Monday, March 23, 2015

'मसाप’चा अव्यापारेशु व्यापार!


राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाच्या नावाखाली माकडचाळे; लाखोंचा चुराडा


 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात एक-दोन स्थानिक कलाकारांच्या एकांकिका वगळता दुसरे काहीच झाले नाही. पाहुण्यांना यायला उशीर झाला म्हणून वेळ मारून नेण्यासाठी एका कलाकाराने मिमिक्रीच्या नावाखाली नुसतेच माकडचाळे केल्याचे पहायला मिळाले.
नाट्य क्षेत्रातील अभिराम भडकमकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते नाट्य-साहित्यावर कमी आणि व्यवसाय प्रशिक्षणावरच जास्त बोलले. व्यवसाय निष्ठेने करावा, नैतिकतेने करावा, कल्पकतेने करावा या विषयी भडकमकर भरभरून बोलले. मात्र नाट्यसाहित्य कसे लिहावे, त्याचे नियम काय, संवाद लेखन कसे असावे, नेपथ्य कसे असावे यावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
या राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाला रंगभूमीवरील एकही कलाकार उपस्थित नव्हता, हे दुर्दैवच. येथील काही तुरळक युवकांशी संवाद साधण्यास एकाही नाट्यलेखकाची उपस्थिती नव्हती. कार्यकारिणी सदस्यांची व्याख्याने आयोजित करून 'मसाप’ने या युवा नाट्यसाहित्य संमेलनाची बोळवण केली.
चित्रपट आणि साहित्य या विषयावर बोलताना राज काझी यांनी तर साहित्यातील गुणवत्तेचा मुद्दा बाजूला ठेऊन मार्केटींगलाच महत्त्व असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे युवा नाट्य-साहित्य संमेलन भरकटल्याचे पहायला मिळाले.
समारोपाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. संमेलनाचे सभामंडप तीनही बाजूंनी पडद्यांनी बंदिस्त असल्यामुळे जे काही जेमतेम श्रोते होते. मात्र उकाड्याने ते हैैराण झाले. कसलेही पूर्वनियोजन नसलेले हे युवा नाट्य-साहित्य संमेलन घाईघाईने उरकण्याचा अट्टहास 'मसाप’ने का केला असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
(साप्ताहिक चपराक २३ मार्च २०१५)   

Wednesday, March 18, 2015

मराठी मातीतल्या 'अस्सल' कविता!


लहानथोरांपासून सर्वांच्याच भावविश्‍वाला साद घालणारा वाङ्मयप्रकार म्हणजे कविता. वास्तविक मानवी जीवनच काव्याने भरून राहिलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच कविता ही प्रत्येकाला कायमच सर्वाधिक जवळची वाटते. ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेल्या ‘अक्षरगाणी’, ‘सुंबरान’, ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘दाटुनी येताहे काळोखी काहूर’ या चार कवितासंग्रहांच्या निमित्ताने याची पुनर्प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

बालसाहित्य वा बालकविता हा तर साहित्याचा उगमस्रोतच मानता येईल. उगमाजवळचा नदीचा प्रवाह जितका सोपा वाटतो, तितकाच तो खडतर असतो. बालसाहित्याबाबत तसेच म्हणावे लागेल. बालसाहित्य वा काव्यलेखन जितके सोपे दिसतेे, तितकेच ते अवघड आहे. बालगोपाळांना समजेल, आवडेल, त्यांच्या कोवळ्या मनाचा ठाव घेईल, अशा शब्दांत लिहिण्यासाठी मुळातच लिहिणार्‍याला आधी लहान व्हावे लागते. तीच बालसाहित्यिकाची पूर्वअट असते. त्यात बालकवितेसारखा प्रकार हाताळायचा असेल, तर कवीचा अक्षरशः कस लागतो. संदिपान पवार यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आहे.
 पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा एक अभिनव प्रयोग आहे. लहानमुलांना या गाण्यातून वा कवितेतून स्वर-व्यंजनांची अर्थात मूळाक्षरांची ओळख करून देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न त्यांनी केला आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेत या माध्यमातून त्यांनी मुलांशी संवाद साधला आहे. स्वाभाविकच अक्षरओळख करण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक पालक, शिक्षक सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते.
‘अ’ हा पहिला स्वर. स्वाभाविकच अक्षरगाण्यांची सुरुवात या स्वरापासूनच सुरू  होते.
अननसाचे अ आहे
पहिले मूळाक्षर
पाठांतर करू चला
होऊ सारे साक्षर
अशा प्रकारे गाण्यातून पवार ‘अ’ अननसाचा धडा देतात. शिवाय साक्षरतेचे बीजही मनात रुजवतात. यानंतर आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः यांसारख्या स्वरांचीही चार ओळीतल्या गाण्यातून ते ओळख करून देतात.
अं च्या अंबारीत
बसता राजा
हत्ती चाले पुढे
वाजे बेंडबाजा
 अशा प्रकारच्या लयबद्ध व तालबद्ध ओळी या संग्रहात असून, त्या निश्‍चितच मुलांना झुलवणार्‍या, नाचवणार्‍या आहेत.
 कुठलीही गोष्ट गाण्यातून सांगितली, की ती मुलांना पटकन समजते, हा बालमानसशास्त्राचा सिद्धांत आहे. पवार यांनी या सिद्धांतावरच्या पायावरच आपली सरळमार्गी व रोजच्या व्यवहाराच्या भाषेत बोलणारी कविता फुलविली आहे.
कमळाचे क अक्षर
व्यंजन पहिले
आवडते देवाला
कमळ वाहिले
अशी क ते ज्ञपर्यंत पुढे जाणारी कविता मुलांचे अक्षरज्ञान अधिकच ठळक करते.
पंख असता परि
पायावर चालणारा
श चा शहामृग
पक्षी असे पळणारा
 यातून मुलांना शहामृग पक्षाच्या या वैशिष्ट्याचेही ज्ञान होते. स्वाभाविकच मुलांना परिसराचे, भोवतालचे ज्ञान व्हावे, यादृष्टिने अशा काही ओळी महत्त्वाच्या ठरतात.
ज्ञ चे ज्ञानोबा
आळंदीला आले
ज्ञानेश्‍वरी लिहिली
अन् देवची झाले
 हा काव्यसंग्रहाचा समारोपही तितकाच भावणारा आहे. मुख्य म्हणजे ही कविता मुलांच्या मनातील अनेकविध संकल्पना दृढ करणारी आहे. शिक्षण आनंददायी व्हावे, असे आपण नेहमीच म्हणत असतो. मात्र, प्रत्यक्षात त्यादृष्टिने काही घडताना दिसत नाही. पवार यांनी त्यादृष्टिने अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूळाक्षरांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचा हा प्रयोग निश्‍चितच सर्वांसाठी आनंददायी ठरेल, यात संदेह नाही. किंबहुना, ऋ, लृ यांसारख्या मूळाक्षरांचा कुठे उल्लेख दिसत नाही. ऋषी, ऋतू, ऋजुता, ऋग्वेद, ऋचा यांसारखे कितीतरी शब्द सातत्याने वापरले जातात. त्यामुळे ‘ऋ’चा उल्लेख असायला हवा होता, असे वाटते. ‘लृ’ हा केवळ क्लृप्तीपुरता सीमित राहिला आहे. याशिवाय काही अनुनासिक मूळाक्षरे गायब झाली आहेत. त्यांचा अनुल्लेख औचित्याला धरूनच आहे. याशिवाय काही ओळींमध्ये यमक वा उपमा कृत्रिम वाटतात. हा अपवाद सोडल्यास ही अक्षरगाणी, त्यांना साजेेशी चित्रे, मांडणी सुबक अशीच आहे.
कवी प्रभाकर बळवंत चव्हाण यांच्या ‘सुंबरान’ या काव्यसंग्रहातील कविता या संत तुकाराम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘अभंगगाथे’चा व ‘ग्रामगीते’चा वारसा सांगणार्‍या आहेत. भूपाळी ते प्रार्थना अशी उलगडत जाणारी ही कविता बहुपदरी अन् बहुआयामी आहे. तिच्यात अनेकविध सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली आहेत. या कवितेतून चव्हाण यांचे सामाजिक भान, प्रबोधनाप्रतीची निष्ठा अन् सर्वधर्मसमभावाचा व्यापक दृष्टिकोन ठसठशीतपणे अधोरेखित होतो.
या कवितेतून कोकणच्या नितांत सुंदर निसर्गाचे अत्यंत रमणीय दर्शन घडते. ‘साद’ ही कविता सृष्टीसौंदर्य व भावभावना याचा उत्कृष्ट आविष्कारच म्हटला पाहिजे.
 
गिरी माथी शोभल्या आम्रतरूच्या ‘ओळी’
 काजूंची मौक्तिके सुवर्णात गुंफलेली
 तरळतात अजुनी आठवणींच्या लाटा
 फणसाच्या कुशीत भरला अमृत साठा
 कोकणातील आंबा, काजू, फणसाची कूस, आठवणींच्या लाटा अशा प्रतिमा मन मोहवून टाकणार्‍या आहेत. याशिवाय श्र्र्ावणातील मखमल, भुईचंपकासह जंगम-संगम झुळझुळ घाट अन् कवीने ओवलेल्या शब्दफुलांच्या माळा त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचीच साक्ष देतात.
 चव्हाण यांची कविता अंधश्र्र्द्धा, कर्मकांडावर कठोर प्रहार करते. मात्र, ती नास्तिकही नाही. माणूसपण, मानवता हा या कवितेचा मूलस्रोत आहे. जात, धर्म, पंथात ही कविता अडकत नाही. सर्वधर्मांचा, प्रतीकांचा आदर करणारी, समस्त मानव जातीवर इतकेच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणी, निसर्ग यांच्याशी ऋणानुबंध असलेली ही कविता आहे. चव्हाण यांची ही प्रगल्भ कविता जातीधर्माच्या अस्मिता टोकदार होत जाणार्‍या आजच्या काळात कोणत्याही माणसाला विचारप्रवण करते. त्याच्यातील माणूसपण, आत्मभान जागवते.
धर्म नव्हे जात, शुद्र वा विटाळ ।
प्रेमाचा सुकाळ । धर्म जाणा ॥
धर्म नव्हे स्वार्थ, क्रौर्य रक्तपात ।
कारुण्य सवेत । धर्म जाणा ॥
 चव्हाण यांची कविता धर्माकडे या दृष्टिने पाहते. या कवितेतील विचार हा सर्वव्यापी आहे.
   बलदंड वर्धमान, सत्य, अहिंसा संयम
   प्रज्ञा, शील, करुणेने बुद्ध शांतीचा संगम
   पैगंबरांचा सबक मक्का, मदिना पवित्र
   कोणी अनाथाचे नाथ, त्यांचे वाचावे चरित्र
आणि
 गावी संतांची वचने ज्ञाना, तुकाचा जागर
 सज्जन वा प्रज्ञावंत जनसेवक जे थोर
 मग सवत्या चुलीचा, ‘धर्म सुभा’ का सवता?
 घ्यावा उमजून तरी, ‘खरा धर्म मानवता’
 अशी मानवतेवर विश्‍वास असणारी ही कविता आहे.
 नेत्रदान, पाणी बचत, आरोग्याचा संदेश, राष्ट्रकल्याण, तरुणाईला संदेश अशी या कवितेची अनेक अंगे आहेत. त्यामागे प्रत्येकाचे सामाजिक भान वाढावे, हाच शुद्ध उद्देश आहे.
  म्हणून हे सुंबरान मांडीलं व माय
            जनता जनार्दना ॥
साधू, भोंदू, कर्मकांडे; चमत्कारे केली कोंडी
ढोंगी भोगी बाबा-बापू, तया रोज तूप हुंडी
‘खर्‍या देवा बुडविले’, नादी लागोनी पाखंडी
करणी-धरणीत गाडीला, सोन्या धनगरांचा धोंडी
विज्ञानाचे मारेकरी, क्रूर सैतानांच्या झुंडी
झणी उठा वारकरी, छेडा विवेकाची वीणा ॥
असं म्हणत ही कविता सुंबरान आळवते. चव्हाण यांच्या कवितेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेचा विलक्षण प्रभाव दिसतो.
ग्रंथ पुस्तके वाचून, जरी केला असे चोथा ।
जीवाभावानं वाचावी, वेचावी ती ग्रामगीता ॥
अन्
तुझ्या-माझ्या अस्तित्वात, सकारात्मक जीवन ।
आनंदाची अनुभूती, आस्तिकत्व चिरंतन ।
तुकोबांच्या अभंगात, दिव्य मायेची पाखर ।
ग्रामगीता तुकडोजींची, मानवतेचे मंदिर ॥
ही कविता या संग्रहाचा कळसाध्यायच मानता येईल.
कवी माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’ हा कवितासंग्रह मराठी कवितेसाठी वेगळे परिमाण ठरू शकेल, असा आहे. मराठी साहित्यात आईवर विपुल लेखन झाले आहे. हे लेखन हळवे, उत्कट व काळजाचा ठाव घेणारे असे आहे. तुलनेत बापावर मोजकेच लेखन झाले आहे. काही अपवाद वगळता हे लेखन रूक्ष, कोरडे या सदरात मोडणारे आहे. गिर यांची कविता या सर्वाला छेद देणारी आहे. या कवितेचे विशेष म्हणजे ती अस्सल मातीशीच नव्हे, तर बापाशी नाळ असलेली आहे. शेतात राबणारा बाप इतक्या उत्कटतेने, तळमळीने गिर यांनी या कवितेतून पुढे आणला आहे, की त्याच्या भेटीने कोणताही माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्या अर्थी घरदार, शेतामातीसाठी हाडाची काडं करणार्‍या बापाला गिर यांनी खर्‍या अर्थाने न्याय दिला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मानेवर जू ठेऊन
ढेकळा धस्कटातून
चालत राहतोस...
उन्हातान्हात बैलामागून
आपलीच हाडे जाळून घेतोस..
कष्टाचे डोंगर उपसणार्‍या बापाचे हे दुर्लक्षित रूप कवी मोठ्या ताकतीने कवितेतून उभं करतो. ‘बांधावरचा लिंब’ या कवितेतून तर कवीने बांधावरच खितपत पडलेल्या वा उपेक्षित राहिलेल्या बापाला जगासमोर आणले आहे.
बांधावरचा हा लिंब मला
बापासारखा वाटतो
ऊन, वारा, पाऊस झेलून
गायी, गुरं, वासरं अन् वाटसरू
या सर्वांना आसरा देतो
 हा कवितासंग्रहाचा उत्कटबिंदूच मानला पाहिजे. यानंतरही या कवितासंग्रहात ठायी ठायी बाप येतो. गाव, शेत, शेतकरी, त्याचं जगणं, सावकारी पाश अशा अनेक अंगानी कविता फुलत जाते. मात्र, बाप हाच या कवीचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे बापच सर्वत्र भरून राहतो.
गिर यांच्या कवितेतून मातीवरील श्र्र्द्धा व भक्तीचेही दर्शन घडते.
नाही पंढरीला आलो
तुझ्या दर्शनाला देवा
काळ्या मातीत राबतो
घेई जाणून तू सेवा
 या काव्यओळी तर संत सावता माळी यांच्या कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी॥ या अभंगाशी नाते सांगणार्‍या आहेत. गोरगरिबांचा देव असणार्‍या विठ्ठलावर कवीचे अतीव प्रेम आहे. किंबहुना, खरा विठ्ठल कवीला मातीत, शेताशिवारात, पिकापाण्यातच सापडतो.
तुझा राऊळ कळस
दिसे माझ्या शेतातून
तुझी सावळीशी मूर्ती
हाले माझ्या पिकातून
अथवा
काय मागू तुझ्यापाशी
तू रे बडव्यांचा दास
नाही पंढरीला येत
मी हा पूजतो मातीस
 यांसारख्या कवितांतून कवीची मातीवरील श्र्र्द्धाच अधोरेखित होते.
शेतात राबराब राबूनही शेतकर्‍याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. या व्यवस्थेत शेतकर्‍याच्या पदरी पिळवणूकच येते. डोळ्यात ऊस जळताना, टाबून टाकली उरात कळ, यातून शेतकर्‍याचं दुःख अत्यंत तीव्रतेनं प्रकट झालं आहे.
पाऊस हा शेतकर्‍यांचा जीव अन् जीवन. शेतकर्‍याच्या जीवनात पावसाला काय स्थान आहे, हे ‘अशी मिरगाची झड’ या कवितेतून सांगण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.
अशी मिरगाची झड
ओल्या मनी उतरते
अंगणात समृद्धीची
एक लय पसरते
 या ओळी मनात उतरल्याशिवाय राहत नाहीत. ही कविता कुणब्याचं शापित जगणं मांडणारी असली, तरी ती निराश वा हताश नाही. ‘नवं तांबडं फुटेल’, अशी आस बाळगणारी आहे. शेतीतील प्रश्‍न, बळीराजाची फरफट, निसर्गाची अवकृपा, सावकारी पाश यांसोबतच गाव, तेथील भवतालचं दर्शन घडविणारी ही कविता भारतातील रंजल्यागांजल्या शेतकर्‍याचेच प्रतिनिधित्व करणारी आहे. अर्थातच मराठी वा ग्रामीण साहित्याला ही कविता नवा आयाम प्राप्त करून देईल, यात संदेह नाही.
 शांताराम हिवराळे यांचा ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ हा काव्यसंग्रहदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. माणुसपणावर दाटलेल्या अंधाराकडे ही कविता निर्देश करते. स्वस्त झालेले मरण, आत्महत्या, माणुसकीला लागलेलं ग्रहण, चंगळवाद अन् या माध्यमातून काळोखत चाललेल्या वाटा याचं अस्वस्थ चित्रण ही कविता करते.
‘वस्ती’ या कवितेतून
वस्तितल्या दारिद्र्यात
काळोख पाहिला मी
लाचार जिंदगीचा
आकांत पाहिला मी
अशा नेमक्या शब्दांत कवीने आपली व्यथा व्यक्त केली आहे. सभोवतालच्या अनेक घटना वा प्रसंग याचा कवीमनावर परिणाम होत असतो. हिवराळे यांच्या कवितेतही याचे प्रत्यंतर पहायला मिळते. अंधश्र्र्द्धा, भ्रष्टाचार, महागाईच्या नावाने होणारं सामान्यांचं शोषण अत्यंत परिणामकारकपणे ते मांडतात. मुळात ही सर्वसामान्यांचं दुःख, व्यथा मांडणारी कविता आहे. सत्ता, नीतीभ्रष्टता यामुळे अवघा समाज कसा नाडला, चिरडला जातो, हेच हिवराळे यांची कविता सांगते.
दाम, दंड, भेद
ऐशी राजनीती
कशी येईल गा
विकासाला गती
यातून सत्तेचे, राजकारणाचे चित्र कवी मांडतो. बांडगुळासारखा खुशाल जगणारा समाज पाहिला, की तो आणखीनच व्यथित होतो. मात्र, त्याच्या मनातही प्रकाशवाटा आहेत. काळोखाचे काहूर दूर होईल आणि चैतन्याच्या प्रकाशात अवघा आसमंत उजळून जाईल, अशी अपेक्षा हिवराळे यांची कविता बाळगून आहे.
 एकूणच अस्सल मातीतल्या या ‘अक्षर’ कविता आहेत. या कवितांमधून अस्सल जीवनानुभवच व्यक्त झाला आहे. त्यामुळे रसिकांनी या कविता आवर्जून वाचायलाच हव्यात.
- प्रशांत चव्हाण
संपादकीय विभाग प्रमुख,
बेळगाव तरुण भारत, पुणे


Tuesday, March 17, 2015

चकटफूंना चपराक!


घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीने मोफत करावे, अशी मागणी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘साहित्य संमेलनाची फुकटेगिरी बंद करा’असा योग्य सल्ला दिला आहे. यावरून साहित्य क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच सांस्कृतिक मंत्र्यांनी घुमजाव करत ‘घुमानजाव’चा नारा दिला आहे आणि दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले आहे. असे जरी असले तरी तरी तावडेंच्या तावडीतून ही फुकटेगिरी सुटली नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही फुकटेगिरी केवळ मोफत प्रसारणापुरती नाही तर यांच्या कामकाजात आणि वृत्तीत अनेक ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होते. 
संत नामदेवांची कर्मभूमी असल्याने घुमानला साहित्य संमेलन झाल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका ‘चपराक’ने सुरूवातीपासून घेतली आहे. मात्र या संमेलनाच्या निमित्ताने केवळ ‘पिकनिक टूर’ करता येईल, इतक्या संकोचित भूमिकेतून अनेकजण या संमेलनाकडे पाहत आहेत. राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रूपये देण्यात येतात. शिवाय आयोजक संस्था त्यांच्या कुवतीप्रमाणे मोठा निधी उभा करते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाब सरकारनेही पुढाकार घेऊन या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसिद्धीचा सोस काही सुटत नाही. सरकारकडून सर्वकाही फुकटात मिळावे ही वृत्ती अत्यंत घातक आहे.
य. दि. फडके हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना बेळगावला एस. टी. बसने, स्वतःच्या खर्चाने गेले होते. हा इतिहास दुर्लक्षून साहित्य परिषद, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सर्वकाही फुकटात कसे मिळेल यासाठी धडपडताना दिसतात. विमान प्रवासाचा हट्ट असेल किंवा मोफत प्रसारणाची मागणी असेल प्रत्येक वेळी या लोकाच्या मनाचे भिकारपण दिसून येते.
आज महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललाय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. रोज विविध भागातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. असे सारे असताना आपण सरकारी तिजोरीवर डोळा ठेऊन स्वतःची हौसमौज पुरी करून घेणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. खरेतर यावेळी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून संमेलनाला जाणे अपेक्षित होते. मात्र हे कर्मदरिद्री लोक. केवळ तीन हजार रूपये प्रतिनिधी शूल्क असूनही हे रेल्वेने येणार नाहीत. त्यांना सरकारच्या, आयोजकांच्या खर्चातून विमानसेवा हवी. स्वयंसेवक आणि इतर अनेक निमित्तानेही रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट असणार आहे. संत नामदेवांच्या नावावर सहानुभूती मिळवत कोणी सरकारला गाळात घालण्याचे धंदे करीत असेल, तर ते हाणून पाडायला हवेत.
दुष्काळ, गारपीट आणि नापिकी यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. सरकारकडून त्यांना यथायोग्य मदत मिळतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका श्रीकृष्ण फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात मूल आणि कोसंबी येथे शेती आहे. यंदाच्या नापिकीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र यांचे ज्येष्ठ बंधू आशिष आणि काका बाळासाहेब तथा श्रीकृष्ण यांनाही बसलाय. गारपिटीने त्यांच्या शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू आणि काका यांच्याही बँक खात्यात जमा झाली. मात्र ‘आपण सधन शेतकरी असून ही मदत अन्य गरीब शेतकर्‍यांना देण्यात यावी’ असे म्हणत त्यांनी मूलच्या तहसीलदाराकडे हे पैसे धनादेशाद्वारे परत केले. याला म्हणतात नैतिकता! साहित्य आणि संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. केवळ तीन पाच हजार रूपयांसाठी आयोजकांवर आणि सरकारवर अवलंबून राहणार्‍या या टीनपाटांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडावा आणि पदरच्या पैशाने या साहित्योत्सवात सहभागी व्हावे.
साहित्य संमेलनाच्या नावावर ही ‘नाटक कंपनी’ वाटेल ते उद्योग करत आहे. श्री. पु. भागवतासारखा प्रकाशक साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झाला होता, हा इतिहास विसरून प्रकाशक परिषदेने सुरूवातीला घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘चपराक’सारख्या काही संस्थांनी आणि अस्सल साहित्य रसिकांनी हा बहिष्कार फेटाळून लावला. ज्या अरूण जाखडे यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने आवेशात भाषणबाजी केली आणि प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्काराची आवई दिली तेच आज घुमानमधील साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळाची ही ‘नाटक कंपनी’ तर नाही ना? अशी शंका येण्यासही वाव आहे.
आजवरचा इतिहास पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार कुटुंबीयांचे योगदान मोठे राहिले आहे. दरवेळी पवारांचेच कोणीतरी बगलबच्चे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे. मात्र यावेळी सत्तेचे फासे उलटे पडले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती दाखवून देत माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे (लोगो)े अनावरण केले. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे मराठी माणसाचा पुळका येणारे घटक आहेत. त्यांना विनंती केली असती तर ते पुण्यात साहित्य महामंडळाच्या कार्यालयात नक्की आले असते. मात्र कायम लाचारीचे दर्शन घडवणार्‍यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवले. त्यानंतर नितीन गडकरींनी स्वागताक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि यांच्या जीवात जीव आला.
सुरूवातीला शे-पाचशे लोक तरी या संमेलनाला येतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ‘चपराक’ सारख्या संस्थांचा कृतीशील पाठिंबा बघून आठ ते दहा हजार साहित्य रसिक संमेलनाला येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे सारे पोषक वातावरण असताना राज्यमंत्र्यांना तुम्हाला ‘फुकटेगिरी बंद करा’ असे सांगण्याची वेळ येत असेल तर तुम्ही मराठी माणसाचे नाक कापले आहे. तुमच्या करणीमुळे पदरचे पैसे टाकून येणारे साहित्य रसिक बदनाम होत आहेत.
‘चपराक’ परिवाराचे बारा सदस्य स्वतःचे पैसे टाकून या संमेलनास उपस्थित राहत आहेत. ते कुणापुढेही मिंधे नाहीत. पत्रकार म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून चार टाळकी घुसडण्याचा उद्योग आम्ही केला नाही. नेमके याच ठिकाणी चकटफू वृत्ती दाखवून देत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या साहित्योत्सवाला गालबोट लावले आहे. अशा करंट्या आणि कंजुष, चकटफू वृत्तीला चपराक देण्याचे दखलपात्र कार्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केले आहे. त्यातून काहीतरी बोध घेऊन या बेशरमांनी आपली उरली सुरली लाज राखावी, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

Monday, March 2, 2015

ख-या 'आयडॉल्स'ची प्रेरणादायी ओळख!

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या संजय वाघ लिखित 'गंध माणसांचा' या पुस्तकाची जयंत कुलकर्णी यांनी करून दिलेली ओळख. 



'गंध माणसांचा' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डावीकडून लेखक संजय वाघ, उमेश सणस,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुधीर गाडगीळ, विनायक लिमये आणि 'चपराक'चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील.
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नी माझे व्हावे मिलन...
या ओळींमध्ये गीतकाराने ज्या गंधाचा अनुभव घेतला, तसाच गंध लेखक संजय वाघ यांनी सभोवतालच्या समाजप्रेमी लोकांमध्ये अनुभवला.
‘गंध माणसांचा’ या पुस्तकाचे लेखक संजय वाघ हे हाडाचे पत्रकार आहेत. पत्रकारितेची गद्धे पंचविशी त्यांनी पूर्ण केली आहे. या प्रवासात त्यांना नानाविध भलीबुरी माणसे भेटली. अशा बहुरंगी, बहुढंगी चेहर्‍यांमधुन त्यांना भावली ती आपला कुटुंबकबिला सांभाळीत समाजासाठी वेगळे काहीतरी करणारी माणसे! प्रयत्न, जिद्द, परिश्रम व सच्चाईच्या भांडवलावर वेगळी वाट निवडून निरपेक्ष भावनेने ध्येयाकडे वाटचाल करणारी संवेदनशील मनाची माणसे, कारण ती लेखकाच्या जातकुळीतली होती.
लेखकाच्या मते हल्ली जो तो स्वत:चे सुख-दु:ख कुरवाळत बसलेला आहे. अशा माणुसकी हरवून बसलेल्या माणसाला लेखकाने अतिशय समर्पक ‘निरो’ची उपमा दिलेली आहे. रोम जळत असताता फिडल वाजवण्यात मग्न असलेल्या ‘निरो’ची!
अन्याय, अत्याचार, व्याभिचार, बलात्कार, घातपात, जाळपोळ, दंगल, महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना, हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या, स्त्रीभ्रूण हत्या आदी प्रकारात वाढ झाल्याने जगात आता ‘राम’ उरला नाही; असा सूर आपल्यला नेहमीच ऐकावयास मिळतो. अशा निराशाजनक वातावरणात समाजासाठी काहीतरी करू पाहणारे लोक, काही करण्याची धडपड करणारे लोक हेच आशेचे किरण आहेत. लेखकाने अशा लोकांना काळोखात मिणमिणत्या पणतीची उपमा दिली आहे. ती सार्थ वाटते. त्या पणतीला तिच्या मर्यादा ठावूक असुनही कोणाची पर्वा न करता ती तिच्या परीने अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते! जो तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला अंधुक का होईना वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते!
कस्तुरी हरणीच्या नाभीतच असताना ती अकारण तिच्या शोधासाठी वणवण भटकंती करीत असते. तसेच माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. अशी माणसे आपल्या आजुबाजुलाच असतात. त्यांचा शोध घ्यावा लागतो. अशाच माणसांचा शोध लेखकाने नाशिकच्या पंचक्रोशीत घेतला. हा शोध सत्कारणी लागला. चांगुलपणा, सच्चाई, माणूसकी, दानशूरता, परोपकारी वृत्ती या माणसांच्या गंधाने लेखकाला भुरळ घातली आणि यातुनच निर्माण झाले ’गंध माणसांचा’ हे पुस्तक!
साप्ताहिक सुटीच्या दिवशी लेखक महाशय या सुवासाचा वेध घेण्यासाठी बाहेर पडायचे, अगदी पदरमोड करून. दर आठवड्याला वेगळी वाट, वेगळी राने वने!
या प्रवासात लेखकाला भेटले डॉ. देवीप्रसाद शिवदे. बागलाण तालुक्यात मोसम नदीच्या तीरावर मातीत पुरलेल्या जाईला पुनर्जन्म देण्यासाठी धडपडणारे; ध्येय आणि तत्त्वात तडजोड न करण्यासाठी पंचवीस वर्षे गाव आणि संसाराचा त्याग करून काशाई देवीच्या मंदीरात वास्तव्य करणारे गोंदे येथील निष्ठावंत शिवसैनिक भिका राजू बोडके; स्वत:च्या दोन्ही मतीमंद मुलांचे दु:ख कुरवाळत न बसता गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तीन मुलींचे स्वखर्चाने कन्यादान करणारे नामपूर येथील शरद नेरकार भेटले; घात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेवारस प्रेतांचा वारसदार बनून त्यांची निगा राखणारे आणि प्रेताची ओळख पटताच त्यांना स्वखर्चाने त्यांच्या गावापर्यंत घेऊन जाणारे येवला येथील हुसेन शेख भेटले; तरूण वयातच छत्रपती शिवरायांच्या विचारांनी भारावलेले आणि गावाच्या प्रवेशद्वाराजवळ 43 लक्ष रूपयांची पदरमोड करून रयतेच्या राजाचा अश्‍वारूढ पुतळा उभारणारे खालच्या टेंभ्यातील भाऊसाहेब चिला अहिरे भेटले; जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या आदिवासी भागातील रूग्णांच्या नातलगांची भोजनाची मोफत व्यवस्था करणारे जी. के. चढ्ढा आणि गंगाराम पांडे भेटले; विभक्त कुटुंबपद्धतीचा नवा ट्रेंड रूजवू पाहणार्‍या स्वैराचारी पिढीसमोर चार पिढ्यांपासून 65 जणांना एकाच छताखाली घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे मुंढेगाव येथील महादू गतीर यांचे माळकरी कुटुंब भेटले.
असे अनेक माणसांचे अनेक गंध आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतात. ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना आधार देणारे, दुर्बल घटकांतील मुलांना आश्रय देणारे, ग्रामविकासासाठी झटणारे, प्रथमोपचार करणारे, व्यसनमुक्तीसाठी झटणारे, आपली खासगी विहिर गावच्या पाणीपुरवठ्यासाठी देऊन तहानलेल्यांची तहान भागविणारे, गावच्या हागणदारीमुक्तीसाठी झटणारे, अंधांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे, गोर-गरीबांना मोफत औषधोपचार करणारे डॉक्टर, पथनाट्यातून जनजागृती करणारे, मायेने पशुसंवर्धन करणारे. ही सगळी कर्तृत्ववान माणसे आपापल्या परीने ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या विचाराने समाजकार्यात खारीचा वाटा उचलताना दिसतात.
आपल्या कर्तृत्वाचा गंध आसमंतात पेरणार्‍या या सर्वसामान्यातील असामान्य माणसांच्या कामाला नम्रपणे अभिवादन करणारे हे पुस्तक खूपच वाचनीय झाले आहे.
या पुस्तकाला पुण्यातील अग्रणी ‘चपराक प्रकाशन’चे संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘सामान्य माणसाची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर दृढ विश्‍वास असणारे घनश्याम पाटील.
या पुस्तकातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, भारावून गेल्यासारखे होते. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सुदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. साध्या सोप्या भाषेत लिहीलेले हे पुस्तक म्हणूनच वाचनीय झाले आहे. अनेकांना या पुस्तकातून समाजकार्याची प्रेरणा मिळेल असेही वाटते.
गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे.


१२८ पानाच्या या पुस्तकाचे मूल्य १३० रुपये असून  वाचकांना ते याच किमतीत घरपोहच पाठवले जाईल. त्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन' - ०२० २४४६०९०९/७०५७२९२०९२/९२२६२२४१३२