Wednesday, March 29, 2017

मन की बात

साहित्य चपराक (मार्च २०१७) 

 1969 साली राजेश खन्ना यांचा आराधना’ चित्रपट आला. 1973 साली नमकहराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन होते. त्याच वर्षी म्हणजे 1973 साली जंजीर’ चित्रपट आला, ज्याचे हिरो अमिताभ बच्चन होते. 1991 साली हम’ चित्रपट आला, ज्याचे हिरोही अमिताभ बच्चन हेच होते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे 1969 साली आराधना’ हा चित्रपट आल्यानंतर राजेश खन्ना यांनी सुपरस्टारडम’ची सुरुवात केली. मोतीलाल यांच्यापासून ते दिलीपकुमार, देवआनंद यांच्यापर्यंत कुणालाही अप्राप्त असे लोकांचे प्रेम आणि आकर्षण राजेश खन्ना यांना प्राप्त झाले. 1969 ते 1973 ही चार वर्ष फक्त राजेश खन्ना यांची होती. 1973 साली जंजीर’ चित्रपटापासून अमिताभ बच्चन त्याच सुपरस्टारडम’च्या धावपट्टीवर उतरले, पण 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवार’ चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी सुपरस्टारडम’चा मुकुट खर्‍या अर्थाने आपल्याकडे खेचून घेतला. 1975 पासून 1991 च्या हम’ या चित्रपटापर्यंत अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होते पण 1975 नंतरही बरीच वर्षं म्हणजे जवळपास 1987 पर्यंत राजेश खन्ना यांचं स्टारडम’ टिकून राहिलं. सुपरस्टारडम’चा हिंदी चित्रपटसृष्टीतला कालखंड एवढाच. मानधनाच्या दृष्टीने पाहिलं, तर 1969 ते 1978 पर्यंत राजेश खन्ना हेच सर्वात अधिक मानधन घेणारे स्टार’ होते (जरी त्यांचे सुपरस्टारडम’ लौकिकार्थाने संपले तरी). 1979 ते 1987 पर्यंत राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या मानधनाचा आकडा सारखाच होता. 1987 नंतर अमिताभ बच्चन मानधनाच्या आकड्याच्या बाबतीत राजेश खन्ना यांना पार करून पुढे निघून गेले. 1990 साली प्रदर्शित झालेला अग्निपथ’ हा चित्रपट अमिताभ यांच्या सुपरस्टार’ पदावर कोंदण बसवणारा ठरला, जसा 1971 चा आनंद’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या सुपरस्टार’ पदाला कोंदण देणारा होता. अगोदर म्हटल्याप्रमाणे मोतीलाल यांच्यापासून दिलीपकुमार यांच्यापर्यंत आणि त्यानंतर तिन्ही खान (आमीर, शाहरुख, सलमान) यांच्यापासून ते हृतिक रोशनपर्यंत (अगदी त्यात कुमार गौरवचा एक चित्रपटही आला!) अनेक स्टार्स आले, त्यांनी अनेक अव्वल चित्रपटही दिले. परंतु, लोकांची मानसिकता कब्जात घेण्याची आणि आतडं पिळवटून टाकणार्‍या ऑक्टोपसी मोहिनी सामर्थ्याची जी लार्जर दॅन लाइफ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची किमया साधली, ती राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या त्यांच्या काळात. त्यातही राजेश खन्ना यांचं सुपरस्टार’ पद हे पहिलंच होतं. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट ओळीने दिले, जो विक्रम अमिताभ यांनाही मोडता आला नाही. परंतु अमिताभ बच्चन कालमान मोजता प्रचंड काळ टिकून राहिले, अगदी आजपर्यंत! पण पडदा व्यापून टाकण्याची क्षमता असलेला अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे हम’.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणं शक्यच नाही, इतके ते भिन्न प्रकृतीचे नट होत. परंतु, वर उल्लेखलेल्या
सुपरस्टारडम’च्या कालखंडात त्यांनी समाजमानसाचं नेमकं काय केलं, जे अगोदर आणि नंतर कुणीही करू शकलं नाही ते आश्चर्यकारक होतं. मुख्य म्हणजे हे दोन सुपरस्टार त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचा स्व’ व्यापून उरायचे. राजेश खन्ना हे रोमँटिक सुपरस्टार’, तर अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन सुपरस्टार’ होते. रोमँटिक सुपरस्टार असल्यामुळे स्वाभाविकच राजेश खन्ना यांची लोकप्रियता स्त्रियांमध्ये हृदयाच्या रक्तातल्या धमन्यांमध्ये पोहोचणारी होती. दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला ते पुरुषार्थाचं पडद्यावरचं रुप वाटत असत. पण याचा अर्थ राजेश खन्ना पुरुषांमध्ये आणि अमिताभ बच्चन स्त्रियांमध्ये कमी लोकप्रिय झाले, असाही होत नाही. राजेश खन्ना यांच्यासारखे आपण व्हावे, असे त्यांच्या काळातल्या प्रत्येक पुरुषाला वाटत असे आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा पुरुष आपल्याला प्राप्त व्हावा, असं प्रत्येक स्त्री प्रेक्षकाला वाटत असे. इथे पुरुष याचा अर्थ बाप, मुलगा, प्रियकर, नवरा असा काहीही असू शकत होता. हा संपूर्ण कालखंड भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. लायसन्स राज, पाकिस्तानबरोबरचे युद्ध आणि बांगलादेशचा उदय, इंदिरा गांधी यांची महानायिका पदाकडे होणारी वाटचाल आणि पतन, जनता पक्षाचा उदय, जयप्रकाश नारायण यांचा संघर्ष, जनता पक्षाचे पतन, इंदिरा गांधी यांचा पुन्हा उदय, संजय गांधी यांचा कालखंड, त्यांचा अकाली अस्त, खलिस्तानी चळवळ, सुवर्णमंदिरात घुसवलेली सेना आणि त्यामुळे इंदिराजींची झालेली हत्या, त्या हत्येमुळे राजीव गांधी यांना 400 हून अधिक जागेवर मिळालेलं पाशवी बहुमत, ते बहुमत राजीव गांधी टिकवू न शकल्याने व्ही. पी. सिंग आणि जनता दलाचा झालेला उदय, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण या दोघांच्या समाजवादी स्वप्नाचे उत्तर भारतात झालेलं यादवीकरण, इंदिरा गांधी यांनी अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे उभी राहिलेली श्रीलंकन तामिळींची त्यावेळची जगातील सर्वात खतरनाक अशी एलटीटीई ही संघटना (काही वर्षांपूर्वी श्रीलंकन सेनेने या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन याच्यासहीत या संघटनेचा अस्त घडवून आणला) विरोधात गेल्यामुळे राजीव गांधींची झालेली क्रूर हत्या, त्यामुळे गांधी घराण्यापासून मुक्त होऊन कॉंग्रेसची सत्ता नरसिंहरावांकडे येणे  आणि त्या सत्तेचा कुशल वापर करून अगोदरच्या राजीव गांधींच्या शेवटच्या पर्वातील कॉंग्रेसच्या समर्थनाने पंतप्रधानपदावर असणार्‍या चंद्रशेखर यांच्या काळात सोने गहाण ठेवणार्‍या भारताला उदारीकरणाच्या नव्या धोरणाने जगातल्या एका प्रमुख अर्थव्यवस्थेकडे नरसिंहरावांनी नेण्याची सुरुवात एवढ्या सगळ्या घटना या दोन सुपरस्टार्सच्या काळात घडलेल्या आहेत. गंमत म्हणजे, या दोन्ही सुपरस्टार्सनी या कालखंडात कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 1984 साली अमिताभ बच्चन अलाहाबादमधून विजयी झाले, तर राजेश खन्ना यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावरून दिल्लीतून निवडणूक लढवताना लालकृष्ण अडवाणी यांना कडवी टक्कर देऊन त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या संपूर्ण कालखंडात मुंबईत एक मोठी घटना घडली. ती म्हणजे 1982 चा गिरणी संप. त्या काळात एकंदरीतच कामगार वर्ग अशांत होता आणि गिरणी कामगार पराकोटीचा अस्वस्थ आणि ज्वालाग्राही होता. या कामगारांनीच दत्ता सामंत नावाच्या एका महानायकाचा उदय घडवला. गिरणी संपाने दत्ता सामंत हे नाव जगभर गेले आणि गिरणी संपाच्या पतनाने गिरणी कामगार आणि दत्ता सामंत हे दोघेही कोसळले ते कायमचेच. त्यातूनच पुढे मुंबईतल्या अतिरक्तरंजित गँग्जचा आणि गँगवॉर्सचा उदय झाला, ज्याचा सर्वात मोठा खलनायक दाऊद इब्राहिम कासकर ठरला. ज्या गँग्ज आणि गँगवॉरवर आधारित अनेक चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले.
या सार्‍या प्रचंड कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन सुपरस्टार्स उभे आहेत, ही समाजमनाशी संबंधित गोष्ट फारशा बारकाईने कोणीच अभ्यासलेली नाही. राजेश खन्ना यांच्या रुपाने सामाजिक
स्वप्नाळू रोमँटिसिझम’ शिखरावर पोहोचला आणि राजेश खन्ना यांच्या महानायक पदाच्या उतरणीवर येता येता तो अस्त पावला. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या रुपाने सामाजिक वास्तववादी रोमँटिसिझम’ शिखरावर गेला आणि 1991 साल होता होता तो अस्ताला गेला. त्यानंतर नव्या डिजिटल यंत्रयुगाचा मल्टिप्लेक्सचा, मल्टी स्क्रीन्सचा आणि 100 ते 300 करोड क्लबचा उदय झाला. चांगले सिनेमे आले आणि गेलेही. महाहिरोंचे ग्रुप्स तयार झाले, पण राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टारडम’च्या काळातल्या लोकांच्या हृदयातील वीणा थेट छेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते आणि ते स्वाभाविकही होते.
सिनेमा आणि समाज यांचा एवढा टोकदार संबंध भारताच्या इतिहासात अगोदर आणि नंतर कधीही जमून आलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारची जादुई संमोहिनी या दोन्हीही महानायकांनी भारतीय समाजावर घातली. हळुवारपणे फुलत जाणार्‍या एखाद्या फुलासारखे मुलायम स्वप्न भारतीय समाजाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या आयुष्यासंबंधी कल्पिलेले होते. ते सर्वोच्च आविष्कार म्हणून पडद्यावर राजेश खन्ना यांनी साकार केले. ते स्वप्न भंगले. स्वातंत्र्याच्या फळाची अपेक्षा समाजाला दुरापास्त आहे, याची जाणीव जनमानसाच्या काळजात घुसू लागली आणि तेव्हाच अमिताभ बच्चन यांचा उदय झाला. त्यांनी वेगळ्या प्रकारच्या रोमँटिसिझमचा सर्वोच्च आविष्कार केला, जो रोमँटिसिझम राकट, रासवट, व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, लढणारा, साध्यसाधनशुचितेला न मानता विजयी होण्याचे स्वप्न दाखवणारा होता. 1991 नंतर तो रोमँटिसिझमही अस्ताला गेला. त्यानंतर भारतात उदारीकरणाचा प्रथमच प्रवेश झाला. पाठोपाठ डिजिटलायझेशनही. स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाहिलेल्या स्वप्नांना हाक देण्याची आणि ती विफल झाली तर त्याविरुद्ध बंड करण्याची सारी शक्यता भारतीय समाज गमावत गेला. प्रेक्षक महाहिरोंच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सची तिकीटे काढणार्‍या रोबोटसारखा झाला. आपली आवडनिवड ही आपण ठरवत नसून मोठमोठे कॉर्पोरेट्स ठरवतात हेही त्याला कळेनासे झाले आणि कळले तर त्याचेही त्याला काही वाटेनासे झाले.
पुष्पा, आय हेट टीयर्स’’ किंवा पीटर मैं यहॉं हूँ’’ यांसारखे संवाद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकताना त्या काळातल्या प्रेक्षकाने सिंगल स्क्रीनवर कसे पैसे उधळले असतील, याची कल्पना करणंसुद्धा हास्यास्पद वाटते. माझ्याही पिढीने यातले वास्तवात काहीच पाहिलेले नाही, फक्त ऐकलेले आहे. फिल्म्स तेवढ्या पाहिल्या. राजेश खन्ना यांच्या गाडीवर रक्ताने ’आय लव्ह यू’ असं मुली लिहित असत किंवा अमिताभ बच्चन यांना पडद्यावर बघून समोरच्याच्या आणि स्वत:च्या ताकदीचा अंदाज न घेता बेलबॉटममधला तरुण सरळ संघर्षाचा पवित्रा घेत असे, हे आज खरे वाटत नाही. खरे तर हे इतके जुनेही नाही. आई मरणासन्न अवस्थेत असताना देवाला उद्देशून बोललेले अमिताभ यांचे संवाद आता कुठच्या चित्रपटात टाकले, तर तद्दन हास्यास्पद वाटतील किंबहुना 1991 नंतर अमिताभ यांच्या मधल्या उतरत्या काळात असेच संवाद त्यांच्याच नास्तिक’ या चित्रपटात हास्पास्पद वाटले होते. हिरो तोच होता, पण काळ बदलला होता. राजेश खन्ना नव्या युगाशी ऍडजस्ट करू शकले नाहीत, अमिताभ बच्चन ऍडजस्ट करू शकले, पण ते महानायक नव्हते, तर एक कुशल कारागीर होते. राजेश खन्ना आपले उर्वरित आयुष्य (अलिकडेच त्यांचा मृत्यू होईपर्यंत) आपल्या महानायकपदाच्या नॉस्टॅल्जियामध्येच जगले. बोलताना ते आपण नॉस्टॅल्जिक होत नाही, असं वारंवार सांगत आणि हाच त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा पुरावा होता. ते कधीच आपल्या जुन्या बुटातून आपला पाय काढू शकले नाहीत.
खरे तर हे दोन वेगवेगळ्या ताकतीचे नट. त्यांच्या मागे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार, संवाद आणि पटकथा लेखक, निर्माता आणि प्रचंड मोठी टीम काम करत होती. त्यांच्या यशात या सार्‍यांचाच वाटा तेवढा होता. परंतु आपल्या मागच्या अजस्र टीमला लोकांच्या हृदयात थेट नेण्याचं किंवा लोकभावना पडद्यावर जोडून घेण्याचं कसब या दोघांनी दाखवलं. यांच्या योग्यतेचे इतर कुणी देशात त्या काळी नव्हते किंवा नसतीलच असे नव्हे पण नियतीने त्यांनाच ती संधी दिली, जी स्वप्नवत होती आणि स्वप्नं ही एके दिवशी तुटतातच. भारतीय समाजाचीही ती तुटली. अजून 25 वर्षांनी या दोघांच्या अद्वितीय सुपरस्टारडमच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना 1969 ते 1991 या काळात भारत घडता घडता बिघडत गेला आणि त्याच वेळी बिघडतानाच घडत गेला, हे नमूद करावे लागेल. या तुटलेल्या स्वप्नाचे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय विश्लेषण हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे (लेखक ते पुस्तक लिहितो आहे). परंतु एक मात्र नक्की, याच सार्‍या काळामध्ये चित्रपटाच्या पडद्याशी भारतीय प्रेक्षकाचे सर्वात जवळचे नाते जडले आणि तुटले. जसे, भारतीय समाजाचे देशातल्याच राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेशी नाते तुटले. उदाहरणार्थ, आता आपल्या आयुष्याशी संबंधित काही नकारात्मक घडत असेल, तरी लोक रस्त्यावर उतरत नाहीत. हे सर्व उकलत जाताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वप्न आणि पतन आणि त्याच वेळी उभे राहता राहता लोकांचे मोडून जाणे याच्या एका प्रक्रियेचा मागोवा घ्यावा लागेल, ज्यात काळ हा किती बलवान असतो आणि तो लोकभावनांशी कसा खेळतो त्याची एक निष्ठुर जाणीव वाचणार्‍याच्या मनाशी ठसठसत आतपर्यंत जाईल; पण तोंडातून आवाज निघणार नाही!
कारण आता संवाद संपले आहेत!!

- राजू परुळेकर
सुप्रसिद्ध पत्रकार 
साहित्य चपराक (मार्च २०१७)





Monday, March 27, 2017

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)

प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा तत्कालीन औंड्र या मेंढपाळ समाजामधून उदयाला आलेला राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मूळ नाव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळ उभारणी सातवाहन काळात झाली. तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्‍व असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या गाथा ‘सप्तशती’ सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, ‘लीलावई’सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच; पण वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ या व्याकरण ग्रंथाने महाराष्ट्रीला समृद्धी दिली. पूर्वी रठ्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रठ्ठसमुहाला एकाच राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खर्‍या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथा सप्तशतीतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.
त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत, असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपुत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.
सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश. महाराष्ट्र भूमीच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीसनपूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपूर्वी सातवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर इत्यादी जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक मेंढपाळ समाज. महाभारतात औंड्रांना असुर राजा महाबळीचे पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र, पुंड्र, मल्ल इत्यादी समाज दक्षिणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे डिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत. यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. पंढरपूर हे नावही पुंड्रपूरवरुन आलेले. मावळालाही आंदर मावळ असे म्हटले जाते. मल्ल लोकांना हरवणारा मल्हारीही आपल्याला माहीत आहे. आंदर मावळ (जुन्नरचा परिसर) आंध्रा या नदीच्या नावावरुन बनला आहे. या भागात आंद्र (औंड्र) अधिक संख्येने निवासास असल्याने नदी व परिसरास आंध्र नाव मिळणे स्वाभाविक आहे.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल इत्यादी पश्‍चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुफांतील प्रदीर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षिणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची गाथा ‘सप्तशती’, गुणाढ्याचे ‘कथा सरित्सागर’, वररुचीचे ‘माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण’, जैन माहाराष्ट्रीतील ‘अंगविज्जा’ अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लीलावती हिच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण ‘लीलावई’ या काव्यग्रंथात आले आहे.
एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवताना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. ‘क्षहरात’ घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात सातार्‍याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्‍चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. 32 मध्ये नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वार्‍या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेव्हा सातारा-कर्‍हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ’गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस.
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या 78 मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हणजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ’तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतु पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदिकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो; पण इसवी सन 78 पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन 78 मध्येच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मूळ उद्देश गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे असे की शालिवाहन शक असा मुळात शब्दच अस्तित्वात नाही. या नावाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ’सालाहन’ असा आहे. सातवाहन स्वत:ला अनेक लेखांत सालाहन असेच म्हणवून घेतात. मग त्याचे कृत्रिम संस्कृतीकरण शालिवाहन करायचे आणि नंतर शालिवाहन नावाचा राजाच इतिहासात सापडत नाही अशी लाडिक तक्रार करायची असे उद्योग आमचे विद्वान करत बसतात हे नवलच नाही काय?

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?
बरे या विद्वानांच्या बुद्धीवर कळस चढवणारे ब्रिगेडी कल्पनाशक्तीचे आजकाल झालेले विकृत रुप पाहिले तर थक्क व्हायला होते. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली ती ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार. वेद ऐकले म्हणून कानात उकळते शिसे ओतले. संस्कृत उच्चारिले म्हणून जीभ छाटली. हे सारे झाल्यावर भाल्यावर मस्तक टोचून त्याची मिरवणूक काढली. तीच पहिली गुढी व महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी तेव्हापासून गुढी हा एक सण केला. तेव्हा बहुजनांनी गुढी उभारू नये असा संदेश गुढीपाडव्याच्या आसपास फिरू लागतो.
गुढीपाडवा किमान दोन हजार वर्षांची परंपरा असलेला सण आहे हे आपण वर पाहिले. नंतरच्या मराठी साहित्यातही गुढीचे उल्लेख येतात. लीळाचरित्रात म्हाइंभट हा सडा-संमार्जन करुन मग गुढी कशी उभारावी याचे सविस्तर वर्णन करतो. तेराव्या शतकातीलच संतश्रेष्ठ चोखा मेळा टाळी वाजवावी : गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची म्हणतात. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते संत एकनाथांनी गुढीचे विजय-गुढी म्हणून जसे वर्णन केले तसेच गुढीला आध्यात्मिक अर्थही दिले. म्हणजे सातवाहनांपासून सुरु झालेली गुढीची परंपरा अव्याहत सुरु होती.
मग गुढीची परंपरा ब्राह्मणांनी आपल्या मताप्रमाने संभाजी महाराजांची हत्या करवून सुरु केली या विकृत अपप्रचाराला महत्त्व देण्याची खरे तर काही गरज नाही. औरंगजेबाने शंभुराजांची हत्या करायला हिंदुंचा सण व नववर्ष दिन निवडावा यात उलट त्याची विकृती दिसून येते. त्याबाबत औरंगजेबाचा निषेध न करिता महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जबाबदार धरत समाजात द्वेष पसरवावा हे कृत्य नक्कीच निषेधार्ह आहे. असे करुन आपण शंभुराजांचाही अवमान करीत आहोत याचे यांना भान नाही.
महाराष्ट्रात इतिहासाचे विकृतीकरण वैदिक विद्वानांनी जाणीवपूर्वक वा भाबडेपणाने केले. तसेच वेगळे विकृतीकरण स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असताना हिंदुंनी करावा हे निषेधार्ह आहे. यातून धर्म व संस्कृतीचे मुळचे स्वच्छ स्वरुप हाती लागणार नाही. उलट विद्वेष गहिरा होत जाईल याचे भान ब्रिगेडसारख्या विकृतीने पछाडलेल्या संघटनांनी ठेवले पाहिजे. इतिहास ज्याचे माप त्याच्या पदरात नक्कीच घालतो; पण हवा निकोप दृष्टिकोन!
सर्वांना गौतमीपुत्राच्या विजयदिवसाच्या व त्यानिमित्ताने सुरु झालेल्या नववर्ष दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो!
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- संजय सोनवणी
9860991205