Friday, October 2, 2015

अशी माणसं! असे ऋणानुबंध!!

डावीकडून तुषार उथळे पाटील, कवी माधव गिर, 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील, सुप्रसिद्ध लेखक सदानंद भणगे, महादेव कोरे, महेश मांगले आणि डॉ. देवदत्त केतकर.
हात उंचच उंच करून मुंग्या आणायला मला फार आवडतं
आणि मग आपल्याच शरीरापासून दूर झालेला
आपलाच हात पाहून फार गंमत वाटते
अगदी सेन्सेशनलेस
असं डोक्याचं असतं तर फार बरं झालं असतं
फार वर काढलं असतं मी डोकं
आपल्या समाजात दारू न पिता
डोक्यात मुंग्या आणता आल्या असत्या ना
तर जग पोखरून काढण्याची ताकत आहे आमच्यात


त्या साठीतल्या जिंदादिल कवीनं या काव्यपंक्ती म्हटल्या व आम्हीही दाद देऊन मोकळे झालो. त्या कवीचं नाव सदानंद भणगे. खरंतर कवितांची त्याची ती खूप जूनी डायरी. त्याचं ते वयच कॉलेजमधलं. मग या डायरीत त्याच काळात तो कविता लिहू लागला. सुंदर कविता लिहून काढल्या. मग एका टप्प्यावर कविता थांबल्या. बँक ऑफ महाराष्ट्रमधली नोकरी व इतर गद्य व नाट्यलेखन. त्यामुळं कवितांच्या जगात पुन्हा जाता आलं नाही त्याला. मग ती डायरी? ती मात्र त्यानं जपून ठेवली. अगदी तळहाताच्या फोडासारखी. खूप काळानंतर त्यानं ती हातात घेतली परवा. मग आम्हीही उत्सुकतेनं ऐकत राहिलो व तोही ऐकवत राहिला. सौ. क्षमा भणगे होत्याच तिथं. त्यांच्या डोळ्यात अश्रू व आमच्याही मनात कालवाकालव. त्या दोघांना पहिल्यांदा पाहताक्षणी एकच वाटलं, साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा!! दुसरी उपमाच नाही. काकू शिक्षिका. नगरच्याच एका शाळेत. तरूण वयात कितीतरी देखणे दिसत असतील दोघंही. मात्र मुद्दा फक्त दिसण्याचा नसतोच. सौंदर्य दिखाऊसुद्धा असू शकतं. या दोघांचं तसं नाही. दोघांची मनं त्याहून सुंदर! लहान मुलासारखे निष्पाप दोघंही! मनाचा मोठेपणाही खूप! दोघं राहतात नगरला. थोडासा शहराबाहेर त्यांचा सुंदर बंगला!! बंगल्याचं नाव काय ठेवलंय दोघांनी? कल्पना करता येईल? ‘पसायदान’! ‘नाव सोनुबाई व हाती कथलाचा वाळा’ असला प्रकार नाही तो. त्या दोघांच्या स्वभावातच ‘पसायदान’ आहे. ते अगदी क्षणोक्षणी जाणवत राहतं. ‘‘भणगे सरांकडं जायचंय नगरला. खूप दिवसांपासून बोलवताहेत ते’’ घनश्याम पाटील कधीतरी म्हटल्याचं आठवतं. त्यादिवशी सकाळी निघालो तेव्हा खास भणगे सरांकडेच निघालो आहे याची मला कल्पना नव्हती. पाटील एखाद्या कवीसंमेलनाला घेऊन जात आहेत, असंच वाटत होतं. त्यावेळी लक्षात आलं नाही, पसायदानचा खरा अर्थच समजून घेण्यासाठी आपण जात आहोत. नगरमधलं महाराजा हॉटेल. मुख्य हमरस्त्यावरचं. तिथून डाव्याबाजूला आत कारनं वळण घेतलं आमच्या. दोन्ही बाजूला छोटेमोठे सुंदर बंगले. उजव्या बाजूला ‘पसायदान’ ही अक्षरे शोधत होतो. एक-दोन चौक ओलांडले. मग ती अक्षरे दिसली. मनातच म्हटलं, घरातली माणसं कशी असतील?

घनश्याम पाटील यांचा सत्कार करताना श्री. सदानंद भणगे आणि डॉ. देवदत्त केतकर. सोबत सौ. क्षमा सदानंद भणगे.
मात्र काही माणसं भेटताक्षणीच अंदाज येतो. स्वभावाचा अंदाज! तर त्या दिवशी गाडी ‘पसायदान’पुढे उभी राहिली व त्या सुंदर, टुमदार बंगल्याचं फाटक ओलांडून आत गेलो. समोरच सदानंद भणगे उभे. चेहर्‍यावर प्रसन्नता व आनंद! आम्ही त्यांच्या घरी आल्याचा आनंद! त्यांनी प्रेमभरानं हातात हात घेतला व जाणवलंच, माणूस अतिशय प्रेमळ आहे. हॉलमध्ये स्थानापन्न झालो. ‘‘अगदी निवांत बसा. आपलंच घर आहे’’ भणगे सर म्हणाले. त्या दिवशी सरांनी खरं तर लवकर यायला सांगितलं होतं. काकूंनी तर नाश्ता करून ठेवला होता आमच्यासाठी; मात्र आम्ही पोहचेपर्यंत दुपारचे साधारण साडेबारा वाजले असावेत. मग सर सांगत राहिले. सकाळपासूनच तुमची वाट पाहतोय म्हणून. अचानक टेबलवर लक्ष गेलं तर ‘शककर्ते शिवराय’चा पहिला खंड. नागपूरच्या विजय देशमुखांनी लिहिलेला. त्यावरून चर्चा सुरू झाली. लगेच जाणवलं, सदानंद भणगे हा माणूस अत्यंत निष्कपट, निरागस आहे. आतल्या गाठीच्या वृत्तीचा साधा अंशही नाही. काकूसुद्धा अगदी तंतोतंत तशाच. सुईच्या टोकाएवढीही बेरकी, कावेबाज वृत्ती नाही. गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात काकू स्वयंपाकघराकडे वळल्यासुद्धा. दहाव्या मिनिटाला गरमागरम उपीटाच्या डीश समोर हजर. सोबत ढोकळा, गुलाबजाम! नंतर चहा! मनसोक्त गप्पा व पाठोपाठ घरातच भरलेलं कवीसंमेलन! महादेव कोरे, माधव गिर व सरांचं काव्यवाचन!  

नगरला जायचंय म्हणून मी आदल्या दिवशी डॉ. देवदत्त केतकरांनाही फोन केलेला. आता हे केतकर कोण? तर हा माणूस मराठी साहित्यातला एक उत्कृष्ट भाषांतरकार! पेशानं डॉक्टर; मात्र साहित्यात रमणारा स्वभाव. त्यांनी ‘शूट टू किल’ या पुस्तकाचं भाषांतर केलं. केवळ सुरेख भाषांतर! ‘चपराक’साठी त्याचं परीक्षण मी लिहिलं. आयर्लंडमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक होतं ते. नंतर त्यांना एकदा फोनही केला होता. भणगे सरांशी बोलताना केतकरांचा उल्लेख केला, तर केतकर हे सरांचे मित्रच निघाले. अगदीच चांगले मित्र! एकाच शाळेत होते दोघंही. इतकी जुनी मैत्री! मात्र मधल्या काळात फारसा संपर्क नव्हता दोघांचा. भणगे सरांच्याइथून पुन्हा केतकरांना फोन केला. पंधराव्या मिनिटाला ते ‘पसायदान’मध्ये हजर! मग काव्यशास्त्रविनोदाची मैफलच जमली. बोलताना समजलं, केतकरांनी बरीच भाषांतरं केली आहेत. मग आम्ही मराठीतल्या काही उत्कृष्ट भाषांतराबद्दल बोललो. अपर्णा वेलणकरांच्या ‘शांताराम’पासून ते दोस्तोयवस्कीच्या विश्राम गुप्त्यांनी भाषांतर केलेल्या ‘हाऊस ऑफ डेड’पर्यंत. केतकर भेटतील असं जणू मला आतून कुठंतरी वाटत होतं. मी एक इंग्रजी ग्रंथ सोबत नेला होता त्यांना दाखवायला. सोव्हिएत युनियनचा हुकुमशहा जोसेफ स्टॅलिन. त्याचं हे चरित्र. लेखक एडवर्ड रॅडझिन्स्की. हा सगळा रशियाचाच इतिहास. प्रचंड उलथापालथींचा!! ‘‘अशा पुस्तकांची भाषांतरं आपल्याकडे होत नाहीत’’ केतकरांना पुस्तक दाखवत मी म्हणालो. त्याच्या भाषांतराबद्दल मग त्यांनीही उत्सुकता दाखविली. सध्या ‘मेहता प्रकाशन’साठी केतकर भाषांतरं करतात. मेहतांनी काही उत्तम ग्रंथांची भाषांतरं प्रकाशित केली आहेत; मात्र इंग्रजीतून मराठीत आणण्यासारखं खूप काही आहे. अगदी विल्यम शिररच्या ‘द राईज ऍन्ड फॉल ऑफ थर्ड राईश’चे देखील आपल्याकडे अद्याप भाषांतर झालेलं नाही. तीच तर्‍हा अल्बर्ट स्पिअरच्या ‘इन साईड द थर्ड राईश’ची. हे दोन्ही ग्रंथ हिटलरचं समग्र चरित्रच सांगणारे. जर्मनीचा तो महत्त्वाचा काळ सगळा. त्यात प्रचंड जागतिक राजकारणसुद्धा! शिवाय दुसर्‍या महायुद्धातल्या असंख्य घटना! नाझीझम किंवा फॅसिझम कसा असतो त्याची ही कहानी! हे सगळं मराठी वाचकांनी कधी वाचायचं? ते उत्कृष्ट मराठीत आलं तर ना? आपल्याकडे मात्र आजही भाषांतरकाराला लेखकासारखी लोकप्रियता मिळत नाही. त्यांचं महत्त्व लक्षात घेतलं जात नाही. स्वत: भाषांतराकारांनाही तसंच वाटतं. खरं म्हणजे चांगला भाषांतरकार हा चांगला लेखक असतोच. नाहीतर भाषांतराची वाट लागते.
तर त्यादिवशी या विषयावर आम्ही बोलत राहिलो. मग भणगे सर उठले व त्यांची कवितांची डायरी घेऊन आले. कविता वाचू लागले. सहज वहीत डोकावून पाहिलं तर मोत्यासारखं अक्षर! अत्यंत शिस्तबद्ध लेखन! ‘‘बरं, जेवणाचं कसं करायचं? बाहेर हॉटेलमध्ये जायचं का?’’ सरांनी नंतर विचारलं. हॉटेलमध्ये जाण्याचा कुणाचाच मूड नव्हता. काकूंच्या ते लक्षात आलं व त्या पुन्हा किचनकडे वळल्या. तासाभरात छान जेवण तयार! त्याआधी सरांनी त्यांचा सगळा बंगला दाखवला. केवढा मोकळेपणा हा वागण्यातला!! घरसुद्धा इतकं सुंदर की, कुणालाही हेवा वाटावा! कसलाही भपका नाही! श्रीमंतीचं प्रदर्शन नाही. नीटनेटकेपणा व स्वच्छता! कुठंही धुळीचा साधा कण नाही! फर्निचरचा फाजिल अट्टाहास? तो तर मुळीच नाही. घरात ग्रंथांना आवर्जून जागा! अगदी हॉल व बेडरूममध्येही पुस्तकांना महत्त्वाचं स्थान! नंतर किचनमध्ये डायनिंग टेबलवर आम्ही जेवायला बसलो व काकू गरमागरम पोळ्या वाढत राहिल्या. त्या दिवशीच्या त्यांच्या हातच्या खिचडी भाताची चव तर ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी! सरांची मुलगी पुण्यात. तिचं लग्न झालेलं. मुलगा अधूनमधून परदेशात. सरांना मात्र इतक्याच भौतिक गोष्टी महत्त्वाच्या नाही वाटत. त्यांना  माणसं प्रिय! जेवताना किचनमधल्या देवघराकडे लक्ष गेलं. प्रसन्न देवघर. तुपाची वात अखंड जळत असलेलं. तो देवही या कुटुंबावर आभाळागत माया करणारा व हे कुटुंब त्याचं ऋण मानणारं!! जिथं देवघर व ग्रंथ नाहीत ते घर काय घर असतं का? मनात विचार आला. जेवण करून पुन्हा गप्पा मारत बसलो व काकूंनी पुन्हा चहा ठेवलासुद्धा. शिवाय दोघं आग्रह करत राहिले. आजचा दिवस रहा म्हणून. खरंतर त्या घरातून पाय निघत नव्हता आमचा; मात्र घनश्याम पाटलांपुढे कामाचे डोंगर वाढून ठेवलेले. दिवाळी अंकाची तयारी, पुढच्या साप्ताहिक व मासिकाची छपाई. कामाचे असे अखंड व्याप. मग दोघांचे चरणस्पर्श करत आम्ही निरोप घेतला. दोघं निरोप देण्यासाठी बाहेर आले. भारावलेल्या मनानं आम्हाला निरोप दिला. महादेव कोरेंनी पुण्याच्या दिशेनं कार वळवली व आमच्या मनात व नजरेपुढं तिच अक्षरं उमटत राहिली ‘पसायदान’!
नगरहून पुण्यात आलो. घनश्याम पाटील दिवाळी अंकासाठी धावपळ करू लागले. मी काही महत्त्वाची ग्रंथपरीक्षणं लिहिण्याच्या मागं. बेळगाव दौरादेखील झाला मधे आमचा. त्यावर लेखही लिहायचा होता. दुसरीकडं सगळ्या राज्यात दुष्काळानं हाहाकार माजलेला! नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे. ही दोन माणसं! फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावत होती ती! सरकारही सरकारचं काम करत होतं; मात्र तसंही प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर आपण राजकारण्यांवर फोडतो. त्यात काही अर्थ नसतो. नागरिक म्हणून आपली जबाबदारी सर्वात महत्त्वाची. महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी. त्यातली पाच पंचवीस लाख माणसं एकत्र आली तरी मोठा निधी उभा राहू शकतो. खारीचा वाटा महत्त्वाचा असतो अशावेळी  प्रत्येकाचा. अशातच संगमनेरच्या पत्रकारांनी ठरवलं, वीस हजार रूपयांचा निधी नाना पाटेकरांकडे सोपवायचा. त्यांनी त्यानिमित्त घनश्याम पाटलांचं व्याख्यान ठेवलं. ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’ या विषयावर.
दि. 20 सप्टेंबर. सकाळी साडेनऊची वेळ. महादेव कोरेंची कार अप्पा बळवंत चौकात येऊन थांबली. लगबगीनं मी त्यांना तिथं गाठलं. मोरेश्‍वर ब्रह्मे काका, तुषार उथळे पाटील हेदेखील घनश्याम पाटलांबरोबर होतेच. आमची कार संगमनेरमध्ये पोहचली तेव्हा दुपारचा एक वाजला असावा. त्याच्याआधी नारायणगाव लागलं. तिथल्या एका साध्या पण प्रसिद्ध हॉटेलसमोर पाटलांनी गाडी थांबवली. तिथं पाटलांनी ‘कढीवडा’ खाऊ घातला. कढी व त्यात ताजा चविष्ट बटाटा वडा! इतकी अप्रतिम चव की विचारता सोय नाही! नंतर अप्रतिम चहा!! पाटलांना पुण्यातल्या एकूणएक खाऊगल्ल्या ठाऊक! मात्र इतर शहरातलीही दर्जेदार हॉटेलं तोंडपाठ! माझ्या आयुष्यात एक मित्र आला होता पूर्वी. धनंजय शिंदे. अगदी तोंडातला घास काढून देणारा मित्र! खिशातले असेल नसेल तेवढे सगळे पैसे काढेल व मित्रांना खाऊपिऊ घालेल. पाटीलही तसेच.
तर संगमनेरमध्ये पोहोचलो व दै. ‘सामना’चे राजाभाऊ वराट तिथं भेटले. तिथलं सरकारी विश्रामगृह. तिथं राजाभाऊंनी रूम बूक केलेली. तिथं जाऊन टेकलो. संगमनेरमधली पत्रकार मंडळी प्रचंड उत्साही! मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारी. राजाभाऊ वराट अतिशय अभ्यासू माणूस! मग भरभरून बोलत राहिले ते. नगर जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल, तिथल्या पाणीप्रश्‍नाबद्दल. मग तिथं श्याम तिवारी आले. ते राजाभाऊंचे जवळचे मित्र व सहकारी. ‘सकाळ’चे नंदकुमार सुर्वे आणि ‘पुण्यनगरी’चे वसंत बंदावणेदेखील आले तेवढ्यात. बोलता बोलता वैभव पिचडांचा विषय निघाला. वैभव पिचड अकोल्याचे आमदार. अकोला संगमनेरपासून अवघ्या वीसएक किलोमिटर अंतरावर. पिचडांचा विषय निघाला व मी चमकलो. कारण काय? तर वैभव माझा वर्गमित्र. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधला. पाचवी ते आठवी अशी चार वर्षे एकत्र होतो आम्ही. एकाच वर्गात. हॉस्टेलमध्येही एकत्र. आता त्याची माझी काही जिगरी मैत्री वगैरे नव्हती तेव्हा; मात्र कसलाही दुस्वास वा हेवादावाही नव्हता आम्हा दोघात त्या शाळकरी वयात. वैभव माझ्या आठवणीत का राहिला? आमचं मिलिटरी स्कूल. कडक शिस्त. जरा काही झालं की शिक्षक सडकून काढायचे. वैभवनेही शिक्षकांचा मार खाल्ला त्या काळात; मात्र त्याचं एक वैशिष्ट्य होतं. मधुकरराव पिचड हे त्याचे वडील. ते अगदी आमदार व मंत्रीही असावेत त्या काळात! मात्र वैभवने कधीही त्यांच्याकडे शिक्षकांची तक्रार केली नाही किंवा शाळा सोडली नाही. मधुकर पिचडांनीही या गोष्टीचा बाऊ केला नाही. एकदा तर ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते शाळेत तेव्हा. असो.काही पत्रकार मंडळी भेटायला येत होती सरकारी विश्रामगृहात. त्यात दैनिक सकाळचे श्री. नंदकुमार सुर्वे होते. थोड्याच वेळात तिथे मुरारीभाऊ देशपांडे आले. ते संगमनेरमधील प्रसिद्ध कवी. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून सतत प्रसिद्ध होतात. पाटलांना त्यांनी पाहिलं व खूप आनंदले. ‘चपराक’नं त्यांना ओळख दिली ही त्यांची भावना. ती कृतज्ञता होती. घडाघडा बोलत राहिले ते. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून यायचा अवकाश, त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येतात. क्वचित महाराष्ट्राबाहेरूनही येतात. अगदी इंदौर, बडोदा व हैद्राबाद येथूनसुद्धा. मुळातच अतिशय ताकतीचा हा कवी; मात्र ‘चपराक’नं पुढे आणेपर्यंत तो अंधारातच होता. त्यांची बहिणही उत्कृष्ट कविता करते. मुरारीभाऊंनीच हे सांगितलं; मात्र तिच्या कवितांकडेही अद्याप कुणाचं लक्ष नाही.

संगमनेर पत्रकार मंचने आयोजित केलेल्या 'दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता' या विषयावर व्याख्यान देताना 'चपराक'चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील.

सायंकाळी पाचची वेळ. रेस्टहाऊसमधून खाली आलो. जवळच्या टपरीवर चहा घेतला व कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी गेलो. संगमनेर व्यापारी असोसिएशनची ही नवीन इमारत. संगमनेर रेस्टहाऊसपासून अगदी हाताच्या अंतरावर. ‘संगमनेर पत्रकार मंच’. कार्यक्रमाचे आयोजक होते ते. सुरूवातीला मुरारीभाऊ बोलले. ‘सव्यसाची संपादक’ असा त्यांनी घनश्याम पाटलांचा उल्लेख केला. ‘साहित्यातला अत्यंत दर्दी मनुष्य’ अशीही पावती त्यांनी पाटलांना दिली. ‘‘साहित्याची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही व ‘चपराक’ची टीम साहित्याला वाहिलेली टीम आहे’’ मुरारीभाऊ म्हणाले. ‘‘चुका होणं हे मानवी आहे. पन्नास पन्नास वर्षे पत्रकारितेत घालवलेल्या माणसांनाही अनेक विषय नव्यानं समजून घ्यावे लागतात’’ मुरारीभाऊ पुढे म्हणाले. ‘‘संगमनेरला अनंत फंदी या शाहिराचा वारसा लाभला आहे. हे सांस्कृतिक शहर आहे व इथं सर्वधर्मसमभाव जपला जातो’’ त्यांनी संगमनेरची अशी ओळख करून दिली. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश टाकळकर व श्री. प्रकाश कलंत्रीही होते. कलंत्री हे संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष . तरूण पोरगा. उमद्या मनाचा. चांगले विचार मांडणारा. त्यांनीच संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँकेचं हे सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं. गौतम गायकवाड हे संगमनेरमधले आणखी एक पत्रकार. त्यांनी घनश्याम पाटलांची ओळख करून दिली. ‘‘पाटील हे महाराष्ट्रातले वयाने सर्वात लहान असलेले स्वतंत्र संपादक आहेत’’ ते म्हणाले. पाटलांनी दहावीत असतानाच पत्रकारिता सुरू केली होती. तेव्हा ते दै. ‘तरूण भारत’चे पत्रकार होते. गायकवाडांनी हे सांगितलं तेव्हा उपस्थितांची उत्सुकता वाढली. मग पाटील बोलले. विषय होता ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’.
गेली पंधरा वर्षे सतत पत्रकारितेत वावरणारे पाटील. वय बत्तीस. त्यांना व्याख्यानासाठी सतत निमंत्रणं येतात. तीही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून. पुण्यातल्या मोठमोठ्या शिक्षणसंस्था. त्याही त्यांना आदरानं बोलवतात. ‘‘अन्नधान्याच्या अभावी माणसं, जनावरं मरतात व संस्कारांअभावी मानवता मरते. संगमनेरच्या पत्रकारांनी ही मानवता मरू नये म्हणून छोटं का होईना पाऊल उचललं’’ पाटील म्हणाले. ‘‘मराठवाड्याला चार-चार मुख्यमंत्री मिळाले तरीही मराठवाड्यावर ही वेळ का आली?’’ पाटलांचा प्रश्‍न होता. ‘‘बिहारसाठी पंतप्रधानांनी सव्वाशे कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मग विदर्भाचं काय? मराठवाड्याचं काय?’’ पाटलांचा पुढचा प्रश्‍न होता. ‘‘शेतकर्‍यांना आर्थिक मदत तात्पुरती मलमपट्टी आहे; मात्र सध्या ती गरजेची आहे’’ पाटील पुढं म्हणाले. ‘‘कर्जमाफी हाही तात्कालिक उपाय आहे. त्यापेक्षा दुष्काळी भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे’’ पाटलांचं मत होतं. ‘‘दुष्काळावर मात करणार्‍या शेतकर्‍यांच्या बातम्याही समाजापुढं ठेवल्या पाहिजेत’’ पाटील म्हणाले. त्यांचं आणखी एक वाक्य तर फार महत्त्वाचं होतं ‘‘गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणं हा राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा ठरवला पाहिजे’’ ते म्हणाले. ‘‘नांगरणी, पेरणी, कोळपणी यासाठी शेतकर्‍याला थेट मदत केली पाहिजे’’ ते पुढं म्हणाले. ‘‘हुंडा घेण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे’’ त्यांचा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. ‘‘मरण स्वस्त होणं व भाकरी महाग होणं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही!’’ त्यांचं आणखी हे एक वाक्य. ते तर हादरवून टाकणारं होतं. शेतकर्‍यांच्या वारंवार होणार्‍या  आत्महत्या. त्या रोखायच्या कशा? त्यासाठी व्यवस्थेचीच नीट झाडाझडती व्हायला हवी असं पाटलांना सुचवायचं होतं.
यावेळी पाटलांनी ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने दुष्काळनिधी म्हणून पाच हजार रूपये ताबडतोब जाहीर केले. ते तिथल्या तिथं राजाभाऊ वराटांकडे सोपवलेसुद्धा. घनश्याम पाटील मराठवाड्यातले. शेतकरी कुटुंबातले. शेती केलेले. शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेली सगळी दु:खं भोगलेले.
कार्यक्रमस्थळाहून पुन्हा रेस्टहाऊसवर आलो. आयोजकांनी मांसाहारी जेवणाचा बेत केला होता. पाटलांना हे समजलं. ‘‘मी दुष्काळावर व्याख्यान द्यायला आलो आहे. अशावेळी मांसाहारी जेवणाची मेजवाणी झोडणं बरोबर नाही’’ पाटलांनी आयोजकांना स्वच्छ सांगितलं. ‘‘साधी पोळी भाजी चालेल. नपेक्षा तसंच परत गेलेलं बरं’’ पाटील म्हणाले तेव्हा सगळेच थक्क झाले. संगमनेरच्या पत्रकारांच्या भावना. त्या आम्ही समजू शकत होतो. त्यांचं प्रेम. ते आम्ही समजू शकत होतो; मात्र पाटलांच्या मते जे औचित्याला धरून नाही ते कधीच करायचं नाही. मग रेस्टहाऊसवर साधं का होईना जेवण आम्ही घेतलं. जेवण छान होतं व सगळ्याच पत्रकार बंधूंनी तिथं अगत्यानं काय हवं नको ते पाहिलंसुद्धा. गोरक्ष नेहे, स्थानिक चॅनलच्या एक पत्रकार निलिमा घाटगे, प्रशांत शर्मा, मनोज गाडेकर, रियाज सय्यद, रवी महाले, प्रकाश आरोटे, नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, अमोल वैद्य, शेखर पानसरे, उल्हास पाटील, सुशांत सातपुते, विकास वाव्हळ, अंकुश बुब, गंगाधर शिंदे ही सगळी मंडळी. सगळेच धडपडत होते या  कार्यक्रमाच्या नियोजनासाठी. रात्री जेवणाच्या वेळी यातले बरेचजण रेस्टहाऊसवरसुद्धा जातीनं हजर होते. निघताना सगळे गाडीजवळ जमले. माणसांमधली आपुलकी. ती लगेचच जाणवते. एका क्षणात जाणवते. त्याला वेळ लागत नाही. पत्रकार बांधवात दै. ‘लोकमत’चे रियाज सय्यदही होते. निघण्यापूर्वी आम्ही एकमेकांना प्रेमभरानं मिठीच मारली. रियाज सय्यद हा माणूसच अतिशय प्रेमळ व सज्जन! ‘‘पुढच्या वेळी भंडारदर्‍याला जाऊ. तिथं मुक्काम करू. त्यासाठी मुक्कामाच्या तयारीनंच या’’ राजाभाऊ वराट पुन्हा पुन्हा हेच सांगत होते. हा माणूसही खूपच प्रांजळ. शेवटी वराटांनी बळेबळे दोन हजार रूपये पाटलांच्या हातात ठेवले. ‘‘पेट्रोलसाठी असू दे. खर्च थोडे असतात का तुमचे?’’ ते म्हणाले.
गाडीनं पुण्याचा रस्ता धरला. डोक्यात एकाच गोष्टीनं तुफान माजलेलं. पाटलांनी मांसाहारी जेवण नाकारलं? मी केलं असतं हे? नसतं केलं! अगदी दोनशे टक्के नसतं केलं. मुळात सुचलंच नसतं असलं काही. बुद्धीच चालेना. ‘‘दादा, तू पाच हजार रूपये खिशातून काढून दिलेस. त्याबद्दल आम्हाला एका शब्दानं बोलला नाहीस. एका विशिष्ट गंभीर प्रसंगासाठी आलोय म्हणून ‘नॉनव्हेज’ खायचं नाकारलंस. या गोष्टींसाठी माझा तुला खरोखर सलाम आहे!’’ मी पाटलांना म्हणालो. यावर काहीशा संकोचाने पाटील हसले फक्त. ‘‘सर, आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जायचंय’’ त्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली. विचार करत राहिलो मी.
या जगात सर्वश्रेष्ठ गोष्ट कुठली? ‘माणसांचे माणसांशी असलेले ऋणानुबंध’ याइतकी श्रेष्ठ गोष्ट या जगात दुसरी कुठलीही असू शकत नाही हेच खरं!

-महेश मांगले 
संपर्क: ९८२२०७०७८५
हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले....!
पाहुणा बोलावून एखादा कार्यक्रम करणे फारच खर्चिक झाले आहे... पाहुण्याची बडदास्त ठेवणे हाच एक कार्यक्रम होऊन बसतो... पाहुण्यांची येण्याजाण्याची व्यवस्था, दिवसभराची शाही बडदास्त आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे मान आणि धन यातच आयोजकांची धावपळ होते...
दुष्काळनिधी व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांना बोलावले. आम्हीसुद्धा वरील प्रमाणेच तयारीत होतो... पण पाटील यांनी कोणताही बडेजाव दाखवला नाही.. खास ठेप नाही... आणि ऊलट आम्हालाच त्यांनी दुष्काळ निधीसाठी पाच हजार रूपये रोख दिले..
काय बोलणार...? काय प्रतिक्रिया देणार...?
फक्त एवढंच सांगेन, ‘‘हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले...’’

- राजा वराट
पत्रकार, दै. ‘सामना’



No comments:

Post a Comment