एकदा एका मांजरीशी गाठ पडली माझी. हो, मांजरच! तसा तर अगदी क्षुल्लक जीव पण मला खूप काही देऊन गेला. मुख्य म्हणजे मला विचारप्रवण करून गेली ती! ती नुसती मांजर राहिली नव्हती माझ्यासाठी मादीच; भले ही मग ती माणसाची असो वा प्राण्याची! तिचं निरीक्षण करताना कितीतरी स्त्री विषयक प्रश्न मनात जन्मले. प्रसंग तिच्या बाबतीत घडले आणि मनात मालिका समस्त स्त्रीविषयक प्रश्नांची सुरू व्हायची. आठ पंधरा दिवसांचा सहवास तिचा; मनात विचारांचं काहूर ऊठवून गेला.
त्याचं झालं असं; एका आळसावलेल्या दुपारी सहज जिन्याकडे नजर गेली तर जिन्याखालच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीतून उडी मारून एक पांढरी मांजर बाहेर पडताना दिसली. सावधपणे पायर्या चढत ती छताकडे गेली आणि तिथून बहुतेक आपल्या गंतव्याकडे. काही दिवसांपासून छतावरचा दरवाजा उघडा होता. बहुतेक तिथून प्रवेश मिळवून तिनं आमच्या घरात घुसखोरी केली असावी.
ती पहिल्यांदा दिसली तेव्हा विशेष काही वाटले नाही दुसर्यांदा तिची चाहूल लागली तेव्हा मात्र उत्सुकता चाळवली गेली. ती घरात यायची नाही मग घराच्या या भागात खाण्यासारखं काही सापडण्याची शक्यता नसताना ती का येत असावी? एखादा क्षुल्लक प्रश्न ही माणसाचं स्थैर्य भंग करून त्याला प्रसंगी कार्यप्रवणही करतो. माझंही काहीसं तसंच झालं. मी उत्सुकतावश जिन्यात जाऊन जिन्याखालच्या टाकीत डोकावले आणि प्रसन्नतेची एक लकेर मनाला स्पर्शून गेली. इवलाली तीन पिल्लं अंगाचं मुटकूळं करून शांत झोपलेली. मी चटकन बाजूला झाले. लहानपणी कधीतरी ऐकल्याचं आठवलं; मांजरीच्या पिल्लांना धोका आहे असं वाटलं तर मांजर प्रसंगी हल्ला ही करते. बाळाच्या ओढीनं डोंगरकडा उतरून जाणारी हिरकणी, ऑफिस सुटल्यावर घराकडे धावत सुटणार्या आधुनिक हिरकणी आणि पिल्लांसाठी हिंस्र होणारी मांजर या सार्यांच्या काळजाची जात शेवटी एकच ना!
पुन्हा कधीकधी ती कंपाउंडवरून चाललेली दिसायची. भुरकट छटेचा पांढरा रंग, तशी थोडी रोडच, पाठीला किंचीत बाक देऊन पाठ वर उचलून ती संथ पावलं टाकायची तेव्हा तिचा बांधा छान कमनीय वाटायचा. तिच्या चालण्यात नवयौवनेचा नखरेलपणा जाणवायचा. बहुतेक पहिलटकरीण असावी .
मीही मुद्दाम ठरवून जिन्याकडे पुन्हा पुन्हा डोकावायचं टाळलं. दिवसातून एकदोनदा वाटीभर दूध जिन्यात ठेवायच पण अगदी अलीकडे. तिला माहेरासारखं निवांत या जिन्याखालच्या टाकीत रहाता यावं हा माझा हेतू.
तिला माहेरपणाची अनुभूती द्यायच्या नादात माझ्या मनात माहेरविषयक विचारांची मालिका आपोआप चालू व्हायची. माहेर म्हणजे हक्काचं विश्रांती स्थान, हक्काचा आसरा, भरल्या घरात ही डोळ्यांच्या कडा ओलावणारा हळवा कोपरा. आताशी या माहेराचं बदलेलं रूप ही बरेचदा पहायला मिळतं. स्त्रियांना माहेरच्या संपतीत अर्धी वाटणी मिळवून देणार्या कायद्याने किती स्त्रियांना वाटणी मिळवून दिली माहीत नाही पण या कायद्याअंतर्गत न्यायालयात दाखल होणार्या दाव्यांनी ती माहेरला मात्र कायमची मुकलेली बरेचदा पहायला मिळते. बरं ही कायदेशीर प्रक्रिया करताना तिची खरंच संमती असते का? हा वेगळा प्रश्न पण शेवटी कुचंबणा, मानसिक एकटेपणात भरडली जाते ती स्त्रीच. स्त्री शिक्षणानं स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन दिलं हे खरं. सोबतच अनेक गुंतेही निर्माण झाले. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रियांच्या बाबतीत माहेर बरेचदा तितकं हळवं होताना दिसत नाही. मग या स्वावलंबी स्त्रीची मानसिक गरज, तिची प्रेमाची भूक कोण पूर्ण करणार? कोण भागवणार? आर्थिक स्वावलंबनासोबत मानसिक अपूर्णता अनुभवत अनेक कमावत्या स्त्रिया आतल्या आत घुसमट दाबून टाकतात. आभार त्या मांजरीचे! तिच्या मुळे मी माहेरच्या बदलत्या रूपावर चिंतनाला सुरूवात तर केली. कदाचित या विषयावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहिताही येईल.
माझी मुलं आता कॉलेजात जाऊ लागली आहेत. त्यांचं बालपण अनुभवून मला खूप दिवस झालेत. मग मला त्या मांजरीच्या पिल्लांनी वेड न लावलं तरच नवल! माझ्या कामाच्या रहाटगाडग्यातून वेळ काढून ती नसेल तेव्हा दिवसभरात दोनचारदा तरी तिच्या पिल्लांकडं माझं डोकावणं सुरू झालं. ती पिल्लं बहुधा शांत झोपलेली असायची. मला आता उत्सुकता होती त्यांच्या बागडण्याची. मी ऐकून होते की मांजर पिल्लांची जागा बदलत राहते; फार दिवस एका ठिकाणी ठेवत नाही. मी मनात म्हणायची ही इथून लवकर नाही गेली तर हिच्या बाळांचं बागडणंही अनुभवता येईल .
‘जन्म’ म्हणजे निसर्गाच्या सृजन शक्तीचा सर्वोच्च अविष्कार. म्हणून तर ’जन्म’ मग तो माणसाच्या पिल्लाचा असो किंवा पाळीव प्राण्यांच्या पिल्लांचा प्रचंड कुतूहल आणि आनंद निर्माण करतो. जन्मणार्याचं प्राक्तन त्याला कुठे घेऊन जाणार आहे; त्याला काय काय भोगावं लागणार आहे या प्रश्नांचा पुसटसा ही स्पर्श मनाला न होता आपण नवीन जिवाच्या जन्मानंतर आनंदी होत राहतो. माझंही काहीसं तेच झालं.
काळाच्या उदरात दडलेल्या घटनांपासून माणूस अनभिज्ञ असतो म्हणून तर माणसाच्या जगण्यात आनंद, आशा आणि थ्रील आहे. दुःख अचानकच येतात म्हणून तर त्या अगोदरचे दिवस निवांतपणे व्यतीत होत असतात. माझ्या पिल्लं निरीक्षणाच्या कार्यक्रमात मला काही दुखद ही बघावं लागेल याची मी कल्पनाच केलेली नव्हती. माझ्यासाठी तो निखळ आनंददायी विरंगुळा होता.
एका संध्याकाळी; उन्हे उतरायला लागल्यावर मी पिल्लांच्या ठिकाणाकडे गेले. तर पिल्लं गायब. मनात एक सौम्य विषाद डोकावून गेला; दुसरीकडे घेऊन गेली वाटतं! मनात म्हटलं जाऊ दे. असंच जरा छतावर जाऊन येऊ म्हणून चार पायर्या चढले तर एका कोपर्यात लांबट आकाराची घाणेरडी वस्तू पडलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर मांजरीच्या पिल्लाचा पाय! काळजात सळ्ळ झालं! म्हणजे बोक्यानं तिची पिल्लं फस्त केली तर! खरंच शब्दात नाही मांडता येत काय काय भावना दाटून आल्या. करूणा, दुःख, त्या न बघितलेल्या बोक्याचा तिरस्कार व क्रोध! सारंच मी काही क्षणात एकत्रच अनुभवलं. त्या मांजर कुटूंबाचा लळाच लागला होता. दुपारीच तर सारे ठीक होते. हे कधी घडले असेल? उदास वाटत होतं. म्हटलं छतावर थांबू थोडा वेळ. छतावर पण एकदोन ठिकाणी अवयवांची घाण पसरलेली दिसली पण मी दुर्लक्ष केलं.
थोड्या वेळानं तिची म्यांव म्यांव ऐकू आली. कमालीचा करूण स्वर होता तिचा. ती छतावर आली; वाटलं आता अंगावर तर नाही ना यायची? तिचाही विश्वास असावा बहुतेक माझ्यावर! ती चवताळून नाही आली माझ्या अंगावर. सैरभैरपणे छतावर, छतावरून पायर्यांवर, पायर्यांवरून पुन्हा छतावर फिरत राहिली. कमालीचा करूण स्वर होता तिचा. मधूनच काही क्षण थांबून बघायची माझ्याकडे. जणू तिचे डोळे विचारत होते मला; बघितलीस का माझी पिल्लं? काय झालं त्यांचं? कुठे गेली? काळजातली कालवाकालव आवरत नव्हती. ती आई होती. तिचा आक्रोश माझ्या मातृहृदयाला थेट भिडत होता. मी स्वतःला सावरलं, परत खाली आले.
नंतर ही चारसहा दिवस ती जिन्याखाली, कंपाउंडवर, अंगणात अस्वस्थपणे चकरा मारत राहिली. मधूनच करूण स्वरात म्याऊ करायची. जणू पिल्लांना हाक मारत असावी.
तिला पहाताना एक बोचरा, अस्वस्थ करणारा प्रश्न मनाला चटके देत रहायचा; नर आणि मादीचं हे कसलं नातं? सृजनाचा सोहळा साजरा करणारा नर मग तो मानव असो किंवा इतर प्राण्यातला, त्या क्षणांनंतर अलिप्त होतो आणि मादी मात्र त्याच क्षणांचं ओझं मातृत्वाच्या रूपात वागवत राहते... आयुष्यभर! अशा कितीतरी विधवा,परित्यक्ता, बलात्कारीता या ओझ्यासोबत मरणप्राय यातना भोगत जगत राहतात. निसर्गानं बांधिलकीची एकही खूण त्याच्याकडे का शिल्लक ठेवू नये? त्याच्याही सहभागाचा एखादा तरी पुरावा! तसा तो असता तर कदाचित समाजाचं चित्र काही वेगळं राहिलं असतं. एक अधिक सहिष्णू, जबाबदार समाजव्यवस्था कदाचित अस्तित्वात असती. ज्या समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एवढा गंभीर राहिला नसता. निर्भयपणे वावरणार्या स्त्रीनं प्रगतीची अजून ही ऊंच शिखरं सर केली असती. कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या आपण तरी अजूनही एक भयमुक्त समाज स्त्रीला पुरवण्यात आपण समाज म्हणून कमी पडलो आहोत हे वास्तव आहे.
तरी बरं, एक समाधान तरी आहे; किमान समाज स्त्रीची अपत्याबाबतची बांधिलकी मान्य तरी करतो! म्हणूनच तर म्हणतात ना; बाप एखाद वेळेस मेला तर चालेल पण लेकरांच्या भल्यासाठी माय मात्र जिवंत राहिली पाहिजे!
(साहित्य चपराक डिसेंबर २०१५)
- विद्या बयास
शिरूर ताजबंद, जि. लातूर
७०३८६६५६८४
No comments:
Post a Comment