Wednesday, March 30, 2016

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली
लहानची ती मोठी झाली
तिच्या चेहर्‍यावर विलसणारं
गर्भारपणाचं तेज पाहून
समजतंय,
निसर्गानं आपलं काम चोख बजावलंय
यथावकाश दिलाय तिने
एका गोंडस मुलाला जन्म
आता सिग्नलला थांबून
भोवतालच्या गर्दीत
भिरभिरत्या नजरेने
घेतेय ती
बाळाच्या बापाचा शोध!



उड्डाणपुलाखाली
दीनवाण्या चेहर्‍यानं
भीक मागणारी मुलं पाहून वाटतं
हीच का या देशाची भावी पिढी?
याचक म्हणून जगणारी!
पण ह्याच मुलांकडून
गरगरीत पोटावरुन
ढासळणारी पॅन्ट सावरीत
कोपर्‍यात उभ्या असलेल्या मामानं
केलेली हप्तावसूली पाहून
संभ्रम पडतो
खरा भिकारी कोण?
ही मुलं का तो मामा?
उत्तर वाचकानी शोधावं!



उड्डाण पुलाखाली
आपलं बालपण विसरुन
भीक मागणारी मुलं
कमावतात दिवसाकाठी
पाच-पन्नास रुपये
उदर निर्वाहासाठी!
अन् संध्याकाळी
देतात ते पोलिसाला
दहा रुपयांचा हप्ता
बिनदिक्कतपणे!
यापेक्षा वेगळं दानशूरत्व
आणखी काय असू शकतं?



उड्डाण पुलाखाली
परदेशासारखे
सुंदर उद्याने खुलण्याऐवजी
स्थिरावलेत येथे
अनेकांचे संसार
येथेच होतात त्यांचे विवाह
सुहागरातही येथेच रंगते
संसार वेलीवर फुलेही उमलतात
अन्
रोजगारही येथेच मिळतो
यांना न कसली चिंता
ना कसलं भय
नसतो यांचा बँक बॅलन्स
नसतो यांना आयकराचा त्रास
एक हप्ता पोलिसाकरवी
स्थानिक पुढार्‍याला पोहोचल्यावर
विसावतात ते जन्मभर आनंदात
याच उड्डाण पुलाखाली
याच उड्डाण पुलाखाली


शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या
उड्डाण पुलाखाली
सिग्नलला थांबताना
दिसतात मला
आठ-दहा वयोगटातील
लहान मुले
कधी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला
तर कधी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला
देशाचा तिरंगी झेंडा विकताना
तर ख्रिसमसच्या निमित्ताने
सान्ताक्लॉज विकताना
कधी पावसाळ्यात विकतात ते छत्र्या
पावसात भिजत-भिजत
तर कधी उन्हाळ्यात
गार पाण्याच्या बाटल्या
उन्हात पोळत-पोळत
चित्रांची पुस्तकेही विकतात ते
लहानग्यांच्या खुशीसाठी
खेळणीही असतात त्यांच्याकडे
खेळण्याच्या वयात पण
अशी खेळणी विकताना पाहून
आतून गलबलून येतं
पण थोडं समाधानही वाटतं
देशाची भावी पिढी
कष्टाने कमावून खातेय याची
ऐदीपणाच्या विळख्यातून सुटून
प्रामाणिकपणे जगतेय याची!


सौ. चंद्रलेखा बेलसरे, पुणे
8554981971
(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)

अंध कळ्यांच्या सहवासात....

तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते

नीताने भावेशबद्दल, आपल्या नवर्‍याबद्दल काढलेले हे शब्द. आयुष्यात समर्पण, अत्युच्च प्रेम ह्याचा वास्तुपाठ म्हणजे नीता. स्वत: डोळस असून एका अंध मुलावर जीवापाड प्रेम करून, घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी प्रेमविवाह केला.
भावेश शाळेत असताना मुलं त्याला ‘आंधळा, आंधळा’ म्हणून चिडवत. त्याची आई फार शिकलेली नसली तरी त्याला वाचून दाखवायची. तिनेच त्याला शिकवले. ती माऊली म्हणाली, ‘‘भावेश तू जग बघू शकत नसलास तरी असं काहीतरी वेगळं करून दाखव की जग तुझ्याकडे बघेल.’’ भावेशला स्वत:ला प्रकाश दिसत नव्हता तरी जगाला प्रकाश देणार्‍या मेणबत्त्या बनवायची इच्छा होती.
संकटं एकटी येत नसतात. ती हातात हात घालून येतात. तसंच भावेशचं झालं. त्याची नोकरी गेली, कॅन्सरने त्याची आई गेली, वडील तर आधीच गेले होते आणि त्याची दृष्टीही संपूर्ण गेली पण खचून न जाता संकटांना संधी मानून त्याने स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. मेणबत्त्या करून हातगाडीवरून तो विकू लागला. त्याला कोणी कर्ज देईना, मदत करेना. त्याचवेळी नीता त्याच्या आयुष्यात आली.
हळूहळू त्यांनी स्कूटर घेतली, मग टेम्पो घेतला. मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या करून स्वत:ची कंपनी काढली. त्यात अनेक अंध मुलांना शिकवून पायावर उभं केलं. स्वावलंबी बनवलं. या यशात त्याची पत्नी नीता हिचाही मोठा वाटा आहे. अंधत्व ही कमतरता न मानता त्यावर मात करून तो खेळाडू झाला. अनेक खेळात तसेच पॅरा ऑलिंपिक्स मध्ये त्याने भरपूर पदके मिळवली. स्वत:च्या जिद्दीवर आपला व्यवसायही त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. त्याचा वेलू गगनाला भिडला आहे. खेळाप्रमाणे व्यवसायातही अनेक रेकॉर्डस् भावेशला मोडायचे आहेत. आज तो आपल्या पत्नीबद्दल कृतज्ञतेने म्हणतो,
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे

भावेशवरून आणखी एक गोष्ट आठवली. शाळेत मास्तरांनी विद्यार्थ्यांना कागदाचे अनेक तुकडे दिले आणि सांगितले की हे तुकडे जोडून भारताचा नकाशा बनवा. एका मुलाने पटकन नकाशा बनवला. मास्तरांनी विचारलं, ‘‘इतका लवकर कसा बनवलास?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘या कागदांच्या तुकड्याच्या मागे माणसाचं चित्र आहे, मी माणूस जोडला. भारताचा नकाशा आपोआप तयार झाला.’’ याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात. ही एकात्मता आपल्या भारताची शान आहे. ती मला अनामप्रेमींनी महाबळेश्‍वरला अक्षयतृतीयेला अंधांचे राष्ट्रीय संमेलन घेतले होते त्यात बघायला मिळाली. मी पण अनामप्रेमी आहे. म्हणूनच मलाही हा सोहळा बघायचं भाग्य लाभलं.
अनाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रसिद्धीची गरज वाटत नाही, आपले नाव कुठेतरी यावे असे मनात वाटत नाही ते अनाम आणि प्रेमाने कोणतीही परिस्थिती, म्हणजे जग जिंकता येते म्हणून अनामप्रेम. अंधांच्या सहवासात तीन दिवस राहिले. त्यांच्याशी बोलले, त्यांच्याबरोबर सहभोजन केले. त्यांच्या कोंडलेल्या भावनांना, हृदयातील वेदनांना वाट करून दिली, साद घातली. तेव्हा जाणवलं दुदर्म्य इच्छाशक्ती असली की त्यापुढे काहीही अशक्य नसत. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. आम्ही प्रेमाचे प्रयोग करतो. प्रेमाचे प्रयोग करताना वाटलं खरं म्हणजे आपण डोळे असलेले लोक अंध आहोत. कोणी सत्तेने, कोणी धर्माने, कोणी पैशानी, कोणी व्यवहारातील तात्कालिक लाभांनी. जे डोळस आंधळ्यांसारखे वागतात त्यांच्यासाठी ओशो म्हणतात, ‘‘मै अंधोंकी बस्ती मे रोशनी लेके घूम रहा हूँ!’’
अंधांना फक्त चर्मचक्षू नाहीत पण त्यांचे अंत:चक्षू उघडले आहेत. त्यांना तुमच्यातील आत्मा दिसतो, सहसंवेदना जाणवते. म्हणून आपण थोडा काळ आपलं अंधत्व विसरून या खर्‍या अंधांवर प्रेमाचं सिंचन करू या. अंध केवळ वासानी, स्पर्शानी, ऐकण्यानी कितीतरी गोष्टी आपल्यापेक्षा सरस करू शकतात.
‘‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’’
असं म्हणणार्‍या या अंधमुलांच्या राष्ट्रीय मेळाव्यातून मी त्यांचे अदृष्य प्रेम समजून घेऊ शकेल.
इतके वर्ष फक्त अन्यायाच्या रॅली (कामगारांचे प्रश्‍न, त्यांच्या मागण्या, पगारवाढ इ.) पाहील्या होत्या, पण महाबळेश्‍वरला या अंधांची प्रेमाची रॅली आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. प्रेम ओसंडून वहात होते. त्या बिचार्‍या मुलांच्या काही मागण्या, प्रश्‍न नव्हतेच. उलट गोड आवाजात आपापल्या भाषेत सर्व मुलं छान हसून गाणी म्हणत होती. या रॅलीचं अवर्णनीय दृष्य बघून डोळ्याचं पारणं फिटलं. अंतर्मुख व्हायला झालं. भारतातल्या दहा राज्यांमधून एकोणीस शांळाचे सर्व वयोगटातील चारशे विद्यार्थी जमले होते. हिंदुस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अंधांचा राष्ट्रीय मेळावा झाला आहे. सगळ्यांनी जगावेगळं समृद्ध जग पाहिलं.
अंध मुलांचं वागणं, बोलणं, त्यांचं पाठांतर, त्यांचे कडूगोड अनुभव, त्यांना पावलोपावली येणार्‍या समस्या, तरीही आनंदी वृत्ती, जिद्द आणि कष्टाची तयारी पाहिली. त्यांची स्थिरता, एकाग्र चित्त आणि एकाग्र मनानी कोणतीही गोष्ट करणं, प्रवाहाविरूद्ध जावे लागूनही जगण्याची जिगर, मोठं मन पाहिलं. आमच्या अडचणी, आमचे प्रश्‍न कुठल्याकुठे विरून गेले. तेव्हा वाटलं आपलं दुखलेलं कळतं तसं दुसर्‍याचं दुखलेलंही आपल्याला कळलं पाहिजे. आपण कृतज्ञतापूर्वक समाजाचं जे देणं लागतो. ते दिलं पाहिजे, कोणत्याही सबबी न सांगता. म्हणतात ना ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग निघतो‘, ‘ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते.’ या अंध मुलांनी आपण अंध आहोत याचा बाऊ न करता, सहानुभूती न मागता उलट त्याचा स्वीकार केला आहे. म्हणूनच त्यांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होते आहे.
खरं तर आपण डोळस लोक भाग्यवान आहोत. आपल्याला निसर्गाची सर्व रूपं बघता येतात. चंद्र, सूर्य, पक्षी, प्राणी, झाड, फुल, फळ, समुद्र, नद्या, डोंगर. पण आपण तो निसर्ग अनुभवत नाही. उपभोगतच नाही कारण आपण स्वत:शीच एकरूप नाही. तर इतरांशी एकरूप कसे होणार? माणसाच्या सुखासाठी निसर्ग सिंहाचा वाटा उचलतोय. आपण निदान खारीचा तरी उचलूया. परिवर्तन हृदयापासून केलं तर यशस्वी होतं. म्हणून आपण स्वयंप्रकाशित होऊ आणि इतरांना प्रकाश देऊ. मनामनात क्रांती झाली की समाजातील उपेक्षितांना आपोआप मदतीचे हात दिले जातील. त्यांच्यावर असं प्रेम करूया की ज्या प्रेमात कसलीही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. खरं म्हणजे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.
इथे अंध मुलांनी रोप मल्लखांबात आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस् तोडले होते. काही जणांनी  अंधांसाठी असणार्‍या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले होते. ऑर्केस्ट्रामध्ये  सर्वप्रकारची वाद्ये डोळसांना लाजवतील इतक्या सफाईदारपणे मुले वाजवीत होती. स्टेजवर सर्व नृत्यप्रकार एकही बीट न चुकता करत होती. त्यांची स्टेजवरची थिरकणारी पावलं बघून थक्क व्हायला होतं. आपोआप सर्व प्रेक्षकांकडून त्यांना स्टँडिंग ओव्हिशन दिले गेले. टाळ्यांचा कडकडाटात भरभरून दाद मिळाली. गाण्याचा सुंदर, सुरेल गळा, तालासुरांचं अद्भूत ज्ञान, अभिनय, कविता, साहित्य एकही क्षेत्र असं नाही की ज्यात या अंध मुलांनी प्राविण्य मिळवलं नाही. त्यांच्यात अनेक कलागुण आहेत. त्यांना फक्त अनाम प्रेमींनी व्यासपीठ दिले.
काही अंध विद्यार्थी सी. ए. झाले आहेत. काही इंजिनीअर, एम. बी. ए., कोणी मोठे व्यावसायिक, कोणी मोठ्या पदावर अधिकारी आहेत. खेळात, गिर्यारोहनात, मॅरॅथोन कशातही ही मुले मागे नाहीत. एक जण तीन डिगर्‍या घेऊन शाळेची मुख्याध्यापिका आहे. नेहाने हिमालयातील उंच शिखर चढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष गिर्यारोहणाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीला जागतिक महिला अधिवेशनातही जगातील ज्या अंध महिलांची निवड केली गेली त्यात नेहाची निवड झाली होती. काहीजणी वॉटरफॉल रॅपलींगसारख्या साहसी गिर्यारोहणात अग्रेसर होत्या. कोणाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार मिळाला तर कोणाला ‘ऑल राऊंडर’ पुरस्कार मिळाला. कुणी नृत्यात अग्रेसर तर कोणाची अंध संस्थेचे अध्यक्ष, सचिव म्हणून निवड झाली.
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दरी खोर्‍यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश

महाबळेश्‍वर सोडताना माझी अवस्था अशीच झाली.
खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार्‍या अंध विद्यार्थ्यांकडे पाहून असे वाटले, ‘लेट्स नॉट गीव सिम्पथी बट ऑपोर्च्युनिटी टू देम.’
तसेच अनामप्रेम ही एक विचारधारा आहे, प्रवाह आहे, परिवार आहे. ‘प्रेम शिंपीत जा’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. समाजातील उपेक्षितांसाठी मग ते मुकबधिर, अंध, अपंग, मतीमंद, अनाथ कोणीही असोत त्यांच्यासाठी हृदयापासून वाटणार्‍या तळमळीने, भक्तीभावाने, निरपेक्षपणे काहीतरी समाजासाठी चांगलं काम करण्याची धडपड पाहून अनाम प्रेमींनाही सॅल्युट करावासा वाटला. हेलन केलर, आएशा यांसारख्या संस्थामधून अंधांसाठी आणि इतर सर्वांसाठी काम करणार्‍या माझ्या मैत्रिणी म्हणत असतील,
कधी भक्त का पाहतो ईश्‍वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्यासारखी मी सदा वाहते
जरी आंधळी मी तुला पाहते.


(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', मार्च २०१६)
- उज्ज्वला कुलकर्णी, पुणे 

९८९०९४६६८४ 

Tuesday, March 29, 2016

एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ

सन अठराशे सत्तावन्न
एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ 
'साप्ताहिक चपराक', पुणे 

(२८ मार्च २०१६)

अठराशे सत्तावनचा उठाव. त्याबद्दल साधारणपणे एकच मतप्रवाह आढळतो. तो स्वातंत्र्यलढा होता असं ते मत. तो उठाव मोठा होता यात शंका नाही; मात्र तो स्वातंत्र्यलढा होता का? त्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. बेचाळीसचा उठाव स्वातंत्र्यलढा होता. त्यानंतर आझाद हिंद सेनेने केलेला उठावही स्वातंत्र्यलढाच. ब्रिटिशांबद्दल खूप संताप होता, म्हणूनच अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला ही गोष्ट मात्र खरी आहे. या उठावाला असंख्य बाजू आहेत. शेषराव मोरे म्हणतात त्याप्रमाणं, एक बाजू ‘जिहाद’ची देखील आहे. ना. के. बेहर्‍यांचा ‘सन अठराशे सत्तवन्न’ हा ग्रंथ या उठावाच्या सर्व बाजू मांडतो. 489 पानी हा ग्रंथ. यात सत्तावन्नमध्ये घडलेला भयानक रक्तपात, बंडखोर व ब्रिटिश दोघांनी आखलेले डावपेच, त्यामागचं राजकारण अशा सर्व बाबी येतात. हा उठाव दडपताना ब्रिटिशांनी दाखवलेली राक्षसी वृत्ती भयानक होती, तसंच बंडखोरांकडूनही अत्यंत अमानवी व हिंस्त्र हत्या घडल्या. त्याचा संपूर्ण लेखाजोखा ग्रंथात आला आहे.
ब्रिटिशांनी भारत जिंकून घेतला तोच मराठ्यांपासून. औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठ्यांनी सगळा भारतच ताब्यात घेतला होता. दिल्लीच्या मुघल बादशाहीचं प्राणपणानं रक्षण देखील केलं होतं. ग्रंथाच्या सुरूवातीला लेखकानं हे ऐतिहासिक सत्य सांगितलं आहे. नंतर लेखक 1857 च्या उठावाची कारणं सांगतो. लॉर्ड डलहौसीची लोभी वृत्ती यामागं होती. तो 1848 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारतातली अनेक संस्थानं त्याच्या डोळ्यात खुपू लागली. आधी सातार्‍याच्या प्रतापसिंह भोसल्यांचं राज्य इंग्रजांनी गिळलं. दि. 29 मार्च 1849 रोजी डलहौसीनं पंजाबचं राज्य खालसा केलं. तिथं राजा रणजितसिंहाचं राज्य होतं. रणजितसिंहाचा मुलगा दिलीपसिंह. त्याला तर ब्रिटिशांनी ख्रिस्तीच केलं. डलहौसीनं पुढं मराठ्यांच्या तंजावर येथील राज्याची देखील तीच गत केली. नागपूरच्या भोसल्यांचं राज्य देखील डलहौसीच्या कारस्थानांना बळी पडलं. ब्रिटिश कापडाचा व्यापार करत. त्यासाठी त्यांना मुबलक कापूस हवा असे. यासाठी त्यांनी वर्‍हाड व मध्य प्रांतावर कब्जा केला. दि. 2 ऑगस्ट 1854. या दिवशी डलहौसीनं झांशीचं राज्य खालसा केलं. दि. 4 फेब्रुवारी 1856. या दिवशी लखनौच्या संपन्न राज्याचा देखील घास घेण्यात आला. इ. स. 1714 ते 1818 हा साधारण 104 वर्षांचा पेशवाईचा काळ. 1818 साली पेशवाई नष्ट झाली व ब्रिटिशांनी मराठ्यांना सरळ चेपायला सुरूवात केली. साम, दाम, दंड, भेद! ब्रिटिशांच्या राजकारणाचं सूत्रच होतं हे. ब्रिटिशांची व विशेषः डलहौसी या महाभागाची ही वृत्ती असंतोषाला कारणीभूत ठरत गेली. ब्रिटिशांचं हे हातपाय पसरणं लेखकानं ग्रंथाच्या सुरूवातीलाच खूप तपशीलानं सांगितलं आहे. पेशवाईच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भारतभर झेंडे रोवले होते. अटकेपर्यंत राज्य नेलं होत; मात्र नंतर इस्ट इंडिया कंपनीच्या राजकारणानं सर्वांवरच कडी केली. त्यात दुसरा बाजीराव पेशवा. तो घरबुडवा निघाला. त्यानं 1802 साली वसई येथे ब्रिटिशांशी तह केला. तो दिवस होता 31 डिसेंबर. त्या दिवसापासून मराठ्यांच्या राज्यातच भांडणं व मतभेद सुरू झाले. ब्रिटिश या सगळ्यांचा फायदा घेत गेले. राजकारण हा शेवटी बुद्धिबळाचाच पट असतो. हे बुद्धिबळाचे खेळ बेहर्‍यांच्या या ग्रंथात पानोपानी वाचायला मिळतात. ग्रंथ कुठेही बोजड नाही. कंटाळवाणा तर नाहीच. अभ्यासपूर्ण व वाचनीय असा तो आहे. बेहर्‍यांनी हा ग्रंथ लिहिला 1927 साली. त्यानंतर 11 वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मग थेट 2007 साली तिसरी आवृत्ती. ती काढली पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनने.  ते 1937 साल होतं. त्यासाली स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बेहर्‍यांच्या या ग्रंथाची स्तुती केली होती. ‘हा ग्रंथ खर्‍या इतिहासाला धरून आहे’ असे सावरकरांचे उद्गार होते. ग्रंथ वाचताना सावरकरांचे हे उद्गार आपल्याला आठवत राहतात.
दिल्ली, लखनौ, कानपूर व झांशी ही सत्तावनच्या उठावाची प्रमुख केंद्रे होती. यात लखनौ वगळता इतरत्र ब्रिटिश बायका व मुलांच्या कत्तली झाल्या, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्यात सर्वात भीषण कत्तल कानपुरला झाली. त्याचा सूड म्हणून ब्रिटिशांनी कानपूर व आसपासच्या परिसरात दहा हजार भारतीयांच्या कत्तली घडवून आणल्या. वाटेल ती किंमत देऊन ब्रिटिशांना हा उठाव दडपायचा होता. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. आपली सगळी बुद्धी, शक्ती वापरली. त्याची सगळी वर्णन बेहर्‍यांनी दिली आहेत. दिल्ली जिंकून घेताना ब्रिटिशांचे 61 लाख रूपये खर्च झाले व 3837 सैनिक मरण पावले; मात्र ब्रिटिशांनी ती किंमत चुकती केली. पुढं त्यांनी झांशी जिंकून घेतलं तेव्हा सूडबुद्धीनं पाच हजार जणांना ठार मारलं. झांशीतली लढाई घनघोरच होती. झांशीच्या राणीनं 17 दिवस किल्ला लढवला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशीच स्थिती त्या काळात झांशीच्या राणीची होती. या चार शहरांमधली बंडाची आग भयंकर होती. त्याला उघड राज्यक्रांतीचं स्वरूप आलं होतं. ही आग विझवायला ब्रिटिशांना एक वर्ष लागलं.
हा उठाव का झाला? त्याची कारणं बरीच होती; मात्र ठिणगी पडली ती एका घटनेमुळं. त्यावेळी कोलकत्याहून आठ मैलांवर ‘दमदम’ ही लष्करी छावणी होती. तिथं ब्रिटिशांनी काडतुसे तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यावेळी ब्रिटिश फौजेतील शिपाई ‘ब्राऊनबेस’नावाची बंदुक वापरत असत. या बंदुकीत काडतूस भरताना ते दातांनी तोडून बंदुकीत भरावं लागे. या काडतूसाला गाईची व डुकराची चरबी चोपडली जाते अशी अफवा उठली. ब्रिटिशांनी देशी शिपायांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र काडतूस वापरताना आपला धर्म बाटेल या विचारानं हिंदू व मुसलमान शिपाई अस्वस्थ झाले. ते आतल्या आत घुसमटू लागले व दि. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे सर्वप्रथम मंगल पांडे बिथरला. त्यानं एका ब्रिटिश अधिकार्‍यावर गोळी झाडली. तो अधिकारी बचावला; मात्र त्या गोळीनं ‘1857’चा अध्याय सुरू झाला. तो संपायला पुढं दोन वर्षे लागली. काय घडलं या दोन वर्षात? तर उत्तर भारतात अक्षरशः हलकल्लोळच माजला होता. बेहरे यांनी या सगळ्या घटना सांगितल्या आहेत. त्यात लढाया, राजकीय डावपेच सगळं काही आहे. त्यावेळी भारतात इस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. तिच्या फौजेत अयोध्या, कानपुर, अलाहाबाद, वाराणसी टापूतील पूरभैयांचा खूप भरणा होता. या पूरभैयांच्या पलटणी बिहार, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, वायव्य प्रांत, मध्य हिंदुस्थानातील संस्थानं, पंजाब अशा सर्व उत्तर हिंदुस्थानभर पसरल्या होत्या. उठावात या पलटणी सर्वात पुढं होत्या. मुसलमान शिपाई तर उठावात सामील होतेच. अशावेळी ब्रिटिशांनी आपल्या फौजेतील शीख व गुरखा पलटणींना आपल्याकडे वळवून घेतले व केवळ त्यांच्या मदतीनेच उठाव दडपला. शीख व गुरखे विरोधात गेले असते तर? तर ब्रिटिश अक्षरशः मेले असते; मात्र ते विरोधात गेले नाहीत त्याला ऐतिहासिक कारणं होती. एक तर शिखांना त्यावेळी मोगल बादशाही मान्य नव्हती. बंडखोरांनी तर मोगल बादशहालाच आपला राजा मानलं होतं. शिखांचे गुरूगोविंदसिंगांसारखे काही धर्मगुरू पूर्वी मोगल बादशहाकडून मारले गेले होते. त्यामुळे शिखांना या बादशाहीविरूद्ध आतून तिटकारा होता. आणखी एक कारण होतं. 1849 साली शीख-इंग्रज युद्ध झालं होतं. त्यावेळी पूरभैय्या व मुसलमान पलटणींनी शिखांविरूद्ध लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्याचाही राग शिखांच्या मनात होता. गुरख्यांची अवस्था अशीच होती. पूर्वी नेपाळ देखील ब्रिटिशांनी जिंकून घेतला होता तो या पूरभैय्या व मुसलमान पलटणींच्या बळावरच. आता गुरख्यांना त्या घटनेचा सूड घ्यायचा होता. यातली ब्रिटिशांची चलाखी व मुत्सद्देगिरी लक्षात घेण्यासारखी होती. ब्रिटिश भारतीय संस्थानं खालसा करत होते. दुसरीकडे या संस्थानिकांना एकमेकांविरूद्ध कोंबड्यासारखं झुंजवत होते; मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना बुडवावं असं कुणालाही वाटलं नाही. नेपाळचा राजा जंगबहाद्दूर. तो देखील ब्रिटिशांच्या मदतीला धावला. त्याचं कारण वर आलंच आहे. प्रत्येकाला आपापले हेवेदावे साधायचे होते. या हेवेदाव्यांचा परिणाम एकमेकांचे रक्त सांडण्यात झाला. यासंदर्भात एक पत्र फार बोलकं आहे. ते लिहिलंय लॉर्ड लॉरेन्सनं सर फ्रेडरिक करी याला. लिहिलं 1858 मध्ये. तो म्हणतो, ‘‘हॅड द पंजाब गॉन, वुई मस्ट हॅव बीन रूइंड.’’ पंजाब बिथरला असता तर सर्वनाश अटळ होता असं तो म्हणतो. बंडाच्या काळात राजपुताना (राजस्थान) शांतच राहिला व महाराष्ट्रातही बंडाचं मोठं वारं शिरलं नाही. झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे मराठे तेव्हा लढले. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी प्राण पणाला लावले; मात्र त्यांच्या सैन्यातली एकूण मराठ्यांची संख्या कमीच होती. रजपूत शांत राहिले ते त्यांच्या काहीशा स्थितीप्रिय वृत्तीमुळं. सत्ताधारी हे मोघल असोत, मराठे असोत वा ब्रिटिश, सत्तेपुढं लीन रहायचं ही ती स्थितीप्रियता. दुसरीकडे बंगाल व मद्रास प्रांत देखील शांतच राहिले.
मंगल पांडे ते तात्या टोपे असा देखील हा सगळा प्रवास आहे. मंगल पांडेला ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्या फाशीची तारीख मात्र ग्रंथात दोन ठिकाणी वेगवेगळी देण्यात आली आहे. पृष्ठ क्र. 155 वर ती 6 एप्रिल 1857 आहे तर पृष्ठ क्र. 207 वर दि. 8 एप्रिल 1857. मंगल पांडे नंतर बरोब्बर दोन वर्षांनी ब्रिटिशांनी तात्या टोपेंना फाशी दिली. तो दिवस होता दि. 18 एप्रिल 1859.
बेहर्‍यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातील या ऐतिहासिक बंडात हिंदुंपेक्षा मुसलमानांचा सहभाग जास्त होता. कारण त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध तेव्हा जिहादच पुकारला होता. शेषराव मोरे यांनी नंतर हेच सांगितलं. ‘लखनौ शहर बंडखोरांनी एखाद्या किल्ल्याप्रमाणे लढवलं’ असं बेहेर्‍यांनी म्हटलंय. लखनौमधील बंडखोर हे सगळेच मुसलमान होते. त्यांच्या शौर्याचं जबरदस्त कौतुक सावरकरांनी देखील आपल्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात केलेले आहेच.
ग्रंथात मथुरा, बरेली, आग्रा, शहाजहानपुर, वाराणसी, अलाहाबाद, ग्वाल्हैर, इंदौर, महू, लाहौर, पेशावर, नझफगड येथील उठावांची देखील माहिती देण्यात आली आहे. ‘सत्यासारखा धर्म नाही’ असं बेहेरे एकेठिकाणी म्हणतात. त्यामुळं ते हा इतिहास सांगताना सत्य घटना सांगण्यावर भर देतात. बेहेर्‍यांनी दोन उदाहरणे सांगितली आहेत. त्यावरून ही गोष्ट लक्षात यावी. एका ब्रिटिश अधिकार्‍याने या बंडाच्या धुमश्‍चक्रीत वीस हजार निरपराध स्त्री-पुरूषांचे प्राण वाचवले. ही घटना झांशीतली. दुसरीकडे सर जॉन के, लॉर्ड कॅनिंग, एडवर्ड थॉमसन ही ब्रिटिश मंडळी सत्यच सांगतात. ब्रिटिशांचे राक्षसी अत्याचार सांगताना ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची मतं बेहर्‍यांनी दिली आहेत.
बेहर्‍यांच्या मते त्याकाळी एकराष्ट्रीयत्वाची भावना भारतात नव्हती. 1885 साली कॉंग्रेसची स्थापना झाली. बेहर्‍यांच्या मते त्यानंतर भारतात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ग्रंथात 1857-58च्या वेळचा भारताचा नकाशा आहे. त्यातून भुगोल तर समजतोच; पण ऐतिहासिक ग्रंथ नकाशांमुळे नीट समजायला मदत होते. काही छायाचित्रे ग्रंथात आहेत. त्यातील कुंवरसिंह, झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, बहाद्दूरशहा जफर, बेगम झिनत महल, तात्या टोपे यांची छायाचित्रे आपल्याला भूतकाळात खेचून नेतात. एकूणच 1857 च्या उठावाचा समतोल अभ्यास या ग्रंथातून आला आहे. 


* सन अठराशे सत्तावन 

* लेखक : नारायण केशव बेहेरे 
* प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२०-२४४५८४५५)
* पृष्ठे : ४८९, * मूल्य : ३०० 

* महेश मांगले, पुणे 
९८२२०७०७८५