Tuesday, August 23, 2016

टेन्शन कायको लेनेका...

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

आज एक मित्र भेटला, तसा तो नेहमीच भेटतो पण आज खुपच उदास वाटला! नक्कीच काहीतरी बिनसलं असणार याचं... कसल्यातरी तणावात दिसत होता. नेहमीसारखा उत्साहाने बोलत नव्हता अन् आपण काही बोललोच तर लक्षही देत नव्हता! आता याला बोलतं करावंच असं ठरवून त्याला व्हाटस् ऍपवरचे काही जोक्स ऐकवले आणि आम्ही दोघंही मनमुराद हसलो! मग त्याला हळूच प्रश्न केला ‘‘काय आज वहिनीशी भांडून आलास की काय?’’
तेव्हा मात्र तो अचानक गंभीर झाला व म्हणाला, ‘‘तिच्याशी मी आता भांडू शकणार नाही, आता ती हेडमास्तरीणबाई बनणार आहे! मग तिला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळणार!’’‘‘

‘‘अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे, तू खुश व्हायचं सोडून असा रुसुबाईसारखा का दिसतोस रे ?’’
‘‘हेच ते, तुला काही कळत नाही!’’
‘‘अरे ह्या नोकरी करणार्‍या बायकांचं तुला काही कळणार नाही. आता माझ्याच बायकोचं बघ, तिला जास्त पगार मिळायला लागेल ना मग मला विचारणारसुद्धा नाही, याचंच जाम टेंशन आलंय यार मला!’’
आता याला काय म्हणावं! टेंशन घ्यायला कधी कुणाला कुठल्या प्रकारचं कारण लागेल सांगता येत नाही. कुणाला परीक्षेचं टेंशन तर कुणाला नोकरी कधी मिळणार याचं टेंशन, कुणाला नोकरी मिळाल्यानंतर ती कशी टिकवायची याचं टेंशन! कुणाला घरचं बायकोचं टेंशन तर कुणाला ऑफिसमधल्या साहेबाचं टेंशन! (कारण सरळसाधं आहे. घरी जायला उशीर झाला तर बायको ओरडणार अन् ऑफिसमधून लवकर निघावं तर खडूस साहेब ओरडणार!!)
बरं हा टेंशनचा जो प्रकार आहे ना तो मोठ्यांनाच लागू असतो अशातला भाग नाही. अगदी बालवाडीत किंवा नर्सरीला शिकणारी चिमुकली मुलंही म्हणतात, ‘‘मम्मी मला ह्या होमवर्कचं भारी टेंशन आलंय! तुच करून दे माझं होमवर्क...’’ म्हणजे मग चिमुकलीच्या मम्मीला परत टेंशन आहेच! एकमात्र खरं आहे ज्यांना जास्त कटकटींचा सामना करावा लागतो किंवा ज्यांच्यामागे जास्त व्याप असतात त्यांना जास्त टेंशन असायला हवं! पण प्रत्यक्षात आपण बघतो अशा व्यक्ती नेहमीच तणावमुक्त, हसतमुख दिसतात याचं नेमकं काय कारण असावं?
टेंशन यायला किंवा तणावग्रस्त व्हायला अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असणे तसेच कुठल्याही गोष्टींचा नकारात्मक विचार करणे! इतरही बरीचशी कारणे असू शकतात जसे -स्वतःची दुसर्‍याशी तुलना करणे, लवकर निराश होणे, अकारण भीती वाटणे... इत्यादी.
हे सर्व टाळण्याचे काही उपाय आहेत पण मनुष्य स्वभावानुसार सहसा सर्वसामान्य लोक तिकडे दुर्लक्षच करतात! एक उपाय म्हणजे सुसंगत! आता हे सांगायला खूपच सोपे आहे की, बाबा रे चांगल्या मुलांची संगत धर, असं वागू नको, तसं करु नकोस. मात्र म्हणतात ना... वाईट सवयी लवकर जडतात, पण सुसंगतीसाठी आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. आजकाल व्यसनी लोकांना मित्र शोधावे लागत नाहीत, दारु पिणार्‍याला त्याचे जोडीदार पटकन मिळतात तसेच दुकानही लवकर सापडते (अर्थातच दारूचे)! तंबाखू, गुटखा खाणार्‍यांची सुध्दा तीच तर्‍हा! दुर्दैवानं आपल्या समाजात आज सज्जन माणसं शोधावी लागतात. चांगल्या लोकांच्या संगतीने निश्चितच चांगल्या सवयी जडतील आणि त्यामुळे सकारात्मक विचारसरणी अवलंबण्यास नक्कीच मदत होणार; पर्यायाने आपसुकच तणाव मुक्त होण्यास वेळ लागणार नाही!
‘‘दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है’’ हे गाणं बहुतेकांनी ऐकलं असणारच! जगात मलाच खूप दुःख आहेत, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही अशाप्रकारे आपलीच कॅसेट वाजवणारे कमी नाहीत. खरंतर असे लोक खूप असमाधानी असतात, इतरांचं सुख बघून हे दुःखी होतात! मग तेच त्यांच्या टेंशनचं कारण बनते!
अशावेळी उपरोक्त गाणं आठवलं की अशाप्रकारचं टेंशन बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. काही लोकांना रग्गड पैसा जमवण्याचा हव्यास असतो. त्यासाठी मग कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते! त्यात जर अपयश आले तर मग हे लोक लगेच निराश होतात आणि तणावाने पछाडतात! अशाप्रकारची माणसं जास्त पैसा मिळाला तरीही टेंशनमध्येच असतात. अशावेळी जास्त हव्यास न धरता  ’आपल्या गरजेपुरता पैसा कमावला तरी पुरे’ ही मानसिकता अंगी बाणली तर बर्‍याच अंशी टेंशन कमी होऊ शकते यात शंका नाही!
काहींना झोप येत नाही याचं तर विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही याचं टेंशन येतं. घरी असलेल्या पालकांना शाळेत गेलेली आपली मुलं कधी सुखरूप परतणार याचं टेंशन येतंय! म्हणजेच काय प्रत्येकाला तणावाला सामोरं जावंच लागतं. अशा तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे नियमितपणे योगासने व प्राणायाम करणे! यासाठी ना पैसे पडतात ना कुठल्याही प्रकारचं इंधन लागतं!
चला तर मग करुया सुरुवात आजपासून अगदी आत्तापासूनच!
एकदुसरेको सिर्फ खुशहाली देनेका!
अरे भाई टेन्शन कायको लेनेका!!

- विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

९९२३७९७७२५ 

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment