी विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली तर कधी देशभक्तीला विरोध करीत जणू या देशात फार मोठी आणिबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचा भास निर्माण करण्यात आला.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर दिल्ली निवडणुकांपूर्वी अचानक चर्चवर हल्ले होत असल्याच्या बातम्या एकामागोमाग येऊ लागल्या. पाठोपाठ दिल्लीसह ठिकठिकाणी मोर्चे सुरू झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली. महाराष्ट्रात पनवेलजवळच्या चर्चवर हल्ला झाल्याची बातमी आली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा अंतर्गत संघर्षातून हे घडल्याचे समोर आले. दिल्ली निवडणूक झाली, भाजपाचा पराभव झाला आणि चर्चवरील हल्ल्याच्या बातम्या आणि मोर्चे थांबले.
त्यानतंर अखलाखचे प्रकरण घडले. विरोधाभास म्हणजे ही सर्व मंडळी नुकतीच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या दलित अत्याचारासाठी गुजरात सरकारला जबाबदार धरीत होती. तीच मंडळी दादरीच्या अखलाख प्रकरणासाठी चुकूनही उत्तरप्रदेश सरकारचं नाव काढत नव्हती कारण तिथे या सेक्युलरांचे मुकुटमणी मुलायमसिंह यांच्या पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे मुलायमसिंह यांच्या पक्षाच्या सरकारविरोधात ‘ब्र’ही न काढता देशात जणू धर्मांध शक्तिंचं भयानक असहिष्णू वातावरण सुरू झालंय अशी आरोळी ठोकण्यात आली आणि पुरस्कार वापसीची एक नियोजनपूर्वक साखळी उभी करण्यात आली. साहित्य अकादमीचे 1200 पेक्षा अधिक पुरस्कारार्थी आहेत. त्यातील पुरस्कार वापसी करणार्‍यांची संख्या ही 50 पेक्षाही कमी होती; पण प्रत्यक्षात असं भासवलं गेलं की या देशात सर्वांनी सरकारच्या विरोधात पुरस्कार वापस केले. या गदारोळात महत्त्वाची एक बातमी दुर्लक्षिली गेली ती म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या आवाहनावरून 1 कोटी लोकांनी गॅस अनुदान सोडले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकवेळ जेवण्याचे आवाहन कधीकाळी केले होते; मात्र त्यानंतर मोदींनी असे आवाहन केले आणि देशातील एक कोटी लोक त्याला प्रतिसाद देतात आणि अनुदान त्यागतात ही मोठी गोष्ट; पण त्याऐवजी पुरस्कार वापसीचा अध्याय रंगविण्यात आला आणि जसं बिहार निवडणुकीचे बिगूल वाजले, भाजपाचा पराभव झाला तसं पुरस्कार वापसीचा अध्याय अचानक बंद झाला.
जेएनयू प्रकरण तर सर्वांवर कळस होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तितकीच जबाबदारी घेऊन येतं. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं याचा अर्थ वाट्टेल ते बरळणं होत नाही; मात्र देशविरोधी घोषणांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुर्लक्ष करण्यात यावं अशी भावना काही जणांनी व्यक्त केल्या. देश तोडणार्‍या घोषणा काही विशेष नाही, त्यात काय एवढं? असा निर्लज्ज विचार काहीजणांनी मांडला. देशातील नागरिकांवर अन्याय झालाय म्हणून त्यांनी वेगळेपणाची भावना जोपासली तर बिघडलं कुठं? असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला; पण आपल्यात आहेत अनेक अडचणी, नाही पोहचली अनेक समाजघटकांपर्यंत विकासाची गंगा... म्हणून कोणी देश तोडण्याची भाषा करीत नाही. समाजसमुहांना दिशा देण्याऐवजी त्यांना भडकवण्यातच या मंडळीचा रस असल्याचं दिसून आले. कन्हैया हा जणू जग जिंकून आल्याच्या थाटात डोक्यावर घेत देशभर त्याला मिरवण्यात आले. कन्हैयाला जामीन देताना मात्र न्यायाधीशांनी काय शब्द वापरले होते त्याबद्दल थेट न्यायालयाच्या ‘समजे’वर या मंडळीनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
मालेगाव बॉंम्बस्फोटातील काही मुस्लीम युवकांना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात अटक करण्यात आली होती, ती निर्दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांची सुटका केली. या निर्दोष तरूणांना विनाकारण तुरूंगात डांबल्याबद्दल सरकारवर टीका करण्यात आली आणि ती योग्य होती; मात्र ही माणुसकी, आणि मानवी हक्क मात्र प्रज्ञासिंहला नाहीत. कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांची ही दुटप्पी भूमिका याच सदरातील होती. साध्वी प्रज्ञासिंहवरील मोका हटविला तर प्रचंड काहूर उठविले गेले; पण सर्वोच्च न्यायालयाच्या या खटल्यातील मोकावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातून वर्षानुवर्षे कॉंग्रेसच्या काळात प्रज्ञासिंह तुरूंगात आहे; पण खटला पुढे सरकावा असे प्रयत्न झाले नाहीत. कारण खटल्याच्या निकालापेक्षा हिंदुत्त्ववाद्यांच्या बदनामीत अधिक रस या मंडळीना होता.
दिल्ली निवडणुकांपूर्वी ख्रिश्‍चन, बिहार निवडणुकांपूर्वी अखलाख, वेमुलासारखे विषय तापत ठेऊन दलित, मुस्लीम आणि ख्रिश्‍चन या समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एफटीआयच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नवे अद्यावत तंत्रज्ञान आले पाहिजे ही मागणी नव्हती, तर आम्ही म्हणू तो अध्यक्ष द्या अशी मागणी होती. एखाद्या शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष आम्ही म्हणू तोच होईल असा आविर्भाव या डाव्या मंडळींचा होता. कॉंग्रेसच्या काळात राजाश्रय अशा संस्थामध्ये मिळाला तोच आता नाहीसा झाल्याने विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा समाजातील घसरती विश्‍वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न डाव्यांनी एफटीआयच्या निमित्ताने केला. आता उत्तरप्रदेश निवडणुकांपूर्वी पुन्हा दलित विरोधी सरकार रंगविण्याचा प्रयत्न या मंडळींचा सुरू आहे.
भारताच्या प्रयत्नाने सार्‍या जगाने योग स्वीकारत वर्षातला एक दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याचं मान्य केलं; पण या योगदिनालाही विरोध करण्यात सर्वप्रथम पुढे होती ती हीच ढोंगी सेक्युलरवादी मंडळी. इस्लाममध्ये सूर्याला नमस्कार करण्याचं मान्य नसल्याचं काही जणांनी मांडत कडाडून विरोध केला; पण सूर्यनमस्कार टाळून इतर योग करूया अशी भूमिका घेतली नाही. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईत अचानक एका मुस्लीम युवतीला घर नाकारल्याच्या घटनेची ब्रेकिंग न्यूज आणि ताबडतोब चर्चा असा रतीब सुरू झाला. जणू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: फोन करून सोसायटीला सांगितले असावे अशा थाटात काही वीर आपल्या शाब्दिक तलवारी चालवित होते; पण प्रत्यक्षात त्याही प्रकरणात त्या सोसायटीत मुस्लीम कुटुंब राहत होती हे स्पष्ट झाले. काहीही तथ्य नसलेल्या प्रकरणावरून टीव्हीवरून डाव्या समाजवादी मंडळीनी आपली सरकारविरोधातील मळमळ व्यक्त करून घेतली. महाराष्ट्रात खडसे-दाऊद फोन कॉल प्रकरण असेच तापविण्यात आले. फोन कॉल होत असल्याचा दावा करणार्‍यांना न्यायालयात काहीच सिद्ध करता आले नाही; पण याच सेक्युलर मंडळीनी पुन्हा आपली मळमळ व्यक्त केली. इतकंच काय ज्यांना आपल्या घरातल्या बेरजा-वजाबाक्या कधी जमल्या नाहीत ती मंडळी देशाच्या आर्थिक बाबींसह रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर कॉंग्रेस कार्यकाळात नेमलेला गव्हर्नर कसा योग्य होता याची चर्चा करू लागल्याचे चित्र दिसत होते.
एफटीआय, पुरस्कार वापसी, जेएनयू या प्रकरणांवर कित्येक दिवस चर्चा होत राहिल्या; पण गेल्या दोन वर्षातील या गाजलेल्या प्रश्‍नांवरील वादांचा विचार केला तर यापैकी किती प्रश्‍न लोकांच्या दैनंदिन उपयोगाचे होते? विकासाबद्दल कुणी भूमिका मांडली का? विकासाबाबत मतमतांतरे असू शकतात; पण ते तरी कुणी व्यक्त केलं का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मक आहेत. 26 किमी प्रतिदिन या विक्रमी वेगाने रस्तेनिर्मितीचे काम सुरू आहे, रेल्वेमध्ये आमूलाग्र सुधारणा होत आहेत, स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झाली तरी वीज न पोहचलेल्या हजारो गावांमध्ये वीज पोहचवण्याचं काम विक्रमी वेळेत म्हणजे 1000 दिवसात पूर्ण होणार आहे, मुद्रा बँकेतून लाखो युवकांनी कर्ज घेतले, नवे उद्योग सुरू झाले. देशाच्या विकासाचा वेग हा जगात मंदी असताना अधिक होता. या व अशा अनेक चर्चा करताना कधी ही मंडळी पाहिली का? काश्मीरसारखे अनेक प्रश्‍न कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे जटील बनले आहेत त्यावर मार्ग काढताना वेळ जाणार आहे; पण देशासमोरील सर्व प्रश्‍नांचं खापर ही मंडळी मोदी सरकारवर फोडून मोकळी होत आहेत.
काही महिन्यांपूर्वी ’ढहश  रश्राळसहींू’ नावाची कांदबरी वाचण्यात आली होती. यातला वर्तमानपत्राचा मालक वर्तमानपत्राचा खप वाढविण्यासाठी थेट एक दहशतवादी गट तयार करतो, त्यांना पोसतो. त्यांनी कोणते दहशतवादी कृत्ये करायची हे ठरवून देतो, त्यांनी कारवाया करायच्या आणि त्याचं खास थेट एक्युक्लिव्ह वृत्त फक्त त्याच्या वर्तमानपत्रात अशी रचना असते. यात त्याच्या वर्तमानपत्राचा खप वाढत असतो; पण त्यातून जगात या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात. असंच सध्या चित्र दिसत आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई ही डाव्या आणि समाजवादी मंडळीची सुरू आहे. आजपर्यंत इतर विचारांच अस्तित्वच नाकारण्याची भूमिका घेत एकप्रकारे वैचारिक दहशतवादच जपला. आजही या वैचारिक दहशतवादामध्ये ते संपूर्ण समाजाला वेठीस धरत आहेत.
या मंडळींना विकासात रस नाही, त्यांना राष्ट्रवादी विचारांचं सरकार ही पोटदुखी होती. वास्तविकता या समाजवादी आणि डाव्या मंडळीना भारतीय समाजाने कधीच स्वीकारले नाही म्हणून दिवसेंदिवस भारतीय राजकारणात या मंडळीची जागा आक्रसत राहिली आहे. आता एका अर्थाने त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
ही समाजवादी-डावी मंडळी अनेक प्रकारे खोट्या प्रचार मोहिमा चालवित असताना संघ-भाजपा मंडळी मात्र लोकांमध्ये आपल्या कृतीतून पोहचली. त्यातून हा विचार देशात प्रबळ होत गेला. एकीकडे संघ आणि परिवारातील संघटनातून, आपल्या कार्यक्रमातून, सेवाभावी वृत्तीतून वस्तुस्थिती मांडत स्वीकार्हता मिळवली.
समाजातील डाव्या-समाजवाद्यांचे हरवत असलेले स्थान विरूद्ध विश्‍वासार्हतेतून विस्तारत असलेले राष्ट्रवादी विचारांचे काम अशी ही लढाई सध्या सुरू आहे. संघाने कधी कुणाला अस्पर्शी न समजता काम सर्वस्पर्शी केले; मात्र स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी मंडळी ही संघ आणि ते मांडत आलेले विचार हे कायम अस्पर्शी ठरवित आले.
या देशातील जनतेने प्रत्यक्ष अनुभवातून संघ विचार स्वीकारला म्हणून तर हे काम विस्तारत गेले आणि डाव्या समाजवाद्यांची ढोंगबाजी उघड होत गेली. हे सर्व उघडे पाडण्यात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आत्तापर्यंत ही मंडळी म्हणतील तेच खर अशी परिस्थिती होती कारण विरोधी विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हते. शोध हेच लावणार, मांडणी हीच मंडळी करणार, सत्यता यांचीच मंडळी तपासणार आणि पुरस्कारही यांनाच दिले जाणार असं छान सगळं या लोकांचं सुरू होतं. प्रसारमाध्यमांवरील पकड मजबूत होतीच; पण समाजमाध्यमांच्या सार्वत्रिकरणाने दिवसेंदिवस यांचे ढोंग उघड पडू लागले. या तथाकथित पुरोगाम्यांकडून होणार्‍या दाव्यावर लोक प्रश्‍न विचारू लागले आहेत. त्यातून अनेकांची पितळ उघडी पडू लागली आहेत. ठरलेले प्रश्‍न विचारायचे, ठरलेली उत्तरे समोर करायची अशी आजपर्यंतची भूमिका होती; पण समाजमाध्यमांतून हे ठोसपणे खोडले जाऊ लागले. संघ जातीयवादी, मनुवादी असल्याची टीका ही ढोंगी समाजवादी मंडळी करताच, त्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी ही माहिती खोटी असल्याचे पुढे येऊ लागले. ही माहिती स्वत:च्या अनुभवातून आल्याचं सांगणारी ही मंडळी होती.
त्यामुळे आगामी काळातही ही मंडळी अशाच मोहिमा राबविणार. कारण मुळात विरोध हा मोदी या नावाला आणि ते ज्या विचारधारेचं प्रतिनिधीत्व करतात त्या विचारधारेला आहे. त्यामुळे येनकेन प्रकारेण या सरकारविरोधात गटागटाने बोलत रहायचे हा या मंडळींचा आवडता कार्यक्रम असणार आहे. सरकारच्या कार्यक्षमतेबाबत काही बोलता येत नाही त्यावेळी अशा इतर मुद्द्यांवर समाजात गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करायचा असतो हे या मंडळींनी ओळखल आहे आणि त्यातून वैचारिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे; पण या पराकोटीच्या विद्वेषातूनही संघाचा राष्ट्रवादाचा विचार या भूमित विस्तारत गेला, हे या मंडळीचं खरं दुखणं आहे.
लोकांचं मतपरिवर्तन करता आलं नाही की गोंधळ निर्माण करायचा, ही एक ठरलेली गोष्ट रेटण्याचा प्रयत्न डाव्या मंडळींच्या पुढाकाराने सुरू आहे. म्हणूनच चिलकॉटचं उदाहरण समर्पक इथे बसतं; पण या संघर्षातून अस्सल खर तेच टिकेल हा विश्‍वास आहे. भलेही लोकशाहीची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न ही डावी समाजवादी मंडळी करो; पण शेवटी लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली लोकशाही हीच व्याख्या सिद्ध होईल यात शंका नाही.

- केशव उपाध्ये
प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र

'साहित्य चपराक' दिवाळी महाविशेषांक २०१६

Sunday, September 18, 2016

स्पर्धा परीक्षा : दुकानदारी जोमात; विद्यार्थी कोमात!

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 


माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला अज्ञानी आणि अहंकारी ठरवणारे हेच धर्माधिकारी सर (?). यांनी 5 सप्टेंबर 2016 च्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचाव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे अन् अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनाही ‘अज्ञानी’ ठरवण्याचं किंवा म्हणण्याचं धाडस करावं.
-अर्जुन नलवडे, पाटण

लहानपणी कोल्हापूरात असताना दिवाळीच्या सणाला मावशीसोबत कपडे खरेदी करायला जायचो. कोल्हापूरात कपडे मिळण्याचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाद्वार रोड. या रोडवर संध्याकाळची खूप गर्दी असते. या रोषणाईने नटलेल्या महाद्वार रोडवर कपड्यांच्या दुकानाच्या बाहेर त्या दुकान मालकाने एखाद-दुसरा मुलगा जाणीवपूर्वक उभा केलेला असायचा. अशा मुलांचं काम काय? तर रोडवरील खरेदी करायला आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपल्याच दुकानात घेऊन यायचं. अशा मुलांचा पगार ठरायचा कसा? तर त्या मुलाने किती ग्राहक दुकानात आणून दिले अन् त्या ग्राहकाने किती रूपयांचे कपडे खरेदी केले, यावर म्हणजेच ‘कमिशन’वर तो पगार ठरायचा. जास्त पगार (हजेरी) मिळवण्याच्या आशेने ही मुलं ग्राहकांना इतका आग्रह करायची की, कधी कधी ते जबरदस्तीने हाताला धरून दुकानात न्यायचे. नेमकी हीच परिस्थिती थोड्या-फार प्रमाणात आज स्पर्धापरीक्षेचे क्लासेस चालवणार्‍यांच्या बाबतीत लागू पडते. फक्त प्रभावी जाहिरात करून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना (आमच्या क्लासेस-ऍकॅडमीमध्ये या! तुम्हाला विविध सुविधा मिळतील.) अशा पद्धतीचा आग्रह केला जातो. आयएएस अन् आयपीएस होण्याची स्वप्ने पाहणार्‍या विद्यार्थ्यांना हे लक्षात का येत नाही की, ’खरंच पैसे खर्च करून अधिकारी होता आलं असतं तर सर्वच श्रीमंत बापाची पोरं अधिकारी झाली नसती का?’ पण ‘स्पर्धा परीक्षाग्रस्त’ झालेल्या विद्यार्थ्यांना हे कोण समजवणार?
आता पुणे शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी जेथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते, अशा ठिकाणी किंवा पुणे महानगरपालिकेच्या शहरी बसेस आणि बस स्थानकांवर लाखो रूपयांच्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती असतात. त्या इतक्या प्रभावी आणि परिणामकारक आहेत की, खेड्यातून आलेलं सामान्य कुटुंबातलं एखादं पोरगं ‘स्पर्धा परीक्षा पास होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय’ असं मनोमन ठरवतं आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरायला सुरूवात करतं. त्या स्वप्नांच्या दुनियेत ध्येयाच्या अनिश्‍चिततेचा काळाकुट्ट अंधार आहे. हे त्याच्या लक्षातच येत नाही आणि लक्षात आलंच तर तो जाणीवपूर्वक त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. ऑगस्ट 2016 च्या ‘चपराक’ मासिकामध्ये ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या माझ्या लेखात जाणीवपूर्वक मी क्लासेसवाले आणि ऍकॅडमीवाले यांची नावे टाळली होती. परंतु आता प्रातिनिधीक पातळीवर काही क्लासेस व ऍकॅडमी यांची नावे वाचकांच्यासमोर ठेवणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
द् युनिक ऍकॅडमी, चाणक्य मंडल परिवार, ज्ञानदीप ऍकॅडमी, पुणे ऍडमिनिस्ट्रेटीव्ह करिअर ऍकॅडमी, सिंग क्लासेस, भगीरथ ऍकॅडमी, पंकज गांधी ऍकॅडमी, सिनर्जी ऍकॅडमी, ज्ञानप्रबोधिनी, राजपथ ऍकॅडमी, व्हिजन ऍकॅडमी, प्रविण चव्हाण क्लास, रितेश ओतारी क्लास, अग्रवाल क्लासेस, गुरूकुल ऍकॅडमी, अभिजित राठोड ऍकॅडमी, युपीएससी ऍकॅडमिया, पृथ्वी ऍकॅडमी... या प्रत्येक ऍकॅडमी-क्लासेसवाल्यांचे स्वत:चे प्रकाशन, मासिक, साप्ताहिक, अभ्यासिका आहेत.
ज्यावेळी मी द् युनिक ऍकॅडमी आणि चाणक्य मंडल परिवार यांना भेट दिली तेव्हा ऑफिसमध्ये समोरच असणार्‍या टेबलवर काही व्यक्ती (अतिशय बोलक्या असणार्‍या) अशा पद्धतीने क्लासेसची माहिती सांगण्यासाठी बसविलेल्या आहेत की, जणू काही श्रीकृष्ण अर्जुनाला स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात लढायचं कसं याचाच उपदेश करतो आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आवारात दहावी-बारावी करणार्‍या विद्यार्थ्यांचीसुद्धा गर्दी होती. मी जिज्ञासा म्हणून त्यांना विचारलं की, ‘तुम्ही येथे कसे काय?’ त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘‘आम्ही स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचला प्रवेश घेतो आहे.’’ तेव्हा तर मी डोक्याला हात मारून घेतला. अरे बाप रे! आता तर दहावी-बारावीच्या पोरांनाही या क्लासेस-ऍकॅडमीवाल्यांनी स्पर्धा परीक्षेच्या चिखलात ओढलं. चाणक्य मंडल या संस्थेनं तर जागोजागी महानगरपालिकेच्या बसस्थानकांवर ‘आज आणि उद्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्वांसाठी’ अशी भली मोठी जाहिरात केली आहे. द् युनिक ऍकॅडमीने तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभ्यासिकेसह वसतिगृहाच्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर हे ऍकॅडमी-क्लासेसवाले खासगी बसेस, खासगी वसतिगृह, उपहारगृह, खानावळी उभे करून करोडो रूपयांची उलाढाल किंवा व्यवसाय करत आहेत.
या ऍकॅडमी व क्लासेसवाल्यांचे सर्वेसर्वा यांनी तर माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला सौम्य, सभ्य आणि संदिग्ध भाषेत धमकी देण्यापर्यंत मजल मारली. मी हा लेख लिहिताना यांना खलनायक म्हणून कधी पाहिलेच नव्हते. कारण स्पर्धा परीक्षेच्या अनिश्‍चित ध्येयाच्या चिखलात रूतून बसलेले माझेच मित्र आणि त्यांची अवस्था ही डोळ्यांनी पाहण्यासारखी नव्हती. म्हणून हा लेख लिहण्याचं धाडस केलं. स्पर्धा परीक्षा करणार्‍या माझ्या अनेक गरीब मित्रांची आणि त्यांच्या जीवनाची फरफट पाहण्यासारखी अजिबात नाहीये. ते सदाशिव पेठेतल्या काही धोकादायक इमारतीत (अगदी एक-दोन रिश्टर स्केलच्या भुंकपात पडण्यासारख्या) दाटीवाटीने राहतात. कोण सकाळचं दुध घालण्याचं काम करतोय... कोण रात्रपाळीत एटीएमच्या बुथवर पहारेकर्‍याची नोकरी करतोय... कोण आपल्या पोटाचा प्रश्‍न मिटावा म्हणून एखाद्या खानावळीत पार्टटाईम वेटरची नोकरी करतोय... तर कोण पेपर टाकण्याचे काम करतोय. खरंतर याच मुलांच्यामध्ये मला रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, विजय भटकर दिसतात. याच मुलांच्यात मला बाबा आमटे, अभय बंग आणि रवींद्र कोल्हे दिसतात. याच मुलांच्यात मला भविष्यातले शेकडो सुवर्ण पदके मिळवून आणणारे खेळाडू दिसतात आणि याच मुलांच्यामध्ये समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्यिक दिसतात; पण प्रश्‍न आहे, मला दिसून उपयोग काय? याची जाणीव मला होऊन उपयोग काय? हे सर्व स्वत:ला बुद्धिवादी, मानवतावादी आणि पुरोगामी म्हणविणार्‍या लोकांना आणि विचारवंतांना का दिसत नाही? कारण यांना संघटना उभी करणं आणि त्यासाठी तरूणांना हातशी धरणं अन् त्यांना चिथवणं इतकंच माहिती असतं. असो! पण प्रत्यक्ष राज्यव्यवस्थेची धुरा सांभाळणार्‍या आणि या होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या कल्याणाची जबाबदारी असणार्‍या राजकीय व्यवस्थेतील माणसांनी (लोकप्रतिनिधींनी) डोळ्यावर पट्टी बांधली आहे काय? आणि ही पट्टी बांधली असेल तर... त्यांनी ती पट्टी काढावी आणि राजकीय स्वार्थासाठी चाललेले आपापसांतील दिखावू भांडणे मिटवून या मुलांच्या कल्याणासाठीचा विचार करावा.
जाहिरातीच्या आणि स्मार्टफोनच्या युगात एखाद्या विद्यार्थ्याचा बळी सहज जातो. इंटरनेटच्या माध्यमातून भरत आंधळे, विश्‍वास नांगरे-पाटील, रमेश घोलप, अविनाश धर्माधिकारी यांसारख्या अनेक अधिकारी झालेल्या व्यक्तिंच्या भाषणबाजीमुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आहे. आंधळे नावाचे अधिकारी आपल्या व्याख्यानात पीएसआय होण्यासाठी पाच वर्षे आणि आयपीएस होण्यासाठी आणखी पाच वर्षे अशी दहा वर्षे अभ्यास केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा पास झालो, असे ‘डोळस’पणे सांगतात. यातून अप्रत्यक्षपणे एक चुकीचा संदेश गेला. तो म्हणजे स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी किमान आठ-दहा वर्षे लागतात. त्याचा परिणाम असा झाला की, पुणे विद्यापीठात अनधिकृतपणे (पॅरासाईट) राहणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. हेच विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीत असणार्‍या जिन्याखाली, गॅलरीमध्ये राहू लागले. त्याचा ताण वसतिगृह प्रशासन व्यवस्थेला सहन करावा लागला आणि आजही लागतो आहे. नांगरे-पाटील हे तर स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वातील आदर्श व्यक्तिमत्त्व (आयकॉन) मानलं जातंय. कारण ते आपल्या शाब्दिक खेळ्यामुळे विद्यार्थ्यांवर एकप्रकारची मोहिनी घालतात. त्यांच्या व्याख्यानातून असा विद्यार्थी वास्तवतेपासून दूर जात स्वप्नांच्या दुनियेत रममाण व्हायला लागतो. ती नांगरे-पाटलांची लाल दिव्याची गाडी (शासनाची बरं का!) त्यांच्या अंगावरील शासकीय गणवेश, त्यांचा मानसन्मान, त्यांना इतरांकडून मिळणारी आदराची वागणूक या सर्वात तो विद्यार्थी स्वत:ला ठेवायला लागतो. नांगरे-पाटलांच्या भाषणाचा हा वाईट परिणाम होतो. आता रमेश घोलप हे तर वक्तृत्वाचं वेगळंच रसायन... वक्तृत्वाचं बाळकडूच त्यांनी पिलं होतं की काय? अशी शंका त्यांचं भाषण ऐकल्यावर येते. वक्तृत्व म्हणण्यापेक्षा ‘पाठांतराचा’ तो उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा. घोलप हे अधिकारी झाल्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षासंबंधीची व्यासपीठंच गाजवत सुटले.
आता धर्माधिकारी!! यांनी तर आपल्या वक्तृत्वाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर ‘चाणक्य मंडल परिवारा’चा इतका मोठा व्याप वाढवलाय की, आता ते फक्त ‘संस्थानिक’च व्हायचे बाकी राहिलेत. माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला अज्ञानी आणि अहंकारी ठरवणारे हेच धर्माधिकारी सर (?). यांनी 5 सप्टेंबर 2016 च्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचाव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे अन् अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनाही ‘अज्ञानी’ व ’अहंकारी’ ठरवण्याचं किंवा म्हणण्याचं धाडस करावं. असो. वरील अधिकारी हे प्रचंड हुशार आहेत; परंतु ते आपल्या बुद्धिचा वापर समाजसेवेसाठी नाही तर व्यवहारासाठी (फायदेशीर व्यवसायासाठी) व स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करतात. सकारात्मकतेचा अतिरेक झाला की त्यातूनही नकारात्मक बाजू जन्म घेते हे वरील अधिकार्‍यांच्या आणि क्लासेसवाल्यांच्या उद्योगांतून स्पष्ट होते.
माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना भारतीय असंतोषाचे जनक कोण? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून लोकमान्य टिळक असं अभ्यासलं अन् ते बरोबरही होतं. आता आमच्या पुढच्या पिढीसमोर ‘आमचा आजचा वर्तमान’ इतिहास म्हणून असेल तर हा प्रश्‍न नक्कीच विचारला जाईल की, ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक कोण?’ आणि त्याचं उत्तर आमची पुढची पिढी असं देईल की, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक ‘स्टडी सर्कलचे डॉ. आनंद पाटील’ होय. यातील गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे. माझी पुढची पिढी कोणाचा इतिहास अभ्यासणार आहे? थोर समाजसुधारक म्हणून अविनाश धर्माधिकारी, तुकाराम जाधव, मनोहर भोळे, आनंद पाटील, फारूक नाईकवाडे, यजुर्वेद महाजन, रंजन कोळंबे, देवा जाधवर, महेश शिंदे यांचा इतिहास अभ्यासणार आहे काय? का गुगल, फेसबुक, ट्वीटरचे संस्थापक किंवा ऑलिंपिकमध्ये मायकेल फ्लेप्स, उसेन बोल्ट यांसारखे सुवर्णपदकांचे विश्‍वविक्रम करणार्‍या व्यक्तिंचा इतिहास अभ्यासणार आहेत? माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील वाया गेलेल्या आठ-दहा वर्षातील उद्ध्वस्त जीवन... हा भविष्यातील इतिहास बनू शकत नाही!!! आमचं असं स्वत:चं कर्तृत्व काय? की ते कर्तृत्व भविष्यातील पिढीसमोर ‘सोनेरी इतिहास’ म्हणून उभा असेल? हा प्रश्‍न प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्याने स्वत:ला विचारावा.
काही महिन्यापूर्वी पुण्यातील एका नावाजलेल्या ‘सीओईपी’ या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’ नावाचं उपग्रह बनवलं आणि त्याचं यशस्वी उड्डाणही झालं. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून अनेक मान्यवरांपर्यंत त्या विद्यार्थ्यांचं कौतुकही झालं. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे नव्यानेच पुण्यात दाखल झालेला माझा नवीन मित्र. त्याने द् युनिक ऍकॅडमीमध्ये जवळपास ऐंशी हजार भरून युपीएससीचा क्लास लावला. तो सांगत होता, लेक्चरचा पहिला दिवस. त्या लेक्चरमध्ये मुलांच्या शैक्षणिक शाखा विचारल्या गेल्या. त्यात अभियांत्रिकी शाखेकडून आलेल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे हात वर झाले. राहिलेले दहा टक्के इतर शाखेतून आलेले. अशी परिस्थिती. समजा, विद्यार्थी दशेत असताना सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कर्तबगारी पहायला मिळते तर दुसरीकडे त्याच शाखेची मुले पुढे अभियांत्रिकीची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली तर त्यांच्या शिक्षणावर पालकांनी आणि शासनाने केलेला खर्च त्याचं काय? याचं कारण फक्त एकच. स्पर्धा परीक्षेचं निर्माण केलं गेलेलं आभासी वातावरण.
आमच्या महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे बारा हजार विद्यार्थी कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यातील फक्त दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरी लागते अन् उरलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही.
स्पर्धा परीक्षा करणार्‍या माझ्या मित्रांना इतकंच सांगायचं आहे की, स्पर्धा परीक्षा करायची आहे तर करा पण ठराविक वर्षे त्यासाठी द्या आणि त्यावर्षात आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून लवकर बाहेर पडा. ज्या कोणत्या शाखेचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करा. स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्या! तो पर्याय मात्र तुम्हाला जे काही येतंय (कौशल्य किंवा कला), ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात त्यामध्येच सर्वोत्कृष्ट बनायचा तुम्ही प्रयत्न करा. असा विचार आत्महत्या केलेल्या डॉ. विकास बोंदर या स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्याने केला असता तर कदाचित तो त्याच्या भागातील चांगला डॉक्टर होऊ शकला असता किंवा त्याच्याही पुढे जाऊन डॉ. आमटेंसारखं कार्य करू शकला असता. स्पर्धा परीक्षेकडे न वळता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी-व्यवसाय करणारे काही कमी नाहीत. वयाच्या वीशी-पंचवीशीमध्ये कथाकार, कादंबरीकार आणि कवी असणारे, साहित्यिक क्षेत्रात लेखक म्हणून स्वत:चा ठसा उमटविणारे सागर कळसाईत, हणमंत कुराडे, सागर सुरवसे, स्वप्निल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर यांसारखे लेखकसुद्धा आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या पात्रतेचा जरूर आहे. गरज आहे ती त्यांनी स्वत:ला ओळखण्याची आणि व्यवस्थेने त्यांची दखल घेण्याची. फक्त अधिकारी होऊन समाजसेवा करता येते किंवा समाजाचे प्रश्‍न सोडवता येतात या भोळ्या आशेतून अलिप्त व्हा, हीच विनंती! 

-अर्जुन नलवडे, 'मासिक 'चपराक', पुणे 
संपर्क : ७३८५६११३५३  


‘चपराक’च्या ऑगस्ट 2016 च्या अंकातील ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर आलेल्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया-

फक्त क्लासवालेच
खलनायक नाहीत!

अतिशय उत्तम लेख. स्पर्धा परीक्षांचे मायाजाल फारसा अतिरेक न करता उत्तम प्रकारे उलगडले आहे. स्पर्धा परीक्षेची दुसरी बाजू सांगायचा सहसा प्रयत्न कुणी केल्याचे वाचनात आलेले नाही. स्पर्धा परीक्षा मंडळ, त्यांचे परीक्षांचे घोळ, रिझल्ट्सची अनिश्चितता, पास झालेल्यांच्या नियुक्त्यांमधील दिरंगाई, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होणे इत्यादी अनेक मुद्दे यातून सुटले आहेत. केवळ क्लासवालेच यात खलनायक नाहीत तर शासन व्यवस्था व यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. मंडळेसुद्धा तितकीच जबाबदार आहेत, हेही विसरून चालणार नाही.
-श्रीकांत गिरजे


स्वप्ने विकणारेही कमी नाहीत...
न झेपणारी स्वप्नं जोपर्यंत आपण विकत घेण्यासाठी हट्ट करु तोपर्यंत अशी स्वप्ने विकणारेही कमी होणार नाहीत... या विषयाला ऐरणीवर आणल्याबद्दल संपादक व टीमचे आभार.
-संतोष घोंगडे

भीषण वास्तव माहीत नव्हते
अतिशय उत्तम लेख. डोळ्यात झणझणित अंजन घालणारा. स्पर्धा परीक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते. अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते.
-अरूण कमळापूरकर


डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद
लेख खुपच छान आहे. मी कालच माझ्या मुलाला, तो मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे, त्याला ह्या परीक्षांविषयी जाणून घ्यायला सांगितले; परंतु लेख वाचल्यानंतर वाटतंय त्यापेक्षा तो कुठेतरी टेबल-खुर्ची टाकून प्रॅक्टीस करेल तरी चालेल. खरंच खूप भयानक आहे हे सगळं. तसेच लेखात पेपरफुटीबद्दल काही लिहिलं नाही, ती पण एक शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद डोळे उघडल्याबद्दल...
-अरूण वाणी

बेरोजगारी हेही एक कारण
विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षाकडे वळतात, याचे प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. या मुद्द्याचा तुम्ही कुठेच उल्लेख केला नाही.
-विशाल  डोईफोडे

व्यवसायाला प्रवृत्त करा
खरंतर आपण आणि आपली मुले व्यवसाय करायला घाबरतात. सर्वच जर नोकरीच्या मागे लागले तर कसे होईल? मुलांना व्यवसाय करायला प्रवृत्त करा. तो लहान व्यवसाय का असेना; पण सुरूवात तर करा.
-संतोष नगरे

विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू
विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू मांडलीय. 2-3% विद्यार्थी तुम्ही म्हणताय तसे सारसबाग, झेड ब्रीज, टेकडी इकडे आढळत असतीलही... परंतु हा अपवाद आहे आणि अपवाद कधीही नियम होत नसतो. उलट बाजूला Aहॉटेल्स इत्यादी ठिकाणी काम करून, एकावेळेसची मेस लावून अभ्यास करणारी कित्येक मुलं आहेत आणि पोस्ट नाही मिळाली तरी ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्याचा ठसा उमटवतेच हे मागील 6-7 वर्षाचे निरीक्षण आहे. राहिला प्रश्‍न जीवघेण्या स्पर्धेचा, तर आज स्पर्धा कुठे नाही ते सांगा... बाकी क्लासेसवाल्यांबद्दलचे मत बर्‍याच अंशी सत्य आहे.
-विशाल नाईकवडे

स्पर्धा परिक्षा केंद्रांचाही बाजार
जे दिसतंय ते लेखकांनी मांडले आहे आणि वास्तव जे आहे ते स्वीकारले पाहिजे. पूर्वग्रहदुषितपणे लिहिले असते तर फक्त एक बाजू लिहिली गेली असती. उद्देश प्रामाणिक आहे. आता हे परखड वाचायची सवय ज्यांना नाही त्यांना पूर्वग्रहदुषित आहे असे वाटेलही. सत्य आहे ते त्यांनी मांडले आहे. शिक्षणाचा बाजार तर झालाच आहे पण आता स्पर्धा परिक्षाकेंद्रांचाही बाजार झाला आहे, हे शंभर टक्के मान्य करतो.
-स्वप्निल करळे

मृगजळाच्या मागे धावू नका
खूप मस्त लेख लिहिला आहे. खूप अभ्यासपूर्ण. विद्यार्थी, पालक, क्लासेसवाले, विद्यार्थ्यांची स्वप्नं, त्यांची होणारी घुटमळ आणि हातातून निसटून गेलेली ती उमेदीची आठ-दहा वर्षे, त्यातून आलेलं नैराश्य व नैराश्यातून घेण्यात आलेला टोकाचा निर्णय. मित्रांनो स्पर्धा परीक्षा जरूर द्या पण अशा मृगजळाला भुलू नका. शंभरपैकी मटका तिघांनाच लागतो त्याचप्रमाणे स्पर्धा परिक्षांचं. त्याच्या किती आहारी जायचं किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. अर्जुन तू वास्तवाची जाण या लेखातून करून दिली; पण सत्य नेहमी कटू असतं. त्याची जाणीव काहींना करून घ्यायचीच नसते; पण असं करत असताना आपला मौल्यवान जीव गमावू नका. आपल्या आईवडिलांचा एकदा तरी विचार करा. अर्जुनचं एक वाक्य ‘ह्यांचे मार्क आपलं भवितव्य ठरवू नाही शकत.’ तसंच स्पर्धापरीक्षांचं. तुमचं ते भवितव्य नाही ठरवू शकत. नीट विचार करा. अपयश आलं तरी नवीन जोमाने आपल्याला जे चांगल्या प्रकारे जमतंय ते शिक्षण घ्या. उगीच अट्टाहास करत बसू नका. आपली योग्य दिशा आपणच ठरवा. मृगजळाच्या मागे धावू नका...
-पवन घटकांबळे

कष्ट करा यश मिळणार
खरं आहे... पण हेही खरं आहे की योग्य मार्गदर्शन करणारे असतील अन् कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळणारच... काहीच न करता तुम्ही यशाची अपेक्षा ठेवत असाल तर एक पंचवार्षिक काय दोन-तीन पंचवार्षिकमध्येेसुद्धा यश मिळणार नाही... मुळात आतून इच्छा असली... आवड असली की काहीही अवघड नाही... तुमच्याकडे मटेरीयल तर खूप असतं... एसी लायब्ररीसुद्धा असते पण तुमचा बहुतेक वेळ तीन-तीन वेळा चहा-नाश्त्याला जात असेल तर काय बोलावं... आणि याची कारणे तर खूप मजेशीर आणि तेवढीच राग आणणारी असतात... काय तर म्हणे ’बोअर झालं रे खूप’... अरे तुझा बाप तिकडं न थकता दिवस-रात्र कामं करुन तुला पैसा पाठवतो तो यासाठी का रे... त्या बापानं मलाही बोअर होतंय म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली तर घर चालेल का... महिन्याच्या एक तारखेला पैसे आले नाही तर रागाने तिळपापड होतो या स्पर्धा परीक्षाविरांचा... दर रविवारी मेसला सुट्टी म्हणून नाही त्या जेवणाची मजा लुटणार्‍या या पोराला बाप शिळी भाकरी जेवून झोपलाय हे जोपर्यंत जाणवणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार...
सर तुम्ही एक बाजू मांडलीत पण हीसुद्धा स्पर्धा परीक्षेची एक बाजू आहे... कष्ट करा यश मिळणार आणि समजा काही कारणाने जमलं नाही तर हा अभ्यास इतका उपयोगी आहे की व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊन जाईल...
-महेश कुंभार

लेखनप्रवास असाच सुरु राहो
अर्जुन तुझा लेख पूर्ण वाचला. वाचताना मन सुन्न झालं. कारण वास्तव मांडताना तुझ्याकडून जी उदाहरणे दिली गेली ती खरोखरच अप्रतिम आणि वास्तवतेला धरूनच आहेत. तुझा हा लेखन प्रवास बघितल्यानंतर मनाला समाधानही वाटलं आणि अभिमानही. तुझा हा लेखनप्रवास असाच सुरु राहो, ही अपेक्षा...
-तुकाराम कुंभार


मासिक 'साहित्य चपराक', पुणे

Tuesday, August 30, 2016

श्रद्धेचा गैरफायदा, सामान्यांना त्रास

साप्ताहिक 'चपराक', पुणे 

‘सदाचार साधना’ या संस्थेअंतर्गत स्काऊट ग्राऊंड सभागृह, पुणे येथे लेखक व कवी समीर नेर्लेकर यांचे ‘गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समीर नेर्लेकर हे समाजमाध्यमांद्वारे (फेसबुक, व्हॉटस्ऍप) गणेशोत्सवाबद्दलची आपली मते व त्यातील अपप्रवृत्तींचा निषेध नोंदवत असतात. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. या व्याख्यानातून घेतलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श.
माणूस हा ईश्‍वरावर अवलंबून राहतो. इतर प्राण्यांमध्ये हे नाही. त्यामुळे तो आपली श्रद्धा वेगवेगळ्याप्रकारे व्यक्त करतो; पण सध्या ईश्‍वराचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातंय. देव या संकल्पनेचा बाजार सुरू झाला आहे आणि त्याचा फटका सध्याच्या गणेशोत्सवाच्या रूपाने सामान्य लोकांना भोगावा लागतोय.
धार्मिक सण उत्सवांमधून आज श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातोय. गणेशोत्सवात ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांचा त्रास सामान्य जनतेला होतो. तरीसुद्धा हे परप्रांतीय प्रशासकीय अधिकारी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक सुरू ठेवण्यास परवानगी देतात. याचा महिला, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे सामान्य माणसाने त्याविरूद्ध निषेध नोंदवला पाहिजे.
सुरूवातीला गणेशोत्सव सुरू करण्यामागची प्रेरणा ही समाज संघटन व समाज प्रबोधन ही होती. त्यावेळची ती गरज होती. 70-80 च्या दशकापर्यंत हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जायचा; पण आता यातील पावित्र्य नष्ट झाले आहे. शास्त्रोक्त पद्घतीप्रमाणे गणेशोत्सवाचे स्वरूप गणपतीची मूर्ती स्वत: मातीची बनवून, त्याची आरास करून, प्रतिष्ठापना करून, रोज आरती करणे व दहा दिवसानंतर त्याचे विसर्जन करणे असे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या कला वापरून, स्वत: मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करणे अपेक्षित होते. असे काही काळ घडतही होते. त्यामुळे उत्तम कार्यकर्ते घडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत होता.
कालांतराने या उत्सवाला बाजारी रूप येत गेले. सध्या उत्सवाचे सर्व सुशोभीकरण व इतर गोष्टी या बाहेरून विकत किंवा भाडेतत्त्वावर करून घेतल्या जातात. त्यामुळे हा उत्सव कार्यकर्त्यांच्या चंगळवादाचा अड्डा बनत चालला आहे. ध्वनीवर्धकांचा अतिरेक वाढला आहे. 80 डेसिबलच्या पुढे आवाज वाढवल्याने सर्वांना त्याचा त्रास होतो. ‘वाट पाहतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशी अश्‍लील व हिडिस गाणी या ध्वनीवर्धकांवर वाजवली जातात ज्याचा धार्मिक विधीशी व भक्तीभावाशी काहीही संबंध नाही. फक्त झिंगलेल्या कार्यकर्त्यांना विक्षिप्तपणे नाचता यावे यासाठी ही गाणी वाजवली जातात.
गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या काळातील ‘नाईट लाईफ’ हा एक वेगळा चिंतेचा मुद्दा झाला आहे. आईवडिलांना फसवून युवक-युवती गणपती पाहण्याचं कारण देऊन रात्री घराबाहेर पडून अश्‍लील चाळे करताना दिसत आहेत.
बहुतेक गणेशोत्सव मंडळे वीज चोरून वापरत आहेत. गणशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती, दमदाटी केली जाते. वर्गणी देणे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा व इच्छेचा विषय असायला हवा. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडपे उभी केल्यामुळे वाहतुककोंडीची समस्या वाढते. यादरम्यान होणार्‍या गर्दीमुळे प्रशासनावर ताण येतो. यासाठी लागणारी पोलीस यंत्रणा कमी पडते. अशा हुल्लडबाजीवर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन आहे काय?
एकूणच सध्याचे गणेशोत्सवाचे स्वरूप हे विदारक आहे. त्यातील अनिष्ट गोष्टींना विरोध केलाच पाहिजे. हा उत्सव मंगलमय व चांगल्या वातावरणात, कोणाला त्रास न देताच व्हायला हवा. यासाठी अनेक उपाय करता येतील. गणेशोत्सवासाठी शहराबाहेर एक प्रशस्त मोकळी जागा उपलब्ध करून देता येईल; जिथे सर्व मंडळे आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना व आरास करू शकतील. सर्वांना आपल्या कला, देखावे वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येतील. यामुळे त्या आवाजाचा आवाज शहरातील समान्य लोकांना होणार नाही. सर्व गणपती एका ठिकाणी आल्यामुळे लोक त्यांना भेटी देऊ शकतील व एका यात्रेचे स्वरूप त्याला देता येईल. यानंतर प्रवाही नदीत त्या गणपतींचे विसर्जन करता येईल. यामुळे हा उत्सव शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जाऊ शकेल.
सध्याच्या गणेशोत्सवातील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी याचा त्रास होणार्‍या प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अनेक लोकांच्या स्वाक्षरी असणारे निवेदन स्थानिक प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारला दिले पाहिजे. हे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हावे की एक दवाब गट निर्माण होऊ शकेल व काहीतरी कारवाई होईल. जर सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रबोधन केले व एकत्रित रित्या प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी बदल घडू शकेल.
(शब्दांकन : अर्जून नलावडे)

साप्ताहिक 'चपराक', पुणे

Monday, August 29, 2016

रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे

जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा. जगणार्‍याला जसं जीवन तसं चित्रकाराला हवा असतो रसिकांचा उत्कट प्रतिसाद. त्याला साद म्हणून उभा राहतो ’रंगाचा श्रीरंगी अविष्कार’. चित्रकाराच्या शब्दांपेक्षाही त्याची चित्रंच आपल्याशी उत्कट संवाद साधतात. कल्पनेच्या आकाशाचा कॅनव्हास अन् त्यावर रंग उतरलेत देवरुपात..! त्यातूनच जन्म होतो चित्रप्रदर्शनाचा. पंढरपूरमधील कुंचल्याच्या रंगात रंगलेले कलावंत आहेत श्री. भारत अर्जुन गदगे. त्यांचे 'विघ्नहर्ता कला प्रदर्शन'  पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिरात सुरु आहे. त्यानिमित्त श्री. गदगे यांच्या कला साधनेचा उलगडलेला हा जीवनप्रवास...!!

साप्ताहिक 'चपराक',पुणे 

'मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो' या गीतपंक्तीप्रमाणे मनातील विविध कल्पनांना रंग आणि रेषा या माध्यमातून कॅनव्हासवर चितारणारे पंढरीतील एक कलावंत म्हणजे भारत अर्जुन गदगे. या पंढरीचा पांडुरंगही या भक्ताच्या भक्तीरंगात न्हाऊन निघाला आहे. 
''भक्तीत दंग सदा पांडुरंग
रंगे मोरपंखी होऊनी श्रीरंग''
प्रत्येक वारकरी हा जन्मजात 'पंढरपुरी' असतो, तसा प्रत्येक पंढरपुरी हा भावरंगी रंगणारा असतो. अशा भक्ती रंगात रंगून रंगाची उधळण करणारा असा एक जन्मजात 'चित्रकारी' म्हणजे भारत अर्जुन गदगे! पंढरपुरातील एक काळ गाजवलेले, कला, नाट्यक्षेत्रात सहजतेने वावरणारे आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल छोटा गंधर्व यांच्या हस्ते सत्कार झालेले 'अर्जुन पेंटर' हे भारत गदगे यांचे वडील आणि कलेच्या क्षेत्रातील पहिले गुरु.
याच अर्जुनाने त्यांना कलेच्या क्षेत्रातील लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा ते शिकवले आणि मग त्यांच्या या शिष्याने कलेच्या क्षेत्रात चौफेर शिरसंधान करीत आपला एक वेगळा ठसा उमटविला. म्युरल पेंटिंग, पोट्रेट, लॅण्डस्केप, मेटल पेंटिंग, फोटोग्राफी आदी क्षेत्रात ते निपुण बनले. त्यांच्या या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली आणि 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार त्यांना 5 सप्टेंबर 1997 रोजी बहाल करण्यात आला. कल्पनेचा एकेक धागा गुंफून त्यांनी शुभ्र कॅनव्हास वर अनेकरंगी चित्रांची मुक्तहस्ते उधळण केली आणि त्यामुळेच जगण्यासाठी चित्रकला व चित्रकलेसाठी जगणे या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी अपरिहार्याने त्यांना एकत्रितपणे अबाधित ठेवण्यात गदगे यशस्वी झाले आहेत.
लोखंडाला परिसस्पर्श झाला की त्याचे सोने होते. तसंच काहीसे गदगे यांच्या बाबतीत घडलं. 1967 साली 'आग्य्राहून सुटका' या नाटकाची तयारी चालली होती. त्यात आपलाही सहभाग असावा या भावनेतून भारत गदगे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चित्ररूप दिले आणि खरंतर तेव्हापासून कागद, रंग, ब्रश, पेन्सिल यांचे एक भावविश्‍व आकार घेऊ लागले. दहावीनंतर सांगलीच्या कला विश्‍व महाविद्यालयातून ए. डी. टी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात आणि नंतर मुंबईच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जी. डी. (पेंटिंग) ही परीक्षा केंद्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ए. एम. ही कलेच्या क्षेत्रातील सर्वोच परीक्षा ते केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
आकाशात काही काळाने संथ विहरणारा पतंग हा जसा सुरूवातीस अष्ट दिशांना गोता खातो, तशाच काही परिस्थितीच्या गोता खाताना गदगे यांना कला क्षेत्रात स्थिर राहण्यासाठी गुरुतूल्य तिळवे सर, ए. टी. पाटील, श्री. माजगावकर, एम. के. जाधव यांनी सहाय्य केले. आपल्या गावातील एक उत्कृष्ट कलाकार नोकरीच्या निमित्ताने आपले गाव सोडून जाऊ नये यासाठी पंढरपुरातील कै. बापू जोशी, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांना पंढरपुरातच बांधून ठेवायचे ठरवले आणि नगरपालिकेच्या 'लोकमान्य विद्यालयात' कलाशिक्षक म्हणून गदगे नोकरीस लागले.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, चंद्रकांत व सूर्यकांत मांडरे बंधू,चित्रकार एम. एफ. हुसेन, वसंत बापट, प्रतापसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. आजही गदगे यांची चित्रसाधना कायम चालूच असते. स्वातंत्र्याची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याचे दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन भरविले. त्यांच्या 'ईश्‍वरभूती' आणि 'रंगाचा श्रीरंगी आविष्कार' या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून मिळालेल्या पैश्याचा गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोग केला जातो. पंढरपूरचे माजी प्रांताधिकारी ज्योतिबा पाटील यांनी गदगे सरांचे हे कलागुण लक्षात घेऊन 1 मे 1997 रोजी सोलापूर जिल्ह्यातर्फे मुंबईला पाठविण्यात येणार्‍या चित्र रथाच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली. सध्या ते तालुक्यातील होतकरू विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक घरात पोहचलेल्या या कलाकारास साथ मिळाली आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंजुषा गदगे यांची! पंढरपुरतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गदगे यांनी कलाशिक्षिकेचे काम केले आहे परंतु संसाराच्या व्यापामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि कलेची साधना चालूच ठेवली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा फार मोठा वाटा असतो हे सौ. मंजुषा गदगे यांनी सार्थ करून दाखविले आहे. भारत गदगे यांचे दोन्ही बंधूही कलाक्षेत्रात पारंगत आहेत. त्यांचे मोठे बंधू आनंद गदगे हे उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर धाकटे बंधू गणेश गदगे हे वास्तुविशारद आहेत. एकंदरीत भारत गदगे यांचे संपूर्ण कुटुंब चित्रकलेच्या रंगात मनसोक्त रंगलेले आहे.
भारत गदगे यांच्या रंगात रंगलेल्या वाटचालीचे रंग असेच अधिकाधिक खुलत रहावेत हीच शुभेच्छा!!


स्वप्निल रविकांत कुलकर्णी, पंढरपूर प्रतिनिधी

साप्ताहिक 'चपराक',पुणे 
९८३३३७९००५ 


Sunday, August 28, 2016

सरकारकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय : संजय सोनवणी

सीमांचे रक्षण, कायदा व सुव्यवस्था हे सरकारचे मुख्य काम आहे. ते न करता नको त्या कामात सरकार गढले आहे व जनतेच्या पैशांचा अपव्यय करत त्यांची सुरक्षितता धोक्यात आणत आहे असा आरोप स्वर्ण भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सरकारवर केला आहे. त्यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेबाबत सरकारला जाब विचारला आहे. याबाबत त्यांच्याशी ‘चपराक’चे विशेष प्रतिनिधी तुषार उथळे पाटील यांनी साधलेला संवाद.

कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची आणि न्यायव्यवस्था तत्पर आणि सक्षम ठेवण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. सरकार त्यासाठी वेळोवेळी नवनवीन कायदेही करत असते; परंतु देशातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही व न्यायही लवकर मिळत नाही. स्त्री व दलितविरोधी गुन्ह्यात उत्तरोत्तर वाढच होत असल्याची वस्तुस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे पोलीस नेहमीच टीकेचे लक्ष बनलेले असतात. दहशतवादी हल्ल्यात जनतेचे, तुटपुंज्या साधनांनिशी प्रसंगी स्वत:चे जीव गमावून, रक्षण करुनही पोलिसांची प्रतिमा आजही मलीन व प्रश्‍नांकित आहे. न्यायव्यवस्थेबद्दल शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, हे वाक्य तर प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येते; परंतु मुळात अशी अकार्यक्षम व्यवस्था का आहे आणि ती कार्यक्षम करण्यासाठी काय केले पाहिजे याची कसलीही योजना सरकारकडे नाही. अपुरी पोलीस व न्यायाधिशांची संख्या, त्यांना होणार्‍या असंख्य असुविधा याबाबतही बोलले जाते; पण त्यावर कार्यवाही होत नाही. भारतातील एकमेव स्वतंत्रतावादी असलेल्या स्वर्ण भारत पक्षाने या विषयावर आवाज उठवला.

पोलिसांची संख्या वाढवा
भारतात एक लाख लोकसंख्येमागे केवळ 182 मंजूर पोलीस आहेत. युनोच्या मानकानुसार ते किमान लाखामागे 222 एवढे तरी असले पाहिजेत. त्यात भारतात आहे त्या मंजूर  पोलीस संख्येपैकी 23.99% जागा रिक्त आहेत. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण लाखामागे 147 एवढेच आहे. त्यात बंदोबस्त, नेत्यांचे संरक्षण यात पोलीस दलाचा मोठा कालापव्यय होतो. मग गुन्ह्यांचा सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा करण्यासाठी, गुन्हे नियंत्रणात राहण्यासाठी, प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळही उरत नाही की पुरेसा वेळही. पोलीस अनेकदा अनेक गुन्हे नोंदवून घेण्यात टाळाटाळ यामुळेच करतात. याबाबत पोलिसांना दोष देण्यापेक्षा गरज आहे ती पोलिसांची संख्या किमान आंतरराष्ट्रीय मानकाएवढी तरी वाढवण्याची.

पोलिसांना निवारा व आरोग्यसेवा मिळावी

जेवढे आहेत त्या पोलिसांच्या समस्या तर अजून गुंतागुंतीच्या आहेत. त्यांना आवश्यक तेवढी निवासस्थाने आजही उपलब्ध नाहीत. जी निवासस्थाने आहेत त्यांचा दर्जा अत्यंत वाईट आहे. केवळ 27% पोलिसांना आज निवारा मिळतो, बाकींना अन्यत्र सोय करावी लागते. काम जास्त असल्याने कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. पोलीसांवरील मानसिक ताण-तणावांमुळे अनेक पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पोलीस आरोग्य हा ऐरणीवरील विषय आहे परंतु त्यांना (व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला) सरकारतर्फे कसल्याही सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना घोषीत केली होती व विनामूल्य उपचार काही आजारांबाबत कोणत्याही इस्पितळाने करावेत अशी अपेक्षा होती. ही योजना काही काळ चालली पण शासनाने इस्पितळांची बिलेच न भागवल्याने आज ही योजना असून नसल्यात जमा आहे. प्रत्येक पोलिसाला हक्काचा निवारा व आरोग्यसेवा मिळाव्यात. केंद्र सरकारच्या आरोग्यसेवा योजनेप्रमाणे राज्य सरकारनेही तशीच योजना राबवावी  व ही योजना निवृत्तीनंतरही लागू असावी.

पोलीस स्कूल्स आणि अत्याधुनिक साधनांची गरज

पोलिसांच्या मुलांचे शिक्षण हाही कळीचा मुद्दा बनला आहे. सैन्यासाठी जशी देशभर पब्लिक स्कूल्स आहेत तशीच पोलीस स्कूल्स देशभर असली पाहिजेत.
पोलीस दलाला अत्याधुनिक साधने पुरवणे, शिरस्त्राणे व बुलेटप्रुफ जॅकेट्स पुरवणे, पोलीस स्टेशन व चौक्या या काम करण्यायोग्यच बांधणे, पुरेशी वाहने पुरवणे हेसुद्धा अत्यावश्यक असून सरकारने त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वर्ण भारत पक्षाने केली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवायची असेल तर ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना सक्षम व सबळ केले पाहिजे. यासाठी पोलिसांवर राज्य सरकार खर्च करत असलेली रु. 74,258 कोटींची रक्कम किमान रू. 1,50,000 कोटींपर्यंत वाढवावी अशी मागणीही पक्षाने केली आहे.

न्यायव्यवस्थेला न्याय द्या
पोलसांची जशी बिकट अवस्था आहे ती न्यायव्यवस्थेलाही चुकलेली नाही. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ तेरा न्यायाधीशच आहेत, जे प्रत्यक्षात किमान 36 तरी असायला हवेत. त्यात आहे त्या जागातही रिक्त असलेल्या जागांचे प्रमाण मोठे आहे. सर्वोच्च न्यायालयात 6, उच्च न्यायालयात 446 तर खालच्या कोर्टात 4600 न्यायाधिशांच्या जागा आजही रिक्त आहेत. भारतात उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले 43 लाख खटले आहेत. खालच्या कोर्टातील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण कोटीत जाते. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकुर यांनी तर सरकार न्यायव्यवस्था संपवायला निघाले काय? असा संतप्त प्रश्‍न विचारला. अश्रू ढाळून अथवा संतप्त होऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. न्यायाधीशांची संख्या दर दहा लाखांमागील तेरावरून पन्नासपर्यंत तत्काळ वाढवली पाहिजे.

मुलभूत सुविधांपासून न्यायव्यवस्था वंचित
जनता सरकारवर कायदा, सुव्यवस्था आणि न्यायासाठी अवलंबून असते. केंद्रीय बजेटमध्ये न्यायसंस्थेसाठी एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या केवळ 0.02% एवढाच वाटा येतो. प्रगत जो  प्रत्यक्षात 0.20% एवढा असला पाहिजे. यात न्यायाधीशांची संख्या योग्य प्रमाणात वाढवणे एवढेच अभिप्रेत नाही. आपली न्यायालये, अगदी सत्र न्यायालयेही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. असंख्य न्यायालयीन इमारती व कोर्टरुमची अवस्था चिंतनीय तर आहेच, पण साध्या पिण्याच्या पाण्याची अथवा शौचालयांची उपलब्धताच नाही. खालच्या कोर्टात तर काही न्यायाधीशांना गोडाऊन किंवा कोंदट रेकॉर्डरुममध्ये बसून सुनावण्या घ्याव्या लागतात. पक्षकार व आरोपींच्या किमान सुविधांबद्दल तर काही बोलावे अशी स्थिती नाही. कोर्ट ही न्यायाची जागा न वाटता एक पोलीस कोठडी वाटते असा सर्व पक्षकारांचा अनुभव आहे. उच्च दर्जाची, सुविधांनी परिपूर्ण अशी न्यायालये व न्यायाधीशांच्या चेंबर्स असल्याच पाहिजेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी न्यायव्यवस्थेला दिलेले बजेट किमान दहा पट वाढवलेच पाहिजे.

हे पैसे आणायचे कोठून?
सरकार आजवर हेच उत्तर देत आले आहे की हे करण्यासाठी आवश्यक पैसा सरकारच्या तिजोरीत नाही. हे उत्तर भ्रम उत्पन्न करणारे आहे. सरकारचे काम मुळात उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, खाणी किंवा हॉटेल चालवणे आहे काय? तरीही भारत सरकार हा उद्योग आजवर करत आले आहे व बदल्यात महाप्रचंड तोटा दरवर्षी सहन करते आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर भारतात बँक आणि विमा क्षेत्र वगळता 298 केंद्र सरकारी उद्योग कंपन्या आहेत. यातील सरकारी भांडवल दोन लाख तेरा हजार कोटी रुपये असून एकूण गुंतवणूक 10 लाख 96 हजार कोटींची आहे. आज त्या काही नफ्यातील कंपन्या सोडल्या तर दरवर्षी हजारो कोटींचा तोटा घोषीत करत आल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार यातील 77 कंपन्यांचा 2014-15 सालचा तोटाच रू. 27,360 कोटींचा आहे. या उद्योगांना तगवण्यासाठीचा खर्च जो होतो तो कितीतरी अधिक पटीत होतो. या कंपन्यांत निर्गुंतवणूक करण्याच्या फक्त चर्चा होतात पण हितसंबंधियांमुळे ते होत नाही. आज सरकारी उद्योग जे करणे सरकारकडून मुळात अभिप्रेत नाही तिकडे सरकारी (म्हणजे जनतेची) संपत्ती उधळली जात आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची मुख्य जबाबदारी असून तिकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. सरकारने तत्काळ सर्वच उद्योगातून बाहेर पडावे व सरकारच्या कायदा व सुव्यवस्था या मुख्य उद्दिष्टांकडेच लक्ष पुरवत छोटे व मजबूत सरकार कसे बनेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच घोषणेप्रमाणे पहावे असेही मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात
सरकारचे काम उद्योग-व्यापार करणे नसून जनतेच्या हिताची, स्वातंत्र्याची रक्षा करणे आहे. नको त्या कामातून मुक्त होत सरकारने महत्त्वाच्या कामात लक्ष केंद्रीत करावे. सरकारने असे दुर्लक्ष आजवर केल्यानेच आज गुन्हेगारीचा दर वाढतच चालला असून सामाजिक स्वास्थही धोक्यात येत आहे. नवनवे कायदे आणल्यानेही गुन्ह्यांवर कसलाही प्रतिबंध लागलेला नाही की वचक बसलेला नाही. त्यामुळे तत्काळ पोलीस व न्यायव्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ वाढवून सामान्य जनतेला स्वातंत्र्यात जगण्याची हमी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
26 सप्टेंबरपर्यंत या बाबतीत प्रधानमंत्री व संबंधित मंत्र्यांनी पाळली जाईल अशी घोषणा न केल्यास 2 ऑक्टोबरपासून स्वर्ण भारत पार्टी आंदोलन करेल.

Thursday, August 25, 2016

पर्यावरणाचा सुभेदार बाबूराव पेठकर


मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

 शेती हा आतबट्याचा व्यवहार असल्याची मानसिकता बळावत असताना. त्याच दरम्यान एका युवा मनाच्या ज्येष्ठाने तरूण शेतकर्‍यांना लाजवेल असा प्रयोग आपल्या शेतात केलाय. सुभेदार बाबूराव पेठकर असं या पर्यावरण ऋषीचं नाव आहे. पर्यावरणावर, पाण्याच्या बचतीवर बोलणारे अनेक आहेत; मात्र  कृतीतून पर्यावरण जगणारे तसे नगण्यच. त्या नगण्यांपैकीच एक म्हणजे बाबूराव पेठकर. वयाची 27 वर्षे सैन्य दलाच्या आरोग्य विभागात कार्य केल्यानंतर त्यांनी सोलापूरात आपले बस्तान बसवले. त्यांच्या सैन्य दलातील सेवेच्या भरतीलाही देशसेवेचीच झालर होती. कारण 1962 साली झालेल्या चीन सोबतच्या युद्धावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तरूणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. लातूर येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारे बाबूराव पेठकर वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले. उत्कट देशप्रेमामुळेच त्यांनी सैन्यात प्रवेश केला.
सैन्यदलात असताना बाबूराव यांची नेमणूक आरोग्य विभागात झाली. त्यामुळे 1962, 1965 साली झालेल्या युद्धात त्यांनी युद्धभूमिवरील जखमी जवानांवर उपचार केले. 1965 च्या युद्धात त्यांनी अमेरिकन बनावटीचे मोबाईल हॉस्पिटलही हाताळले. युद्धभूमिवर त्यांनी तीन आठवड्यात जवळपास एक हजार सैन्यांवर उपचार केले. त्याच दरम्यान युद्धात सैनिकांसोबतच झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांच्या नजरेस आलं. कोणतीही चूक केलेली नसताना केवळ दोन देशातील वादामुळे निष्पाप झाडे, फुले, फळे हकनाक बळी जातात. त्यामुळे झाडांविषयी त्यांना अतीव जिव्हाळा निर्माण झाला. वृक्षप्रेमाची खरी बीजे त्याच ठिकाणी रूजली. दिल्ली, बंगळुरू, पुणे, सिक्कीम आदी ठिकाणी संशोधनाच्या कामी त्यांनी सेवा केली. याशिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संशोधन टीममध्येही त्यांनी काम केलं. पुढे 27 वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोलापूरकडे आपला मोर्चा वळवला. 
सैन्य दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल 1980 साली तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुभेदार पेठकर यांची राजपत्रित अधिकारी म्हणून बढती केली. याशिवाय भारत सरकार तर्फे त्यांना चरितार्थासाठी तीन एकर जमीन आणि राहण्यासाठी एक जमिनीचा तुकडा देण्यात आला. त्यांना नोकरीदेखील मिळण्याची संधी आली होती; मात्र त्यांनी ती नाकारली. सरकारने दिलेल्या जमिनीचा विनियोग आणि शेतीत काही वेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केवळ निर्णय घेऊन ते शांत बसले नाहीत तर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. 
सोलापूरच्या कंबर अर्थात छत्रपती संभाजी तलावाच्या पाठीमागेच पेठकर यांची सरकारने दिलेली तीन एकर शेती आहे. पंधरा वर्षापूर्वी ही जमीन म्हणजे खडकाळ रान होते. कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वा झाडी त्याठिकाणी नव्हती; मात्र आपल्या देशसेवेनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात बाबूराव पेठकर यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. खडकाळ रानावर शेती आणि जंगल उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पर्यावरण ठीक असेल तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे. पर्यावरण उत्तम असेल तरच देशातच नव्हे तर जगात शांतता, सुव्यवस्था नांदू शकते. त्यामुळे या शतकातली पर्यावरणाची समस्या लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणाच्या अभ्यासास सुरूवात केली. सीमेवर केलेल्या सेवेनंतर ते पर्यावरण सैनिक म्हणून काम करू लागले. त्यासाठी त्यांनी राज्यातील 27 जिल्ह्यात दौरा केला. दरम्यानच्या काळात त्यांनी वृक्षांची लागवड सुरू केली. त्यांचे संवर्धन, विस्ताराचे कार्य केले. त्याचबरोबर त्याचा प्रचार-प्रसारही सुरूच ठेवला. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीला लागूनच असलेल्या राज्य शासनाची सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही त्यांनी शिवार फुलवायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानाचे राजदूत म्हणून नेमले. त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानासाठी जवळपास ऐंशीहून अधिक देणगीदार मिळवून दिले.

महाराष्ट्राच्या पर्यावरणीय संकटावर उत्तरे...
पर्यावरण रक्षण हा कृती करण्याचा विषय आहे. त्यामुळे कागदोपत्री घोडं नाचवल्याने ते साध्य होणार नाही. म्हणून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी विविध उत्तरे शोधली आहेत.

जलपुनर्भरण....
यामध्ये पाण्याचे संकट मिटविण्यासाठी विहिर पुनर्भरण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यात त्यांनी जलस्त्रोत शुद्धिकरण आणि जलस्त्रोत बळकटीकरण असे दोन भाग केले. शिवसेना-भाजप युती सरकारने राबविलेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आज सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाली; मात्र पेठकर यांनी आठ-दहा वर्षापूर्वीच जलयुक्त शिवारचा प्रयोग यशस्वी केला आहे. उतारावरून पळणारे पाणी त्यांनी रांंगते केले तर रांगते पाणी थांबते करून पाण्याचा योग्य वापर व नियोजन करून शेती हिरवीगार केली. विशेष म्हणजे पेठकर यांच्या शेतीच्या बाजूलाच बारमाही पाण्याने भरलेला छत्रपती संभाजी तलाव आहे. तरीही अद्याप त्यांनी एकदाही तलावातील पाण्याचा थेंबही शेतीसाठी वापरला नाही. शेतात व आजूबाजूला पडलेल्या पावसाचे पाणी आपल्या शेतीकडे वळवून त्यांनी आपल्या खडकाळ रानावर नंदनवन फुलवले. त्यांच्या या प्रयोगाने अनेक छोट्या शेतकर्‍यांना हा प्रयोग उपयुक्त ठरला आहे.
याबाबत सुभेदार बाबूराव पेठकर सांगतात की, शेतकर्‍यांनी आपल्याकडे जमीन किती आहे याचा विचार न करता, आहे त्याच जमिनीत सोने पिकविण्याची हिंमत ठेवली पाहिजे. पावसाचे पाणी साठवून जिरायती शेती बागायती करण्यावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान शासनाने आता सुरू केले असले तरी, आपण हा प्रयोग स्वकल्पनेतून यापूर्वीच सुरू केला आहे. त्यामुळे मी पाण्यासाठी कधीही अवलंबून राहिलो नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही आमच्या विहिरीला 16 ते 17 फूट पाणीसाठा होता.

वनभिंतीचा शोध...
आपल्या महाराष्ट्रात प्रदूषण उद्भवाची जवळपास पस्तीस केंद्रे आहेत. त्यात विटभट्टी, पेट्रोल पंप, स्टोन क्रशर, स्मशान भूमी, साखर कारखाना, इतर उद्योग आदी. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी पेठकर यांनी वनभिंतीचा शोध लावला. वनभिंत संकल्पना म्हणजे झाडांची भिंत. यात तीन प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. यात झुडूपवजा झाडाची पहिली रांग, मध्यम उंचीच्या झाडांची दुसरी रांग आणि सर्वात उंच वाढणार्‍या प्रजातीची तिसरी रांग. ती घनदाट असते. अशी वनभिंत त्यांनी आपल्या शेतात तयार केली आहे. समाजानेही हे प्रयोग आपल्या भागात करायला हवेत अशी त्यांची अपेक्षा आहे.
सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समुहाने हा प्रयोग स्वीकारला आहे. लोकमंगल साखर कारखान्याने आपल्या फळी साठवण केंद्राच्या बाजून अशी वनभिंत उभारली आहे. त्यामुळे वायूप्रदुषणास रोख लागणार आहे. शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी अशा भिंती उभारणे गरजेचे आहे. सध्या जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यावर ही वनभिंत म्हणजे चपखल उत्तर आहे. भारतीय नेत्यांनी अनेकवेळा जागतिक परिषदेत अशी ग्वाही दिलीय की, आम्ही कार्बनचे प्रमाण वाढू देणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावू; मात्र ते भारतीय नागरिकांच्या जीवावर सांगितले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकांच्या मनात वृक्ष लागवड करण्याचा विचार येतो; मात्र त्यांना रोपे किंवा ते वाढविण्याची माहिती नसते. ते होऊ नये यासाठी त्याचाच एक भाग म्हणून पेठकर यांनी रोपवाटिकाही तयार केली आहे.

पाण्याचे संकलन...

आपल्याकडेे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र ते पाणी असेच वाहून जाते. ते पाणी वाया जावू नये म्हणून पेठकर यांनी बारा वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक वाचल्यानंतर पाण्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी स्वतः बाबूराव पेठकर यांच्या शेताला भेट दिली. तेथील विविध प्रयोग त्यांनी पाहिले. रेनवॉटर हार्वेस्टींगची कामेदेखील त्यांनी पाहिली. विशेष म्हणजे ही कामे त्यांनी मोफत करून दिलेली आहेत. सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विवेकानंद केंद्र आदी इमारतीत त्यांनी ही कामे करून दिली आहेत.

सेंद्रीय रांगोळीचा शोध....

भारतीय संस्कृतीतील एक दैनंदिन कार्य म्हणजे रांगोळी काढणे. मात्र त्यामुळे जमिनीत रासायनिक रंग जाऊ लागलेत. ते प्रमाण कमी असले तरी त्याचा परिणाम जमिनीवर होतोच. त्यावर पर्याय म्हणून मग सेंद्रीय रांगोळीची कल्पना मला सुचली. आसपासची झाडाची पानगळ सुरू असते. त्याच्या पानांचा रंग विविध प्रकारचा असतो. ती पाने वाळवून त्याची भुकटी केली की रांगोळी तयार होते. यासोबत कोळसा पावडर, लाकडाचा भुस्सा, आपली रांगोळी किंचित प्रमाणात वापरायची. याशिवाय सूर्यफुल, गव्हाचे गोंडर, कूस असे शंभर प्रकारच्या वस्तूंचा उपयोग त्यात करता येतो. त्याबाबतचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. समाजात ते माहिती होण्यासाठी सेंद्रीय रांगोळी बनविण्याची स्पर्धा देखील त्यांनी घेतली.
प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी दुसरी हरितक्रांती घोषीत केली आहे; मात्र तिला केवळ हरितक्रांती न म्हणता दुसरी पर्यावरणीय हरितक्रांती घोषीत करायला हवी होती. कारण हरितक्रांतीमध्ये पुन्हा लोक युरिया आणि तत्सम रासायनिक पदार्थांचा वापर करतील. मग ती हरितक्रांती होईल का? पेठकर यांची ही संकल्पना ऐकून डॉ. स्वामीनाथन अतिशय प्रभावित झाले. 

खंत वाटते...

पर्यावरणाच्या र्‍हासाबाबत खंत व्यक्त करताना बाबूराव पेठकर म्हणतात, पर्यावरणाबाबत आपल्या समाजात अनास्था आहे. मुळात ती शालेय स्तरावरूनच दिसून येते. जे समाज घडवतात त्या शिक्षकांनाही याचे भान नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना याचे शिक्षण देणे गरजेेचे आहे. पर्यावरणाला मूलभूत शिक्षणाचा दर्जा द्यायला हवा. त्यामुळे काही प्रमाणात त्याबाबत सजगता येईल. मुळात भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे; मात्र आपण पंचमहाभूतांना महत्त्व न दिल्याने ही पश्‍चातापाची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्या मते प्रत्येकाला तीन माता असतात. त्यापैकी एक जीवनदाती माता, दुसरी भूमाता आणि तिसरी गोमाता. यातील जीवनदाती मातेखेरीज दोन मातांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
सुभेदार पेठकर यांनी त्यांच्यापरीने पर्यावरणाचे काही सिद्धांत मांडले आहेत.
1)     किमान गरजेवर आधारित जीवनपद्घती
2)     जीव जीवश्य जीवनम्
3)     रसायन निर्मिती आणि त्याचा वापर मर्यादित
4)     ऊर्जा निर्मिती आणि त्याचा मर्यादित वापर
सुभेदार बाबूराव पेठकर यांनी फुलवलेल्या शेतीत आज जैवविविधता आहे. त्यांच्या शेतात मोर, ससे, साप, फुलपाखरे, मुंगूस, सरडा, विविध परदेशी पक्षी आदींचा वावर असतो. विशेष म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. विहिरीत अनेक प्रकारचे मासे, कासव, साप आदींचा वावर असतो. पेठकर यांच्या शेतात जल आणि पक्षीतीर्थ आहे.  म्हणजेच, मळ्यामध्ये कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याने भरलेली विहीर असून त्याला जलमंदिर असे नामकरण केले. परिसर वृक्षांनी व्यापून गेला असल्यामुळे वृक्षमंदिर तर मळ्यामध्ये पक्षांचा सतत किलबिलाट असल्याने त्याचे पक्षीतीर्थ असे नामकरण त्यांनी केले आहे.
भविष्यात सरकार आणि समाजाने वनमहोत्सव कृतिशीलपणे साजरा केला जावा. शहरी वनीकरण करणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये आदींनी किमान एक तृतीयांश जमिनीवर वनीकरण करावे. केवळ शेतकर्‍यानेच झाडे लावावीत असा काही नियम नाही. कारण ऑक्सीजन सर्वांनाच हवा आहे. बायोडायव्हर्सिटी, कृषी पर्यटन आदी जास्तीत जास्त निर्माण व्हावेत. याशिवाय वनयुक्तशिवार उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजात पर्यावरणाचे तीर्थक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. 


सुभेदार बाबूराव पेठकर यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार
*   1980 साली सैन्यातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र देऊन नायब सुभेदार पद.

*    1997 साली वृक्ष लागवड प्रचार-प्रसार कार्याकरिता महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनश्री पुरस्कार.
*   1999 साली भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार.
*   2000 साली प्रदुषण विरोधी कार्यासाठी शौर्य पुरस्कार.
*   महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण मंत्रालय विभागाचा विशेष गौरव पुरस्कार.
*    किसान शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार.
*   2011 साली दूरदर्शन वाहिनीचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार.

पर्यावरण पूरक संशोधन प्रकल्प सादर
*   छतावरच्या पाण्याचे संकलन
*   महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी संकलन
*   सेंद्रीय रांगोळी


सागर सुरवसे
आयबीएन लोकमत, सोलापूर
मो. 97691 79823


मासिक 'साहित्य चपराक', पुणे

Tuesday, August 23, 2016

टेन्शन कायको लेनेका...

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

आज एक मित्र भेटला, तसा तो नेहमीच भेटतो पण आज खुपच उदास वाटला! नक्कीच काहीतरी बिनसलं असणार याचं... कसल्यातरी तणावात दिसत होता. नेहमीसारखा उत्साहाने बोलत नव्हता अन् आपण काही बोललोच तर लक्षही देत नव्हता! आता याला बोलतं करावंच असं ठरवून त्याला व्हाटस् ऍपवरचे काही जोक्स ऐकवले आणि आम्ही दोघंही मनमुराद हसलो! मग त्याला हळूच प्रश्न केला ‘‘काय आज वहिनीशी भांडून आलास की काय?’’
तेव्हा मात्र तो अचानक गंभीर झाला व म्हणाला, ‘‘तिच्याशी मी आता भांडू शकणार नाही, आता ती हेडमास्तरीणबाई बनणार आहे! मग तिला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळणार!’’‘‘

‘‘अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे, तू खुश व्हायचं सोडून असा रुसुबाईसारखा का दिसतोस रे ?’’
‘‘हेच ते, तुला काही कळत नाही!’’
‘‘अरे ह्या नोकरी करणार्‍या बायकांचं तुला काही कळणार नाही. आता माझ्याच बायकोचं बघ, तिला जास्त पगार मिळायला लागेल ना मग मला विचारणारसुद्धा नाही, याचंच जाम टेंशन आलंय यार मला!’’
आता याला काय म्हणावं! टेंशन घ्यायला कधी कुणाला कुठल्या प्रकारचं कारण लागेल सांगता येत नाही. कुणाला परीक्षेचं टेंशन तर कुणाला नोकरी कधी मिळणार याचं टेंशन, कुणाला नोकरी मिळाल्यानंतर ती कशी टिकवायची याचं टेंशन! कुणाला घरचं बायकोचं टेंशन तर कुणाला ऑफिसमधल्या साहेबाचं टेंशन! (कारण सरळसाधं आहे. घरी जायला उशीर झाला तर बायको ओरडणार अन् ऑफिसमधून लवकर निघावं तर खडूस साहेब ओरडणार!!)
बरं हा टेंशनचा जो प्रकार आहे ना तो मोठ्यांनाच लागू असतो अशातला भाग नाही. अगदी बालवाडीत किंवा नर्सरीला शिकणारी चिमुकली मुलंही म्हणतात, ‘‘मम्मी मला ह्या होमवर्कचं भारी टेंशन आलंय! तुच करून दे माझं होमवर्क...’’ म्हणजे मग चिमुकलीच्या मम्मीला परत टेंशन आहेच! एकमात्र खरं आहे ज्यांना जास्त कटकटींचा सामना करावा लागतो किंवा ज्यांच्यामागे जास्त व्याप असतात त्यांना जास्त टेंशन असायला हवं! पण प्रत्यक्षात आपण बघतो अशा व्यक्ती नेहमीच तणावमुक्त, हसतमुख दिसतात याचं नेमकं काय कारण असावं?
टेंशन यायला किंवा तणावग्रस्त व्हायला अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असणे तसेच कुठल्याही गोष्टींचा नकारात्मक विचार करणे! इतरही बरीचशी कारणे असू शकतात जसे -स्वतःची दुसर्‍याशी तुलना करणे, लवकर निराश होणे, अकारण भीती वाटणे... इत्यादी.
हे सर्व टाळण्याचे काही उपाय आहेत पण मनुष्य स्वभावानुसार सहसा सर्वसामान्य लोक तिकडे दुर्लक्षच करतात! एक उपाय म्हणजे सुसंगत! आता हे सांगायला खूपच सोपे आहे की, बाबा रे चांगल्या मुलांची संगत धर, असं वागू नको, तसं करु नकोस. मात्र म्हणतात ना... वाईट सवयी लवकर जडतात, पण सुसंगतीसाठी आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. आजकाल व्यसनी लोकांना मित्र शोधावे लागत नाहीत, दारु पिणार्‍याला त्याचे जोडीदार पटकन मिळतात तसेच दुकानही लवकर सापडते (अर्थातच दारूचे)! तंबाखू, गुटखा खाणार्‍यांची सुध्दा तीच तर्‍हा! दुर्दैवानं आपल्या समाजात आज सज्जन माणसं शोधावी लागतात. चांगल्या लोकांच्या संगतीने निश्चितच चांगल्या सवयी जडतील आणि त्यामुळे सकारात्मक विचारसरणी अवलंबण्यास नक्कीच मदत होणार; पर्यायाने आपसुकच तणाव मुक्त होण्यास वेळ लागणार नाही!
‘‘दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है’’ हे गाणं बहुतेकांनी ऐकलं असणारच! जगात मलाच खूप दुःख आहेत, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही अशाप्रकारे आपलीच कॅसेट वाजवणारे कमी नाहीत. खरंतर असे लोक खूप असमाधानी असतात, इतरांचं सुख बघून हे दुःखी होतात! मग तेच त्यांच्या टेंशनचं कारण बनते!
अशावेळी उपरोक्त गाणं आठवलं की अशाप्रकारचं टेंशन बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. काही लोकांना रग्गड पैसा जमवण्याचा हव्यास असतो. त्यासाठी मग कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते! त्यात जर अपयश आले तर मग हे लोक लगेच निराश होतात आणि तणावाने पछाडतात! अशाप्रकारची माणसं जास्त पैसा मिळाला तरीही टेंशनमध्येच असतात. अशावेळी जास्त हव्यास न धरता  ’आपल्या गरजेपुरता पैसा कमावला तरी पुरे’ ही मानसिकता अंगी बाणली तर बर्‍याच अंशी टेंशन कमी होऊ शकते यात शंका नाही!
काहींना झोप येत नाही याचं तर विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही याचं टेंशन येतं. घरी असलेल्या पालकांना शाळेत गेलेली आपली मुलं कधी सुखरूप परतणार याचं टेंशन येतंय! म्हणजेच काय प्रत्येकाला तणावाला सामोरं जावंच लागतं. अशा तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे नियमितपणे योगासने व प्राणायाम करणे! यासाठी ना पैसे पडतात ना कुठल्याही प्रकारचं इंधन लागतं!
चला तर मग करुया सुरुवात आजपासून अगदी आत्तापासूनच!
एकदुसरेको सिर्फ खुशहाली देनेका!
अरे भाई टेन्शन कायको लेनेका!!

- विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

९९२३७९७७२५ 

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
ऑगस्ट २०१६