Tuesday, December 1, 2015

बोल कौतुकाचे

सुवर्णाक्षरे
माणसाचं मन खरंच अनाकलनीय असतं. कधी तो छोट्या गोष्टींसाठी राईचा पर्वत करून भांडत बसतो तर कधी पैशाला महत्त्व देईल आणि जिथून खरंच पैसे मिळवता येतील तिथे तो पैशावर पाणी सोडतो. कुणाच्या तरी शब्दाखातर... माणसाला यशस्वी होण्यासाठी, कर्तृत्व फुलवण्यासाठी आयुष्यात पाठीवर थाप ही फार महत्त्वाची. म्हणूनच ‘कणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी गुरूजींना म्हणतो.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊनि नुसते लढ म्हणा
आणि कर्तृत्व फुललं, कुठल्याही कार्यात यश मिळालं की होणारं कौतुक हे फार महत्त्वाचं. कौतुकामुळे उत्साह वाढीला लागतो आणि कौतुक केलेेलं प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं.
आपल्या बालपणात डोकवा बरं जरा. आठवा आपण काही चांगलं काम केलं, आईला कामात मदत करून तिचं काम कमी केलं तर ती जरी काही बोलली नाही तरी तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं कौतुक जाणवलं की काम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. काम करण्यासाठी उत्साह यायचा. कॉलेजमध्ये गुरूवर्यांनी केलेले कौतुक, मित्रमैत्रिणींनी केलेले कौतुक यामुळे विद्यार्थी दशेत प्रगतीपथाची वाटचाल आनंददायी होते. परिवारात, संसारात घरच्यांनी केलेले कौतुक जीवन आनंददायी करतं. आपण घरच्यांसाठी आहोत आणि घरातले आपलेच आहेत ही भावना जपली जाते. घरातल्या लहानग्यांचं आपण कौतुक करतो. मुलं चुकली तरी त्यांच्या प्रयत्नांचं, धडपडीचं कौतुक करतो आणि त्या कौतुकाच्या बोलानं मुलं अपयशावर मात करत पुढं पुढं चालत राहतात. कौतुकाचे बोल त्यांना उभारी देतात.
ज्याप्रमाणे खासगी आयुष्यात, परिवारात, मित्रमैत्रिणींकडून माणसाला जशी कौतुकाची भूक असते तशीच व्यावसायिक जीवनातही असते. बॉसचे कौतुकाचे दोन बोल कर्मचार्‍याचा उत्साह द्विगुणीत करण्यास निश्‍चितच सहाय्य करतात. खरं पाहिलं तर आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो तो उदरनिर्वाहासाठी, अर्थार्जनासाठी आणि सगळ्यांनाच आपापल्या आवडीचा व्यवसाय वा नोकरी मिळेलच असे नाही. थोडेच भाग्यवान असतात की ज्यांना आयुष्यात जे करायचं होतं ते इप्सित साध्य होतं. खूपदा माणूस ठरवतो काही आणि घडतं काही. खूपदा खूपजण ठरवतात की, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हायचं. कलाप्रांतात यश मिळवायचं पण आर्थिक अडचणी, आयुष्याला कलाटणी देणार्‍या घटना घडणे, घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन, त्यामुळे अचानक येऊन पडणारी कुटुंबाची जबाबदारी, त्यामुळं अर्धवट सोडावं लागणारं शिक्षण आणि मूळ आवड सोडून जमेल ती नोकरी, व्यवसाय अर्थार्जनासाठी करावा लागतो आणि तो मग आवडीचे काम मिळाले नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम आवडीने करतो. मग असं काम चांगलं केल्यावर त्याचं कौतुक झालं तर? हे कौतुक त्याला समाधानही मिळवून देते पण असं फार कमी वेळा घडतं. नोकरी करणार्‍यांना तर हे निश्‍चितच जाणवत असेल! काही चुकलं तर बॉस रागवायला अजिबात विसरत नाही पण खूप चांगलं, व्यवस्थित काम केलं, कमी वेळात उल्लेखनीय काम केलं तर बॉस कौतुक करेलच असं नाही. चांगल्या कामाचं कौतुक केलं तर कर्मचार्‍यांचा उत्साह वाढतो. तो जोमाने काम करतो. त्याला श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं!
कौतुक कुठल्या गोष्टीचं करावं? आवडलेल्या, भावलेल्या कुठल्याही गोष्टीच करावं! एखाद्या नृत्याचा कार्यक्रम झाला, आपण नर्तिकेचं कौतुक केलं की तिचा उत्साह वाढतो. कवितेचा कार्यक्रम झाला, आवडलेल्या कवितांचं कवींजवळ कौतुक केलं की त्यांनाही बरं वाटतं. विविध कार्यक्रम होत असतात. ते यशस्वी होण्यामध्ये सूत्रसंचालकाचा सिंहाचा वाटा असतो. सूत्रसंचालक छान चारोळ्या, शेर, चांगली वाक्यं प्रसंगावधान राखून पेरत असतो. काही प्रासंगिक, समर्पक शेर मारून, कॉमेंटस् करून कार्यक्रमाची लज्जत वाढवतो. याचं श्रेय त्याला दिलं, थोडे कौतुकाचे बोल ऐकवले की त्याच्या चेहर्‍यावर कार्यक्रमाचे सार्थक झाल्याचे स्पष्ट दिसते, जाणवते.
एकदा मी शिवनेरीने मुंबईहून पुण्याला आले. चालकाने गाडी अगदी वेळेत व छान, सुरक्षित चालवत आणली. मी गाडीतून उतरताना त्याचे कौतुक केले. ‘तुम्ही छान, सुरक्षित, वेळेवर आणलीत गाडी’. त्यावर ‘कौतुक केल्याबद्दल तुमचेही आभार’ तो म्हणाला.
अशाप्रकारे कौतुक हे उत्साहवर्धक टॉनिक आहे. आपण दुसर्‍यांसाठी कौतुकाचे बोल वापरायला हरकत नाही. चला तर आजपासून सुरूवात करूया!
- सुवर्णा जाधव 

(साप्ताहिक चपराक, पुणे)
www.chaprak.com

No comments:

Post a Comment