Tuesday, August 30, 2016

श्रद्धेचा गैरफायदा, सामान्यांना त्रास

साप्ताहिक 'चपराक', पुणे 

‘सदाचार साधना’ या संस्थेअंतर्गत स्काऊट ग्राऊंड सभागृह, पुणे येथे लेखक व कवी समीर नेर्लेकर यांचे ‘गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समीर नेर्लेकर हे समाजमाध्यमांद्वारे (फेसबुक, व्हॉटस्ऍप) गणेशोत्सवाबद्दलची आपली मते व त्यातील अपप्रवृत्तींचा निषेध नोंदवत असतात. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. या व्याख्यानातून घेतलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श.
माणूस हा ईश्‍वरावर अवलंबून राहतो. इतर प्राण्यांमध्ये हे नाही. त्यामुळे तो आपली श्रद्धा वेगवेगळ्याप्रकारे व्यक्त करतो; पण सध्या ईश्‍वराचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातंय. देव या संकल्पनेचा बाजार सुरू झाला आहे आणि त्याचा फटका सध्याच्या गणेशोत्सवाच्या रूपाने सामान्य लोकांना भोगावा लागतोय.
धार्मिक सण उत्सवांमधून आज श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातोय. गणेशोत्सवात ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांचा त्रास सामान्य जनतेला होतो. तरीसुद्धा हे परप्रांतीय प्रशासकीय अधिकारी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक सुरू ठेवण्यास परवानगी देतात. याचा महिला, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे सामान्य माणसाने त्याविरूद्ध निषेध नोंदवला पाहिजे.
सुरूवातीला गणेशोत्सव सुरू करण्यामागची प्रेरणा ही समाज संघटन व समाज प्रबोधन ही होती. त्यावेळची ती गरज होती. 70-80 च्या दशकापर्यंत हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जायचा; पण आता यातील पावित्र्य नष्ट झाले आहे. शास्त्रोक्त पद्घतीप्रमाणे गणेशोत्सवाचे स्वरूप गणपतीची मूर्ती स्वत: मातीची बनवून, त्याची आरास करून, प्रतिष्ठापना करून, रोज आरती करणे व दहा दिवसानंतर त्याचे विसर्जन करणे असे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या कला वापरून, स्वत: मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करणे अपेक्षित होते. असे काही काळ घडतही होते. त्यामुळे उत्तम कार्यकर्ते घडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत होता.
कालांतराने या उत्सवाला बाजारी रूप येत गेले. सध्या उत्सवाचे सर्व सुशोभीकरण व इतर गोष्टी या बाहेरून विकत किंवा भाडेतत्त्वावर करून घेतल्या जातात. त्यामुळे हा उत्सव कार्यकर्त्यांच्या चंगळवादाचा अड्डा बनत चालला आहे. ध्वनीवर्धकांचा अतिरेक वाढला आहे. 80 डेसिबलच्या पुढे आवाज वाढवल्याने सर्वांना त्याचा त्रास होतो. ‘वाट पाहतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशी अश्‍लील व हिडिस गाणी या ध्वनीवर्धकांवर वाजवली जातात ज्याचा धार्मिक विधीशी व भक्तीभावाशी काहीही संबंध नाही. फक्त झिंगलेल्या कार्यकर्त्यांना विक्षिप्तपणे नाचता यावे यासाठी ही गाणी वाजवली जातात.
गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या काळातील ‘नाईट लाईफ’ हा एक वेगळा चिंतेचा मुद्दा झाला आहे. आईवडिलांना फसवून युवक-युवती गणपती पाहण्याचं कारण देऊन रात्री घराबाहेर पडून अश्‍लील चाळे करताना दिसत आहेत.
बहुतेक गणेशोत्सव मंडळे वीज चोरून वापरत आहेत. गणशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती, दमदाटी केली जाते. वर्गणी देणे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा व इच्छेचा विषय असायला हवा. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडपे उभी केल्यामुळे वाहतुककोंडीची समस्या वाढते. यादरम्यान होणार्‍या गर्दीमुळे प्रशासनावर ताण येतो. यासाठी लागणारी पोलीस यंत्रणा कमी पडते. अशा हुल्लडबाजीवर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन आहे काय?
एकूणच सध्याचे गणेशोत्सवाचे स्वरूप हे विदारक आहे. त्यातील अनिष्ट गोष्टींना विरोध केलाच पाहिजे. हा उत्सव मंगलमय व चांगल्या वातावरणात, कोणाला त्रास न देताच व्हायला हवा. यासाठी अनेक उपाय करता येतील. गणेशोत्सवासाठी शहराबाहेर एक प्रशस्त मोकळी जागा उपलब्ध करून देता येईल; जिथे सर्व मंडळे आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना व आरास करू शकतील. सर्वांना आपल्या कला, देखावे वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येतील. यामुळे त्या आवाजाचा आवाज शहरातील समान्य लोकांना होणार नाही. सर्व गणपती एका ठिकाणी आल्यामुळे लोक त्यांना भेटी देऊ शकतील व एका यात्रेचे स्वरूप त्याला देता येईल. यानंतर प्रवाही नदीत त्या गणपतींचे विसर्जन करता येईल. यामुळे हा उत्सव शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जाऊ शकेल.
सध्याच्या गणेशोत्सवातील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी याचा त्रास होणार्‍या प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अनेक लोकांच्या स्वाक्षरी असणारे निवेदन स्थानिक प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारला दिले पाहिजे. हे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हावे की एक दवाब गट निर्माण होऊ शकेल व काहीतरी कारवाई होईल. जर सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रबोधन केले व एकत्रित रित्या प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी बदल घडू शकेल.
(शब्दांकन : अर्जून नलावडे)

साप्ताहिक 'चपराक', पुणे

Monday, August 29, 2016

रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे

जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा. जगणार्‍याला जसं जीवन तसं चित्रकाराला हवा असतो रसिकांचा उत्कट प्रतिसाद. त्याला साद म्हणून उभा राहतो ’रंगाचा श्रीरंगी अविष्कार’. चित्रकाराच्या शब्दांपेक्षाही त्याची चित्रंच आपल्याशी उत्कट संवाद साधतात. कल्पनेच्या आकाशाचा कॅनव्हास अन् त्यावर रंग उतरलेत देवरुपात..! त्यातूनच जन्म होतो चित्रप्रदर्शनाचा. पंढरपूरमधील कुंचल्याच्या रंगात रंगलेले कलावंत आहेत श्री. भारत अर्जुन गदगे. त्यांचे 'विघ्नहर्ता कला प्रदर्शन'  पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिरात सुरु आहे. त्यानिमित्त श्री. गदगे यांच्या कला साधनेचा उलगडलेला हा जीवनप्रवास...!!

साप्ताहिक 'चपराक',पुणे 

'मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो' या गीतपंक्तीप्रमाणे मनातील विविध कल्पनांना रंग आणि रेषा या माध्यमातून कॅनव्हासवर चितारणारे पंढरीतील एक कलावंत म्हणजे भारत अर्जुन गदगे. या पंढरीचा पांडुरंगही या भक्ताच्या भक्तीरंगात न्हाऊन निघाला आहे. 
''भक्तीत दंग सदा पांडुरंग
रंगे मोरपंखी होऊनी श्रीरंग''
प्रत्येक वारकरी हा जन्मजात 'पंढरपुरी' असतो, तसा प्रत्येक पंढरपुरी हा भावरंगी रंगणारा असतो. अशा भक्ती रंगात रंगून रंगाची उधळण करणारा असा एक जन्मजात 'चित्रकारी' म्हणजे भारत अर्जुन गदगे! पंढरपुरातील एक काळ गाजवलेले, कला, नाट्यक्षेत्रात सहजतेने वावरणारे आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल छोटा गंधर्व यांच्या हस्ते सत्कार झालेले 'अर्जुन पेंटर' हे भारत गदगे यांचे वडील आणि कलेच्या क्षेत्रातील पहिले गुरु.
याच अर्जुनाने त्यांना कलेच्या क्षेत्रातील लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा ते शिकवले आणि मग त्यांच्या या शिष्याने कलेच्या क्षेत्रात चौफेर शिरसंधान करीत आपला एक वेगळा ठसा उमटविला. म्युरल पेंटिंग, पोट्रेट, लॅण्डस्केप, मेटल पेंटिंग, फोटोग्राफी आदी क्षेत्रात ते निपुण बनले. त्यांच्या या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली आणि 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार त्यांना 5 सप्टेंबर 1997 रोजी बहाल करण्यात आला. कल्पनेचा एकेक धागा गुंफून त्यांनी शुभ्र कॅनव्हास वर अनेकरंगी चित्रांची मुक्तहस्ते उधळण केली आणि त्यामुळेच जगण्यासाठी चित्रकला व चित्रकलेसाठी जगणे या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी अपरिहार्याने त्यांना एकत्रितपणे अबाधित ठेवण्यात गदगे यशस्वी झाले आहेत.
लोखंडाला परिसस्पर्श झाला की त्याचे सोने होते. तसंच काहीसे गदगे यांच्या बाबतीत घडलं. 1967 साली 'आग्य्राहून सुटका' या नाटकाची तयारी चालली होती. त्यात आपलाही सहभाग असावा या भावनेतून भारत गदगे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चित्ररूप दिले आणि खरंतर तेव्हापासून कागद, रंग, ब्रश, पेन्सिल यांचे एक भावविश्‍व आकार घेऊ लागले. दहावीनंतर सांगलीच्या कला विश्‍व महाविद्यालयातून ए. डी. टी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात आणि नंतर मुंबईच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जी. डी. (पेंटिंग) ही परीक्षा केंद्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ए. एम. ही कलेच्या क्षेत्रातील सर्वोच परीक्षा ते केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
आकाशात काही काळाने संथ विहरणारा पतंग हा जसा सुरूवातीस अष्ट दिशांना गोता खातो, तशाच काही परिस्थितीच्या गोता खाताना गदगे यांना कला क्षेत्रात स्थिर राहण्यासाठी गुरुतूल्य तिळवे सर, ए. टी. पाटील, श्री. माजगावकर, एम. के. जाधव यांनी सहाय्य केले. आपल्या गावातील एक उत्कृष्ट कलाकार नोकरीच्या निमित्ताने आपले गाव सोडून जाऊ नये यासाठी पंढरपुरातील कै. बापू जोशी, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांना पंढरपुरातच बांधून ठेवायचे ठरवले आणि नगरपालिकेच्या 'लोकमान्य विद्यालयात' कलाशिक्षक म्हणून गदगे नोकरीस लागले.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, चंद्रकांत व सूर्यकांत मांडरे बंधू,चित्रकार एम. एफ. हुसेन, वसंत बापट, प्रतापसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. आजही गदगे यांची चित्रसाधना कायम चालूच असते. स्वातंत्र्याची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याचे दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन भरविले. त्यांच्या 'ईश्‍वरभूती' आणि 'रंगाचा श्रीरंगी आविष्कार' या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून मिळालेल्या पैश्याचा गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोग केला जातो. पंढरपूरचे माजी प्रांताधिकारी ज्योतिबा पाटील यांनी गदगे सरांचे हे कलागुण लक्षात घेऊन 1 मे 1997 रोजी सोलापूर जिल्ह्यातर्फे मुंबईला पाठविण्यात येणार्‍या चित्र रथाच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली. सध्या ते तालुक्यातील होतकरू विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक घरात पोहचलेल्या या कलाकारास साथ मिळाली आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंजुषा गदगे यांची! पंढरपुरतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गदगे यांनी कलाशिक्षिकेचे काम केले आहे परंतु संसाराच्या व्यापामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि कलेची साधना चालूच ठेवली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा फार मोठा वाटा असतो हे सौ. मंजुषा गदगे यांनी सार्थ करून दाखविले आहे. भारत गदगे यांचे दोन्ही बंधूही कलाक्षेत्रात पारंगत आहेत. त्यांचे मोठे बंधू आनंद गदगे हे उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर धाकटे बंधू गणेश गदगे हे वास्तुविशारद आहेत. एकंदरीत भारत गदगे यांचे संपूर्ण कुटुंब चित्रकलेच्या रंगात मनसोक्त रंगलेले आहे.
भारत गदगे यांच्या रंगात रंगलेल्या वाटचालीचे रंग असेच अधिकाधिक खुलत रहावेत हीच शुभेच्छा!!


स्वप्निल रविकांत कुलकर्णी, पंढरपूर प्रतिनिधी

साप्ताहिक 'चपराक',पुणे 
९८३३३७९००५ 


Sunday, August 28, 2016

सरकारकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय : संजय सोनवणी

सीमांचे रक्षण, कायदा व सुव्यवस्था हे सरकारचे मुख्य काम आहे. ते न करता नको त्या कामात सरकार गढले आहे व जनतेच्या पैशांचा अपव्यय करत त्यांची सुरक्षितता धोक्यात आणत आहे असा आरोप स्वर्ण भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सरकारवर केला आहे. त्यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेबाबत सरकारला जाब विचारला आहे. याबाबत त्यांच्याशी ‘चपराक’चे विशेष प्रतिनिधी तुषार उथळे पाटील यांनी साधलेला संवाद.

कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची आणि न्यायव्यवस्था तत्पर आणि सक्षम ठेवण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. सरकार त्यासाठी वेळोवेळी नवनवीन कायदेही करत असते; परंतु देशातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही व न्यायही लवकर मिळत नाही. स्त्री व दलितविरोधी गुन्ह्यात उत्तरोत्तर वाढच होत असल्याची वस्तुस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे पोलीस नेहमीच टीकेचे लक्ष बनलेले असतात. दहशतवादी हल्ल्यात जनतेचे, तुटपुंज्या साधनांनिशी प्रसंगी स्वत:चे जीव गमावून, रक्षण करुनही पोलिसांची प्रतिमा आजही मलीन व प्रश्‍नांकित आहे. न्यायव्यवस्थेबद्दल शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, हे वाक्य तर प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येते; परंतु मुळात अशी अकार्यक्षम व्यवस्था का आहे आणि ती कार्यक्षम करण्यासाठी काय केले पाहिजे याची कसलीही योजना सरकारकडे नाही. अपुरी पोलीस व न्यायाधिशांची संख्या, त्यांना होणार्‍या असंख्य असुविधा याबाबतही बोलले जाते; पण त्यावर कार्यवाही होत नाही. भारतातील एकमेव स्वतंत्रतावादी असलेल्या स्वर्ण भारत पक्षाने या विषयावर आवाज उठवला.

पोलिसांची संख्या वाढवा
भारतात एक लाख लोकसंख्येमागे केवळ 182 मंजूर पोलीस आहेत. युनोच्या मानकानुसार ते किमान लाखामागे 222 एवढे तरी असले पाहिजेत. त्यात भारतात आहे त्या मंजूर  पोलीस संख्येपैकी 23.99% जागा रिक्त आहेत. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण लाखामागे 147 एवढेच आहे. त्यात बंदोबस्त, नेत्यांचे संरक्षण यात पोलीस दलाचा मोठा कालापव्यय होतो. मग गुन्ह्यांचा सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा करण्यासाठी, गुन्हे नियंत्रणात राहण्यासाठी, प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळही उरत नाही की पुरेसा वेळही. पोलीस अनेकदा अनेक गुन्हे नोंदवून घेण्यात टाळाटाळ यामुळेच करतात. याबाबत पोलिसांना दोष देण्यापेक्षा गरज आहे ती पोलिसांची संख्या किमान आंतरराष्ट्रीय मानकाएवढी तरी वाढवण्याची.

पोलिसांना निवारा व आरोग्यसेवा मिळावी

जेवढे आहेत त्या पोलिसांच्या समस्या तर अजून गुंतागुंतीच्या आहेत. त्यांना आवश्यक तेवढी निवासस्थाने आजही उपलब्ध नाहीत. जी निवासस्थाने आहेत त्यांचा दर्जा अत्यंत वाईट आहे. केवळ 27% पोलिसांना आज निवारा मिळतो, बाकींना अन्यत्र सोय करावी लागते. काम जास्त असल्याने कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. पोलीसांवरील मानसिक ताण-तणावांमुळे अनेक पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पोलीस आरोग्य हा ऐरणीवरील विषय आहे परंतु त्यांना (व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला) सरकारतर्फे कसल्याही सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना घोषीत केली होती व विनामूल्य उपचार काही आजारांबाबत कोणत्याही इस्पितळाने करावेत अशी अपेक्षा होती. ही योजना काही काळ चालली पण शासनाने इस्पितळांची बिलेच न भागवल्याने आज ही योजना असून नसल्यात जमा आहे. प्रत्येक पोलिसाला हक्काचा निवारा व आरोग्यसेवा मिळाव्यात. केंद्र सरकारच्या आरोग्यसेवा योजनेप्रमाणे राज्य सरकारनेही तशीच योजना राबवावी  व ही योजना निवृत्तीनंतरही लागू असावी.

पोलीस स्कूल्स आणि अत्याधुनिक साधनांची गरज

पोलिसांच्या मुलांचे शिक्षण हाही कळीचा मुद्दा बनला आहे. सैन्यासाठी जशी देशभर पब्लिक स्कूल्स आहेत तशीच पोलीस स्कूल्स देशभर असली पाहिजेत.
पोलीस दलाला अत्याधुनिक साधने पुरवणे, शिरस्त्राणे व बुलेटप्रुफ जॅकेट्स पुरवणे, पोलीस स्टेशन व चौक्या या काम करण्यायोग्यच बांधणे, पुरेशी वाहने पुरवणे हेसुद्धा अत्यावश्यक असून सरकारने त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वर्ण भारत पक्षाने केली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवायची असेल तर ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना सक्षम व सबळ केले पाहिजे. यासाठी पोलिसांवर राज्य सरकार खर्च करत असलेली रु. 74,258 कोटींची रक्कम किमान रू. 1,50,000 कोटींपर्यंत वाढवावी अशी मागणीही पक्षाने केली आहे.

न्यायव्यवस्थेला न्याय द्या
पोलसांची जशी बिकट अवस्था आहे ती न्यायव्यवस्थेलाही चुकलेली नाही. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ तेरा न्यायाधीशच आहेत, जे प्रत्यक्षात किमान 36 तरी असायला हवेत. त्यात आहे त्या जागातही रिक्त असलेल्या जागांचे प्रमाण मोठे आहे. सर्वोच्च न्यायालयात 6, उच्च न्यायालयात 446 तर खालच्या कोर्टात 4600 न्यायाधिशांच्या जागा आजही रिक्त आहेत. भारतात उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले 43 लाख खटले आहेत. खालच्या कोर्टातील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण कोटीत जाते. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकुर यांनी तर सरकार न्यायव्यवस्था संपवायला निघाले काय? असा संतप्त प्रश्‍न विचारला. अश्रू ढाळून अथवा संतप्त होऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. न्यायाधीशांची संख्या दर दहा लाखांमागील तेरावरून पन्नासपर्यंत तत्काळ वाढवली पाहिजे.

मुलभूत सुविधांपासून न्यायव्यवस्था वंचित
जनता सरकारवर कायदा, सुव्यवस्था आणि न्यायासाठी अवलंबून असते. केंद्रीय बजेटमध्ये न्यायसंस्थेसाठी एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या केवळ 0.02% एवढाच वाटा येतो. प्रगत जो  प्रत्यक्षात 0.20% एवढा असला पाहिजे. यात न्यायाधीशांची संख्या योग्य प्रमाणात वाढवणे एवढेच अभिप्रेत नाही. आपली न्यायालये, अगदी सत्र न्यायालयेही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. असंख्य न्यायालयीन इमारती व कोर्टरुमची अवस्था चिंतनीय तर आहेच, पण साध्या पिण्याच्या पाण्याची अथवा शौचालयांची उपलब्धताच नाही. खालच्या कोर्टात तर काही न्यायाधीशांना गोडाऊन किंवा कोंदट रेकॉर्डरुममध्ये बसून सुनावण्या घ्याव्या लागतात. पक्षकार व आरोपींच्या किमान सुविधांबद्दल तर काही बोलावे अशी स्थिती नाही. कोर्ट ही न्यायाची जागा न वाटता एक पोलीस कोठडी वाटते असा सर्व पक्षकारांचा अनुभव आहे. उच्च दर्जाची, सुविधांनी परिपूर्ण अशी न्यायालये व न्यायाधीशांच्या चेंबर्स असल्याच पाहिजेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी न्यायव्यवस्थेला दिलेले बजेट किमान दहा पट वाढवलेच पाहिजे.

हे पैसे आणायचे कोठून?
सरकार आजवर हेच उत्तर देत आले आहे की हे करण्यासाठी आवश्यक पैसा सरकारच्या तिजोरीत नाही. हे उत्तर भ्रम उत्पन्न करणारे आहे. सरकारचे काम मुळात उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, खाणी किंवा हॉटेल चालवणे आहे काय? तरीही भारत सरकार हा उद्योग आजवर करत आले आहे व बदल्यात महाप्रचंड तोटा दरवर्षी सहन करते आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर भारतात बँक आणि विमा क्षेत्र वगळता 298 केंद्र सरकारी उद्योग कंपन्या आहेत. यातील सरकारी भांडवल दोन लाख तेरा हजार कोटी रुपये असून एकूण गुंतवणूक 10 लाख 96 हजार कोटींची आहे. आज त्या काही नफ्यातील कंपन्या सोडल्या तर दरवर्षी हजारो कोटींचा तोटा घोषीत करत आल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार यातील 77 कंपन्यांचा 2014-15 सालचा तोटाच रू. 27,360 कोटींचा आहे. या उद्योगांना तगवण्यासाठीचा खर्च जो होतो तो कितीतरी अधिक पटीत होतो. या कंपन्यांत निर्गुंतवणूक करण्याच्या फक्त चर्चा होतात पण हितसंबंधियांमुळे ते होत नाही. आज सरकारी उद्योग जे करणे सरकारकडून मुळात अभिप्रेत नाही तिकडे सरकारी (म्हणजे जनतेची) संपत्ती उधळली जात आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची मुख्य जबाबदारी असून तिकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. सरकारने तत्काळ सर्वच उद्योगातून बाहेर पडावे व सरकारच्या कायदा व सुव्यवस्था या मुख्य उद्दिष्टांकडेच लक्ष पुरवत छोटे व मजबूत सरकार कसे बनेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच घोषणेप्रमाणे पहावे असेही मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात
सरकारचे काम उद्योग-व्यापार करणे नसून जनतेच्या हिताची, स्वातंत्र्याची रक्षा करणे आहे. नको त्या कामातून मुक्त होत सरकारने महत्त्वाच्या कामात लक्ष केंद्रीत करावे. सरकारने असे दुर्लक्ष आजवर केल्यानेच आज गुन्हेगारीचा दर वाढतच चालला असून सामाजिक स्वास्थही धोक्यात येत आहे. नवनवे कायदे आणल्यानेही गुन्ह्यांवर कसलाही प्रतिबंध लागलेला नाही की वचक बसलेला नाही. त्यामुळे तत्काळ पोलीस व न्यायव्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ वाढवून सामान्य जनतेला स्वातंत्र्यात जगण्याची हमी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
26 सप्टेंबरपर्यंत या बाबतीत प्रधानमंत्री व संबंधित मंत्र्यांनी पाळली जाईल अशी घोषणा न केल्यास 2 ऑक्टोबरपासून स्वर्ण भारत पार्टी आंदोलन करेल.

Thursday, August 25, 2016

पर्यावरणाचा सुभेदार बाबूराव पेठकर


मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

 शेती हा आतबट्याचा व्यवहार असल्याची मानसिकता बळावत असताना. त्याच दरम्यान एका युवा मनाच्या ज्येष्ठाने तरूण शेतकर्‍यांना लाजवेल असा प्रयोग आपल्या शेतात केलाय. सुभेदार बाबूराव पेठकर असं या पर्यावरण ऋषीचं नाव आहे. पर्यावरणावर, पाण्याच्या बचतीवर बोलणारे अनेक आहेत; मात्र  कृतीतून पर्यावरण जगणारे तसे नगण्यच. त्या नगण्यांपैकीच एक म्हणजे बाबूराव पेठकर. वयाची 27 वर्षे सैन्य दलाच्या आरोग्य विभागात कार्य केल्यानंतर त्यांनी सोलापूरात आपले बस्तान बसवले. त्यांच्या सैन्य दलातील सेवेच्या भरतीलाही देशसेवेचीच झालर होती. कारण 1962 साली झालेल्या चीन सोबतच्या युद्धावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तरूणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. लातूर येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारे बाबूराव पेठकर वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले. उत्कट देशप्रेमामुळेच त्यांनी सैन्यात प्रवेश केला.
सैन्यदलात असताना बाबूराव यांची नेमणूक आरोग्य विभागात झाली. त्यामुळे 1962, 1965 साली झालेल्या युद्धात त्यांनी युद्धभूमिवरील जखमी जवानांवर उपचार केले. 1965 च्या युद्धात त्यांनी अमेरिकन बनावटीचे मोबाईल हॉस्पिटलही हाताळले. युद्धभूमिवर त्यांनी तीन आठवड्यात जवळपास एक हजार सैन्यांवर उपचार केले. त्याच दरम्यान युद्धात सैनिकांसोबतच झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांच्या नजरेस आलं. कोणतीही चूक केलेली नसताना केवळ दोन देशातील वादामुळे निष्पाप झाडे, फुले, फळे हकनाक बळी जातात. त्यामुळे झाडांविषयी त्यांना अतीव जिव्हाळा निर्माण झाला. वृक्षप्रेमाची खरी बीजे त्याच ठिकाणी रूजली. दिल्ली, बंगळुरू, पुणे, सिक्कीम आदी ठिकाणी संशोधनाच्या कामी त्यांनी सेवा केली. याशिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संशोधन टीममध्येही त्यांनी काम केलं. पुढे 27 वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोलापूरकडे आपला मोर्चा वळवला. 
सैन्य दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल 1980 साली तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुभेदार पेठकर यांची राजपत्रित अधिकारी म्हणून बढती केली. याशिवाय भारत सरकार तर्फे त्यांना चरितार्थासाठी तीन एकर जमीन आणि राहण्यासाठी एक जमिनीचा तुकडा देण्यात आला. त्यांना नोकरीदेखील मिळण्याची संधी आली होती; मात्र त्यांनी ती नाकारली. सरकारने दिलेल्या जमिनीचा विनियोग आणि शेतीत काही वेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केवळ निर्णय घेऊन ते शांत बसले नाहीत तर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. 
सोलापूरच्या कंबर अर्थात छत्रपती संभाजी तलावाच्या पाठीमागेच पेठकर यांची सरकारने दिलेली तीन एकर शेती आहे. पंधरा वर्षापूर्वी ही जमीन म्हणजे खडकाळ रान होते. कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वा झाडी त्याठिकाणी नव्हती; मात्र आपल्या देशसेवेनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात बाबूराव पेठकर यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. खडकाळ रानावर शेती आणि जंगल उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पर्यावरण ठीक असेल तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे. पर्यावरण उत्तम असेल तरच देशातच नव्हे तर जगात शांतता, सुव्यवस्था नांदू शकते. त्यामुळे या शतकातली पर्यावरणाची समस्या लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणाच्या अभ्यासास सुरूवात केली. सीमेवर केलेल्या सेवेनंतर ते पर्यावरण सैनिक म्हणून काम करू लागले. त्यासाठी त्यांनी राज्यातील 27 जिल्ह्यात दौरा केला. दरम्यानच्या काळात त्यांनी वृक्षांची लागवड सुरू केली. त्यांचे संवर्धन, विस्ताराचे कार्य केले. त्याचबरोबर त्याचा प्रचार-प्रसारही सुरूच ठेवला. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीला लागूनच असलेल्या राज्य शासनाची सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही त्यांनी शिवार फुलवायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानाचे राजदूत म्हणून नेमले. त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानासाठी जवळपास ऐंशीहून अधिक देणगीदार मिळवून दिले.

महाराष्ट्राच्या पर्यावरणीय संकटावर उत्तरे...
पर्यावरण रक्षण हा कृती करण्याचा विषय आहे. त्यामुळे कागदोपत्री घोडं नाचवल्याने ते साध्य होणार नाही. म्हणून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी विविध उत्तरे शोधली आहेत.

जलपुनर्भरण....
यामध्ये पाण्याचे संकट मिटविण्यासाठी विहिर पुनर्भरण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यात त्यांनी जलस्त्रोत शुद्धिकरण आणि जलस्त्रोत बळकटीकरण असे दोन भाग केले. शिवसेना-भाजप युती सरकारने राबविलेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आज सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाली; मात्र पेठकर यांनी आठ-दहा वर्षापूर्वीच जलयुक्त शिवारचा प्रयोग यशस्वी केला आहे. उतारावरून पळणारे पाणी त्यांनी रांंगते केले तर रांगते पाणी थांबते करून पाण्याचा योग्य वापर व नियोजन करून शेती हिरवीगार केली. विशेष म्हणजे पेठकर यांच्या शेतीच्या बाजूलाच बारमाही पाण्याने भरलेला छत्रपती संभाजी तलाव आहे. तरीही अद्याप त्यांनी एकदाही तलावातील पाण्याचा थेंबही शेतीसाठी वापरला नाही. शेतात व आजूबाजूला पडलेल्या पावसाचे पाणी आपल्या शेतीकडे वळवून त्यांनी आपल्या खडकाळ रानावर नंदनवन फुलवले. त्यांच्या या प्रयोगाने अनेक छोट्या शेतकर्‍यांना हा प्रयोग उपयुक्त ठरला आहे.
याबाबत सुभेदार बाबूराव पेठकर सांगतात की, शेतकर्‍यांनी आपल्याकडे जमीन किती आहे याचा विचार न करता, आहे त्याच जमिनीत सोने पिकविण्याची हिंमत ठेवली पाहिजे. पावसाचे पाणी साठवून जिरायती शेती बागायती करण्यावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान शासनाने आता सुरू केले असले तरी, आपण हा प्रयोग स्वकल्पनेतून यापूर्वीच सुरू केला आहे. त्यामुळे मी पाण्यासाठी कधीही अवलंबून राहिलो नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही आमच्या विहिरीला 16 ते 17 फूट पाणीसाठा होता.

वनभिंतीचा शोध...
आपल्या महाराष्ट्रात प्रदूषण उद्भवाची जवळपास पस्तीस केंद्रे आहेत. त्यात विटभट्टी, पेट्रोल पंप, स्टोन क्रशर, स्मशान भूमी, साखर कारखाना, इतर उद्योग आदी. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी पेठकर यांनी वनभिंतीचा शोध लावला. वनभिंत संकल्पना म्हणजे झाडांची भिंत. यात तीन प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. यात झुडूपवजा झाडाची पहिली रांग, मध्यम उंचीच्या झाडांची दुसरी रांग आणि सर्वात उंच वाढणार्‍या प्रजातीची तिसरी रांग. ती घनदाट असते. अशी वनभिंत त्यांनी आपल्या शेतात तयार केली आहे. समाजानेही हे प्रयोग आपल्या भागात करायला हवेत अशी त्यांची अपेक्षा आहे.
सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समुहाने हा प्रयोग स्वीकारला आहे. लोकमंगल साखर कारखान्याने आपल्या फळी साठवण केंद्राच्या बाजून अशी वनभिंत उभारली आहे. त्यामुळे वायूप्रदुषणास रोख लागणार आहे. शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी अशा भिंती उभारणे गरजेचे आहे. सध्या जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यावर ही वनभिंत म्हणजे चपखल उत्तर आहे. भारतीय नेत्यांनी अनेकवेळा जागतिक परिषदेत अशी ग्वाही दिलीय की, आम्ही कार्बनचे प्रमाण वाढू देणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावू; मात्र ते भारतीय नागरिकांच्या जीवावर सांगितले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकांच्या मनात वृक्ष लागवड करण्याचा विचार येतो; मात्र त्यांना रोपे किंवा ते वाढविण्याची माहिती नसते. ते होऊ नये यासाठी त्याचाच एक भाग म्हणून पेठकर यांनी रोपवाटिकाही तयार केली आहे.

पाण्याचे संकलन...

आपल्याकडेे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र ते पाणी असेच वाहून जाते. ते पाणी वाया जावू नये म्हणून पेठकर यांनी बारा वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक वाचल्यानंतर पाण्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी स्वतः बाबूराव पेठकर यांच्या शेताला भेट दिली. तेथील विविध प्रयोग त्यांनी पाहिले. रेनवॉटर हार्वेस्टींगची कामेदेखील त्यांनी पाहिली. विशेष म्हणजे ही कामे त्यांनी मोफत करून दिलेली आहेत. सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विवेकानंद केंद्र आदी इमारतीत त्यांनी ही कामे करून दिली आहेत.

सेंद्रीय रांगोळीचा शोध....

भारतीय संस्कृतीतील एक दैनंदिन कार्य म्हणजे रांगोळी काढणे. मात्र त्यामुळे जमिनीत रासायनिक रंग जाऊ लागलेत. ते प्रमाण कमी असले तरी त्याचा परिणाम जमिनीवर होतोच. त्यावर पर्याय म्हणून मग सेंद्रीय रांगोळीची कल्पना मला सुचली. आसपासची झाडाची पानगळ सुरू असते. त्याच्या पानांचा रंग विविध प्रकारचा असतो. ती पाने वाळवून त्याची भुकटी केली की रांगोळी तयार होते. यासोबत कोळसा पावडर, लाकडाचा भुस्सा, आपली रांगोळी किंचित प्रमाणात वापरायची. याशिवाय सूर्यफुल, गव्हाचे गोंडर, कूस असे शंभर प्रकारच्या वस्तूंचा उपयोग त्यात करता येतो. त्याबाबतचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. समाजात ते माहिती होण्यासाठी सेंद्रीय रांगोळी बनविण्याची स्पर्धा देखील त्यांनी घेतली.
प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी दुसरी हरितक्रांती घोषीत केली आहे; मात्र तिला केवळ हरितक्रांती न म्हणता दुसरी पर्यावरणीय हरितक्रांती घोषीत करायला हवी होती. कारण हरितक्रांतीमध्ये पुन्हा लोक युरिया आणि तत्सम रासायनिक पदार्थांचा वापर करतील. मग ती हरितक्रांती होईल का? पेठकर यांची ही संकल्पना ऐकून डॉ. स्वामीनाथन अतिशय प्रभावित झाले. 

खंत वाटते...

पर्यावरणाच्या र्‍हासाबाबत खंत व्यक्त करताना बाबूराव पेठकर म्हणतात, पर्यावरणाबाबत आपल्या समाजात अनास्था आहे. मुळात ती शालेय स्तरावरूनच दिसून येते. जे समाज घडवतात त्या शिक्षकांनाही याचे भान नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना याचे शिक्षण देणे गरजेेचे आहे. पर्यावरणाला मूलभूत शिक्षणाचा दर्जा द्यायला हवा. त्यामुळे काही प्रमाणात त्याबाबत सजगता येईल. मुळात भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे; मात्र आपण पंचमहाभूतांना महत्त्व न दिल्याने ही पश्‍चातापाची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्या मते प्रत्येकाला तीन माता असतात. त्यापैकी एक जीवनदाती माता, दुसरी भूमाता आणि तिसरी गोमाता. यातील जीवनदाती मातेखेरीज दोन मातांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
सुभेदार पेठकर यांनी त्यांच्यापरीने पर्यावरणाचे काही सिद्धांत मांडले आहेत.
1)     किमान गरजेवर आधारित जीवनपद्घती
2)     जीव जीवश्य जीवनम्
3)     रसायन निर्मिती आणि त्याचा वापर मर्यादित
4)     ऊर्जा निर्मिती आणि त्याचा मर्यादित वापर
सुभेदार बाबूराव पेठकर यांनी फुलवलेल्या शेतीत आज जैवविविधता आहे. त्यांच्या शेतात मोर, ससे, साप, फुलपाखरे, मुंगूस, सरडा, विविध परदेशी पक्षी आदींचा वावर असतो. विशेष म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. विहिरीत अनेक प्रकारचे मासे, कासव, साप आदींचा वावर असतो. पेठकर यांच्या शेतात जल आणि पक्षीतीर्थ आहे.  म्हणजेच, मळ्यामध्ये कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याने भरलेली विहीर असून त्याला जलमंदिर असे नामकरण केले. परिसर वृक्षांनी व्यापून गेला असल्यामुळे वृक्षमंदिर तर मळ्यामध्ये पक्षांचा सतत किलबिलाट असल्याने त्याचे पक्षीतीर्थ असे नामकरण त्यांनी केले आहे.
भविष्यात सरकार आणि समाजाने वनमहोत्सव कृतिशीलपणे साजरा केला जावा. शहरी वनीकरण करणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये आदींनी किमान एक तृतीयांश जमिनीवर वनीकरण करावे. केवळ शेतकर्‍यानेच झाडे लावावीत असा काही नियम नाही. कारण ऑक्सीजन सर्वांनाच हवा आहे. बायोडायव्हर्सिटी, कृषी पर्यटन आदी जास्तीत जास्त निर्माण व्हावेत. याशिवाय वनयुक्तशिवार उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजात पर्यावरणाचे तीर्थक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. 


सुभेदार बाबूराव पेठकर यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार
*   1980 साली सैन्यातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र देऊन नायब सुभेदार पद.

*    1997 साली वृक्ष लागवड प्रचार-प्रसार कार्याकरिता महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनश्री पुरस्कार.
*   1999 साली भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार.
*   2000 साली प्रदुषण विरोधी कार्यासाठी शौर्य पुरस्कार.
*   महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण मंत्रालय विभागाचा विशेष गौरव पुरस्कार.
*    किसान शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार.
*   2011 साली दूरदर्शन वाहिनीचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार.

पर्यावरण पूरक संशोधन प्रकल्प सादर
*   छतावरच्या पाण्याचे संकलन
*   महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी संकलन
*   सेंद्रीय रांगोळी


सागर सुरवसे
आयबीएन लोकमत, सोलापूर
मो. 97691 79823


मासिक 'साहित्य चपराक', पुणे

Tuesday, August 23, 2016

टेन्शन कायको लेनेका...

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

आज एक मित्र भेटला, तसा तो नेहमीच भेटतो पण आज खुपच उदास वाटला! नक्कीच काहीतरी बिनसलं असणार याचं... कसल्यातरी तणावात दिसत होता. नेहमीसारखा उत्साहाने बोलत नव्हता अन् आपण काही बोललोच तर लक्षही देत नव्हता! आता याला बोलतं करावंच असं ठरवून त्याला व्हाटस् ऍपवरचे काही जोक्स ऐकवले आणि आम्ही दोघंही मनमुराद हसलो! मग त्याला हळूच प्रश्न केला ‘‘काय आज वहिनीशी भांडून आलास की काय?’’
तेव्हा मात्र तो अचानक गंभीर झाला व म्हणाला, ‘‘तिच्याशी मी आता भांडू शकणार नाही, आता ती हेडमास्तरीणबाई बनणार आहे! मग तिला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळणार!’’‘‘

‘‘अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे, तू खुश व्हायचं सोडून असा रुसुबाईसारखा का दिसतोस रे ?’’
‘‘हेच ते, तुला काही कळत नाही!’’
‘‘अरे ह्या नोकरी करणार्‍या बायकांचं तुला काही कळणार नाही. आता माझ्याच बायकोचं बघ, तिला जास्त पगार मिळायला लागेल ना मग मला विचारणारसुद्धा नाही, याचंच जाम टेंशन आलंय यार मला!’’
आता याला काय म्हणावं! टेंशन घ्यायला कधी कुणाला कुठल्या प्रकारचं कारण लागेल सांगता येत नाही. कुणाला परीक्षेचं टेंशन तर कुणाला नोकरी कधी मिळणार याचं टेंशन, कुणाला नोकरी मिळाल्यानंतर ती कशी टिकवायची याचं टेंशन! कुणाला घरचं बायकोचं टेंशन तर कुणाला ऑफिसमधल्या साहेबाचं टेंशन! (कारण सरळसाधं आहे. घरी जायला उशीर झाला तर बायको ओरडणार अन् ऑफिसमधून लवकर निघावं तर खडूस साहेब ओरडणार!!)
बरं हा टेंशनचा जो प्रकार आहे ना तो मोठ्यांनाच लागू असतो अशातला भाग नाही. अगदी बालवाडीत किंवा नर्सरीला शिकणारी चिमुकली मुलंही म्हणतात, ‘‘मम्मी मला ह्या होमवर्कचं भारी टेंशन आलंय! तुच करून दे माझं होमवर्क...’’ म्हणजे मग चिमुकलीच्या मम्मीला परत टेंशन आहेच! एकमात्र खरं आहे ज्यांना जास्त कटकटींचा सामना करावा लागतो किंवा ज्यांच्यामागे जास्त व्याप असतात त्यांना जास्त टेंशन असायला हवं! पण प्रत्यक्षात आपण बघतो अशा व्यक्ती नेहमीच तणावमुक्त, हसतमुख दिसतात याचं नेमकं काय कारण असावं?
टेंशन यायला किंवा तणावग्रस्त व्हायला अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असणे तसेच कुठल्याही गोष्टींचा नकारात्मक विचार करणे! इतरही बरीचशी कारणे असू शकतात जसे -स्वतःची दुसर्‍याशी तुलना करणे, लवकर निराश होणे, अकारण भीती वाटणे... इत्यादी.
हे सर्व टाळण्याचे काही उपाय आहेत पण मनुष्य स्वभावानुसार सहसा सर्वसामान्य लोक तिकडे दुर्लक्षच करतात! एक उपाय म्हणजे सुसंगत! आता हे सांगायला खूपच सोपे आहे की, बाबा रे चांगल्या मुलांची संगत धर, असं वागू नको, तसं करु नकोस. मात्र म्हणतात ना... वाईट सवयी लवकर जडतात, पण सुसंगतीसाठी आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. आजकाल व्यसनी लोकांना मित्र शोधावे लागत नाहीत, दारु पिणार्‍याला त्याचे जोडीदार पटकन मिळतात तसेच दुकानही लवकर सापडते (अर्थातच दारूचे)! तंबाखू, गुटखा खाणार्‍यांची सुध्दा तीच तर्‍हा! दुर्दैवानं आपल्या समाजात आज सज्जन माणसं शोधावी लागतात. चांगल्या लोकांच्या संगतीने निश्चितच चांगल्या सवयी जडतील आणि त्यामुळे सकारात्मक विचारसरणी अवलंबण्यास नक्कीच मदत होणार; पर्यायाने आपसुकच तणाव मुक्त होण्यास वेळ लागणार नाही!
‘‘दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है’’ हे गाणं बहुतेकांनी ऐकलं असणारच! जगात मलाच खूप दुःख आहेत, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही अशाप्रकारे आपलीच कॅसेट वाजवणारे कमी नाहीत. खरंतर असे लोक खूप असमाधानी असतात, इतरांचं सुख बघून हे दुःखी होतात! मग तेच त्यांच्या टेंशनचं कारण बनते!
अशावेळी उपरोक्त गाणं आठवलं की अशाप्रकारचं टेंशन बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. काही लोकांना रग्गड पैसा जमवण्याचा हव्यास असतो. त्यासाठी मग कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते! त्यात जर अपयश आले तर मग हे लोक लगेच निराश होतात आणि तणावाने पछाडतात! अशाप्रकारची माणसं जास्त पैसा मिळाला तरीही टेंशनमध्येच असतात. अशावेळी जास्त हव्यास न धरता  ’आपल्या गरजेपुरता पैसा कमावला तरी पुरे’ ही मानसिकता अंगी बाणली तर बर्‍याच अंशी टेंशन कमी होऊ शकते यात शंका नाही!
काहींना झोप येत नाही याचं तर विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही याचं टेंशन येतं. घरी असलेल्या पालकांना शाळेत गेलेली आपली मुलं कधी सुखरूप परतणार याचं टेंशन येतंय! म्हणजेच काय प्रत्येकाला तणावाला सामोरं जावंच लागतं. अशा तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे नियमितपणे योगासने व प्राणायाम करणे! यासाठी ना पैसे पडतात ना कुठल्याही प्रकारचं इंधन लागतं!
चला तर मग करुया सुरुवात आजपासून अगदी आत्तापासूनच!
एकदुसरेको सिर्फ खुशहाली देनेका!
अरे भाई टेन्शन कायको लेनेका!!

- विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

९९२३७९७७२५ 

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
ऑगस्ट २०१६

Saturday, August 13, 2016

चेतना पेटवणारी धर्मशाळा

काव्य जीवनात आहे
जरा जवळून बघा
वाफ पाण्यामध्ये आहे
पाणी उकळून बघा

असं सांगणार्‍या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या ‘धर्मशाळे’चे संपादन दस्तुरखुद्द व. पु. काळे यांनी केले आहे. वपुंचा आणि मभांचा याराना अनेकांना सुपरिचित आहे. व. पु. प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वांना ठाऊक आहेत; मात्र ते उत्तम कवीही होते हे थोडक्या लोकांना माहीत असावे. त्यांचा ‘नको जन्म देऊस आई’ हा छोटेखानी काव्यसंग्रह मभांनीच त्यांच्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित केला आहे. लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर यांच्यात जे आणि जसं नातं होतं तसंच या जोडगोळीचं. या कलंदर कलाकारांचे माय मराठीवर ऋण आहेत.
तर मभांच्या या ‘धर्मशाळे’चे 336 प्रवासी आहेत, जीवनाचे सारे रंग त्यात आलेत. प्रत्येक कविता चार ओळींची. म्हटलं तर स्वतंत्र; म्हटलं तर अखंड. सगळ्या रचना अष्टाक्षरी. जीवनावर भाष्य करणार्‍या, नाना पैलू उलघडून दाखविणार्‍या, भविष्य वर्तविणार्‍या ओळी. या ‘धर्मशाळे’त जो कोणी विसावेल तो तिथलाच प्रवासी बनेल. नेकीने जगणार्‍या, जगू पाहणार्‍या प्रत्येकाला वाटेल की, आपल्या आयुष्याचा अर्कच मभांनी या पुस्तकात काढून दिलाय.
कधीतरी जन्मा आलो
कुण्या गावात वाढलो...?
माझ्या जीवनाची गाथा
मीच लिहाया बैसलो...!

अशी ‘धर्मशाळे’ची दमदार सुरूवात मभांनी केली आहे. मात्र लगेचच ते म्हणतात,
 तसे सांगण्यासारखे
आहे कुठे माझ्यापाशी?
माझ्या स्वत:च्या गावात
मीच आहे वनवासी!

‘हे विश्‍वची माझे घर’ अशी भावना बाळगणार्‍या मभांनी ‘धर्मशाळे’तून लाखमोलाची शिकवण दिली आहे. त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध असल्याने या सर्व ओळी त्यांच्या ह्रदयातून आल्यात. म्हणूनच वाचणार्‍याला त्या आपल्याशा वाटतात. महाकवीची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय! मग म. भा. तरी त्याला अपवाद कसे ठरतील? या महाकवीच्या जीवनाचा आलेख बघितला तर पुन्हा लोककवी मनमोहन आठवतात. ते म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने चालत असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ मभांच्या बाबतीतही तसेच आहे. कविता जगणार्‍या या कवीला मात्र त्याची फिकिर नाही.
 माझी स्वत:ची बायको
मला नवरा मानेना
तरी वडाच्या झाडाला
फेर्‍या घालणे सोडेना...

अशी आजूबाजूची विसंगती म. भा. नेमकेपणे मांडतात.
माझ्या सग्यासोयर्‍यांची
काय सांगू नवलाई
माझ्या आजारपणाची
त्यांनी वाटली मिठाई

असे सांगून म. भा. लिहितात,
माझ्या सग्यासोयर्‍यांनी
काही कमी नाही केले
माझ्या दहाव्याआधीच
गाव जेवण घातले!

अशा सोयर्‍यांविषयीच्या या ओळी पहा-
माझ्या कातड्याचे जोडे
त्यांच्या पायी मी घातले
तरी बोलतात साले
‘नाही कातडे चांगले...!’

‘धर्मशाळे’तल्या कोणत्याही चार ओळी घेतल्या तरी त्या आपल्याला आपल्या आयुष्याची गाथाच वाटतील. प्रेमापेक्षा श्रमाला किंमत मिळावी असा आग्रह धरणार्‍या मभांना भुकेची जाणीव आहे. त्यांच्या कष्टमय आयुष्याचा ते कधी बागुलबुवा करीत नाहीत; मात्र ‘धर्मशाळे’तून जणू मभांचे चरित्रच वाचकांसमोर आले आहे.
पोटामध्ये भूक माझ्या
मात्र ओठात कविता
पाण्याशिवाय वाहते
माझी जीवन सरिता

असे ते म्हणतात. भुकेचे भयंकर वास्तव त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पुढच्या ओळी त्याची साक्ष पटवून देतील.
भूक तुलाही छळते
भूक मलाही छळते
भूक विश्‍वमित्रालाही
कुत्रे खायला घालते
 
भूक माय ममतेचे
पाश तोडून टाकते
भूक पोटच्या पोरीला
बाजारात बसवते

भूक लहानथोरांना
देशोधडीला लावते
गरिबाच्या घरातला
भूक दिवा विझवते

आजूबाजूचे वास्तव मभांनी इतक्या नेमकेपणे टिपलेय की त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे यात त्यांनी भाषेचे कसलेही अवडंबर माजविले नाही.
त्याची आणि तिची सुद्धा
नाही ओळख पटली
जरी दोघांनी जिंदगी
एका घरात काढली

या ओळीतून त्यांनी ‘घरघरची कहाणी’ मांडली ती शंभर पानांच्या पुस्तकातून तरी मांडणे शक्य आहे का?
मभांच्या कविता तरूणाईत कायम आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. विविध महाविद्यालयातून होणारे त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम अफाट तरूणाईप्रिय आहेत. 

ज्यांना कुणीच नाहीत
मुलेबाळेही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
फक्त झाडे लावावीत

स्त्रियांचा सन्मान हे तर मभांच्या जीवनाचे मूलतत्त्वच आहे.
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा

‘धर्मशाळा’ वाचणार्‍याला फक्त मभांच्या कवितांची भुरळच पडत नाही तर ते कवितांवर प्रेम करू लागतात. कवितेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा लोककवी आहे.
कुणाच्याही संसारात
कुणी आणू नये बाधा
कुणाची जाऊ नये
कुण्या कृष्णाकडे राधा

अशी रास्त अपेक्षा त्यांची कविता व्यक्त करते. अनेकांना बागेतल्या फुलाचे महत्त्व कळतच नाही. प्रत्येक व्यक्तित, प्रत्येक कामात दोषच दिसतात. अशांना मभांनी चपराक दिलीय. ते म्हणतात,
काही लोक असतात
चालताना भुंकणारे
बागेतल्या फुलांवरी
जाताजाता थुंकणारे

एकीकडे ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करताना दुसरीकडे खुद्द भगवंतालाच त्यांनी सवाल केलाय,
जेव्हा रावणाने तुझी
होती पळविली सीता
का रे नाही भगवंता
तेव्हा सांगितली गीता

एकंदरीत म. भा. चव्हाण हे आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे, वंचित उपेक्षितांच्या वेदना प्रभावी शैलीत मांडणारे लोककवी आहेत. त्यांनी पेटवलेला कवितेचा दिवा भविष्यात समाजातील अंधार दूर करीत राहील हे मात्र नक्की!
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन, पुणे (9922172976)
पाने - 112, किंमत - 60

-घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२ 

Thursday, August 11, 2016

स्मार्ट जीवनशैलीचे स्मार्ट संतुलन

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६ 

स्मार्ट या शब्दाने नवीन पिढीवर अक्षरश: गारुड केले आहे. ‘आपली प्रत्येक गोष्ट स्मार्ट असली पाहिजे आणि प्रत्येक स्मार्ट गोष्ट आपल्याजवळ असली पाहिजे’ असा अट्टाहास सध्या सुरु आहे; मात्र त्यातून आपण पूर्णत: स्मार्ट होतो का, हे तपासून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने आजच्या प्रत्येक व्यक्तिच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आक्रमण केले आहे. त्याचा प्रभाव इतका खोलवर आहे की त्यापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. एकंदरीत सगळ्या जीवनशैलीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे आणि तंत्रज्ञानाशिवाय जगणे आजच्या पिढीला शक्य नाही. मी सतत सगळ्यांच्या पुढे राहिलो पाहिजे, सगळ्यांमध्ये प्रथम, सगळ्यांच्या आधी,  सगळ्यांमध्ये श्रेष्ठ, सगळ्यांमध्ये उच्च आणि सगळ्यांमध्ये स्मार्ट! अशी ही लढाई प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये सुरु आहे. सर्वात उत्तम मोबाईल हँडसेट हवा, सर्वात उत्तम संगणक हवा, सर्वात वेगवान पळणारे इंटरनेट हवे, सर्व प्रकारची आधुनिक गॅझेटस माझ्याकडे हवीत असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी त्याचा आटापिटा सुरु असतो. त्यातून तुलना येते. त्यातून मग मानसिक आणि भावनिक आंदोलने सुरु होतात. ईर्षा, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा यांचे रुपांतर असूया, मत्सर, अहंकार, निराशा आणि हतबलता अशा भावनांमध्ये देखील होऊ लागते. त्याचे दृश्य परिणाम अनेकदा आत्महत्या, बलात्कार, हिंसक हल्ले अशा भयावह प्रकारे दिसून येतात.
आजचे जीवन स्पर्धेचे आहे, असे बाळकडू अगदी लहान वयापासूनच दिले जाते. त्यासाठी सतत तयारी करुन घेतली जाते. आजचे संपूर्ण जीवन अर्थप्रधान झाले आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कृती पैशाशी संबंधीत आहे असेच ठसविले जाते. मानवी जीवनमूल्ये, नैतिकता, परस्पर संवाद, कौटुंबिक सामंजस्य, सामाजिक बांधिलकी इ. विचार कालबाह्य करण्यात आले असून आर्थिक विचार आपल्या जीवनशैलीवर पूर्णपणे स्वार झालेले आहेत. त्यामुळे यंत्राप्रमाणे माणसे जीवनाशी लढताना दिसतात, तेव्हा हसावे की रडावे ते कळत नाही. स्मार्ट असणे काळाची गरज आहे. स्मार्ट राहणे म्हणजे पाप नाही. स्मार्ट असण्याचे फायदेही भरपूर आहेत. स्मार्टनेस याचा अर्थ आपल्याकडील उपलब्ध साधनांचा उपयुक्त वापर. यामध्ये जी संसाधने नसतील ती मिळवणे आणि जी संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा प्रभावी वापर करणे हे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तंत्रज्ञान आणि गॅझटेस कितीही आधुनिक आणि वेगवान असली तरी ती वापरणारी व्यक्ती हुशार आणि कार्यक्षम नसली तर अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. आज आपण पाहतो की कितीतरी साधनांचा आपण पुरेपूर वापरच करीत नाही. प्रत्येक मोबाईल हँडसेटमध्ये जितक्या सुविधा दिल्या असतात त्यापैकी 50% हून अधिक सुविधा वापरल्याच जात नाहीत. कारण अभ्यास आणि निरिक्षण यांचा अभाव आहे. हँडसेट उघडल्यावर त्याचे मुख्य फिचर आत्मसात केल्यावर इतर फिचर्सकडे दुर्लक्ष होते. त्याचवेळी बाजारात नवीन हँडसेट येतो. मग त्याच्यामागे धावाधाव सुरु होते. खरंतर आजच्या तंत्रज्ञानाची ही खरी गंमत आहे की ते सतत अत्यंत वेगाने बदलत आहे. विशेष गोष्ट म्हणजे करोडो लोकांना ई-मेल म्हणजे काय ते माहीत नाही आणि त्याचवेळी करोडो लोक फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर पार करुन क्लाऊड आणि रोबोच्या सानिध्यात राहत आहेत. प्रत्यक्ष जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि समुहांबरोबर आपला संबंध येत असतो. तेव्हा त्या सर्वांबरोबर जुळवून घेत आपले कार्य स्मार्टपणे करणे गरजेचे असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच समाजाची तंत्रज्ञान विषयक किंवा स्मार्ट जगण्याविषयीची जाणीव हीदेखील महत्त्वाची ठरते. ती जाणीव जितकी विकसित तितके स्मार्ट काम करणे सोपे जाते. वर्तमानपत्रे आणि विविध माध्यमांतून तंत्रज्ञान आणि स्मार्ट गॅझेटच्या वापरांविषयी सुरु झालेल्या माहिती देणार्‍या पुरवण्या याचीच साक्ष देतात.
जीवन स्मार्ट बनविताना आधुनिक गोष्टी नक्कीच आत्मसात केल्या पाहिजेत. त्याविषयीची माहिती मिळवली पाहिजे. त्या हाताळून पाहिल्या पाहिजेत. त्यांची उपयुक्तता तपासून घेतली पाहिजे आणि त्यांचा स्मार्ट वापर कसा करता येईल याबाबत विचार केला पाहिजे. कॅमेर्‍याने फोटो काढणे आणि नंतर ते डेव्हलप करुन आणणे ही गोष्ट पूर्णत: कालबाह्य झाली आहे. मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीने जग अक्षरश: बदलून टाकले आहे. जगण्याची प्रत्येक प्रक्रिया 360 अंशाच्या कोनात विस्तारली आहे. संवाद माध्यमे आणि संभाषण माध्यमे यांचा कालावधी अत्यंत कमी झाला आहे. पूर्वी पत्र पाठवून करावी लागणारी चौकशी आणि 8 दिवसानंतर मिळणारा प्रतिसाद ही सारी प्रक्रिया काही सेकंदावर आली आहे. जीवन अत्यंत गतिमान झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असे संत तुकाराम महाराजांनी एक आध्यात्मिक कल्पना सांगताना म्हटले आहे. आज जग स्मार्ट जीवनशैलीने रात्रंदिन युद्धाचा प्रसंग उभा राहिला आहे. अतिशय वेगाने समोर येणारी माहिती,  घटना, त्यावर तितक्याच वेगाने घ्यावे लागणारे निर्णय आणि त्यातून होणारे बरेवाईट परिणाम यांचा करावा लागणारा सामना यातून एक संघर्ष प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. ‘करु की नको करु’ अशी साशंकता प्रत्येक कृतीमध्ये आली आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणूस हा निसर्गत: एक पशू आहे. मानवी शरीर विधात्याने बनविलेली एक अद्भूत किमया असली तरी शरीराच्या काही मर्यादा आहेत. मानवी शरीर म्हणजे यंत्र नाही. त्याला मन, बुद्धी, चित्त इ. विकार आहेत. त्यांचे संतुलन राखणे हे फार महत्त्वाचे आहे. मानवी शरीराची ताण सहन करण्याची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्याचा त्या व्यक्तिला आणि त्याचबरोबर कुटुंबाला आणि समाजालाही त्रास होतो. जसे रबर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणता येते. रबराशी सतत खेळत राहिल्यास त्यातील ताणशक्ती निघून जाऊन ते निकामी होते. स्मार्ट जीवन जगत असताना शरीराची आणि मनाची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मनातील विचारांचा शरीरावर परिणाम होतो. विचार करण्यासाठी, आपल्याच मनाशी संवाद करण्यासाठी वेळ काढणे खूप आवश्यक आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे माहिती, संधी आणि प्रगती जरी एका क्लिकवर उपलब्ध झाली तरी आपले जीवन सुखी आणि आनंदी होते का हे तपासून पाहिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हॉटस्ऍप यामुळे जीवन नक्कीच गतिमान झाले आहे. माहितीची देवाण घेवाण वेगाने घडत आहे. परस्पर संवाद वेगवान झाले आहेत; मात्र त्यांच्या चांगल्या परिणामांबरोबर दुष्परिणामही वाढत आहेत. थोडा वेळ जरी इंटरनेट कनेक्शन बंद झाले तरी अस्वस्थता येते. दिवसरात्र माणसे फेसबुक आणि व्हॉटस्ऍपला चिकटून आहेत. मनासारखे झाले नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमुळेही चिडचिड होते. कौटुंबिक आणि सामाजिक संवाद कमी होत आहेत. माणसे आभासी जीवनात रममाण झाली आहेत. अशावेळी आपल्या जीवनशैलीमध्ये स्मार्ट विचारांचे अधिष्ठान जागविणे फार गरजेचे आहे. स्वत:शी आणि इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, फक्त स्वत:साठी काही वेळ राखून ठेवणे, स्वत:शी संवाद करणेही गरजेचे आहे. चांगले मित्र जोडणे आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष गप्पा मारणे, गरजेचे आहे. विचारांची देवाण घेवाण केल्याने मनातील कोंडलेल्या भावनांचा निचरा होतो. मनाला नवा तजेला मिळतो. चांगल्या पुस्तकांचे आणि ग्रंथांचे वाचन खूप महत्त्वाचे आहे. ग्रंथ हे गुरु आणि सर्वात चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपण एका वेगळ्या विश्‍वात जातो. याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे, ट्रेकींग करणे यामुळेही एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. व्याख्याने आणि प्रवचने ऐकणे यांनीही आपल्या मनाचे पोषण होते. आपल्याला नवीन विचार समजतात. आपल्या मनातील शंकांचे निराकरण होते. नवीन कल्पना स्फूरतात.
आजचा काळ आव्हानात्मक तर आहेच तितकाच तो असुरक्षितही आहे. स्पर्धेबरोबर आता पुढे काय होईल, कसे होईल अशी विवंचना प्रत्येकाला आहे. अशा वेळी स्मार्ट जगणे ही एक कला आहे. संतुलन स्वत:च्या मनाचे, स्वत:च्या आरोग्याचे आणि स्मार्ट साधनांचे अशी काळाची गरज आहे. स्मार्ट साधनांचा पुरेपूर वापर आणि त्या वापरामधले संतुलन हे निरंतर यशाकडे घेऊन जाईल. प्रत्येक कृती करताना थोडे थांबून, थोडा विचार करुन, ही कृती अधिक स्मार्टपणे करता येईल का, याचा अंदाज घेऊन मग करणे शहाणपणाचे ठरेल. स्मार्ट जीवनशैलीसाठी स्मार्ट विचारांचे अधिष्ठान असले पाहिजे. आज यश मिळविणे कदाचित सोपे आहे. ते टिकवणे खूप अवघड आहे. म्हणूनच तरुणाईला सांगणे आहे,
स्मार्ट करा रे मन । स्मार्ट करा रे जीवन ।
आणि स्मार्ट संतुलन । त्यासाठी हवे स्मार्ट अधिष्ठान ॥
- प्रा. क्षितिज पाटुकले, पुणे
संपर्क: 98228 46918

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६

Tuesday, August 9, 2016

सोविएत युनियन (रशिया) मधील कम्युनिस्ट चळवळीचा समग्र इतिहास...

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६ 

प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
संपर्क 020-2447 3459
पृष्ठे: 468 । मूल्य: 350/-
मार्क्सवाद! कम्युनिझम! मराठीत सांगायचं तर साम्यवाद! एकेकाळी  जगभरातल्या तरूणांना मार्क्सवादाचं आकर्षण होतं. साम्यवादाचं आकर्षण होतं. असं काय होतं या कम्युनिझमध्ये? जगाला का हादरे बसले त्यामुळं? जगाच्या नकाशावर नजर टाकली तर काय दिसतं? साम्यवादी विचारसरणी. तिनं सगळीकडेच प्रभाव गाजवला आहे. विशेष करून मागच्या शंभरेक वर्षात. एक गोष्ट खरी आहे. आता काळ बदललाय. याला जागतिकीकरणाचा काळ म्हणतात. आता कुठलाही देश घ्या. तो शंभर टक्के साम्यवादी राहू शकेल का? तर नाही राहू शकत. आता ‘भांडवलशाही’ची चलती आहे. आता बोलते ती एकच गोष्ट. पैसा!! चीनवर कम्युनिस्ट पक्षाची पकड आहे; मात्र तिथंही आता ‘माओ’चा काळ राहिलेला नाही. तिथली अर्थव्यवस्था. ती आता ‘साम्यवादी’ राहिली नाही. साम्यवादी विचारांचं राजकारण म्हणजे काय? तर त्यात साम्यवादी विचारांचं अर्थकारणही येतंच. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था चांगली की साम्यवादी? असे प्रश्‍न .ेयेतातच. काय चांगलं? काय वाईट? हे समजून घ्यायचं तर? तर अनेक गुंते. ते नीटच अभ्यासावे लागतात. त्यासाठी जगभरातील राजकीय उलथापालथी. त्या समजून घ्यायला लागतात. ‘कम्युनिझम‘  समजून घ्यायची सुरूवात. ती मात्र सोविएत युनियनपासूनच करावी लागते. का? तर तिथं पहिली कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट सत्तेवर आले. जवळपास सत्तर वर्ष त्यांनी तिथं राज्य केलं. काय काय घडलं या इतक्या मोठ्या काळात? ‘कम्युनिझम’ तिथं खरंच यशस्वी झाला का? तो एक प्रयोग होता का? काय घडलं मग या प्रयोगशाळेत? मराठीत यावर दोन-तीन लेखकांनी लिहिलं. गोविंद तळवळकर, नरेंद्र सिंदकर, अरूण साधू ही नावं प्रामुख्यानं घेता येतील. यापैकी तळवळकरांचं लेखन सपक. ‘सोविएत साम्राज्याचा उदय आणि अस्त’ हा ग्रंथ. त्याचे तीन खंड लिहिले त्यांनी. अभ्यासाशिवाय लिहितात का माणसं तीन-तीन खंड? मात्र होतं काय? तर काहीजण आपला अभ्यास किती आहे हे दाखवण्यासाठी लिहितात. तळवळकर हे असे ‘दिखाऊ’ लेखक आहेत. अशा लेखकांना एक मारामार असते. वाचक मिळण्याची. मग कम्युनिझम वा मार्क्सवादासारखा विषय असेल तर? वाचकांची मग अजून गोची होते. मग हा विषय सोपा करून सांगितला कुणी? तर अरूण साधूंनी. प्रश्‍नच नाही. ‘तिसरी क्रांती’ हा त्यांचा ग्रंथ. कसा आहे तो? तर तो वाचकांना समजेल असा आहे. पाचशे पानात साधुंनी हा विषय संपवून टाकला. खंडांचे डोंगर पोखरत बसले नाहीत ते. डोंगर पोखरून उंदीर काढता येतो का? अन् मग तो पुन्हा वाचकांना अभिमानानं दाखवता येतो का? तर येतो की. त्याबाबतीत तळवळकरांसारखा लेखक शोधूनही सापडणार नाही. साधुंनी ते केलं नाही. साधुंचं हेच मोठेपण आहे. खरंतर या विषयाच्या बाबतीत नरेंद्र सिंदकरांचा अधिकार मोठा. त्यांचा अभ्यासाचा आवाकाच मोठा. अफाट असा! शिवाय ते रशियात राहिले होते. अगदी मॉस्कोतच. किती काळ? तर तब्बल पंचवीसेक वर्ष!! ‘लाल महासत्तेचा उदयास्त’ हा ग्रंथ. त्याचे दोन खंड लिहिले त्यांनी. पहिला प्रकाशित झाला. दुसरा झाला नाही. का? ते कॉन्टीनेंटल प्रकाशनलाच माहीत. मग सिंदकरांचा पहिला खंड कसा आहे? तर अभ्यासपूर्ण व बर्‍यापैकी वाचनीय आहे. फक्त झालं एकच. फार आकडेवारीमुळं तो जड झाला. दुसरं, सिंदकर पक्के ‘स्टॅलिनवादी’. त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी त्यांना तटस्थपणे लिहिता आलं नाही. त्यामुळं ट्रॉटस्की, क्रुश्‍चेव्ह, गोर्बाचेव्ह या नेत्यांवर अन्याय होतोच. या लोकनेत्यांनी स्टॅलिनला कधीच मानलं नाही. दुसरीकडे स्टॅलिनवादी लेखक. त्यांनी या लोकनेत्यांना मानलं नाही. साधू मात्र जास्त तटस्थ वाटतात. एकतर सोपं लिहिलयं त्यांनी. दुसरं, स्वत:ला कुठंही झुकू दिलेलं नाही. सगळं लेखन तटस्थ. त्याचवेळी झपाटल्यासारखं! लेखन असं असेल तर? तर वाचकही झपाटून जातो. त्यामुळं ‘तिसरी क्रांती’ ग्रंथ. तो तुम्हाला काय देतो? तर झपाटलेपण!! मग वाचक म्हणून काय होतं आपलं? तर दोन दोन-तीन तीन वेळा वाचायला घेतो आपण हा ग्रंथ. ग्रंथाच्या शेवटी शेहचाळीस संदर्भ ग्रंथांची यादी आहे. त्यावरून कळतं ते एकच. साधूंचं अफाट वाचन! या यादीत एकाहून एक सरस इंग्रजी ग्रंथ आहेत. त्यात ‘पर्मनन्ट रिव्होल्युशन’ हा ग्रंथ आहे. खुद्द ट्रॉटस्कीनंच लिहिलेला आहे तो. ट्रॉटस्कीनं लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ द रशियन रिव्होल्युशन’ हाही ग्रंथ आहे. जॉन रीडचा ‘टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड’ हा ग्रंथ आहे. रॉबर्ट टकरचा ‘सोविएत पॉलिटीकल माईंड’आहे. मायकेल सायर्स व अल्बर्ट कान चा ‘द ग्रेट कॉन्स्पिरसी अगेन्स्ट रशिया’आहे. रॉय मेदवेदेव हा सुप्रसिद्ध लेखक. त्याचे दोन ग्रंथ या यादीत आहेत. एक ‘ऑन स्टॅलिन अँड स्टॅलिनिझम’. दुसरा आहे ‘लेट हिस्ट्री जज’. हॅरिसन सॅलिसबरीचा ‘नाईन हन्ड्रेड डेज: द सीज ऑफ लेनिनग्राड’ हा ग्रंथही या यादीत आहे. या यादीत ट्रॉटस्कीचं आत्मचरित्र आहे. कार्ल मार्क्सचं चरित्र आहे. स्टॅलिन व गोर्बाचेव्ह यांची चरित्रंही आहेत. अगदी मार्क्सपासून गोर्बाचेव्हपर्यंत साधुंनी विस्तारानं लिहिलंय. या सगळ्यांचा कालखंड विस्तारानं येतो. त्यामुळं साधुंचा हा ग्रंथ या विषयावरचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ ठरतो. याची पहिली आवृत्ती 1991 साली आली. नंतर तिसरी आवृत्ती आली फेब्रुवारी 2010 मध्ये. पहिली आवृत्ती पाचशे साठ पानी आहे. तिसरी चारशे अडुसष्ठ पानी. ‘ताजा कलम’ व ‘पंधरा वर्षानंतर’. तिसर्‍या आवृत्तीत ही दोन नवीन प्रकरणं आहेत. ‘उपसंहार’ ही आहे. त्यामुळं हा विषय अगदी नीट समजतो. साधुंच्या मनोगतातच एक वाक्य आहे. ‘‘प्रस्तुत ग्रंथ जगाविषयी उत्सुक असलेल्या तरूणांसाठी आहे’’ ते म्हणतात.
ग्रंथाची सुरूवात होते ‘फ्रेंच राज्यक्रांती’ पासून. मग लेखक कार्ल मार्क्सची ओळख करून देतो. काय म्हणत असे हा मार्क्स? ‘‘समाज बदलता येतो. तो बदलला पाहिजे’’ मार्क्स सांगे. मार्क्स कसा होता? तर ‘तो झंझावाती बुद्धिचा माणूस होता’ साधू सांगतात. मार्क्सची पत्नी जेनी. अतिशय बुद्धिमान होती तीदेखील! अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जेनीचं मार्क्सच्या लेखनावर लक्ष होतं. त्याच्या अभ्यासावर लक्ष होतं. मार्क्सची गरिबी भयंकर!! अशा अवस्थेत जेनीनं मार्क्सचा संसार सांभाळला. मार्क्सची गरिबी भयंकर, तशी त्याची अजून एक गोष्ट भयंकर होती. त्याचं अक्षर! त्यामुळं जेनीचं एक काम आणखी वाढलं. मार्क्सच्या लिखानाची मुद्रणप्रत. ती तिलाच तयार करावी लागे. जेनीचं माहेरचं आडनाव वेस्टफालेन. सुसंस्कृत कुटुंबातून आली होती ती. एक प्रज्ञा व अफाट चिंतन! या दोन गोष्टी सोडल्या तर? तर मार्क्सकडे बिचार्‍याकडे होतं तरी काय? खिसा फाटकाच होता त्याचा! त्यामुळं कौटुंबिक विवंचना भयंकर! त्यातून जेनीची चिडचिड देखील होई; मात्र जेनीनं मार्क्सला सांभाळलं. त्यात आयुष्य वेचलं. नवरा फकीर वृत्तीचा होता तिचा. त्यामुळं वाट्याला गरीबी आलेली. म्हणून काही जेनीनं मार्क्सला सोडचिठ्ठी दिली नाही. आपल्याला प्रश्‍न पडतो. जेनी नसती तर? तर मार्क्सचं काय झालं असतं? मात्र नियतीच अशा गाठी मारत असते. पक्क्या असतात त्या गाठी. जेनीचं आणखी एक मोठेपण कुठं आहे? शेवटच्या काळात तर कॅन्सर जडला तिला; मात्र नवर्‍याच्या लेखनावरचं तिचं लक्ष. ते मात्र तसूभरही कमी झालं नाही. का कुणास ठाऊक; मात्र ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुलेच आठवतात इथं. मार्क्स व जेनीबद्दल वाचत असताना.
मार्क्सचा जन्म जर्मनीतला. वंशानं तो ज्यू. नंतर तो फ्रान्समध्ये राहिला. बेल्जियममध्ये राहिला. लंडन इथंही राहिला. त्यावेळचे प्रशियन (जर्मन) पोलीस अधिकारी. ते मार्क्सला कुठंही सुखानं राहू देत नसतं. त्यांच्या दृष्टीनं तो धोकादायक माणूस होता. मार्क्सनं आयुष्यात खूप अपमान सहन केले. पचवले. हे सगळं सोसतच त्यानं त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. ‘दास कॅपिटल’(भांडवल)! हा तो ग्रंथ. तीन खंडात लिहिला त्यानं तो! हाच तो मार्क्सवाद! जगभरातली भांडवलशाही राष्ट्रं. ती या मार्क्सवादाला टरकून होती अक्षरश:! या मार्क्सवादाचा जगभरचं स्वत:चा एक पगडा होता. मार्क्सच्या आयुष्यात काय घडत होतं नेमकं तेव्हा? तर त्याची दोन लहान मुलं. ती मरण पावली होती. कशामुळं? तर उपासमारीनं! अनेकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आली त्याच्यावर. त्यातून अक्षरश: रस्त्यावर यायचे प्रसंग आले. मार्क्ससह कुटुंबही रस्त्यावर! अशा वाईट वेळा आल्या. मार्क्सचा हा सगळा त्याग! सामान्य त्याग नव्हताच तो! ‘घर जाळून कोळशाचा व्यापार’ म्हणतात याला. तो त्यानं त्यावेळी केला. कामगारांचं जगभर होणारं शोषण! ते त्यानं त्याच्या या ग्रंथातून मांडलं. पुढं तो कामगारांना आपला मुक्तिदाताच वाटला. अगदी जगभरातील कामगारांना. त्यातून जगभर लाल बावटे फडकू लागले. मग हा लाल बावटा खर्‍या अर्थानं कुठं फडकला पहिल्यांदा? तर सोविएत यूनियनमध्ये. 1917 साल. या साली तिथं झालेली हीच ती क्रांती. पहिली कम्युनिस्ट क्रांती! ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ याच क्रांतीची कहाणी सांगतो. तिची वाटचाल सांगतो. तेव्हा रशियातली परिस्थिती कशी होती? तर रशिया अंधारयुगातच होता तेव्हा. गरीबी व सरंमजामशाही. समाज पोखरला होता या दोन गोष्टींनी. त्याही आधी 1904 साली झालं? तर रशिया -जपान युद्ध. यात रशियाचा दारूण पराभव झाला. रशियात तेव्हा ‘झार’ची राजवट होती. राजेशाहीच होती ती. रशियन जनता मात्र भाबडी. या युद्धात ती झारच्या पाठीशी उभी राहिली. हेच झालं पहिल्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा. 1914 साली सुरू झालं हे पहिलं महायुद्ध. ‘‘पहिलं महायुद्ध हा कत्तलखानाच होता’’ अरूण साधू म्हणतात. त्या युद्धात रशियन फौजा जर्मन फौजांना भिडल्या. कसा होता हा कत्तलखाना? किती सैन्य ठार व्हावं रशियाचं? तर अडतीस लाख!! तेही पहिल्याच दहा महिन्यात!! मात्र तिसरी क्रांतीची पहिली आवृत्ती. त्यात या संख्येची गफलत झाली आहे. पान क्रमांक 116. त्यावर ठार झालेल्या सैनिकांची संख्या आहे अडतीस लाख. तर पान क्रमांक 169. त्यावर ती आहे  पंधरा लाख. त्यामुळं नेमकी संख्या कळत नाही; मात्र ती लाखोंच्या घरात होती हे खरं. एखाद्या देशाचे इतके सैनिक मारले जात असतील तर? तर काय हाहाकार माजत असेल त्या देशात? रशियातही तो माजलाच होता. रशियन जनता संतापली. झारला शिव्याशाप देऊ लागली. आधीच रोजचं आयुष्य. हीच एक लढाई होती. त्यात लाखो तरूण युद्धात मारले गेलेले. माणसं उठाव करतील नाहीतर काय करतील? मात्र कुठलाही असंतोष वा बंड. त्याला एक दिशा लागते. ब्लादिमीर लेनिन हा लोकनेता. त्यानं या असंतोषाला दिशा दिली. लिऑ ट्रॉटस्की हा त्याचा सहकारी. खूप जबरदस्त क्रांतिकारक होता तो. तो या उठावात लेनिनच्या बरोबर होता. खरंतर रशियन जनतेचा हा उठाव. तो उत्स्फूर्त होता. जनता नेतृत्त्वाची वाट पहात बसली नाही तेव्हा. लेनिननं काय केलं? तर नंतरच्या काळात या उठावाचं बोट धरून तो सत्तेपर्यंत गेला. फ्रेंच राज्यक्रांतीचं बोट धरून नेपोलियन बोनापार्ट सत्तेपर्यंत गेला तसाच. लेखकानं या ग्रंथात हा सगळा इतिहास त्यातल्या बारीकसारीक तपशिलासह सांगितला आहे. 
रशियातले हे लाखो कम्युनिस्ट क्रांतिकारक. लेनिनचे हे समर्थक. ते होते तरी कसे? तर त्यांची दोन वैशिष्ट्यं साधू सांगतात. साधेपणा व त्याग. त्यांना ‘बोल्शेविक’ असं म्हटलं जाई. दोन गटच होते बंडखोरांचे. बोल्शेविक व मेन्शेविक. त्यातल्या बोल्शेविकांचं नेतृत्व लेनिनकडे होतं. पुढं या बोल्शेविकांचाच कम्युनिस्ट पक्ष झाला. लेनिन स्पष्ट भूमिका घेई. त्याच्याकडे ठामपणा होता. त्यामुळं मेन्शेविकांपेक्षा तो लोकप्रिय ठरत गेला. हे सगळं 1917 व त्यानंतर घडत गेलं. त्याआधी गाजला तो 1905 सालचा संप. कामगार व शेतकर्‍यांनीच केलेला. खरंतर तो जबरदस्त उठाव होता. सत्तेवर होता अर्थातच दुसरा निकोलस झार. बेपर्वा माणूस! 1904 चं रशिया-जपान युद्ध. ते रशियाच्या अंगलट आलेलं. शेतकरी, कामगारांची अवस्था. ती भयानक झालेली. उदारमतवादी, बुद्धिवंतही होतेच तेव्हा रशियात. कलावंत होते. कवी होते. देशाची विस्कटलेली ही घडी. ती पाहून ते निराश होत होते. क्रांतिकारक वृत्तीचे तरूण. ते भूमिगत होत होते. बॉम्ब बनवत होते. पिस्तूलं बाळगत होते. झारला ती खदखद कळत होती;मात्र वळत नव्हती. रशियातला कामगार वर्ग. तो कुठं कुठं काम करत होता तेव्हा? तर तो छापखान्यांमध्ये काम करत होता. जहाजबांधणी कारखान्यांमध्ये काम करत होता. तो गोदी कामगार होता. पोलाद कामगार होता. कोळसा कामगार होता. रेल्वे कर्मचारीही होता. या सगळ्यांनी 1905 साली केलेला हा संप. इतकंच नव्हे तर तेव्हा शिक्षक, डॉक्टरही संपावर गेले. बँकांचे कारकून, पोस्टमनही संपावर गेले. वीज कर्मचारी व अक्षरश: टांगेवालेही संपावर गेले. झारचं रशियन साम्राज्य खूप मोठं होतं तेव्हा. बाल्टिक समुद्रापासून ते पूर्वेला पॅसिफिकपर्यंत पसरलेलं. विविध वांशिक समुहांचा विशाल समूह होता हा. या विशाल भूभागात लक्षावधी कामगार होते. कोट्यावधी शेतमजूर होते. शेतकरी होते. गुलाम होते. त्यांचे जगण्या मरण्याचे प्रश्‍न होते. त्यातून ते रस्त्यावर उतरत होते. झार दुसरा निकोलस. त्यानं अशावेळी केलेली घोडचूक कोणती? तर तो पुन्हा पुन्हा जनतेशी अमानुष वागला. झार जात्याच निर्दयी. त्यामुळं 1911 ते 1914 या काळातही काय झालं? तर कामगारांचे वारंवार उठाव झाले. दिनांक 9 जानेवारी 1905 या दिवशी तर कामगारांवर अमानुष गोळीबार झाला. मॅक्झिम गॉर्की हा सुप्रसिद्ध रशियन लेखक. तो तेव्हा पत्रकार होता. अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क जनरल’चा. त्यानं त्याचवेळी बातमीची तार पाठवली होती अमेरिकेला. ‘रशियन क्रांती सुरू झालेली आहे’ त्यानं बातमीत म्हटलं होतं. अर्थात क्रांती व सत्तांतर. 1917 साल उजडावं लागलं त्यासाठी; मात्र गॉर्कीला लक्षणं जाणवलीच होती. क्रांतीची लक्षणं! नंतर त्यासाठी काळानं ‘लेनिन’ची निवड केली होती इतकंच. लेनिननं बोल्शेविकांना संघटित केलं. बोल्शेविकांची खरी ताकद काय होती? तर लढवय्ये कार्यकर्ते!! असे लढवय्ये बोल्शेविक कुठं कुठं होते? तर ते खेड्यांमध्ये होते. शहरांमध्ये होते. कारखान्यांमध्ये होते. शेतं, बराकी व अगदी युद्धाच्या आघाडीवरील खंदकातही ते होते. 1917 साली उठाव झाला व लगेचच बोल्शेविक सत्तेवर आले का? तर तसं झालं नाही. अलेक्झांडर केरेन्स्कीचं हंगामी सरकार सत्तेवर आलं होतं तेव्हा. लेनिन व ट्रॉटस्कीनं हे सरकार उलथवल.ं खरंतर त्यासाठी रक्तपात करावाच लागला नाही. संघटित ताकद पणाला लावली बोल्शेविकांनी. ती फार मोठी होती का? तसंही नव्हतं. केरेन्स्कीनं ठरवलं असतं तर? तर तो बोल्शेविकांचा उठाव मोडून काढू शकला असता; मात्र तो अक्षरश: पळून गेला. क्रांतिकारकांच नीतिधैर्य. तेच श्रेष्ठ ठरलं. याबद्दल अरूण साधू काय म्हणतात? ‘‘ही क्रांतीची सुरूवात. सत्तेचा चुंबक बदलला होता. भूगर्भातील प्रस्तर हलू लागले होते. राजसत्तेचा डोलारा डळमळू लागला होता.’’ साधुंची अशी अनेक वाक्यं. ती या ग्रंथात आहेत. त्यांचं हे लेखन ‘रोमँटिक’ आहे. कुठल्याही क्रांतीवरचं लेखन रोमँटिक असू शकतं. प्रत्यक्षात क्रांती कठोर असते. निर्दयी असते. या ग्रंथात या दोन्ही गोष्टी वाचकांना जाणवतात. एक उदाहरण सांगता येईल. दुसरा निकोलस झार. त्याला त्याच्या कुटुंबासह ठार मारण्यात आलं. रशियन राज्यक्रांतीतल्या रक्तपाताला तिथूनच सुरूवात झाली.
लेनिन व ट्रॉटस्कीनं सरकार आणलं. बोल्शेविकांचं सरकार; मात्र खरी परीक्षा तिथून सुरू झाली. ऑक्टोबर 1917. या महिन्यात बोल्शेविक सत्तेवर आले; मात्र पुढच्या क्षणी काय झालं? तर दोन भयानक गोष्टी. त्या समोरच येऊन उभ्या ठाकल्या. ब्रिटन, अमेरिका व फ्रान्स. पहिल्या महायुद्धातली ही मित्रराष्ट्रं. त्यांना पोटदुखी सुरू झाली. कसली? तर सोविएत यूनियनमध्ये डाव्या विचारांच्या बोल्शेविकांचे सरकार सत्तेवर आल्याची. मग या थोर (?) व लोकशाहीवादी (?) राष्ट्रांनी काय करावं? तर आपली लष्करी व गुप्तहेर यंत्रणा. ती कामाला लावली. कशासाठी? तर या बोल्शेविक क्रांतीचा गळा घोटण्यासाठी. तसे प्रयत्न त्यांनी अगदी नेटानं सुरू केले. बोल्शेविकांचं सरकार पाडण्याचे हे प्रयत्न. त्यासाठी भयानक कारस्थानं केली. हा एक मोठा इतिहासच आहे असं साधू सांगतात. लेनिन व ट्रॉटस्की. त्यांच्या पुढचं दुसरं संकट काय होतं? तर सोविएत यूनियनमध्ये ‘श्‍वेतसेना’ स्थापन झाली. आता हा काय प्रकार होता? तर रशियाभरचे जमीनदार एकत्र आले. काही लष्करी अधिकारी एकत्र आले. अमीर-उमराव एकत्र आले. या सगळ्यांनी मिळून श्‍वेतसेना उभी केली. अगदी लष्करी संघटनच केलं तिचं. कुणाविरूद्ध? तर लेनिनच्या बोल्शेविक सरकारविरूद्ध. या सरंमजामशहांना द्वेषानं पछाडलं होतं. लेनिननं सरकार स्थापन केलं होतं. त्यांना हे सहन होत नव्हतं. आता लेनिन तरी कच्च्या गुरूचा चेला होता का? तर नाहीच. त्याच्या बोल्शेविक सरकारकडेही ‘लालसेना’ होतीच. तिची सूत्रं होती ट्रॉटस्कीकडे. ट्रॉटस्की हाही बाप माणूस! लेनिनला घडवून आणलेल्या क्रांतीचं रक्षण करायचं होतं. अन्यथा रशिया पुन्हा सरंजामशाहीच्या गर्तेत फेकला गेला असता. शिवाय या सरंजामशहांना वर उल्लेख केलेल्या मित्रराष्ट्रांचा पाठिंबा होताच. मग क्रांतीच्या रक्षणाची जबाबदारी लेनिननं सोपवली कुणावर? तर अर्थातच ट्रॉटस्कीवर. ट्रॉटस्कीनं लालसेनेचं नेतृत्व केलं. लष्करी डावपेच लढवले. पाय रोवून उभा राहिला तो! लेनिनच्या विश्‍वासाला जागला. हे यादवी युद्ध होतं. लालसेना विरूद्ध श्‍वेतसेना. क्रांतिकारकांविरूद्ध प्रतिक्रांतिकारक! क्रांतीला प्रतिक्रांतीनं दिलेलं हे आव्हान! मित्रराष्ट्रांनी श्‍वेतसेनेला पैसे दिले. लष्करी मदत केली; मात्र क्रांतिकारकांचा चिवटपणा! तो मात्र अफलातून होता. जिद्दीला पेटले होते ते!  आपल्या हक्काच्या सरकारचं रक्षण करण्याची जिद्द! ती जिद्द खरोखर तुफानी होती. एकतर ही पहिली साम्यवादी क्रांती. तिचा हा जगातला पहिलाच प्रयोग. क्रांतिकारकांना नवीन समाज घडवायचा होता. सामाजिक परिस्थिती वाईट होती. आर्थिक परिस्थिती तशीच. पहिल्या महायुद्धानं घातलेले घाव. ते खोलवर बसले होते. त्यात हे यादवी युद्ध! आणि या सगळ्याला टक्कर देणारे क्रांतिकारक! शेवटी हे यादवी युद्ध! ते किती भयानक अवस्थेला गेलं? तर दोन्ही सैन्यातले दहा लाख लोक ठार झाले त्यात; मात्र क्रांतिकारकांनी आपलं सरकार शाबूत राखलं. तीन वर्ष ही या यादवी युद्धाची होती. 1918 ते 1921. ही ती तीन वर्षे. या सगळ्यातली एक गोष्ट विलक्षण होती. लेनिन सत्तेवर आला होता. कसा? तर रक्तहीन सत्तांतर होऊन; मात्र आता रक्तपात अटळ ठरला. का? तर त्याच रक्तहीन क्रांतीचं रक्षण करण्यासाठी. लेनिननं सत्तेवर आल्यावर पहिलं काम काय केलं? तर पहिल्या महायुद्धातून सरळ माघार घेतली. सैन्य मागं घेतलं. जर्मनीशी तह केला. जनता युद्धाला विटली होती. भुकेनं मरत होती. दुष्काळानं पिडली होती. त्यामुळं लेनिनचा हा निर्णय. जनतेचा विश्‍वास संपादन केला एका क्षणात लेनिननं हा निर्णय घेऊन. झारची राजवट मुळातच भ्रष्ट! अत्याचारी! तिनं लादलेलं हे युद्ध. लेनिननं या दुष्टचक्रातून रशियन जनतेची सुटका केली असंच म्हटलं पाहिजे. हा निर्णय घेताना स्टॅलिन हा लेनिनच्या पाठिशी होता, तर ट्रॉटस्की मात्र कुंपणावर.
ब्लादिमीर लेनिन, लिऑ ट्रॉटस्की, जोसेफ स्टॅलिन व मिखाईल गोर्बाचेव्ह. सोविएत युनियनमधली ही चार व्यक्तिमत्वं. यातील गोर्बाचेव्ह खूप नंतरचे. पहिले तिघं समकालीन; मात्र या सर्वांबद्दलच साधुंनी विस्तारानं लिहिलं आहे. त्यांचे स्वभाव कसे होते? त्यांचं साम्यवादी क्रांतीतलं स्थान काय? स्टॅलिनची राजवट प्रदीर्घ होती; मात्र ती नेमकी कशी होती? गोर्बाचेव्ह यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान काय? साधू खूप नेमकेपणानं सगळ्या गोष्टी सांगतात. काहीही हातचं राखून ठेवत नाहीत. लेखक म्हणून त्यांचं हे खूप सुंदर वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. त्याकडे साधू शेवटी येतात. तो मुद्दा सोविएत यूनियनचे तुकडे कसे झाले हा. त्याचं अत्यंत तपशिलवार वर्णन साधुंनी केलं आहे. ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. तो सोविएत यूनियनचा मागील जवळपास शंभर वर्षांचा इतिहास सांगतो. गांगरून जायला व्हावं इतकं अफाट राजकारण यात येतं. यात क्रांती येतेच. तिची वाटचाल येते. पहिलं व दुसरं महायुद्ध येतं. अमेरिका व सोविएत यूनियनमधील शीतयुद्ध येतं. साम्यवादी राष्ट्रं व भांडवलशाही राष्ट्रं. त्यांच्यातील शह-कटशह येतात. आंतरराष्ट्रीय राजकारणातील कारस्थानं येतात. वाचकाच्या अंगाचा थरकाप व्हावा अशी ही कारस्थानं व शह-कटशह! साधुंच्या शैलीतच ते वाचावेत. सोविएत यूनियनमधील लक्षावधी कॉम्रेडस्. त्यांनी एका क्रांतीचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी रक्त सांडलं. तुम्ही कम्युनिस्ट किंवा असू नका. हा ग्रंथ वाचून होतो तेव्हा आपली झोप उडालेली असते. स्वेतलाना ऍलेक्सोविच ही बेलारूसची लेखिका. पूर्वीच्या सोविएत यूनियनमध्येच होतं बेलारूस. स्वेतलानाला नुकतंच साहित्यातील नोबेल मिळालं. सोविएत यूनियनमधील राजकारण व तिथली माणसं. त्याचा आयुष्यभर अभ्यास केला तिनं. तेथील रक्तपात. तो तिला आयुष्यभर अस्वस्थ करत राहिला. या सगळ्यावर तिनं खूप लिहिलं. तिला हा पुरस्कार मिळाला तो तिच्या याच ‘नॉनफिक्शन’(वास्तववादी) लिखाणासाठी. तब्बल पन्नास वर्षांनी ’नॉनफिक्शन’ प्रकारात कुणालातरी नोबेल देण्यात आलं. यावरूनही तिच्या लेखणाचं महत्त्व लक्षात यावं. तिसरी क्रांती या ग्रंथातही हे सगळं येतंच. स्वेतलानानं तिच्या ग्रंथातून त्यातला भयानक मानवी संहार पुढं आणला. त्याचे दोन पिढ्यांवर झालेले त्याहून भयानक परिणाम. ते पुढं आणले. हे सगळं तिनं अधिक प्रकर्षानं पुढं आणलंअसं म्हणता येईल. तिचं हे सगळं साहित्य. ते चांगल्याप्रकारे मराठीत कधी भाषांतरीत होईल का?
तर साधुंच्या या ग्रंथात फक्त इतिहास दडलेला नाही. ती एक महान शोकांतिका सुद्धा आहे. एका अफाट देशातल्या मानवी आयुष्याची! ते एक महाकाव्य आहे! यातलाच एक महानायक होता लेनिन. त्याचं आयुष्यच वादळी होतं. त्याच्या घरातच एक वादळ उठलं होतं. तो दिवस होता दिनांक 8 मे 1887. या दिवशी रशियात पाच तरूणांना फासावर लटकवण्यात आलं. का? तर त्यांच्यावर गंभीर आरोप होते. काय आरोप होते? तर ‘झार’ राजवटीविरूद्ध कट रचल्याचे. या फासावर गेलेल्या पाच तरूणांत एक होता अलेक्झांडर. वीस वर्षांचा होता तो तेव्हा. कोण हा तरूण? तर तो लेनिनचा सख्खा मोठा भाऊ! लेनिनचं वय होतं तेव्हा सतरा. याच लेनिननं पुढं सगळा देशच हलवून सोडला. याला म्हणतात नियती! याला म्हणतात अस्सल महाकाव्य! त्यातल्या खर्‍या महानायकांची अस्सल आयुष्य!! पुढं सत्तेवर आला हाच लेनिन; मात्र साधाच होता तो शेवटपर्यंत. डोक्यात फक्त क्रांती! डोक्यात कुठलंही मंत्रिपद नाही. पंतप्रधानपद नाही. अध्यक्षपद नाही. विचार फक्त काय करत राहिला लेनिन? तर रशियातल्या विषमतेवर काय उपाय करता येतील हा. त्यासाठी त्याच्या देशातल्या अफाट लोकसंख्येला, तिच्या ऊर्जेला कुठं कसा मार्ग दाखवता येईल हा. ऑगस्ट 1918 मध्ये तर लेनिनवरच गोळीबार झाला. दोन गोळ्या शरीरात घुसल्या त्याच्या. एक हृदयाच्या वर फुफ्फुसात गेली व तिथंच रूतून राहिली. एक मानेला घासून गेली. हे कृत्य करणारी एक महिला होती. फानया काप्लान तिचं नाव. सोशल रिव्होल्युशनरी नावाचा एक पक्ष. त्या पक्षाच्या दहशतवादी गटाची सदस्य होती ती. झारच्या विरूद्ध काही तरूण दहशतवादाच्या मार्गानं लढत होते. हेच तरूण या सोशल रिव्होल्युशनरी पक्षाकडे खेचले गेले. झारच्या विरूद्ध ते लढत होते ते ठीक होतं; मात्र बोल्शेविकांनी यांचं काय घोडं मारलं होतं? मात्र हिंसक वृत्ती व द्वेष यांच नातं पार जवळचं. एक लक्षात घेतलं पाहिजे. बोल्शेविकांचा दहशतवादाला विरोध होता. लेनिनचं महानपण दिसतं इथं. सोशल रिव्होल्युशनवाल्यांना लागली होती हिंसेची चटक!! मग त्यांनी सत्तेवर आलेल्या बोल्शेविकांनाच लक्ष केलं. मात्र साधू म्हणतात तसा लेनिनच्या हत्येचा हा प्रयत्न. हे एकाकी कृत्य नव्हतं. त्यामागंमोठ्या कटाचा भाग असू शकत होता. लेनिनवर शस्त्रक्रिया झाली. फुफ्फुसातली गोळी बाहेर काढण्यात आली; मात्र कधी? तर तब्बल चार वर्षांनंतर. 1922 साली. तोपर्यंत ती हृदयाजवळच होती. हेही महानपणच त्या क्रांतिकारकाचं! मन मोठं त्याचं! त्यानं ती शत्रूची गोळी. ती चार वर्ष जणू हृदयाशी जपून ठेवली. त्या गोळीनं तिचं काम मात्र बजावलं. 1921 चा नोव्हेंबर महिना. गंभीर आजारी पडले लेनिन. दिनांक 25 मे 1922. पक्षाघाताचा झटका आला या दिवशी लेनिनना. शेवटी अवस्था वाईट होत गेली. दिनांक 21 जानेवारी 1924. लेनिननी अखेरचा श्‍वास घेतला या दिवशी. ‘जगातील अग्रणी क्रांतिकारक’ असं साधू वर्णन करतात लेनिनचं. लेनिनच्या हत्येचा 1918 साली झालेला तो प्रयत्न. त्यामुळं बोल्शेविकांचं सरकार खडबडून जागं झालं. छुप्या दहशतवाद्यांना तर जमावानंच मारलं. सामान्य जनता बोल्शेविकांच्याच पाठिशी होती. ‘‘रस्त्यावरचे लोक पूर्णपणे बोल्शेविकांच्या बाजूनं असल्याचा हा पुरावा’’ साधू म्हणतात. लेनिनचं हे बलिदानच होतं एका अर्थी; मात्र त्याआधी विकलांग अवस्थेतही हा माणूस गप्प बसला नाही. डिसेंबर 1922 ते मार्च 1923. लेखनिकांकरवी लेख व पत्र लिहिली लेनिननं या काळात. कशी होती या लोकनेत्याची विचारसरणी? लेनिनचं अंतिम टिपण फार बोलकं आहे. त्यात त्यांनी तीन सूचना केल्या होत्या. काय होत्या सूचना? तर संकुचित राष्ट्रवादाचा प्रतिकार करा. विशेषत: रशियन प्रतिगामी राष्ट्रवादाचा. ही पहिली सूचना. दुसरी सूचना होती, खार्चिक, अन्यायी व दमन करणारं प्रशासन नाकारा. तिसरी सूचना होती, स्टॅलिनला पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदावरून काढून टाका. आणखी एक मत होतं या टिपणात. काय होतं ते? तर रशियन जनतेला जागतिक बंधुभावाचं बाळकडू पाजलं पाहिजे. लेनिनच्या अंत:प्रेरणा. त्याबद्दल आणखी वेगळं भाष्य करायची गरज उरत नाही इथं. स्टॅलिनला काढून टाका असं का म्हणाले लेनिन? तर लेनिन आजारपणातही राजकारणावर लक्ष ठेवून होते. सहकार्‍यांच्या वागण्यावर लक्ष ठेवून होते. स्टॅलिन उद्धट होत चालला होता. महत्त्वाकांक्षी होत चालला होता. लेनिनला हे प्रचंड खटकलं होतं. तरीही त्याला पोलिट ब्युरोतून काढून टाका असं म्हणाले नाहीत लेनिन. मनाचा मोठेपणा शेवटच्या क्षणीही गमावला नव्हता त्यांनी. अखेरच्या टिपणात आणखी एक म्हणाले होते ते. ‘स्टॅलिन व ट्रॉटस्कीत सत्तासंघर्ष होईल’ हे ते मत. लेनिनचा ओढा ट्रॉटस्कीकडे होता हे खरंच. पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं पद. ते जनरल सेक्रेटरी पद. ते स्टॅलिनकडे. लेनिनला ते नको होतं. पक्षासाठी सुद्धा व कदाचित ट्रॉटस्कीसाठी सुद्धा. ट्रॉटस्की शेवटी जिवलग कॉम्रेड होता लेनिनचा. श्‍वेतसेनेविरूद्ध प्राणपणानं लढला होता तो! त्याची साम्यवादावरील श्रद्धा! त्याची तत्वनिष्ठा! या गोष्टी त्यानं केव्हाच सिद्ध केल्या होत्या. लेनिनचं व त्याचं नातंच विलक्षण होतं. कसं होतं हे नातं? तर लेनिन दिवसातून पंधरा-वीस वेळा ट्रॉटस्कीला फोन करत. विविध विषयांवर त्याच्याशी सल्लामसलत करत. ट्रॉटस्की वागायला सरळ. छक्केपंजे स्वभावात नव्हते त्याच्या. त्याचं मूळ नाव लेव दाविदोविच ब्रॉन्स्टीन. जन्म दिनांक 7 नोव्हेंबर 1879 चा. तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. त्याचं बालपण. ते स्टॅलिनच्या बालपणासारखं खडतर नव्हतं; मात्र पहिल्यापासूनच तो चळवळ्या! बुद्धिमान! त्याचे वडील. फार श्रीमंत नव्हते ते; मात्र बर्‍यापैकी सधन शेतकरी होते. त्यांच्या शेतात शेतमजूर राबत. लेवला त्यांचे हाल बघवत नसतं. क्रांतिकारक वृत्तीचा कुठलाही तरूण. जगरहाटी जशीच्या तशी स्वीकारत नाही तो. स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करतो. बर्‍याचदा पहिलं बंड. ते त्याला स्वत:च्या घरात करावं लागतं. लेव घरात रमला नाही ते त्यामुळंच. शेतातल्या शेतमजूरांचं शोषण होतंय असं त्याला वाटे. त्यातून त्याचं  वडिलांशी पटेना. शाळेत असतानाच त्यानं काय केलं? तर मार्क्सवादाचा अभ्यास असणार्‍या तरूणांशी मैत्री केली. लेवचं नवनवीन ग्रंथांच वाचन होतं. वृत्तपत्रांचं वाचन होतं. वक्तृत्व सुंदर!! तो मार्क्सवादावर बौद्धिकंही घेई. ती ऐकायला कामगारांचे लोंढेच्या लोंढे येत. मिसरूडही फुटलं नव्हत त्याला; मात्र बुद्धी धारदार!! पहिला तुरूंगवास! तो कधी झाला त्याला? तर वयाच्या अठराव्या वर्षी!! सायबेरियातही तुरूंगवासात होता तो. तेव्हा त्याचं वय होतं एकवीस! वंशानं तो ज्यू. त्याचाही त्याला खूप त्रास झाला. ‘ज्यू’ असणं हा त्याकाळी जणू अपराधच. फक्त जर्मनीच नव्हे तर इतरत्रही ‘ज्यू द्वेष’ हा प्रकार होताच. रशियातही तो होताच. या वंशद्वेषाचा उल्लेखही ग्रंथात एके ठिकाणी वाचायला मिळतो. ट्रॉटस्कीचं ‘ज्यू’ असणं. स्टॅलिनच्या पथ्यावर पडलं तेही. खुनशी होताच स्टॅलिन. त्यानं ट्रॉटस्कीच्या ज्यू असण्याचं भांडवल केलं. हे करत स्वत:चं व्यक्तीस्तोमही माजवलं. लेनिनला मात्र व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. पक्षात लेनिनची कोणी व्यक्तिपूजा करू पाहत असेल तर? तर लेनिनला ते अजिबात आवडत नसे. व्यक्तिस्तोम न आवडणारा तो लोकनेता होता. ट्रॉटस्कीही एकच बांधिलकी मानणारा. मार्क्सवाद! क्रांतीशी त्याचं जन्मजात नातं! ती नाळ त्यानं तुटू दिली नाही. अगदी त्याची हत्या झाली. त्यावेळीही त्याच्यातला क्रांतिकारक जिवंत होताच. कुणी केली ट्रॉटस्कीची हत्या? कुठे झाली ती? त्याचा तपशिलही ग्रंथात आला आहे. 1928 हे साल. त्या सालाच्या शेवटी ट्रॉटस्की विजनवासातच होता. देश सोडावा लागला होता त्याला. त्याकाळात त्याची मुलगी आजारानं मरण पावली. लेव व सर्जेई ही त्याची दोन मुलं. त्या दोघांचीही गूढ हत्या झाली. अन् मग 1940 साल उजडलं. या साली ट्रॉटस्कीचीही हत्या झाली. कुठं? तर मेक्सिकोत. या सगळ्या हत्या. त्या स्टॅलिननंच घडवून आणल्या. खरंतर एकाकी अवस्थेत होता ट्रॉटस्की. फक्त त्याची पत्नी नतालिया. ही शेवटपर्यंत त्याच्या सोबत होती. तरीही एकाकी ट्रॉटस्कीची स्टॅलिनला इतकी भीती वाटावी? त्याचं कारण होतं. ट्रॉटस्कीचं लेखन चालू होतं. स्टॅलिनवादातले धोके. ते तो स्पष्टपणे मांडत होता. ट्रॉटस्कीच्या लिखाणाचं सार एकच असे. स्टॅलिन साम्यवादी चळवळीला बदनाम करतो आहे. स्टॅलिनसारखा क्रूर हुकूमशहा! मग तो अस्वस्थ झाला नसता तरच नवल. कटू सत्य हे नेहमी दांभिकांनाच झोंबत का? म्हणूनच मग ते हिंसेवर येतात का?  तसंही हिंसा हे दांभिकतेचं सर्वात ठळक लक्षण!! मग ती शारीरिक असो वा मानसिक. स्टॅलिननं लक्षावधींच्या हत्या घडवून आणल्या.  त्याची सगळी वर्णनं. ती या ग्रंथात आहेत. ती काही स्टॅलिनची बदनामी नव्हे. ते एक सत्य आहे. आता स्टॅलिनचीही काही बलस्थानं नक्कीच होती. साम-दाम-दंड-भेद!! याबाबतीत तो ‘बाप’ माणूस! म्हणूनच तो दुसर्‍या महायुद्धात हिटलरला पुरून उरला. त्या विजयाचं श्रेय. ते स्टॅलिनच्या कर्तव्यकठोर नेतृत्वाचंच. ‘लोहा लोहे को काटता है’असा तो प्रकार. हे सांगताना साधू हातचं काही राखून ठेवत नाहीत; मात्र त्यानं वेळोवेळी घडवून आणलेला अमानुष हिंसाचार! तोही ते सांगतातच. ट्रॉटस्कीबद्दल स्टॅलिनला खुन्नस होतीच. त्यातूनच त्याआधीही ट्रॉटस्कीवर हल्ले झाले. दिनांक 24 मे 1940. या दिवशीही ट्रॉटस्कीवर हल्ला झाला. मेक्सिकोतील त्याचा बंगला. त्यात वीस-पंचवीस जण घुसले. बेसुमार गोळीबार केला. हल्लेखोर कोण होते? तर मेक्सिकन कम्युनिस्ट. कडवे स्टॅलिनवादी होते ते. इतक्या द्वेषाने का पछाडले होते ते? तर ट्रॉटस्कीबद्दल प्रचार करण्यात आलेला. अगदी जगभर. प्रचार अत्यंत विषारी होता तो! त्यातून ट्रॉटस्कीलाच मार्क्सविरोधी ठरवण्यात येत होतं. लेनिनविरोधी ठरवण्यात येत होतं. ट्रॉटस्की अशा हल्ल्यांना मात्र कधीही घाबरला नाही. मग हे हल्ले वैचारिक असो वा शारीरिक. साधू म्हणतात त्याप्रमाणं तो हाडाचा क्रांतिकारक होता. ट्रॉटस्कीच्या मते जागतिक साम्यवादाला कशाचा धोका होता? तर स्टॅलिनवादाचा; मात्र ट्रॉटस्कीचं दुर्दैव काय होतं? ते साधुंनी अचूक सांगितलं आहे. ‘‘त्याची बाजू ऐकून घेणारे फार कमी लोक तेव्हा जगात होते’’ साधू म्हणतात एकतर सोविएत यूनियनमधील सर्व सत्ता. ती स्टॅलिनच्या पायाशी लोळण घेत होती. जगभरातले कम्युनिस्ट. त्यांना स्टॅलिनच प्रिय होता. सत्तेचा हा गुणधर्म. ‘जिसकी लाठी उसकी भैंस!’ त्यात स्टॅलिनची प्रचारयंत्रणा. कशी होती ती? तर ‘गोबेल्स’च्या प्रचारयंत्रणेपेक्षा कुटील व घातकी होती. तसं ग्रंथातच म्हटलं आहे. सरळ वागणारा नेहमीच एकटा पडतो. त्याच्याविरूद्ध एकजात सगळे ‘नीच’ एकवटतात. मानवी आयुष्यातलं हे एक सत्य! अटळ सत्य! ट्रॉटस्कीच्या बाबतीत ते खरं ठरलं. दिनांक 20 ऑगस्ट 1940. घातवार असावा तो. त्या दिवशी पुन्हा हल्ला झाला ट्रॉटस्कीवर. कुर्‍हाडीचे घाव घालण्यात आले त्याच्यावर. घाव घालणारा होता मर्कादर नावाचा स्टॅलिनवादी. मर्कादरच्या दुष्टपणाची हद्द झाली. परिणाम एकच. दिनांक 21 ऑगस्ट 1940. त्या दिवशी ट्रॉटस्की या जगात नव्हता. हे सगळं घडलं तेव्हा नतालिया घरातच होती. तिच्या समोर हा भीषण प्रकार घडला. काय वाटलं असेल तिला? ट्रॉटस्कीला जीवाचं रान करताना पहात होती ती. बरोबर स्वत:चं ग्रंथालय घेऊन फिरत असे ट्रॉटस्की. लिहिताना अनेकदा समाधी लागत असे त्याची. सगळ्या सुखांवर पाणी सोडलं होतं त्यानं. मार्क्सवाद व रशियन राज्यक्रांती. त्यावर अनेक ग्रंथ लिहिले होते त्यानं. नतालिया हे पहात होती. मर्कादरचे घाव जणू तिच्या काळजावर बसले होते. असे भोग अनेक सच्च्या कम्युनिस्ट क्रांतिकारकांच्या वाट्याला आले त्याकाळात. ट्रॉटस्की हा तर लेनिनच्या उंचीचा क्रांतिकारक. त्याचं एकही चरित्र मराठीत नाही. त्याच्या एकाही ग्रंथाचं उत्तम मराठी भाषांतर नाही हेही विषयाच्या ओघात सांगितलेलं बरं.
साधुंची लेखणी पुढं सटॅलिनच्या सत्तेची कहाणी सांगते. ‘‘स्टॅलिन दांडगट होता; मात्र त्याची क्रांतिकारी जिद्द प्रखर होती’’ साधू म्हणतात. स्टॅलिन कठोर होता. निर्दयी होता; मात्र त्याची इच्छाशक्ती!  ती अत्यंत जबरदस्त! प्रश्‍नच नाही! त्यातून त्यानं एक निर्णय घेतला. सोविएत यूनियनमधील सर्व शेती सरकारी मालकीची करण्याचा. पॉलिट ब्युरोचं शिक्कामोर्तब झालं यावर. तो होता 1930 चा जानेवारी महिना. ‘‘बड्या शेतकर्‍यांचा वर्गच समूळ नष्ट केला पाहिजे’’ स्टॅलिनचं हे मत. ते त्यानं कठोरपणे अंमलात आणलं. बड्या शेतकर्‍यांना ‘कुलक’ म्हणत. अशा शेतकरी कुटुंबांची संख्या. ती होती वीस लाख. यातून एकच गोष्ट घडणार होती. रक्तपात! किती भयानक होता तो? तर जुने बोल्शेविक हादरून गेले. त्यांच्या नीतिधैर्याची वाट लागली. त्या भयंकर आठवणी. काहीजणांच्या मानगुटीवर स्वार झाल्या त्या. आयुष्यभर त्यांना छळत राहिल्या. लालसेनेचे काही अधिकारी. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. अनेक कुलक सरळ मारलेच गेले; मात्र याची दुसरी बाजू. मोठी विलक्षण आहे ती! साधुंनी ती सांगितली आहे. काय मत होतं स्टॅलिन समर्थकांचं? ते म्हणत, स्टॅलिनचा यात वैयक्तिक काय फायदा होता? त्यानं हे रशियन जनतेसाठी केलं. साम्यवादी समाज निर्माण करण्यासाठी केलं. इतकंच नव्हे तर अनेक शेतकरी. त्यांनीही स्टॅलिनला पाठिंबा दिला. कोण होते ते? तर या शेतीच्या सामायिकीकरणाच्या प्रयोगात त्यांचीही वाट लागली होती; मात्र त्यांनाही वाटत होतं ते तेच. अन्याय नकोय ना? विषमता नकोय ना? दारिद्रय नकोय ना?  पिळवणूक नकोय ना? साम्यवाद आणायचा आहे ना? मग स्टॅलिनचं चुकलं तरी काय? या मोहिमेला ट्रॉटस्कीचा पाठिंबा होता हे विशेष!  या प्रयोगाचा वाईट परिणाम काय होता? तर 1931 व 1932. या दोन वर्षातली पिकं कोसळली. दुष्काळ पडला. लाखो शेतकरी विस्थापित झाले. अन्न -अन्न करत माणसं मेली. टाचा घासून मेली. किती माणसं बळी पडली? तर त्याचे अंदाज दहा लाख ते पन्नास लाखापर्यंतचे आहेत; मात्र सामायिकीकरण पूर्ण झालं, त्यानंतर काय घडलं? तर शेतीची मध्ययुगीन पद्धत गेली. पारंपारिक जुनी अवजारं गेली. टॅ्रक्टर्सचा तांत्रिक जमाना आला. प्रचंड सामायिक शेतं उभी राहिली एका बाजूला. दुसर्‍या बाजूला तांत्रिक शिक्षणाची केंद्रं उभी राहिली. यंत्रदुरूस्ती केंद्रं उभी राहिली. ट्रॅक्टर्सचे ताफे सामायिक शेतातून फिरू लागले. ग्रामीण भागाचा चेहरा बदलला. दुसरीकडे स्टॅलिनने पंचवार्षिक योजना आणली. औद्योगिकीकरणाचा वेग. तो त्यानं तुफान वाढवला. कोळशाचं उत्पन्न वाढवलं. तेलाचं उत्पन्न वाढवलं. वीजेचं उत्पन्न वाढवलं. पोलादाचं उत्पन्न वाढवलं. अफाट ुउत्पादन! त्याचे आकडे ग्रंथात आहेत. त्यातून रशियाभर बांधकामं ुउभी राहिली. नवी शहरं उभी राहिली. दीड हजार जड उद्योग. ते स्टॅलिनला उभे करायचे होते. प्रचंड कारखाने बांधायला सुरूवात केली त्यानं त्यासाठी. या सगळ्यासाठी राबत होतं कोण? तर लक्षावधी सोविएत यूनियन जनता! सतरा कोटींचा हा देश होता तेव्हा. कम्युनिस्टांनी सगळा देशच हलवून सोडला होता.
लेनिन वारला. चोपन्न वर्षांचा होता तो तेव्हा. नंतरचा काळ हा सगळा स्टॅलिनचाच. स्टॅलिनचं सार्वजनिक आयुष्यच वादळी सगळं! मग अशा माणसांची खाजगी आयुष्यं? ती तरी स्थिर कुठली असायला?  साधुंनी या क्रांतिकारकांची कौटुंबिक आयुष्यंही सांगितली आहेत. 1932 साल होतं ते. स्टॅलिननं सगळा देश मुठीत ठेवला होता तोपर्यंत! अन् त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठलं. त्याची पत्नी नादेइदा अलेलूमेवा उर्फ नादिया. काय करावंतिनं? तर आत्महत्या! आता ही आत्महत्या की हत्या? इथपासून छुपी चर्चा सुरू झाली. स्टॅलिनची दहशत त्यावेळी भयानक!! नंतरच्या काळात काही लेखकांनी शोध घेतला. नादियाच्या मृत्युचा. नेमकंकाय झालं? वेगवेगळे अंदाज केले गेले त्याबद्दल. स्टॅलिननं तिचा सर्वांसमक्ष अपमान केला होता का? म्हणून ती दुखावली गेली? स्टॅलिनचे काही स्त्रियांशी संबंध होते? त्याचा हा परिणाम? मात्र ते तरी खरं होतं का? स्टॅलिन खरंच बाहेरख्याली होता का? समजा असला तरी कसं ठरवायचं? ते किती नैतिक किती अनैतिक ते? आता लेनिनचीही प्रेमप्रकरणं झालीच की. त्याची चर्चा आली आहे एका मराठी ग्रंथात. ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ हा तो ग्रंथ. लेखक वि. स. वाळिंबे. नादियाच्या मृत्युबद्दल एक अंदाज आहे. तो मात्र सत्याच्या जवळ जातो. स्टॅलिन शेवटी सत्ताधारी होता. अत्यंत कठोर होता. निर्दयी होता. त्याच्याकडून रक्तपात होत होता. हत्या होत होत्या. भलेही हे सगळं साम्यवादाच्या नावाखाली होत असेल; मात्र नादिया त्यामुळं अस्वस्थ होत होती. तिची घुसमट होत होती. बरं, आणखी काही गोष्टी होत्या. तिचे वडील. ते स्वत: कामगार होते. नादीया स्वत: बोल्शेविक कार्यकर्ती होती. बोल्शेविक क्रांती! त्यात नादियानं स्वत: सहभाग घेतलेला. अतिशय सुंदर व संवेदनशील स्त्री! तिचं असं वर्णन या ग्रंथात आहे. तिचा मृत्यू. हा तिच्या घुसमटीचा परिणाम असण्याचीच शक्यता जास्त. स्टॅलिनचे व तिचे संबंध. त्याबद्दल साधू एक विलक्षण वाक्य लिहितात. ‘‘नादिया तिच्या संवेदनशील जगात रहात होती व स्टॅलिन त्याच्या कठोर विश्‍वात’’ साधू म्हणतात. वि. स. वाळिंबेंचा अजून एक ग्रंथ आहे. ‘स्टॅलिनची मुलगी’. त्यातही हा विषय आला आहेच. त्यात रोझा कोगोनोविच या स्त्रीचा उल्लेख आहे. तिचा दवाखाना होता. ही स्त्री स्टॅलिनच्या आयुष्यात आली होती. कधी? तर नादियाच्या मृत्युनंतर. पुस्तकात तसं स्पष्ट म्हटलंय. मात्र अजून एक म्हटलंय. या दोघांच्या मैत्रीचं स्वरूप कसं आहे हे म्हणे कुणालाच सांगता येत नव्हतं. इथं एक गंमत होती. रोझा ज्यू होती. स्टॅलिन होता ज्यू द्वेष्टा; मात्र स्टॅलिनसारखा रांगडा व रासवट सत्ताधारी. त्याला काय फरक पडत होता? तसंही जगभरातल्या पुरूषांना एक म्हण लागू पडतेच, ’दिल आया आप पे तो परी क्या चीज है!’
स्टॅलिनच्या कारकिर्दीतील ’सफाई पर्व’ प्रकरण. तेही खूप भयानक होतं. कडव्या कम्युनिस्टांचं एक ठरलेलं असतं. आपलेच पक्ष सहकारी. त्यांची हे हत्या करतात. त्याचं कारण काय सांगतात? तर आम्हाला पक्षाचं शुद्धिकरण करायचं होतं. स्टॅलिनच्या काळातही हे झालंच. खूप निघृणपणे झालं. त्याची अनेक वर्णनं ग्रंथात आहेत. नादिया त्याआधीच वारली बिचारी. नंतरचा हा रक्तपात! तो पाहूच शकली नसती ती. ग्रंथात या संदर्भात दोन प्रकरणं आहेत. एक आहे ’हत्याकांड सूरू झाले.’ दुसरं आहे ’स्टॅलिनचं संहारसत्र.’ या सगळ्याला सुरूवात झाली ती एका हत्येपासून. सर्जेई मिरोनोविच किरोव. कोण होता हा? तर हा होता कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोचा सदस्य. मध्यवर्ती समितीचाही सेक्रेटरी. शिवाय पक्षाच्या लेनिनग्राड समितीचा प्रथम सेक्रेटरी. त्याची हत्या झाली. किरोव हा स्टॅलिनचा लाडका कार्यकर्ता; मात्र स्टॅलिनचा स्वभावच चमत्कारिक! संशयाचं पिशाच्च! ते एकदा का मानगुटीवर बसलं की मग स्टॅलिन कुणाचाच राहत नसे. त्याच्या जवळ असणारे त्याचे सहकारी. त्याच्याशी एकनिष्ठ असलेले. त्यांच्या  जीवालाच सर्वाधिक धोका असे. कुणाकडून? तर खुद्द स्टॅलिनकडूनच. विश्‍वास बसत नाही; मात्र त्याचे असे अनेक सहकारी मारले गेले. कुणाकडून? तर स्टॅलिनकडूनच. अत्यंत थंड डोक्यानं केलं त्यानं हे सगळं! थंड क्रौर्य! क्रुश्‍चेव्हसारखे काही सहकारी. ते मात्र वाचले बिचारे. स्टॅलिनचं हे हत्यासत्र. ते नंतर क्रुश्‍चेव्हनं उघडकीला आणलं. किरोवची हत्या. क्रुश्‍चेव्हच्या मते तीसुद्धा स्टॅलिननंच घडवून आणली होती. सोवियत युनियनमध्ये त्यानंतर हजारो कार्यकर्ते मारले गेले. कम्युनिस्टच होते की ते सगळे; मात्र त्यांचा दोष काय? तर स्टॅलिनला त्यांच्याबद्दल संशय वाटला. त्यांच्या ’मार्क्सवादी’ असण्याबद्दल संशय! मग कुणाला ’ट्रॉटस्कीवादी’ ठरवण्यात आलं. कुणाला ’क्रांतीचे शत्रू’ ठरवण्यात आलं. कुणाला ’ब्रिटिशांचे हेर’ ठरवण्यात आलं. कुणाला ’साम्राज्यवाद्यांचे कुत्रे’ ठरवण्यात आलं. कुणाला ’भांडवलदारांचे चमचे’ ठरवण्यात आलं. कुणाला ’फुटीरवादी’ ठरवण्यात आलं. फुटीरवादी का? तर त्यांनी म्हणे युक्रेन हा प्रांत तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बेलोरशिया तोडण्याचा प्रयत्न केला. पूर्व सायबेरिया तोडण्याचा प्रयत्न केला. सगळा सोवियत युनियनच तोडण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षात अशा हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. 1936 ते 1938. हा तो काळ. हत्या म्हणजे काय? तर ’सरकारी हत्या’ म्हणता येईल याला. कसलं ’सफाईपर्व’ होतं हे? खरंतर ते ’हत्यापर्व’ होतं. साम्यवादी चळवळीच्या नावाखाली झालेलं. अन् त्यात मारलं गेलं कोण? तर सच्चे साम्यवादी कार्यकर्तेच! कोण कोण मारलं गेलं याच्यात? तर 1917 चा उठाव. त्यात कित्येक क्रांतिकारक सहभागी झालेले. त्यातले बरेचजण. ते या सफाईपर्वात मारले गेले. बरं, यात मारले गेलेले कम्युनिस्ट. ते सगळे कडवे फॅसिस्टविरोधी होते. नाझीविरोधी होते. मुसोलिनी हा इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा. काय म्हणला तो तेव्हा? ’’स्टॅलिन फॅसिझमची सेवा करतो आहे. फॅसिझम विरोधकांना ठार मारून.’’ मुसोलिनीचं हे वाक्य. त्यातून एकच जाणवतं. मदतच होती ही स्टॅलिनची फॅसिस्टांना. ती कशी? तर कार्यकर्त्यांच्या अशा बेछूट हत्या! सोवियत युनियन कमकुवत होत होता त्यामुळं. दुसरीकडं जर्मनी प्रबळ होत होता. तिथले फॅसिस्ट उतमातच करत होते. खरंतर फॅसिस्ट काय किंवा स्टॅलिनवादी काय? सारखेच होते की ते! फरक काय होता त्यांच्यात? स्टॅलिनचा एक धूर्त डाव काय होता? तर त्याला पूर्व युरोपची वाटणी करायचीच होती. कुणाबरोबर हातमिळवणी करून? तर याच नाझींबरोबर. नंतर पोलंडचे लचके तोडलेच त्यानं. तर स्टॅलिनही त्याचं राजकारण शिजवत बसला होताच. करायलाही हरकत नव्हती ते. साम्राज्यवाद्यांचं राजकारण. त्याला कोणीतरी उत्तर देणारं हवं होतंच; मात्र सोन्यासारखे आपलेच कार्यकर्ते. तेच मारले त्यानं. शिवाय तो वागला कसा? तर साम्राज्यवादी वाईट की हा वाईट? तसा प्रश्‍न पडावा. ’’जंगलतोड व्हावी तशी सफाईपर्वात कार्यकर्त्यांची छाटणी झाली’’ अरूण साधू म्हणतात. दरम्यान ट्रॉटस्की इशारे देतच होता. त्याच्या मते हिटलरच्या उदयाला स्टॅलिनच जबाबदार होता. जर्मनीच्या कामगार चळवळीतही तेव्हा फूट पडली होती. जर्मनीतला कम्युनिस्ट पक्ष. तो एकाकी पडला. हिटलरनं तिथल्या कम्युनिस्टांवरही मात केली. हे स्टॅलिनमुळं झालं हा ट्रॉटस्कीचा आरोप. स्टॅलिननं आदेश दिले होते. काय? तर जगभरातल्या समाजवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचे आदेश. त्यामुळंच जर्मनीतली कामगार चळवळ दुभंगली. हा आरोप ट्रॉटस्कीचा. अर्थात नंतर स्टॅलिन हिटलरला पुरून उरला. राजकारणातही व युद्धातही;  मात्र या दोघांचे युद्धातले डावपेच. भयानक होते ते!  आपापल्या देशातल्या सैनिकांच्या जीवाची पर्वाच नव्हती त्यात. दोघंही क्रूर व लबाडच होते. राजकारण हा ’बदमाषांचा अड्डा’ झाला दोघांमुळं. त्यांच्या त्यांच्या देशात. बदमाषांना ’माणुसकी’ हा प्रकार माहित नसतो. खोटारडेपणा हे तर बदमाषांचं अत्यंत ठळक लक्षण! दोघांच्याही राजकारणात हा खोटेपणा आहे. एकानं वांशिक राष्ट्रावादाच्या नावाखाली केला तर दुसर्‍यानं जागतिक साम्यवादाच्या नावाखाली. आता राजकारण खेळण्यात ’बाप’ होते दोघंही! त्याबद्दल मात्र शंका नाही! हिटलरनं रशियावर केलेलं आक्रमण! त्यानं जग हादरून गेलं! स्टॅलिन तेव्हा बेसावध होता. त्याचा बराच तपशील ग्रंथात आला आहे; मात्र नंतर तो सावध झाला. भानावर आला. चोवीस तास मग त्यानं युद्धाची सूत्रं हलवली. युद्ध आघाडीला पश्‍चिम रशिया व युक्रेन जवळ होता. तिथं प्रचंड कारखाने होते. किती? तर दीड हजार!! अनेक विद्यापीठं होती. संशोधन संस्था होत्या. त्या स्टॅलिननं पूर्वेला हलवल्या. कुठं? तर व्होल्गा खोर्‍यामध्ये, उरल प्रदेशात व सायबेरियात. प्रचंड मोठी अवजड यंत्रं! ती हलवली. त्यांचे सुट्टे भाग हलवले. लाखो कामगारांच काय? तर त्यांनाही हलवलं. त्यांच्या कुटुंबियांनाही हलवलं. ही सगळीच वाहतूक कशी केली? तर रेल्वेनं. स्टॅलिनची तडफ दिसते अशा प्रसंगात! नोव्हेंबर 1941. नाझी सैन्य कुठं होतं या महिन्यात? तर मॉस्कोपासून अवघ्या वीस ते तीस मैलांवर! मात्र स्टॅलिन मागं हटला नाही. युद्धाचे सगळे बारीकसारीक तपशील. सगळ्यावर त्यानं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं; मात्र वर उल्लेख आला तसा स्टॅलिनची युद्धनीती. ती अत्यंत निर्दयी होती. युक्रेनची राजधानी कीव्ह. तिला जर्मनीचा वेढा बसला. योग्य वेळी माघार घेईल तो स्टॅलिन कसला? त्याला तर ’कीव्ह’ लढवायचंच होतं. तेही एकही इंच माघार न घेता; मात्र त्याचे परिणाम भयंकर होते. एका क्षणी त्यानं माघार घेतली; मात्र तोपर्यंत काय झालं? तर हजारो माणसं त्या वेढ्यात मारली गेली. सोविएत  सैन्याची लांडगेतोड झाली. अनेक लष्करी अधिकारी. अनेक राजकीय अधिकारी. ते मारले गेले. दुसरं महायुद्ध! हा काही सामान्य विषय नाही. त्यात जर्मनी व रशियातील युद्ध! आपण नुसती कल्पनाही करू शकत नाही. कशाची? तर त्यातल्या रक्तपाताची! किती सैनिक मारले गेले असतील दुसर्‍या महायुद्धात सोविएत युनियनचे? ग्रंथाच्या पान क्रमांक दोनशे पन्नासवर हा आकडा आला आहे. किती? तर दोन कोटी!! आता ही संख्या नागरिक व सैनिक दोघांची मिळून असावी. जिज्ञासूंनी त्यासाठी इतर संदर्भग्रंथ पहावेत. या संख्येबद्दल कदाचित मतभेद असू शकतात; मात्र सोविएत रशियन जनतेचा हा सगळा त्याग! त्याबद्दल मतभेद कसे असू शकतील? त्याचकाळात गाजली ती आणखी एक लढाई. त्याचीही वर्णनं ग्रंथात आली आहेत. फार विस्तारानं नाहीत आलेली ती; मात्र  अत्यंत प्रभावी लिहिलंय साधुंनी त्याबद्दल. त्या संदर्भात साधू एका कादंबरीचा उल्लेख करतात. ‘लाईफ अँड फेट’ ही ती प्रचंड कादंबरी! स्टॅलिनग्राडच्या वेढ्यावरची! लेखक कोण? तर वॅसिली ग्रॉसमन. आहे का या ग्रंथाचं तरी उत्तम मराठी भाषांतर? भाषांतरासाठी असे विषय सुचतील तर ना! आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? वाचकांनी वर्णन वाचावं. साधुंनी केलेलं. स्टॅलिनग्राडच्या या लढ्याचं. स्टॅलिनग्राडमधलं प्रत्येक घर! प्रत्येक माणूस! प्रत्येक कामगार! स्त्री-पुरूष! सगळे लढलेत नाझींविरूद्ध! ‘लाईफ अँड फेट’ बद्दल काय म्हणतात साधू? ‘‘या कादंबरीतील वर्णनं उत्कट, अंगावर काटा आणणारी आणि सामान्य रशियन जनतेच्या अफाट माणुसकीचं दर्शन घडवणारी आहेत.’’ स्टॅलिनग्राड हे पूर्वीचं झारित्सिन शहर. व्होल्गा प्रदेशातलं. तिथं घडलेलं हे महाकाव्य! ते आलं पाहिजे उत्तम मराठीत. यत्किंचित वेळ न दवडता. मुळात भाषांतर हा दुय्यम वाड्मय प्रकार नाही. तसा तो मानता कामा नये. तो श्रेष्ठ दर्जाचा वाड्मय प्रकार आहे. फक्त एक मुद्दा आहे इथं. माराठीत येणारं असं भाषांतर. ते थोडंसुद्धा फसता नाही कामा. न  पेक्षा ते न आलेलं बरं. दोस्तोयवस्की हा सुप्रसिद्ध रशियन कादंबरीकार. त्याची जगभर गाजलेली कादंबरी. ‘क्राईम अँड पनिशमेंट.’ मराठीत भाषांतर आलं आहे तिचं; मात्र हातात धरवत नाही ते भाषांतर. आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. ‘गॉन विथ द विंड.’ लेखिका मार्गारेट मिशेल. मराठीत याचंही भाषांतर आहे; मात्र एक पान वाचवत नाही. कसं होणार? ‘तिसरी क्रांती’ सारखे ग्रंथ. असे ग्रंथ ही एक संधी असते. त्या विषयावरच्या आणखी ग्रंथांचं भाषांतर मराठीत आणण्याची. अशा उत्कृष्ट भाषांतराचं भांडार असलं पाहिजे मराठीत. त्यातून मराठी साहित्याला प्रेरणा मिळेल. नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल. कवींना कवितांसाठी विषय मिळतील. वाचकांच्या जाणीवा वाढतील. त्या भिकार राहणार नाहीत. आपल्या कादंबरीकारांच्या अस्सल देशी जाणीवा. त्याही वाढतील. नाटकी, प्रचारकी व खोटा राष्ट्रवाद. त्यातले धोके कळतील. नाहीतर मग आहेच आपलं ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘पूर्वरंग’ नाहीतर गेलाबाजार ‘मृत्यूंजय’. अगदीच डोक्यावरून पाणी गेलं तर ‘एक होता कार्व्हर’. अन् पाणी जास्तच डोक्यावरून गेलं तर? तर ‘मुसाफिर’. ‘एक होता कार्व्हर’ वाचून तर अनेकांची आयुष्यं सार्थकी लागली आहेत. उदात्त सुखांचा ध्यास नको. उदात्त दु:खांचा ध्यास नको. उदात्त यातनांचा ध्यास नको. स्वत:ला अस्वस्थ व त्याचवेळी उन्नत करणारं जगभरातलं साहित्य. त्याचा ध्यास नको. अशांच्या हातात ‘लाईफ अँड फेट’ कशी दिसणार? एक होता लेनिन, एक होता मार्क्स, एक होता गांधीबाबा, एक होता ट्रॉटस्की, एक होता मंडेला, एक होता चे गव्हेरा. याचं भान सुटून उपयोग आहे का? अर्थात हे सगळं वाचल्यावर पुढं काय? तो प्रश्‍न असतोच. आता तो सोडवणं कठीण नसतं फारसं. काय स्वीकारायचं ते वाचक ठरवत जातो. काय नाकारायचं ते ठरवत जातो. मानवी मूल्य स्वीकारायची की हिंसा? असे प्रश्‍न पडतातच. हिंसा काही वेळा अपरिहार्य असते का? असेही प्रश्‍न पडतातच. ही प्रश्‍नोत्तरं. ती वाचकाची जडणघडण करतात. त्याला माणूस बनवतात. निरर्थक हिंसा नाकारण्याची नैतिक ताकद. ती त्याला देऊ पाहतात. फक्त रंजनप्रधान साहित्यात असते का ही ताकद? तर अजिबात नसते. एकाच शब्दात असते ती ताकद! सत्य! अन् सत्य पचवणं सोपं नसतं. ते दाहक असतं. कटू असतं. जालिम असतं. काहीवेळा सुखद व आनंददायीही असतं. हे सगळं सत्य. ते पचवत जाणं महत्त्वाचं. ‘तिसरी क्रांती’ या ग्रंथातही अशी अनेक सत्य आहेतच.
असंच एक भीषण सत्य. साधू ते सांगतात. ‘ऑपरेशन स्प्लिंटर फॅक्टर!’ काय प्रकार होता हा? वाचकांनी तो मुळातून वाचावा. नीट अभ्यासावा; मात्र इथं त्याचा थोडातरी उहापोह गरजेचा. आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा साम्राज्यवादी राजकारण. माणसांच्या जीवाची काही किंमत नसते त्या राजकारणाला. स्प्लिंटर फॅक्टर हा असाच प्रकार होता. पूर्व युरोपात तेव्हा कम्युनिस्टांचाच बोलबाला होता. ‘राष्ट्रवादी कम्युनिस्ट’ असाच त्यांचा उल्लेख लेखक करतो. राष्ट्रवादी हा शब्द. तो इथं संकुचित अर्थानं घेता येत नाही. त्याचा खरा अर्थ काय? तर प्रागतिक! उदारमतवादी! बुद्धिवादी! निस्वार्थी! तर असे कम्युनिस्ट सत्तेवर होते पूर्व युरोपात. कुठं कुठं? तर पोलंडमध्ये होते. हंगेरीत होते. बल्गेरियात होते. झेकस्लोव्हाकियात होते. रूमानियात होते. पूर्व जर्मनीत होते. स्वातंत्र्य व साम्यवादी चळवळ. या दोन गोष्टींसाठी आयुष्याचा होम केलेली ही माणसं! नाझींशी लढलेली! दुसरं महायुद्ध संपलं. मग हे कम्युनिस्ट सत्तेवर आले; मात्र राजकारण निष्ठूर असतं. काय कारस्थान शिजलं? त्या सगळ्या राष्ट्रवादी कम्युनिस्टांविरूद्ध? तर स्टॅलिनच्या मनात विष कालवण्यात आलं. कुणाबद्दल? तर याच कम्युनिस्टांबद्दल. हे होतं संशयाचं विष! तेव्हा स्टॅलिन फक्त सोविएत युनियनचंच राजकारण करत नव्हता. तो पूर्व युरोपातही राजकारणातले डावपेच लढवत होता. त्यातून वरील राष्ट्रांमध्ये रशियन हेर वावरत होतेच. त्यांनी केवळ संशयावरून या सत्ताधारी कम्युनिस्टांकडे बोट दाखवलं. त्यातून या सगळ्या पूर्व युरोपीय देशात भूकंपच झाले. हे नेमकं सांगायचं तर काय होतं? तर युरोपातील ‘सफाईपर्व!’ पुन्हा अटका! कारागृह! फायरिंग स्क्वॉड!! हजारो सच्चे कम्युनिस्ट कार्यकर्ते. ते ठार झाले. रक्ताचे पाट वाहिले. हे सगळं कुणी घडवून आणलं? तर अमेरिकेनं. त्याचा मुख्य सूत्रधार कोण होता? तर अलन डलेस. हा अमेरिकेच्या गुप्तहेर विभागात होता तेव्हा. त्यानं आणलेली ही योजना! ऑपरेशन ‘स्प्लिंटर फॅक्टर’! आंतरराष्ट्रीय राजकारण कसं असतं? तर ते दिसतं तसं नसतं इतकंच म्हणता येईल. लेखकानं इथं हे सगळं विस्तारानं सांगितलं आहे. हे सांगण्याआधी लेखक सांगतो पोलंडमधल्या उठावाची कहाणी. दुसर्‍या महायुद्धातला हा उठाव! पोलिश जनतेनं केलेला. कुणाविरूद्ध? तर नाझींविरूद्ध! हिटलरच्या सैनिकांविरूद्ध! तो दिवस होता दिनांक 1 ऑगस्ट 1944. दोन महिने लढलं ‘वॉर्सा’ हे शहर! पोलंडची राजधानी असलेलं हे शहर; मात्र स्टॅलिननं इथं काय करावं? तर अत्यंत निघृण विश्‍वासघात!! कुणाचा? तर वॉर्सातील या लढवय्या जनतेचा! परिणाम? परिणाम एकच! नाझींकडून वॉर्सातील लढवय्या कार्यकर्त्यांचा ‘कत्लेआम‘ झाला! तिथल्या गल्लीबोळात प्रेतांचा खच पडला. दोन लाख पोलिश नागरिक! ते मारले गेले या शहरात! स्टॅलिननं काय केलं इथं? ते वाचकांनी मुळातूनच वाचावं.
पुढं या ग्रंथात नंतरचा काळ येतो. दुसर्‍या महायुद्धानंतरचा. लेखक मग मिखाईल गोर्बाचेव्हबद्दल सांगतो. ते ऐंशीचं दशक. मिखाईल गोर्बाचेव्ह. हा माणूस सत्तेवर आला. त्यानंतर काय काय घडलं? तो सगळा इतिहास! तो सुद्धा चक्रावून टाकणारा आहे. चांगल्या अर्थानं चक्रावून टाकणारा. गोर्बाचेव्ह हा गांधीजींच्या तोडीचा महापुरूष! प्रश्‍नच नाही! अरूण साधू त्यांना ‘महामानव’च म्हणतात. सत्तेवर गोर्बाचेव्ह आले. कशी होती त्यांच्या सत्तेची सुरूवात? तर ती सावध होती. चाणाक्ष होती. कठोर होती व प्रसिद्धीविन्मुख सुद्धा! अरूण साधू असं नेमकं वर्णन करतात. काय होता गोर्बाचेव्ह यांचा निर्धार? त्यांचा दृष्टिकोन? त्यातून पुन्हा किती उलथापालथी घडल्या? ते वाचकांनी वाचलंच पाहिजे; मात्र या उलथापालथी अहिंसक होत्या. त्यातून जगभर भूकंप झाले; मात्र तेही अहिंसक! पूर्वीचे सत्ताधारी. त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते गोर्बाचेव्ह. ‘‘ मला ‘कम्युनिझम’चा मानवी चेहरा जगापुढं आणायचा आहे’’ ते म्हणत. त्यात ते यशस्वी झाले का? खरंतर यात गोर्बाचेव्ह यांचाच मानवी चेहरा समोर आला. स्टॅलिनचा काळ. नुसताच रक्तपात नाही झाला तेव्हा, तर रशियातील बौद्धिक वातावरण. ते घुसमटून गेलं होतं. तिथली वृत्तपत्रं व साहित्यव्यवहार. काही वाव नव्हता त्यांना स्टॅलिनच्या काळात. स्टॅलिन वारला. मग हे साहित्यव्यवहार सुरू झाले. स्टॅलिननंतर सत्तेवर आला निकिता क्रुश्‍चेव्ह. अफाट ऊर्जेचा माणूस! स्टॅलिनचं हत्यासत्र. त्यातून हाच तेवढा वाचला. बालपणी क्रुश्‍चेव्हच्या वाट्याला आल्या होत्या चारच गोष्टी. दारिद्रय! भूक! उपासमार! अन् काबाडकष्ट! हीच परिस्थिती गोर्बाचेव्हचीही होती. सोविएत युनियनमधील सामायिक शेती. तिथं बारा-बारा तास कष्ट उपसले होते गोर्बाचेव्हनं त्याच्या बालपणी.  गावात  ’मशीन ट्रॅक्टर केंद्र’ असत. तिथं गोर्बाचेव्ह काम करत. कंबाईन ऑपरेटर म्हणून. भरलेल्या शेतातलं पीक कापावं लागे. त्याचे दाणे बाजूला करण्याचं मशीन असे. प्रचंड मशीन! हे मशीन गोर्बाचेव्ह चालवत. सततचे दुष्काळ व दुसरं महायुद्ध. त्यातली मनुष्यहानी भीषण होती. बारा ते सोळा वर्षातील शाळेतील मुलंमुली. त्यांना शेतात काम करावं लागे. कारखान्यात काम करावं लागे. सक्तीनं करावं लागे. अर्थात वर्षातून ठराविक वेळाच असत त्याच्या; मात्र त्यात कुचराई चालत नसे. परिस्थिती कशी होती? तर शाळा सुरू होत नसत पीक निघाल्याशिवाय. तर मुद्दा असा, क्रुश्‍चेव्ह व गोर्बाचेव्ह. दोघांनी सकारात्मक कामांवर भर दिला. आपलं बालपण करपलं म्हणून समाजावर सूड उगवत बसले नाहीत ते. सगळी सत्ता त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. त्याची हवा डोक्यात जाऊ दिली नाही त्यांनी. गोर्बाचेव्ह यांच्या बाबतीत तर हे ठामपणे सांगता येईल. आता क्रुश्‍चेव्हचं मोठेपण कुठं आहे? तर त्यानं मॉस्को शहराची पुनर्बांधणी केली. मॉस्कोची जगप्रसिद्ध भुयारी रेल्वे. तिचं काम त्यानं मार्गी लावलं. रशियातलं त्यावेळचं सर्वोच्च ‘लेनिन’ पारितोषिक ते मिळालं त्याला या कामाबद्दल. दिनांक 24 फेब्रुवारी 1956ची रात्र. रशियन कम्युनिस्ट पक्षाची विसावी परिषद. स्थळ मॉस्को. क्रुश्‍चेव्हचं त्या रात्री ऐतिहासिक भाषण झालं. किती तास? तर तब्बल चार तास!! स्टॅलिनचं क्रूर राजकारण व त्यानं घडवून आणलेल्या हत्या. क्रुश्‍चेव्हनं त्या भाषणातून सांगितल्या. पुढं गोर्बाचेव्ह यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पेरस्त्राईका‘ व ‘ग्लासनोस्त’(पुनर्रचना व पारदर्शी मोकळेपणा.) अरूण साधुंच्या मते या घोषणांची बीजं. ती क्रुश्‍चेव्हच्या या भाषणात होती. जगभरातले स्टॅलिनवादी कम्युनिस्ट. ते क्रुश्‍चेव्हच्या भाषणानं हादरून गेले. अगदी जगभरातले सगळे कम्युनिस्ट. त्यांनाही या भाषणाची दखल घ्यावी लागली. क्रुश्‍चेव्हचा व्यक्तिगत त्यागही मोठा. त्याचा मोठा मुलगा लढाऊ वैमानिक होता. तो जर्मनीविरूद्धच्या लढाईत मारला गेला; मात्र  क्रुश्‍चेव्ह त्या दु:खातूनही बाहेर पडला. क्रुश्‍चेव्हनं ‘युक्रेन’ प्रांताची देखील पुनर्बांधणी केली. कधी? तर युद्धोत्तर काळात. ते करताना त्यानं स्टॅलिनचा विश्‍वास कमावला होता हे विशेष!  मारून मुटकून करावं लागलं त्याला हे; मात्र करणार काय? स्टॅलिनपासून स्वत:ला जिवंत वाचवण्याची कसरत साधी नव्हती. ती त्याला करावी लागली. तसंही क्रुश्‍चेव्हकडे राजकीय संयम अफाट होता असं म्हटलं पाहिजे. अर्थात क्रुश्‍चेव्हनंही त्याच्या सत्ताकाळात दडपशाही केलीच. पोलंड व हंगेरी. हे दोन देश. तिथं त्यानं एका अर्थानं ‘स्टॅलिनशाही’च गाजवली. त्यापैकी हंगेरीत तर त्यानं उतमातच केला. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट. तिथं क्रुश्‍चेव्ह वागला ते स्टॅलिनपेक्षा वेगळं नव्हतं. हंगेरीचा खरा कम्युनिस्ट क्रांतिकारक इम्रे नागी. त्याच्या सात हजार समर्थकांना बुडापेस्टमध्ये ठार मारण्यात आलं. नंतरच्या काळात नागीलाही. काय प्रकरण होतं ते? तर ते वाचकांनी ग्रंथातच वाचावं; मात्र क्रुश्‍चेव्हच्या सत्ताकाळात रशियाची एकूण प्रतिमा सुधारली. साधुच तसं सांगतात. ती प्रतिमा ‘उदारमतवादी देश’ अशी झाली. ‘प्रगतिशील देश’ अशी झाली. ‘उत्साही देश’ अशी झाली. ‘गरीब राष्ट्रांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी उदारपणे मदत करणारा समाजवादी रशिया’ अशी ही ती प्रतिमा झाली. याचं आणखी एक कारण साधू सांगतात. क्रुश्‍चेव्हचं दिलखुलास व्यक्तिमत्व. काही प्रसंग. त्यात क्रुश्‍चेव्ह कठोर वागला; मात्र तो पाताळयंत्री व क्रूर होता का? तर तसं म्हणता येत नाही. त्याच्याकडे एक संयमी शहाणपणही होतं. रशिया व अमेरिकेत युद्ध पेटण्याची वेळ आली होती. कशावरून? तर ‘क्यूबा’मध्ये अण्वस्त्र ठेवण्यावरून. अक्षरश: अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते दोन्ही देश! जगानं श्‍वास रोखून धरलेले. त्यावेळी क्रुश्‍चेव्हनं दाखवलेलं संयमी शहाणपण सगळ्या जगानं पाहिलं. त्यानं क्यूबात आणलेली अण्वस्त्र मागं घेतली. हा सगळा तपशिलही वाचकांनी आवर्जून वाचावा असा.
पुढं गोर्बाचेव्ह यांचे निर्णय. ते एकाहून एक अफलातून ठरले. अमेरिकेशी चाललेली अण्वस्त्रस्पर्धा. ती त्यांनी थांबवली. या दोन देशातली महाभयंकर खुन्नस! ती त्यांनी कमी केली. अफगाणिस्तानात रशियन फौजा होत्या. त्या त्यांनी काढून घेतल्या. त्यामुळं रशियन सैनिकांची मोठी प्राणहानी टळली. अणुयुद्धाची भीती. त्यातून जगाला बाहेर काढलं त्यांनी. बर्लिनमधील भिंत पडली व जर्मनीचं एकीकरण झालं. त्यामागं गोर्बाचेव्ह यांची धोरणंच होती. पूर्व युरोपात त्यावेळीही कम्युनिस्ट सत्तेवर होतेच. कुठं कुठं सत्तेवर होते ते? तर पोलंडमध्ये होते. हंगेरीत होते. पूर्व जर्मनीत होते. झेकोस्लोव्हाकियात होते. रूमानियात होते. अल्बानियात होते. त्या कम्युनिस्ट राजवटी. त्या धडाधड कोसळल्या. तिथली कम्युनिस्ट दडपशाही. ती जनतेनं झुगारली. खर्‍या स्वातंत्र्यासाठी तिथं उठाव झाले. त्यामागं प्रेरणा गोर्बाचेव्ह यांचीच होती. गोर्बाचेव्ह यांना शांततेचं ‘नोबेल’ मिळालं. फक्त एक झालं. गोर्बाचेव्ह हे सोविएत युनियनला एकसंघ नाही ठेवू शकले. खूप इच्छा असूनही त्यांना ते करता आलं नाही. सोविएत युनियनचे तुकडे पडले. एका महासत्तेचा अंत झाला. कसं घडलं हे सगळं? ते वाचकांनी अरूण साधुंच्याच शैलीत वाचावं. चक्रावून टाकणारा सगळा काळ आहे तो! बेलारूस हा प्रांत. तो सोविएत युनियनमधून फुटला. जॉर्जिया फुटला. युके्रन फुटला. अर्मेनिया फुटला. कझाकस्तान फुटला. ताजिकीस्तान फुटला. उझबेकिस्तान फुटला. या फाटाफुटीचे परिणाम? तेही होतेच. तेही साधुंनी सांगितले आहेत. ग्रंथाच्या शेवटी हा सर्व भाग आलाय. तो वाचकांनी काळजीपूर्वक वाचावा असा. गोर्बाचेव्ह यांच्यानंतर सत्तेवर आला बोरिस येल्त्सिन. त्यानं  सर्वच क्षेत्रात उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. या उदारीकरणाचा एक परिणाम अटळ असतो. अनेक क्षेत्रात ‘माफिया’ तयार होतात. रशियातही हे कसं झालं? ते वाचकांनी मुळातून वाचावं.
शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. भौतिक सुधारणा. त्यासाठी जगभर उलथापालथी होतात अशा. मार्क्सनं हेच तर ठासून सांगितलं. काय? तर मानवजातीला आधी अन्न हवं. पाणी हवं. निवारा हवा. वस्त्र हवं. अन् ते राजकारण, शास्त्र, कला, धर्म याच्या आधी व्हावं. बाकीच्या गोष्टी नंतर. डार्विननं सचेतन सृष्टीचा नियम शोधला. मार्क्सनं मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम शोधला. अरूण साधू हा मुद्दा ग्रंथाच्या सुरूवातीलाच मांडतात; मात्र भौतिक सुधारणांनंतर पुढं काय? ते शेवटी हा प्रश्‍नही विचारतातच. त्याचं उत्तरही ते देतात. ‘राजकीय तत्वज्ञानांना विशुद्ध व वैज्ञानिक अध्यात्माची जोड’ हे ते उत्तर. भांडवलशाही प्रतिगामी होतीच. कधी? तर मार्क्सनं मार्क्सवाद सांगितला तेव्हा. तेव्हा ती कामगारांना छळणारी होती. शोषण करणारी होती. साम्यवादानं केलं काय? तर या भांडवलशाहीवर जगभरातच दबाव आणला. तिला कल्याणकारी व्हायला भाग पाडलं बर्‍याच ठिकाणी. कामगार कायदे त्यामुळं जगभर सुधारले. प्रागतिक झाले. हे साम्यवादाचं यश. याचा एक अर्थ असा. साम्यवादाच्या अशा यशातच साम्यवादी चळवळीचा अंत आहे. कारण भांडवलशाही मानवी कल्याणाचा विचार करणार असेल तर? तर तिला उत्तर द्यायला साम्यवादाची गरज उरत नाही; मात्र हे सगळं इतकं सोपंही नाही. विशेषत: आपल्यासारखे देश. त्यांना सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागेल. शोषण व हिंसा. मानवी इतिहासाला चिकटलेल्या या गोष्टी. त्याच्या मुळाशी जावं लागेल. हे फार गुंतागुंतीचे प्रश्‍न आहेत; मात्र उत्तरं शोधावी लागतील. देशाची एकसंघता! तिला अत्यंत काळजीपूर्वक जपूनच ही उत्तरं शोधावी लागतील. अरूण साधुंचा ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. हे प्रश्‍न निर्माण करतोच. त्या प्रश्‍नांचा विचार करायला भाग पाडतो आपल्याला. हे या ग्रंथाचं व लेखक म्हणून अरूण साधुंचं मोठं यश! याच प्रश्‍नाची उत्तरं लक्षावधी कॉम्रेडस् शोधत होते जगभर! त्यांना खरोखर लाल सलाम; मात्र अहिंसक लाल सलाम!! हा सलाम त्यांच्या स्वार्थत्यागाला!! त्यांच्या धैर्याला!! त्यांच्या प्रागतिक दृष्टिकोनाला!! अन् हो, एक नम्र लाल सलाम त्या मार्क्सबाबाला व जेनी मार्क्स नावाच्या त्याच्या अंबाबाईलाही!! अन् यासाठी कम्युनिस्टच असायला पाहिजे असा काही नियम नाही.
- महेश मांगले 

९८२२०७०७८५ 
मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६