Tuesday, December 1, 2015

पाऊस........आठवणीतला !!!


तो पूर्वी नियमित यायचा; कधी कल्पना देऊन तर कधी आगंतुकासारखा! पण आता लहरी झालाय तो. येत नाही; आता राहीलाय शिल्लक फक्त आठवणीत. त्याची खूप रूपे अनुभवलीत कळायला लागल्यापासून! पहिल्यांदा कधी भेटला ते नाही सांगता येत नक्की पण तो आठवणीत खोलवर रूतलाय एवढं मात्र नक्की. कधी पडायचा झिमझिम, संथ, मंद लयीत. जणू त्याच्या सहस्त्र धारांनी गोंजारायचा अंगअंग. तर कधी झोडपून काढायचा आडवा तिडवा; आई रागावली की झोडपते तसं. तो तसा पूर्ण सुखदही नव्हता आणि पूर्ण दुःखदही. कधी असा तर कधी तसा.
तो जेव्हा आगंतुकासारखा यायचा ना तेव्हा त्याचं येणं खूप आनंददायी भासायचं. आभाळात लख्ख ऊन पडलेलं असायचं. दुपारची शाळा भरायची वेळ झालेली. जेवण उरकून आमचा घोळका शाळेकडे रमत गमत निघालेला किंवा दुपारच्या मध्यांतरात आमचा मैदानावर खेळाचा डाव रंगलेला असायचा. तो यायचा; अचानक ध्यानीमनी नसताना. कोण तारांबळ उडायची, एकच गलका, त्याच्यापासून बचावासाठी पळापळ. त्या ही धांदलीत कोणीतरी ओरडायचं, ‘‘ए, चिमणीचं लगन लागायल की असला पाऊस पडतय बाळ!’’ तो जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच त्वरेने थांबायचाही. तेवढ्याच वेळात चिंब भिजवून मात्र काढायचा. तो गेला की कुणाचीतरी नजर इंद्रधनुष्याच्या सुंदर कमानीवर पडायची. सोबतच एक आनंदभरीत चित्कार, ‘‘ए, ते बघ.’’ सर्वांच्या माना वळायच्या तिकडे. काही वेळ मग तो गलका चालायचा. आपसुकच मग वर्गात पोहचायला उशीर आणि छडीचा प्रसाद. तरी पण त्याचं ते येऊन जाणं इतकं सुखद असायचं की छडी लागायचीच नाही.
 जेव्हा तो आगमनाची वर्दी देऊन यायचा ना तेव्हा मात्र तो तितकासा सुखद भासायचा नाही. आभाळ झाकोळून यायचं, काळेभोर ढग आणि लकाकणार्‍या वीजा. सोबतीला ढगांचा गडगडाट. आभाळ झाकोळायला लागलं की विचीत्र कालवाकालव सुरू व्हायची मनात; उदास वाटायचं, कधी एकदा हे मळभ दूर होईल असं वाटायचं.
 बरेच दिवस कळतच नव्हतं असं का होतय. पावसानं सार्‍यांची मनं प्रफुल्लीत झालेली असायची. तेव्हा मी मात्र विमनस्कपणे पावसाकडे बघत रहायची. नकोनकोसा वाटायचा तो पाऊस अन् ते वातावरण. एक दिवस अचानकच कारणाचा उलगडा झाला. त्या दिवसापासून आभाळ झाकोळल्यानंतर होणारी माझी तगमग कायमची थांबली.
आईवडीलांचं पहिलं अपत्य मी. आईवडील खेड्यातले आणि आजोळ शहरातलं. म्हणजे तालुक्याचं ठिकाण. आजोळी इंग्रजी माध्यमाची नवीन शाळा सुरू झाली आणि माझी रवानगी वयाच्या तिसर्‍या वर्षीच इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी आजोळी झाली. दोनेक वर्ष काढली आजोळात; शाळेत कमी आणि दवाखान्याच्या चकरा करण्यात जास्त. शेवटी डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; ’लेकरू हळवं आहे, आईवडीलांपासून दूर ठेवू नका, आपोआप होईल तब्बेतीत सुधारणा.‘ झाली आमची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या झकपक शाळेतून गावाकडच्या झेड. पी. च्या शाळेत.
शाळा आठवते अजूनही स्पष्ट. शाळेला दोन खोल्यांची इमारत (?) आणि समोर व्हरांडा. एका खोलीत पार्टीशन करून कार्यालय आणि एक वर्ग भरायचा दुसर्‍या खोलीत. एक वर्ग, खोल्यांसमोरच्या व्हरांड्यात दोन वर्ग; अशी चार वर्गांची सोय व्हायची. मग उरलेले तीन वर्ग; पहिली, दुसरी आणि तिसरी सेवा सोसायटीच्या गोदामात एकत्रच. थोड्या थोड्या अंतराने बसवले जायचे. अध्यापन करणारे आमचे गुरूजी आणि अध्ययन करणारे आम्ही विद्यार्थी सारेच धन्य धन्य! माझी अवस्था तर हरितगृहातील कुंडीतून उपटून उघड्या बोडक्या, खडकाळ माळरानावर एखादं रोपटं लावावं तशी.
या सार्‍या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचा माझा केविलवाणा प्रयत्न चालू होता. नुकताच जून महिन्यात शाळेत प्रवेश झालेला. दिवस पावसाळ्याचे. गावातलं सगळं पाणी वाहत येऊन शाळेच्या मैदानात जमायचं आणि तसंच पुढे वाहत जाऊन शाळेच्या खालच्या बाजूने वाहणार्‍या ओढ्याला जाऊन मिळायचं. त्या दिवशीही दुपारी असाच खूप मोठा पाऊस आला. गावातून वाहत आलेल्या पाण्याचा मोठा प्रवाह शाळेच्या मैदानातून ओढ्याकडे झेपावू लागला. शाळेची इमारत गावाच्या शेवटी होती. पाण्याच्या प्रवाहानं शाळा गावापासून वेगळीच केली. शेतातून परतणारी गुरं, माणसं अन् शाळा प्रवाहाच्या या कडेला अन् विरूद्ध कडेवर गाव. प्रवाहाची खोली कमी असली तरी रूंदी खूप जास्त होती. शहराच्या आखिव रेखीव परिवेशातून आलेल्या माझ्या नजरेला ते दृश्य नवीन होतं. भयचकित नजरेनं मी ते दृश्य न्याहाळत होते. बाकी सारी शाळा पावसाचा आनंद घेत होती. तितक्यात एक शेळीचं पिल्लू चुकून पाण्यात पडलं आणि वाहून जाऊ लागंल.
त्याला पकडायला त्याचा दहा बारा वर्षाचा मालक लगोलग पाण्यात शिरला. अलगद त्या शेळीच्या पिलाला पकडून त्याने छातीशी कवटाळलं आणि दुसर्‍या कडेला गेलाही. पाण्यात शिरलेला तो पोरगा, त्यानं पोटाशी कवटाळलेलं ते शेळीचं पिल्लू, त्या पोराच्या कमरेपर्यंत येणारा पाण्याचा प्रवाह! झालं, मी मोठ्यानं रडायला सुरूवात केली. माझ्या बालनजरेला तो तीनेक फुट खोल पाण्याचा प्रवाह खवळलेल्या समुद्रासारखा वाटत होता. कदाचित माझ्या पावसाविषयीच्या नावडीला या आठवणीचा संदर्भ असावा.
 दुसरी अशीच आठवण एकोणीसशे ब्याऐंशीच्या अतीवृष्टीची. आई आणि मी एक रात्र एका पाहुण्याकडे मुक्कामाला होतोत. घरापाठीमागून एक मोठा ओढा वहायचा. सायंकाळी सर्व काही ठीकठाक होतं. अर्ध्या रात्रीनंतर मात्र त्या घराची पाठभींत गायब झाली. जीव मुठीत धरून ओसरीत कुडकुडत रात्र काढलेली अस्पष्टशी आठवते.
 पुढे वाढत्या वयाबरोबर त्याचं महत्त्व पटत गेलं. उदास का वाटेना मनाला पण तो वेळच्यावेळी यायला हवा हे बुद्धीला पटायला लागलं पण तो वरचेवर कमी कमी होत गेला. या अलीकडच्या दोन तीन वर्षात तर इतका दुर्मिळ झालाय की त्याच्या जराशा डोकावून जाण्याचीही आता बातमी होते.
 पूर्वी त्याच्या आगमनाचं फारसं स्वागत वगैरे नव्हतं कुणी करत कारण तो आपलाच होता, जिव्हाळ्याचा होता. सहज, आत्मीयतेने, नियमित यायचा. नाही म्हणायला आई मिरगाचा लाल लुसलुशीत  किडा दिसला तर हळद कुंकु तेवढं वहायची. आता मात्र तो जरा कुठं डोकावला म्हटलं की त्याला उतरवून घ्यायला विमान काय, रडार काय, शास्त्रज्ञांची फौज काय! पण मानवाच्या सगळ्या प्रयत्न, विनंत्या अन् अर्जवांना भीक घालणं बंद केलंय त्यानं. तो हुलकावणी देत, चकवत रहातोय. झड, मुसळधार, धोधो हे शब्द आता शब्द कोशातच बंदिस्त होणार की काय अशी भीती वाटते.
  अत्यंत प्रगत अशा माया संस्कृतीचा विनाश त्याच्या न येण्यानं झाल्याचं कुठंतरी वाचलं होतं; ते आठवतं. मन चिंतेनं भरून येतं. हा असाच हुलकावत राहीला; आलाच नाही तर?
 कसा पोहचवावा निरोप त्याच्यापर्यंत? खूप चुकलोय रे आम्ही! करतो सगळ्या चुका दुरूस्त पण तू ये; पूर्वीसारखाच आपुलकीने, प्रेमाने; पुन्हा एकदा भीजव, चिंब चिंब होऊ दे. मानव जातीशी तुझा स्नेह कायम राहू दे, युगायुगांपर्यंत!!
भेगावलेल्या भूईतून उगवलेले
शेकडो शेकडो हात
दीनपणे तुझ्या पुढे पसरलेले
दुर्लक्षू नकोस त्यांची याचना
युगायुगांच नातं तुझ्याशी जोपासणारी धरणीमाता
लेकरांच्या चिंतेनं व्याकुळ, सैरभैर
तुझ्या सहस्त्र बाहूंनी
तिला घे कवेत अन्
संपू दे हा विरह ...........जीवघेणा !!

-विद्या बयास /ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर 413514
भ्र. 7038665684


No comments:

Post a Comment