Monday, July 6, 2015

'मसाप'चे बेगडी सावरकरप्रेम!

प्रत्येक कार्यक्रमात 'मिरवण्यासाठी' प्रसिद्ध असलेल्या अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य
साहित्य संमेलन आणि वाद यांचं नातं अगदी अतूट आहे. फेव्हिकॉलच्या जाहिरातीत ‘ये तूटेगा नही, फेव्हिकॉलका जोड है’ असं एक वाक्य असायचं. साहित्य संमेलन आणि वाद यांचा जोड तसाच आहे. विश्‍व साहित्य संमेलन आणि वाद हे तर जुळे भावंडं आहेत. पहिल्या विश्‍व साहित्य संमेलनापासून जे वाद सुरू झाले आहेत, ते आजही सुरू आहेत. विश्‍व साहित्य संमेलन भरवता येते का नाही या मुद्यापासून वाद सुरू झाला होता. त्यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील होते. त्यांनी हे संमेलन भारताबाहेर होणे कसे आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आकांडतांडव केले. आता अंदमानात होणारे विश्‍व साहित्य संमेलन कसे बरोबर आहे हे महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य सांगत आहेत.
अंदमानात विश्‍व साहित्य संमेलन भरवणे ही फक्त चुकीची बाब आहे. कारण अंदमान हा भारताचा भाग आहे. विश्‍व संमेलन हे परदेशातच घेतले जाईल अशी आजपर्यंत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची भूमिका होती. मात्र आता स्वत:ला मिरवून घेण्यासाठी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंदमानला संमेलन होणे कसे बरोबर आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सावरकरांना त्यांनी निर्लज्जपणे वेठीस धरले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षानिमित्त हे संमेलन आम्ही अंदमानात घेत आहोत’, अशी भूमिका माधवी वैद्य यांनी मांडली आहे. मात्र, ज्या दोन संस्थांनी अंदमानात संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव दिले होते त्यापैकी ज्या संस्थेने सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम गेली काही वर्षे अव्याहतपणे केले आहे त्याच संस्थेचा प्रस्ताव नाकारला आहे. निलेश गायकवाड यांच्या संस्थेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर जी कारणे समोर आली आहेत, ती अत्यंत धक्कादायक आहेत. ‘महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा विमान प्रवास, राहण्याची सोय आणि तेथे खर्चासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये महामंडळाने मागितले. ते देण्यास नकार दिल्याने आमचा प्रस्ताव नाकारला’ असा दावा निलेश गायकवाड यांनी केला आहे. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी खर्चासाठी पाच हजार रुपये मागणे हे त्यांना निवडून देणार्‍या सर्व मतदारांचा अपमान करणारे आहे. आपल्या पदाचा असा दुरुपयोग आणि तोही साहित्य क्षेत्रातील मंडळीनी करावा हे किळसवाणे आहे. जर हे खरे असेल, तर महामंडळाच्या सदस्यांनी वैद्य यांच्यावर अविश्‍वास ठराव आणावा आणि तसे झाले नाही तर त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरावा. जर निलेश गायकवाड खोटे बोलत असतील तर महामंडळाने त्यांच्यावर अबू्र नुकसानीचा खटला दाखल करावा. आपण निरपराध आहोत हे त्यांनी सिद्ध करावे.
माधवी वैद्य यांनी यापुर्वी अशा विविध प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाईचा आग्रह धरला आहे. अर्थात वैद्य यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तासमोर सुरू असलेल्या खटल्यांचे काय झाले ते अद्याप कळलेले नाही. मात्र या प्रकरणी वैद्य यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा ‘दूध का दूध और पानी का पानी‘ हे सिद्ध करण्यासाठी गायकवाड यांच्याविरुद्ध खटला दाखल करावा. मुळात अंदमानात असो की जगाच्या पाठीवर कुठंही जर साहित्य संमेलन भरवायचं असेल तर साहित्य विषयक संस्था किंवा साहित्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देणार्‍या संस्थेला संधी मिळाली पाहिजे. इथं वैद्य यांनी दोन व्यावसायिक संस्थांची निवेदने स्वीकारून पहिली चूक केली आहे. आता त्याची भरपाई कशी करणार हा खरा प्रश्‍न आहे. उद्या कोणीही धनदांडगा उठेल आणि संमेलनाचा खर्च करण्याची हमी देऊन संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव देईल.
ज्या सावरकरांचे नाव वैद्यबाई घेत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे प्रेम हे जर खरं असेल तर सावरकरांच्या साहित्यिक कार्याची माहिती देणारी स्मरणिका काढावी, तसेच त्यांच्या स्मृतिनिमित्त पुण्यात कविसंमेलन घ्यावे, त्यासाठी दुसर्‍याच्या खर्चाने अंदमानला जाण्याचा खटाटोप करू नये.
माधवी वैद्य आणि त्यांच्या आजवरच्या भूमिका याबद्दल वेगळा लेख करता येईल. पण आता अंदमानच्या संमेलनावरून जो वाद पेटला आहे त्याचे निराकरण व्हायला हवे. सावरकर प्रेमींना देणगीचे आवाहन करणार्‍या वैद्यबाईंनी जर अंदमानात संमेलन घेण्यात योग्य भूमिका बजावली असती तर लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या असत्या. सावरकरांचे नाव घेऊन स्वत:ची प्रतिमा उजळ करण्याचा उद्योग तातडीने थांबवावा. सावरकरांची अप्रतिष्ठा होऊ नये यासाठी सावरकर प्रेमींनीच महामंडळाला या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी जाब विचारावा.

- देवदत्त बेळगावकर, पुणे 

Thursday, July 2, 2015

‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाची परखड चिकित्सा करणारे पुस्तक

- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
सांस्कृतिक समृद्धीसाठी कार्यरत असलेल्या आणि मराठी मासिकाच्या परंपरेत मोठे योगदान देणार्‍या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या जुलै 2015 च्या अंकात ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे परीक्षण आले आहे. संपादक भानू काळे आणि हे परीक्षण लिहिणारे महाराष्ट्रातील विख्यात वक्ते आणि लेखक, सन्मित्र प्रा. मिलिंद जोशी यांचे आभार. 

 1995 साली महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साडेचार दशकांची कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. युतीचे राज्य आले. ‘ग्रंथाली’तर्फे ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी हे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’च्या वतीने या पुस्तकाची ‘समकालीन राजकारणावरील अभ्यासपूर्ण व खळबळजनक ग्रंथ. तो वाचायला रोचक आहे आणि संग्रहालाही उपयुक्त आहे’ अशी जाहिरातही करण्यात आली. प्रत्यक्षात या पुस्तकात अनेक चुकीचे संदर्भ आहेत हे जाणवल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखकद्वयींशी आणि प्रकाशकांशी पत्रव्यवहारही केला. त्यावर प्रकाशकांनी ‘आपण लेखकांना लिहिलेल्या पत्राची प्रत वाचून थक्क झालो. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून पुढे काय करायचे ते ठरवतो आणि कळवतो’ असे पत्राद्वारे सांगितले. तर लेखकांनी ‘तुमची आणि आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशन होण्यापूर्वीच दाखविले असते परंतु ते होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या आणि न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ती पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यासाठी काही दिवस लागतील. तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत,‘ अशा आशयाचे पत्र पाठवले.
या पुस्तकाची कौतुकाची परीक्षणे सर्वत्र छापून आली. ‘पुढच्या आवृत्तीत चुकांची दुरूस्ती करण्यात येईल’ असेही लेखक आणि प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात आले. मे 1997च्या सुमारास ‘महाराष्टचतील सत्तांतर’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात आली. भाऊ तोरसेकरांनी ती पाहिली. त्यात चुकांची पुनरावृत्ती होती. या पुस्तकामुळे वाचकांची दिशाभूल आणि बुद्धिभेद झाला असे मानणार्‍या भाऊ तोरसेकरांनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची परखड चिकित्सा केली आहे.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात सडेतोड आणि परखड राजकीय  विश्‍लेषक म्हणून स्वतंत्र ओळख असलेले भाऊ तोरसेकर गेली शेहेचाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’तून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली. अनेक दैनिकांत आणि साप्ताहिकांत त्यांनी उपसंपादक आणि स्तंभलेखक म्हणून लेखन केले. श्री, ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपूत्र या साप्ताहिकांत तसेच दै. सकाळ, नवशक्ती, आपला वार्ताहर अशा दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली. जनशक्ती, नवनगर या दैनिकांचे आरंभीचे संपादक असलेल्या तोरसेकरांचे आजवर दहा हजारांपेक्षा जास्त सामाजिक, राजकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘कोरी पाटी’, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’, ‘मोदीच का?‘ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ हे पुस्तक म्हणजे मतभेदाचे रूपांतर मनभेदात न होऊ देता प्रतिवाद कसा करावा  याचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या आणि राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना आहेत. त्याची माहिती अथवा संदर्भ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ या पुस्तकात नाही. उदाहरणार्थ, शालिनीताई पाटील यांची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा. पी. के. सावंत, राजारामबापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (70-74), शंकराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, 1960पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडलेली कॉंग्रेस संघटना आणि त्यांनी टाळलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, मुंबईतील ऐतिहासिक गिरणीसंप आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेली पालिकेतील सत्ता, औरंगाबाद महापालिकेत सेनेचा दणदणीत विजय, 1991 साली पवारविरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल आणि रूपकुंवर सतीचे वादळ यांकडेही तोरसेकरांनी लक्ष वेधले आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकात लेखकांनी ‘1985च्या राजवस्त्रविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने अल्पकाळ शरद जोशी, दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते’ असे म्हटले आहे. ते कसे चुकीचे आहे हे देखील तोरसेकरांनी दाखवून दिले आहे.
इतिहास म्हणजे केवळ घटना, प्रसंगांची जंत्री नसते. ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचे संचित असते. त्यामुळे इतिहास कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता त्रयस्थपणे, तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे मांडला गेला पाहिजे. अनेकदा उपलब्ध साधने, अभ्यासाच्या मर्यादा आणि व्यक्तीचा आवाका यांमुळे इतिहासलेखनाला मर्यादा येतात. चुकाही राहून जातात पण त्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुरूस्त करणे महत्त्वाचे असते. अन्यथा चुकीच्याच गोष्टी पुढील अभ्यासकांपर्यंत जातात. असे घडू नये यासाठी भाऊ तोरसेकरांनी हा लेखनप्रपंच केला आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
पृष्ठे :148, किंमत : 150 रू.

Wednesday, July 1, 2015

भंपक नेमाडे

'साहित्य चपराक' मासिकाच्या जुलै २०१५ अंकातील उमेश सणस यांचा हा विशेष लेख अवश्य वाचा.


मराठीमध्ये सर्वाधिक कंटाळवाण्या कादंबर्‍या कोणी लिहिल्या आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोपे आहे. मराठीतील सर्वात कंटाळवाण्या कादंबर्‍या या भालचंद्र नेमाड्यांच्या आहेत. नव्या पिढीतील कोणत्याही मुलाला भालचंद्र नेमाड्यांची कोणतीही कादंबरी वाचावयास दिली तरी 20 पानांच्यापुढे ती कादंबरी वाचणे शक्य नाही. त्यांच्या कादंबर्‍या जेवढ्या कंटाळवाण्या आहेत तेवढीच त्यांची सार्वजनिक जीवनातील वक्तव्येही आकर्षक असतात.
भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. ‘बिढार,’ ‘कोसला’ आणि अगदी अलीकडची म्हणजे ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ या कादंबर्‍यामध्ये मराठी वाचक नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून ओळखतात. त्यांची ओळख कादंबरीकार म्हणून असली तरी निरस, बोजड व अर्थहीन कादंबर्‍यामुळे मराठी कादंबरीची फारशी प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. त्यांच्या या अनाकर्षक कादंबर्‍यामुळे उलट मराठी वाचक मराठी कादंबरीपासून दूर गेला असं म्हणायलाही हरकत नाही.
नेमाड्यांची कुठलीही कादंबरी संपूर्ण वाचणारा वाचक आजच्या पिढीतच नव्हे तर यापुर्वीच्या पिढीतही दुर्मिळ म्हणावा लागेल. नेमाड्यांच्या कादंबर्‍या वाचवत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या अत्यंत कंटाळवाण्या आहेत. कुठल्याही निर्मात्यानं नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न आजतागायत केला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांना कथाच नसते, तेव्हा निर्माते चित्रपट कोठून निर्माण करणार? नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर नाटकं झाली नाहीत. नेमाड्यांच्या कादंबर्‍या दूरदर्शन निर्मात्यांनी विचारात घेतल्या नाहीत. सशक्त कलाकृती ही विविध माध्यमात फिरत राहते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांबद्दल असं होत नाही. नेमाड्यांच्या एखाद्या कादंबरीवर चित्रपट काढावयाचा म्हटलं तर नेमकं काय दाखवायचं हा प्रश्‍न आहे. तीच गोष्ट दूरदर्शनवर एखादी मालिका काढायची म्हटली तरी निर्माण होवू शकते.
अशा कादंबर्‍या लिहूनही नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून समीक्षकांनी गौरवले आहे. समीक्षकांची मतं काही असतील ती असू देत, पण नेमाड्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही हे सत्य स्वीकारायला हरकत नाही. नेमाड्यांना स्वत:ला याची जाणीव आहे का नाही हे माहीत नाही. फार मोठी साहित्यनिर्मिती न करताही नेमाडे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले. कादंबरीकार म्हणून अलीकडे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असला तरी नेमाड्यांच्या कादंबर्‍या फारश्या गांभिर्याने घ्याव्यात अशातला भाग नाही. प्राध्यापक नायक असलेल्या नेमाड्यांच्या प्रत्येक कादंबरीमधली निरस चर्चा, कंटाळवाणे वातावरण यामुळं त्यांच्या कादंबर्‍या वाचकाला नेमकं काय देवून जातात हा भला मोठा प्रश्‍न निर्माण होतो.
 काही कलाकृती या सर्वकालीन कलाकृती असतात. प्रत्येक पिढीतील वाचक त्याचा आनंद घेवू शकतात. असा प्रकार नेमाड्यांच्या कादंबर्‍याच्या बाबतीत कधीही झाला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍या आवडणारी एकच पिढी होती. प्राध्यापक फडक्यांच्या खोट्या, ओढून ताणून तयार केलेल्या प्रेमकथांनी कंटाळलेला वाचकवर्ग काहीतरी नवीन शोधत होता. वि. स. खांडेकराच्या अतेरिकी ध्येयवादाचा मराठी वाचकांना त्रास होवू लागला होता. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांना तत्कालीन वाचकांकडून थोडाफार प्रतिसाद मिळाला इतकेच पण सर्वकालीन यशस्वी कलाकृती मराठी साहित्याला देण्यात नेमाडे अयशस्वी ठरले. फार गाजावाजा करून आलेली त्यांची ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ ही कादंबरी मराठी कादंबरी विश्‍वातली एक ‘अडगळ’ ठरावी इतकी रसहानी करणारी आहे.        
 नेमाडे हे कादंबरीकार म्हणून सामान्य मराठी वाचकाला परिचित आहेत ते असे. त्यांच्या कादंबर्‍या कोणी वाचल्या नाहीत. त्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट, मालिका अगर नाटके निघाली नाहीत, असे कंटाळवाणे कादंबरीकार अशी नेमाड्यांची ओळख मराठी साहित्यात सर्वकाळ राहील. मात्र सार्वजनिक जीवनात सातत्यानं चर्चा होईल अशी विधानं करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. साहित्य संमेलनाबद्दलची त्यांची मते सर्वश्रुत आहेत.
गेल्या 25 वर्षात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी भालचंद्र नेमाड्यांना मिळाली. ते दरवर्षी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य संमेलनाबद्दलची आपली मतं प्रगट करतात. ‘साहित्य संमेलनाचा साहित्याला काहीच उपयोग नाही, साहित्य संमेलन हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे,’ अशी सहजी विधाने करून भालचंद्र नेमाडे खळबळ उडवून देतात. भालचंद्र नेमाड्यांच्या या योगदानाचा विचार मात्र मराठी साहित्याला जरूर करावा लागेल. भालचंद्र नेमाडे सार्वजनिक जीवनात जी विधान करतात त्यामुळे साहित्य, सांस्कृतिक व मराठी जगतात त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होते हे त्यांचं कौशल्य अत्यंत वादातीत म्हटलं पाहिजे. भाषा जिवंत रहावी असं वाटत असेल तर त्या भाषेत सतत वाद, संवाद, प्रतिवाद झाले पाहिजेत, नवी मतं मांडली गेली पाहिजेत आणि काहीतरी वेगळ्या विषयाची मांडणी केली गेली पाहिजे! हे काम गेली काही वर्ष नेमाड्यांच्या विधानांमुळं होत आहे, हे निश्‍चित.
साहित्य संमेलनांच मराठी भाषेसाठी असलेलं योगदान फारसं चांगलं नाही. साहित्य संमेलनांनी मराठी साहित्याला फार काही दिलं अशातलाही भाग नाही. साहित्य संमेलन म्हणजे ‘बैलबाजार’ आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणानं म्हटलेलं होतं. ते अगदी खरंही आहे.  शिवसेनाप्रमुखांच्या या विधानाला एकाही मराठी साहित्यिकाने विरोध केला नाही, याचं महत्त्वाचं कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हे विधान सर्व साहित्यिकांना मान्य होतं एवढाच आहे. अशा सर्व परिस्थितीत भालचंद्र नेमाड्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल व्यक्त केलेली मतं गांभिर्यानं घ्यायला हरकत नाही. भालचंद्र नेमाडे हे वेळोवेळी विविध विषयांवर अशा प्रकारची मत व्यक्त करतात आणि त्यामुळं भालचंद्र नेमाडे चर्चेत राहतात.
एखाद्या कादंबरीकारानं बोलायचं तर स्वत:च्या कलाकृतीतून बोललं पाहिजे, कादंबरीकाराची कलाकृती बोलली पाहिजे, असं अभिप्रेत आहे. भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या कादंबरीतून फारसं बोलत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही. त्यामुळं त्यांनी कादंबरीतून बोलायचं ठरवलं तरी ते पोहोचणार कोणापर्यंत हा फार मोठा प्रश्‍न आहे. चांगल्या लेखकाच सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याच्या कलाकृतीतून बोलत असतो. त्याची कलाकृती त्याला काय म्हणायचंय ते सांगत असते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांनी त्यांना काय म्हणायचंय ते कधीच सांगितलं नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यातून त्यांना जे काही सांगायचं, ते लोकांपर्यंत फारसं प्रभाविपणानं कधी पोहोचलंही नाही. मात्र सार्वजनिक व्यासपीठावर नेमाडे जेही बोलले त्याच्या अनुषंगानं अनेकदा चर्चा झाल्या, अनेकदा लोकानी वाद केले, संवादही झाले, प्रतिवादही झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, काही वेळा नेमाड्यांना गांभीर्यानंही घ्यावं लागलं.
अलीकडं मात्र नेमाडे यांनी मराठी माणसाचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी विधाने करून चर्चेत राहण्यात नेमाडेंना गंमत वाटत असेल पण त्यामुळे मराठी समुहाचा अपमान होत असेल तर, नेमाडे काय बोलतात हे त्यांना समजावून सांगावे लागेल. सवंग व उथळ विधानांमुळं लोकप्रियता मिळत असेलही पण तेवढ्यासाठी सतत तशीच विधाने करणे चांगले नाही.
 कलाकार म्हणून, लेखक म्हणून, बोलणारा पण साहित्यकृतीद्वारे न बोलू शकणारा लेखक म्हणून भालचंद्र नेमाड्यांचं नाव घ्यावं लागेल. पण साहित्यकृतीतून न बोलताही, त्या बाहेरील व्यासपीठावर बोलल्यानंतरही ज्याच्या बोलण्याचा गांभिर्यानं विचार करावा लागतो, असे लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाड्यांचे हे एक वैशिष्ट्य मान्य केलं पाहिजे. नेमाडे जे बोलतात, त्यापासून ते कधी दूर होत नाहीत. म्हणजेच साहित्य संमेलनांबद्दल त्यांनी जे मत व्यक्त केलं, त्या मतापासून नेमाडे कधी ढळले नाहीत. नेमाड्यांना साहित्य संमेलनाच्या एखाद्या कार्यक्रमास बोलावलं किंवा साहित्य संमेलनात त्यांना मोठा सन्मान दिला तरी नेमाडे बदलतील असं आजच्या घडीला वाटत नाही. स्वत:च्या मताशी व विचारांशी ठाम राहणं हे भल्याभल्यांना जमत नाही. नेमाडे त्याबाबतीत मात्र ठाम आहेत. त्यांनी आपले विचार कधी बदलले नाहीत. ही गोष्ट आवर्जून मान्य करावी लागेल.
 इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमाडे अनेक वर्षे काम करीत होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळा म्हणजे खाटीकखाने आहेत, असं जाहीरपणांनं बोलायला नेमाडे कचरत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी संस्कृतीवर आक्रमण करतात, असाही एक आरोप नेमाड्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमांची संस्कृती रूजविणारे कुणी नेमाड्यांच्या विरोधात बोलायला पुढे आले नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणार्‍यांना नेमाड्यांचे विचार बरोबर आहेत की चूक आहेत, हे सांगावेसे वाटत नाहीत पण मराठी भाषा आणि संस्कृती मोठी व्हावी यासाठी विचारमंथन करणार्‍या प्रत्येकाला त्यांच्या या विधानाचा गांभिर्याने विचार करणं भाग पडतं.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दिलं जाणारं शिक्षण, या शाळांमधली संस्कृती, या शाळांमध्ये साजरे होणारे सण, या शाळांमधले उत्सव हे सर्व मराठी संस्कृतीपासून दूर जात आहे, ही गोष्ट खरीच आहे. ही गोष्ट अत्यंत प्रभावीपणानं आपल्या एखाद्या कादंबरीत नेमाड्यांनी मांडली असती, तर त्याचं स्वागत फार चांगलं करता आलं असतं. पण नेमाड्यांना स्वत:च्या कांदबरीत काहीच मांडता येत नाही. पानामागून पानं कंटाळवाण्या भाषेत लिहीणं यात नेमाड्यांइतका हातखंडा लेखक नाही आणि अत्यंत मोजक्या शब्दात सार्वजनिक व्यासपीठावर आपला विषय लोकांपर्यत पोहोचवणं यातही नेमाड्यांइतका चतुर संभाषक नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळांद्दल नेमाड्यांनी केलेली विधानं गांभीर्यानं घेवून त्या अनुषंगानं त्यावर चर्चा झाली पाहिजे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळं मराठी संस्कृतीवर अतिक्रमण झालं का? हा विचाराचा मुद्दा आहे. मराठी भाषा व संस्कृती ही कुणाच्या आक्रमणानं कधी दबलेली नाही पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा अडथळा ठरू पाहतात, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. भालचंद्र नेमाडे हे सार्वजनिक व्यासपीठावरून असे सारखे बोलतात, त्यांचं बोलणं काही वेळा विचारात घ्यावं असं असतं.
मध्यंतरी नेमाड्यांनी पुण्यामध्ये येवून, ‘‘ओळख टिकवण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा झाला’’, असं विधान केलं. आपल्याकडे राष्ट्रवादाचा अतिरेक वाढत चालला आहे. फक्त आपलीच ओळख टिकावी यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत आहे आणि त्यामुळंच व्यवस्थेचा चुराडा होत आहे, असं नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभात जाहीरपणानं सांगितलं. ओळख टिकविण्याची धडपड ही प्रत्येक सजीवाची त्याच्या जन्मापासून अंतापर्यत चालू असते. स्वत:च्या ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं तो समाज, तो समूह, ती भाषा समृद्ध होत असते. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो. हे नेमाड्यांनी कोठून शोधून काढलं हे माहिती नाही.
नेमाडे हे प्राध्यापक आहेत. अर्धवट अभ्यास करून अर्धवट विधानं करण्याची त्यामुळं बहुदा त्यांना सवय असावी. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं ती ती भाषा समृद्ध झालेली आहे. इंग्रज जगभर पोहोचले. इंग्रजांनी स्वत:ची ओळख टिकवणं आणि विस्तृत करणं यावर भर दिला आणि इंग्रजी भाषा समृद्ध झाली. स्वत:ची ओळख पटल्यानंतर कालीदासांसारखा कवी हा महाकवी झाला. स्वत:ची ओळख टिकविण्याच्या संघर्षातून वाल्मिकीचं रामायण निर्माण झालं, ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं हिंदवी स्वराज्य सतराव्या शतकाचं आपल्याला पहायला मिळालं, हा सारा इतिहास समोर असताना ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो, असं नेमाडे कशाच्या आधारे म्हणतात, हे समजून येत नाही. इतिहासाचा अर्धवट अभ्यास, समाजशास्त्राचं तोकडं असलेलं ज्ञान आणि प्राध्यापकी जीवनाशिवाय बाहेरच्या जगाचा नसलेला अनुभव यामुळं अशाप्रकारची अर्धवट विधानं नेमाड्यांकडून होत असतात, ही गोष्ट तर स्पष्ट आहे.
आत्तापर्यंत नेमाड्यांची विधानं अनेकदा फारशी गांभिर्यानं घेतली जात नव्हती. नेमाडे विधानं करतात त्यावरून चर्चा होतात, वाद होतात, चहाच्या प्याल्यातली वादळंही होतात. हे मराठी साहित्य जगताला माहिती होतं. पण त्यांचा विचार गंभीरपणाने करण्याची गरज नाही, असं नेमाड्यांच्या अनेक समर्थकांनाही वाटत होतं. पण नेमाड्यांना भारतीय साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत प्राध्यापक म्हणून त्यांनी व्यक्त केलेली अर्धवट मतं, त्यांच्या अर्धवट अभ्यासातून आली आहेत असं समजून त्याकडं दुर्लक्ष केलं जात होतं. त्यांच्या कादंबर्‍या कंटाळवाण्या असल्यामुळे,त्या फारश्या विचारात घेतल्या जात नसल्यामुळं नेमाड्यांची इतर मतही फारसं कोणी विचारात घेत नव्हतं. मात्र आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळं त्यांची मतं गांभिर्याने घेतली जाताहेत. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी स्वत:ही जबाबदारीनं विधानं करण्याची गरज आहे.
नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात आणखी एक विधान केलं. मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे हा शोध त्यांनी नेमका कुठं लावला हे समजून येत नाही. नेमाडे नेमके असं म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे. 1901 पूर्वी मराठा अशी जात नव्हती. सर्वजण कुणबी म्हणजे शेतकरी होते. त्यावेळी ब्राह्मणी राष्ट्रवादाचा उदय झाला. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवाद मांडला होता. त्याला अटकाव करण्यासाठी मराठा जात तयार झाली, हे सगळे इंग्रजांनी केले. जाट समाजाचेही असेच आहे.’’ नेमाड्यांच्या या अभ्यासाशी इतिहासाचा संबध नाही. त्यांच्या या विधानाशी समाजशास्त्राचा संबंध नाही. त्यांनी ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे,’ असे म्हटले आहे. याच्याशी इंग्रजांचाही संबंध नाही. आपण असं काही केलेलं आहे, हे इंग्रजांनाही माहिती नाही. ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे’ हे संशोधन नेमाड्यांनी नेमकं कशाच्या आधारे केले हे समजून येत नाही.
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भालचंद्र नेमाड्यांनी सलमान रश्दींच्या लेखनाबद्दल अशीच काही विधानं केली. सलमान रश्दींनी अगदी मोजक्या शब्दात नेमाड्यांचा समाचार घेतला. त्याला पुन्हा नेमाड्यांनी उत्तर दिले नाही. सलमान रश्दींच्या साहित्याबद्दल नेमाडे नेमके का बोलले, हेही समजून आलं नाही. सलमान रश्दी गप्प न बसता अंगावर आल्यानंतर नेमाड्यांनी तो विषयच बंद करून टाकला.
‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे. जाट समाज ही पण त्यांचीच निर्मिती आहे,’ हे नेमाड्यांना बहुदा इंग्रजांनी स्वप्नात येवून सांगितले असावे. इंग्रज त्यांना म्हणाले असणार ‘मराठा समाज व जाट समाजाची निर्मिती आम्ही केली आहे.’ अन्यथा त्यांना कळायला अन्य मार्ग उपलब्ध नव्हता व नाही. त्यांनी इतिहासाचे अवलोकन व अभ्यास थोडा जरी बारकाईने केला असता तरी त्यांना मराठा समाज ही इंग्रजांची निर्मिती नाही हे स्पष्टपणे समजून चुकले असते. परंतु परिपूर्ण अभ्यास करायचे, व्यासंगीपणाने प्रकट व्हायचे हे नेमाड्यांसारख्या उथळ विधानं करणार्‍या व्यक्तिला माहिती नाही. त्यातूनच त्यांची असंख्य चुकीची विधानं वेळोवेळी येतात. आत्तापर्यंत या विधानांबद्दल चर्चा झाली. काही वेळा त्या विधानांशी सहमत होण्याचा प्रसंग आला, काही वेळा त्यांची ही विधानं चुकीची आहेत, हेही लक्षात आलं. पणं त्यांची अर्धवट विधानं करण्याची सवय त्यामुळं कधीच गेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मूल्यमापन करताना आज्ञापत्र लिहिणारे रामचंद्र अमात्य लिहीतात, ‘चालीस हजार पागा, साठ हजार सिलेदार व दोन लक्ष पदाति, कोट्यवधी खजाना, तैसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुज्यात संपादिल्या. शहाण्णव कुलीचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. देशदुर्गादि सैन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन सृष्टीच निर्माण केली.’
छत्रपती शिवाजी महाराजांनी असा पराक्रम केला की शहाण्णव कुळीचे मराठ्यांचा उद्धार झाला, असा स्पष्ट उल्लेख आज्ञापत्रात होता. आज्ञापत्र लिहिणार्‍या रामचंद्र अमात्यांना आज्ञापत्र लिहिण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व व्यवस्थेची प्रेरणा होती. आज्ञापत्रातील बहुतांश मजकूर हा छत्रपती पे्ररणेने लिहिला गेला आहे, असेही इतिहासाचे अभ्यासक सांगतात. भालचंद्र नेमाडेंना रामचंद्रपंत अमात्याचे आज्ञापत्र वाचण्याचा प्रसंग आलेला नाही. अर्धवट इंग्रजी व अर्धवट मराठी शिक्षणातून नेमाडे आपली मतं तयार करतात व बिनदिक्कत मारतात.
नेमाडेंच्या एका धाडसाचं कौतुक करावयास हवं. आपण जे विचार मांडतो आहे त्याला इतिहासाचा, समाजशास्त्राचा काही आधार आहे का? याबद्दल कसलाही विचार ते करत नाहीत. कसलाही विचार न करता रेटून बोलण्याची नेमाडे यांची शक्ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेखकात नाही. हे नेमाडेंचं वेगळेपण ठरायला पाहिजे. रामचंद्र अमात्याला ‘शहाण्णव कुळीचे मराठे’ हा शब्द माहिती होता. मराठा ही जात माहिती होती. याचा उल्लेख त्याने सतराव्या शतकाच्या अखेरीस आज्ञापत्रात केलेला आहे. मात्र इंग्रजांनी मराठा समाजाची निर्मिती केली, हा शोध नेमाडेंनी लावला. आपण कुठला शोध लावला याबद्दलची माहिती ब्रिटिशांनाही नाही. मात्र ही माहिती ब्रिटिशांनाही व्हावी यासाठी नेमाडे आपली मतं मांडत असतात. नेमाडे या असल्या पोरकट विचारांचं प्रदर्शन करतात व त्यातून चर्चा होतात, वाद होतात. मराठी भाषा आणि संस्कृती आहे याचं प्रत्यंतरही येतं. खरं तर या पलीकडे फारसा विचार करण्याचं कारण नसतं.
आतापर्यंत नेमाडेंच्या मताकडं व अशा सवंग विधानाकडं दुर्लक्ष केलं जायचं. नेमाडेंच्या मताकडं दुर्लक्ष होण्याचं कारण ते प्राध्यापक होते व अर्धवट वाचनावर आपली विधाने व्यक्त करीत होते. पण आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना गांभिर्याने घेणे भाग आहे. नेमाडेंनी आणखी एक विधान केलं. ‘न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणे हे हिंदू समाजाचे लक्षण आहे’ त्यांचे हे मत अत्यंत हास्यास्पद आहे. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करत हिंदू समाज बसला असता तर हिंदू समाज काळाच्या ओघात असा टिकला नसता हे समाजशास्त्राचे अभ्यासकही मान्य करतात. जगाच्या इतिहासात अनेक प्रगत संस्कृती उदयास आल्या आणि अनेक प्रगत संस्कृती संपूनही गेल्या. सर्व बदल व परिवर्तनाला सातत्याने सामोरे जात टिकलेली संस्कृती म्हणजे हिंदू समाज आहे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मान्य करावं लागतं. हिंदू समाजानं न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण आहे हे खरं नव्हे. स्वत:च्या आयुष्यातील सामान्य प्रश्‍न सोडविण्यात हिंदू माणसाचा बहुतांश वेळ जात असतो. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण कधीही नव्हतं आणि नाही. हेही विधान कशाच्या आधारे नेमाडेंनी केलं हे समजून येत नाही. हिंदुत्ववाद्यांना चपराक ओढण्यासाठी व समाजवाद्यांना खूष करण्याकरीता नेमाडे असे बोलत आहेत की काय, हे त्यांचं त्यांनाच माहिती. नेमाडेंच्या याही विधानाला कसलाही आणि कोणताही आधार नाही. सदरचे विधान हे इतिहास, तर्कशास्त्र आणि समाजशास्त्र याच्या कुठल्याही कसोटीत बसत नाही. अडगळीत टाकावं असं हेही विधान नेमाडेंनी केलेलं आहे.
मध्यंतरी शोभा डे नावाच्या बाईंनी मराठी चित्रपटांबद्दल काही विधानं केलीत. ‘मल्टीप्लेक्सला मराठी सिनेमे लावले तर आम्हाला दहीमिसळ खावी लागेल, वडा खावा लागेल, पॉपकार्न खाता येणार नाहीत,’ असं बोलणार्‍या डे बाई. शोभा ताई आणि नेमाडे यांच्यात नेमका काय फरक आहे, हे समजून येत नाही. नेमाडे यांनी केलेले हे विधान शोभाताईंच्या विधानाच्या जवळपास जाणारंच आहे. मराठी समाज हा गेल्या 100 वर्षात चिंताग्रस्त झालेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं या समाजात दिसत नाहीत. मराठी माणसांचं नेमाडेंनी केलेलं हे विश्‍लेषण समग्र मराठी माणसांचं नक्कीच नाही. मराठी माणसांचा नेमाडेंच्या या विधानांशी सहमत होण्याचा प्रश्‍न येत नाही. नेमाडेंच्या कादंबरीतला नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा होता. चांगदेव पाटील हा त्या पिढीतील मराठी माणसांचंही प्रतिनिधित्व करत नव्हता आणि आजच्या पिढीतील मराठी मुलांचं प्रतिनिधित्व चांगदेव पाटीलनं करण्याचा प्रश्‍नच येत नाही. नेमाडेंचा नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा चिंताग्रस्त होवून जगणारा युवक म्हणून त्याचं वर्णन कदाचित करता येईल परंतु मराठी समाजाचं असं वर्णन करणं हे सर्वथा चूक आहे.
‘मल्टिप्लेक्सला मराठी सिनेमे दाखवू नयेत, मला पॉपकार्न खात हिंदी आणि इंग्रजी सिनेमे बघता यावेत’, अशी अपेक्षा बाळगणार्‍या शोभाताई आणि ‘100 वर्षात मराठी समाज हा चिंताक्रांत झालेला आहे आणि सुखी समाजाची लक्षणं या समाजात दिसत नाहीत’, हे हास्यास्पद मत मांडणारे भालचंद्र नेमाडे यांच्यात कोणताही फरक नाही.
मराठी माणसांचा द्वेष औरंगजेबापासून अनेकांनी केला. मराठी माणसाच्या मर्यादा दाखविण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. पण मराठी संस्कृतीचा असा चुकीचा उपहास करण्याचा, उपमर्द आजतागायत कोणाकडून घडलेला नाही. मराठी समाज कधी चिंताक्रांत नव्हता आणि चिंताग्रस्तही नव्हता. सतराव्या शतकात चारही बाजूनी अंधार असताना मराठी समाजानं स्वत:चं स्वत्व, अस्तित्व दाखवून जगण्याचा संघर्ष करून भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिलेली आहे. ब्रिटिशांशी शेवटपर्यत लढणारा समाज हा मराठी समाज आहे हा इतिहास भालचंद्र नेमाडेंना माहिती नसावा.
गेल्या शंभर वर्षात मराठी समाज चिंताक्रांत झाला आहे आणि सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात दिसत नाहीत, हे भालचंद्र नेमाडेंचं कथन तितकचं हास्यास्पद आहे. गेल्या शंभर वर्षात मराठी माणसानं अनेक क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती साधलेली आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात मराठी माणूस जावून पोहोचलेला आहे. मराठी माणसाच्या कार्याला आणि कर्तृत्वाला प्रदेशाच्या, देशाच्या, प्रांताच्या आणि भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मराठी माणसांचं कर्तृत्व विज्ञानापासून सहकारापर्यंत आणि उद्योगापासून ते कलेपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये प्रकर्षानं पाहता येत असताना मराठी समाज चिंताक्रांत झालेला आहे व गेल्या 100 वर्षात सुखी समाजाचं कोणतंही लक्षण मराठी माणसांत दिसत नाही, हे भालचंद्र नेमाडे कशाच्या आधारे म्हणाताहेत, हे समजून येत नाही.
बर्‍याचदा लेखक स्वत:ची प्रतिमा आरशात पाहतो व तीच समाजाची प्रतिमा आहे, असा त्याचा भ्रम व गैरसमज होतो. भालचंद्र नेमाडेंचंही असंच झालेल असावं. गेल्या शंभर वर्षात मराठी समाज मुळीच चिंताक्रांत झालेला नाही. सत्तेचाळीस साली देशाचा स्वातंत्र्य लढा असू देत, नाहीतर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसांनं केलेलं आंदोलन असू देत. मराठी माणूस हा सतत संघर्षाला तयार आहे. मराठी मुलखावर गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या दुष्काळाच्या संकटाशी झुंजारपणानं मुकाबला करणारा इथला सामान्य शेतकरी असो किंवा गिरणी कामगारांच्या संपानंतरही मुंबईमध्ये पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करणारा गिरणी कामगार असू देत. चिंताक्रांत जीवन मराठी माणूस कधी जगलेला नाही. स्वत:चं स्वत्व आणि स्वत:ची ओळख कायम ठेवत मराठी माणूस जीवनाला सामोरा गेलेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात नेमाडेंना दिसत नाहीत, हा त्यांच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यांनी स्वत:च्या जीवनाच्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. नेमाडेंची निरीक्षण शक्ती कमी आहे, हे त्यांच्या कांदबर्‍यांवरून जाणवतं. पण सध्याच्या त्यांच्या मतांवरून नेमाडे हे केवळ मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे निश्‍चित होत आहे.
मराठी माणसांचा उपमर्द औरंगजेबापासून लॉर्ड कर्झनपर्यंत अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. ज्याही वेळी मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न कोणी केला त्यावेळी मराठी माणसांनी त्याला खणखणीत उत्तर दिलं. मराठी समाज हा 100 वर्षात चिंताक्रांत कधीही नव्हता. कितीही मोठं संकट आलं, तरी त्या संकटाशी झुंजण्याची क्षमता आणि सामर्थ्य मराठी समुदायात 500 वर्षापूर्वी होती, आजही आहे आणि यानंतरच्या 5000 वर्षानंतरही राहील कारण मराठा समाज हा जगातल्या मोजक्या लढाऊ समाजापैकी आहे, संघर्ष करणार्‍या समाजापैकी आहे. लढणारा योद्धा आणि संघर्ष करणारा माणूस कधीही चिंताक्रांत होत नाही. मराठी समाज हा सातत्यानं लढत होता, संघर्ष करीत होता, त्यामुळं त्याला चिंताक्रांत होण्याची कोणतीच वेळ कधीच आली नाही.
युरोपियन संस्कृती आणि अमेरिकन संस्कृतीचा विचार करता याच्याशी मराठी समाजाची तुलना करता मराठी समाजात आजही कुटुंब व्यवस्था चांगल्या प्रमाणात टिकून आहे. मध्यम वर्गाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं मराठी समाज हा एका निश्‍चित चांगल्या दिशेनं वाटचाल करतो आहे. सतत चिंता करीत राहणं हे विचारवंतांचं लक्षण आहे. एखाद्या समाजाचं अगर समूहमनाचं नव्हे. सतत चिंता करीत रहाणं, हे रोगट प्रवृत्तीच्या माणसांचं प्रतीक आहे, एखाद्या समाजमनाचं प्रतीक नाही. ज्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कवच लाभलं, ज्या समाजात ज्ञानेश्‍वर तुकारामांसारखे कर्ते संत होवून गेले, तो समाज चिंताक्रांत जीवन जगण्याची शक्यता नाही आणि त्या समाजात सुखी जीवनाची कोणतीही लक्षणं नाहीत हे म्हणणंही हास्यास्पद आहे.
मराठी समाज चिंताक्रांत झालेला नाही. 100 वर्षात मराठी समाज जिद्दीनं जगण्याच्या संघर्षाला तोंड देत उभा आहे. 12 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला मराठी समाज हा प्रगती पथावर असून मराठी समाजाची प्रगती अव्याहतपणानं होत राहील, हे सांगण्यासाठी कोणा नेमाड्यांची आवश्यकता नाही. मराठी समाजावर जेव्हाही आक्रमण झाली तेव्हा मराठी समाजाची जिद्द, पराक्रम आजवर इतिहासानं अनुभवलेला आहे. असा मराठी समाज चिंताक्रांत जीवन जगतो, हे नेमाड्यांचं कथन त्यांच्या स्वत:च्या चिंताक्रांत मानसिक अवस्थेचं वर्णन करतो. मराठी समाज हा चिंताक्रांत न होता जिद्दीनं आणि आत्मविश्‍वासानं वाटचाल करतो आहे. सुखी समाजाची असंख्य लक्षणं मराठी समाजात दिसत असताना ती नेमाड्यांना दिसत नाहीत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण केवळ सवंग लोकप्रियतेसाठी नेमाडे अशी विधानं करत असतात. त्यातून नेमाड्यांना सवंग लोकप्रियता मिळेलही पण मराठी माणसाचा उपमर्द करणं योग्य नव्हे. मराठी समाजाच्या भवितव्याची आपणास काळजी आहे, असं दर्शवित मराठी समाजाबद्दल चुकीचे निष्कर्ष मांडणंही योग्य नव्हे, हेही नेमाड्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. नेमाड्यांच्या अनेक मतांबद्दल व विचारांबद्दल आत्तापर्यंत चर्चा होत राहिल्या मात्र अशाप्रकारची पोरकट विधानं नेमाडे करत राहिले तर यानंतरच्या काळात त्यांच्या कंटाळवाण्या कादंबर्‍यांकडं सहजी दुर्लक्ष आजच्या पिढीनं केलं त्याहीपेक्षा अधिक दुर्लक्ष आजची मराठी पिढी केल्याशिवाय राहणार नाही याचं भान नेमाड्यांनी ठेवायला हवं.
आपल्या मृत्यूसमयी औरंबजेबानं आपल्या मुलांना बोलावून सांगितले होते की, ‘‘मी माझ्या आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे मराठ्यांशी केलेलं युद्ध.’’ मराठ्यांशी युद्ध करून औरंगजेबाला पश्‍चाताप झाला होता. ‘मराठ्यांच्या नादाला लागू नका’ असा सल्लाही औरंबजेबाने आपल्या मृत्यूपुर्वी आपल्या मुलांना दिला होता. औरंबजेबाने आपल्या मुलांना दिलेला सल्ला हा भालचंद्र नेमाड्यांना माहिती नसावा. शोभाताईंचा तर त्यांच्याशी काहीच संबंध येत नाही, याची थोडी जरी माहिती या दोघांना असती तरी मराठी समाजाचा, मराठी माणसांचा असा उपमर्द करण्याचे धाडस त्यांनी केले नसते. मराठी माणूस संयमी आहे. मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. तुमचे आजवर भरपूर कौतुक मराठी माणसाने केले आहे. पण त्याचा गैरफायदा घेवू नका. एका प्रगत समाजाचा असा उपहास करू नका. प्रेम करणारी मराठी माणसे तुम्ही अनुभवली आहेत. उपहास आणि उपमर्द केल्यानंतर पेटून उठणारा मराठी माणूस तुमच्या परिचयाचा नाही. याला आवर घातला नाही तर, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

- उमेश सणस, वाई 
७३८५९९८१४७