Wednesday, April 20, 2016

ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स नावाच्या 'शांताराम'ची कहाणी

(परीक्षण पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)

‘‘आय हॅव बीन इन टू पॉलिटीक्स ऑल माय लाईफ.’’  हेच ते वाक्य. ते वाचून काही अंदाज येतो? हे वाक्य कुठल्या क्षेत्रातील व्यक्तीचं आहे याचा? अचूक अंदाजाच्या जवळपास तरी पोहोचता येईल? खूप कठीण आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस! किंवा नेल्सन मंडेला, फिडल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनाच शोभून दिसेल असं हे वाक्य! मग ते आहे तरी कुणाचं? तर ते एकेकाळच्या अंडरवर्ल्ड गँगस्टरचं आहे! दचकलात ना? मग आता त्याची कहाणी वाचाच! ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस्! आधी ऑस्टे्रलिया, मग मुंबई. दोन्हीकडच्या अंडरवर्ल्डमध्ये वावरलेला हा गँगस्टर. त्याच्या आत्मचरित्रातलं हे वाक्य. शितावरून भाताची परीक्षा होते व या एका वाक्यावरून गे्रगरी डेव्हीड रॉबर्टसची. त्याचं हे मूळ इंग्रजी आत्मचरित्र, ‘शांताराम’! जगभर गाजलं ते. ग्रंथाची धाटणी आत्मचरित्रात्मक कादंबरीची. तीसपेक्षा अधिक भाषांत याचं भाषांतर झालं. पन्नास लाख प्रती खपल्या त्याच्या. मग ते आलं मराठीत. ते केलं नाशिकच्या अपर्णा वेलणकरांनी. मराठी भाषांतर मोठं झालं. चौदाशे पानं. मूळ लेखनच अतिशय प्रांजळ. थेट ‘सत्य’ सांगणारं. अगदी त्याच्या आयुष्यातले सत्याचे प्रयोगच! सगळी सत्ये जीवघेणी! अंगावर येऊन आदळणारी! ग्रेगरी जणू जन्मजात लेखक! जन्मानं ऑस्ट्रेलियन. त्याचा आवाका अफाट! सगळ्याच बाबतीतला. मानवी आयुष्य, अंडरवर्ल्ड, अवती भोवतीचं व अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास सगळ्याच बाबतीतली समज अफाट! दुसरीकडे अपर्णा वेलणकर! पेशानं पत्रकार व भाषांतरकार. वेलणकरांना शंभरपैकी दोनशे गुण द्यावेत. तसं भाषांतरच केलंय शांतारामचं त्यांनी. साहित्याच्या क्षेत्रातले सगळे पुरस्कार. ते सगळे ओवाळून टाकावेत असं हे भाषांतर! कठीण काम होतं; मात्र ते किती चोख करावं? त्याचं हे उदाहरण. असं असलं तरी या भाषांतराला कुठलाही महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याचं ऐकण्यात वा वाचण्यात नाही. असो!
मग ग्रेगरी असं नेमकं का म्हणतो? ‘‘आय हॅव बीन इन्टू पॉलिटिक्स ऑल माय लाईफ.’’ त्यासाठी त्याच्या वादळी आयुष्यातली ही सगळी पानं. ती काळजीपूर्वक  वाचावी लागतात. दोनदोन वेळा वाचावी लागतात. प्रसंगी तीन-तीनदा वाचावी लागतात. या आत्मचरित्रात्मक कादंबरीची सुरूवात. ती मुंबई शहरापासून होते. अर्थातच ग्रेगरीच्या आयुष्यात मुंबईचं स्थान खूप महत्त्वाचं; मात्र ही कहाणी त्याच्याही खूप आधीपासून सुरू होते. ग्रेगरीच्या तरूणपणापासून. ‘‘कट्टर साम्यवादी विचारांच्या कुटुंबात मी वाढलो.’’ ग्रेगरीनंच आत्मचरित्रात हे सांगितलं आहे. त्याच्यावर हा संस्कार त्याच्या आईकडून झाला.  आई-वडिलांबद्दल त्यानं अत्यंत मोजकंच लिहिलंय. अगदी सगळं मिळून फार तर पानभर असेल ते; मात्र त्यावरूनही वाचकांना काही कयास करता येतो. ग्रेगरीची आई पक्की समाजवादी होती. खूप खंबीर स्त्री असली पाहिजे ती. ‘‘आयुष्यात जे काही करशील ते हिमतीनं कर. हिंमत हारला नाहीस तर फार भरकटणार नाहीस तू!’’ त्याची आई एकदा त्याला म्हणाली होती. दुसरा मुद्दा ‘मी आयुष्यभर राजकारणच जगलो’ असं तो जे म्हणतो त्याचा. कुठलाही साम्यवादी तरूण घ्या, त्याचा राजकारणाचा अभ्यास असतोच. अनेक राजकीय प्रश्‍नांचा तो विचार करत असतो. सामाजिक प्रश्‍नांचा विचार करत असतो. अभ्यासाची सवय असते. ग्रेगरीचं तसंच झालं. अशी मुलं मग अनेक चळवळीत भाग घेतातच. कर्तव्य म्हणून करतात हे ते सगळं. गे्रगरीलाही राजकारण खूप लवकर उमगू लागलं. अगदी आंतरराष्ट्रीय प्रश्‍नही समजू लागले. अमेरिकनं व्हिएतनामवर युद्ध लादलं हा तो काळ. या युद्धात अमेरिकेनं ऑस्ट्रेलियालाही ओढलं. व्हिएतनामनं अमेरिका व ऑस्ट्रेलियाला कठोर प्रतिकार केला. अनेक अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैनिकांचे बळी जाऊ लागले. अमेरिकेत युद्धविरोधी निदर्शन सुरू झाली. ऑस्ट्रेलियातही हेच घडलं. तिथले तरूण रस्त्यावर उतरले. मागणी करू लागले. ऑस्ट्रेलियानं युद्धातून माघार घ्यावं ही ती मागणी. या रस्त्यावरच्या तरूणांमध्ये ग्रेगरी होताच. त्यावेळी प्रसंगी त्यानं बॉम्बही बनवले. मोर्चे काढले. पोलिसांविरूद्धच्या रस्त्यावरील लढाया लढल्या. एकतर अमेरिकेचं व्हिएतनामवरचं आक्रमणच होतं हे. व्हिएतनाममधल्या बळींची संख्याही थोडी थोडकी नव्हती. ग्रेगरीचा पिंड साम्यवादी विचारांच्या मुशीत घडलेला. या आक्रमणाकडे तो सर्वच बाजूंनी पाहत असला पाहिजे. त्यातल्या साम्राज्यवादी राजकारणात लक्षावधी माणसांचे बळी जात होते. ते पाहून त्याची झोप उडाली नसती तरच नवल.
तरूण वयात प्रत्येकाचा कोणीतरी हिरो असतो. तसा ग्रेगरीचाही होता. नेड केली. हा केली तेव्हा पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत मारला गेला. या गोष्टीचा गे्रगरीवर खूप खोल परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक ‘चे गव्हेरा.’ या गव्हेराचं स्थानही ग्रेगरीच्या आयुष्यात खूप मोठं; मात्र ‘चे’ बद्दल त्यानं एखादं वाक्यच लिहिलं आहे. त्यावरून त्याची ‘चे’ वरची श्रद्धा मात्र समजते. ग्रेगरीचं ते तरूण वय. त्यात कवी मन. सगळ्या क्रांतिकारक चळवळीत सहभाग. असा सगळा त्याचा तो काळ. त्याच दरम्यान तो प्रेमात पडला. तो व ती. दोघं एकमेकांच्या प्रेमात. नाव सांगितलंच पाहिजे तिचं. क्लेरी. देखणी होती ती; मात्र वस्ताद. इतक्या उमद्या मनाचा तरूण तिच्या आयुष्यात आला होता! तिला आनंद व्हायला हवा होता याचा. अभिमान वाटायला हवा होता त्याचा; मात्र पोरगी पक्की व्यवहारी व धूर्त! अगदी कावेबाज म्हणायलाही हरकत नाही. तिला जाणवलं, हा माणूस पटेल ते करणारा. स्वतःपेक्षा अवती भोवतीच्या परिस्थितीचा विचार करणारा. आपण समाजाचं काही देणं लागतो असं मानणारा. त्याचं हे असं असणं. तिला चक्क बेजबाबदारपणाचं लक्षण वाटायला लागलं ते. मग या अंबाबाईनं एका बेसावध क्षणी काय करावं? या लेकराला तिनं चक्क सांगून टाकलं, ‘‘यू आर इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग ऍन्ड कमिटेड टू नथींग.’’ (तुला सगळ्यात तोंड घालायला आवडत, पण जबाबदारी घ्यायला तयार नसतोस तू.) असं म्हणून त्याला त्या बिचारीनं कायमचं ‘टाटा बाय बाय’ करून टाकलं. कोवळ्या, स्वप्नाळू वयातला तो प्रेमभंग! तो त्यानं पचवला. भविष्यात अशा आणखी काही रंभा-उर्वशी त्याच्या आयुष्यात येणार होत्या. त्यावेळी ते त्याला माहीत नव्हतं इतकंच. तिच्या नकारानं त्याच्या मनावर जखम केली मात्र. या क्लेरीची आठवण त्याला आयुष्यात पुन्हा कधी यावी? अनेक वर्षांनी त्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये होता. तिथं भयानक युद्ध पेटलं होतं. तेव्हा रशियन सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं. मग तिथल्या अफगाण मुजाहिदीनांनी सोविएत रशियाच्या या सैन्यासोबत युद्धच पुकारलं.  या मुजाहिदींनांना अमेरिकेचं पाठबळ. या युद्धात ग्रेगरी सापडला. भयंकर चक्रव्यूह!! तो तेव्हा मुजाहिदीनांना मदत करायला तिथं गेला होता. नाईलाज होता त्याचा. 1985 साल होतं ते. मृत्युची टांगती तलवार सतत डोक्यावर. अवतीभवती युद्ध पेटलेलं. कित्येकजण त्याच्या समोरच मारले गेलेले. माणसांच्या शरीराच्या चिंध्या होताना पाहत होता तो तिथं! नुसता अमानुष रक्तपात!! अन् अशावेळी त्याला कुणाची आठवण यावी? तर क्लेरीची! काय तरी पहिलं प्रेम? पहिलं प्रेम कधी कुठं आठवण काढेल सांगता येत नाही; मात्र खरी गंमत पुढेच आहे. क्लेरीच्या त्या वाक्याबद्दल ग्रेेगरीनं त्याचंही मत लिहिलंय. काय लिहितो तो? तर ‘‘बरोबर होतं तिचं. खरं होतं ती म्हणत होती ते’’ ग्रेगरी म्हणतो. मात्र बेजबाबदार कोण होतं? गे्रगरी की क्लेरी? ग्रेगरी आता जगप्रसिद्ध लेखक आहे व एक सच्चा, दिलेर, पारदर्शी माणूस सुद्धा! हे दुर्दैव ग्रेगरीचं नव्हे तर क्लेरीचं होतं का? व्यवहारी क्लेरीला एक सुंदर व्यक्तिमत्त्व ओळखता आलं नाही का? त्याच्यातला क्रांतिकारक व बंडखोर माणूसही ओळखता आला नाही का? व त्याचं हळवं कवी मन देखील? आता इथं ‘जर तर’ला अर्थ नाही. कदाचित क्लेरी आयुष्यात आली नाही म्हणूनच पुढचं महाभारत घडलं. ग्रेगरीकडून ‘शांताराम’नावाचं हे महाकाव्यच लिहून झालं. या महाकाव्यात अनेक नायक होते; मात्र महानायक एकच होता, ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस; मात्र त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा. ग्रेगरीनं स्वतःला कुठंही नायक वा महानायक मानलं नाही. संपूर्ण आत्मचरित्रात कुठंही फुशारकी व ‘मी’पणा नाही. त्याच्या सगळ्या घोडचुका. त्या त्यानं या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. अगदी मोकळेपणानं. स्वतःचे रागलोभ, प्रेम, द्वेष, लैंगिक वासना काहीही लपवून ठेवलं नाही. स्वतःचं माणूस असणं त्याला नेहमी महत्त्वाचं वाटलं. तो स्वतःही प्रचंड माणूसवेडा! माणसं ओळखणारा. त्याच्या या अवाढव्य आत्मचरित्रात माणसाच्या स्वभावाचे असंख्य नमुने आहेत. इथं प्रेमळ माणसं आहेत. दिलेर माणसं आहेत. खुनशी माणसं आहेत. पाताळयंत्री माणसं आहेत. खोटारडी माणसं आहेत. कारस्थानी माणसं आहेत. प्रामाणिक माणसं आहेत. मेहनती माणसं आहेत. सगळ्या प्रकारची माणसं आहेत. त्यानं आयुष्यात माणसं अचूक ओळखली. त्यात सहसा चूक झाली नाही; मात्र त्याआधीच्या काळात त्याचं वैवाहिक आयुष्य मात्र संपलं. घटस्फोट झाला. मुलीचा ताबा मिळाला नाही. त्यातून नैराश्य आलं. व्यसनं जडली. पावलं गुन्हेगारीकडं वळली. वृत्तीच एका गुन्हेगाराची झाली. बायको कारणीभूत झाली का या सगळ्याला? ग्रेगरीनं मात्र तिला दोष दिलेला नाही. तिचा उल्लेखच तो करत नाही. तर तिथं तो जवळपास गप्प राहणंच पसंत करतो. एरवी तो बोलतो तो त्याच्या लेखणीतूनच. ‘‘निदान लिहिताना तरी मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो, म्हणूनच कदाचित माझं लाजिरवाणं आयुष्य मला पेलता आलं. ते दिवस निभावले गेले व निराशा आली नाही’’ तो एकेठिकाणी म्हणतो सुद्धा.
तर असा हा ग्रेगरी. आस्ट्रेलियात एका रॉबरीच्या गंभीर गुन्ह्यात अडकला. शिक्षा झाली. किती? तर एकोणीस वर्षांची. शिक्षा भोगतच होता; मात्र तुरूंगातून पळून जाण्याचे विचार मनातून जाईनात. मग हा तुरूंग फोडून पळाला. खायचं काम नव्हतं ते. एकेका पावलावर मृत्यू उभा होता. यत्किंचिंत चूक व्हायचा अवकाश, ठार मारला गेला असता तो. ते ऑस्टे्रलियाचं ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’ होतं. तिथले बंदुकधारी सुरक्षारक्षक. ते डोळ्यात तेल घालून पहारा देत. हा त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पळाला. तो प्रसंग वाचताना जिभेला कोरड पडते. खड्डा पडतो भीतीनं पोटात! फक्त एक सहकारी या धाडसात त्याच्या बरोबर होता. तुरूंगातून पळाला हा व ‘रेड कॉर्नर नोटीस’चा धनीही झाला. तुरूंगातून पळाल्यानंतर बारा दिवसांनी हा कुणाकडे गेला असेल? तर त्याच्या आवडत्या प्राध्यापकांकडे. तो पूर्वी शिकत होता ते विद्यापीठ. ते प्राध्यापक तिथं ‘तत्त्वज्ञान’ हा विषय शिकवत. ज्यू होते ते. अत्यंत बुद्धिमान, गाढे अभ्यासक व विचारवंत असं तो त्यांचं वर्णन करतो. या दोघांमधला संवाद. वाचकांनी तो मुळातून वाचावा. सरांची ती भेट ग्रेगरी कधीच विसरू शकला नाही. काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी काय वाटेल ते कर; पण एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस. बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुबाडण्याचे तुझे धंदे आता बंद कर. यापुढं तू कधीही बंदुकीला हात लावता कामा नये.’’ ग्रेगरी सुन्न! ऐकत राहिला सर काय म्हणतात ते. ग्रेगरीबरोबर आणखी एक कैदी पळाला होता. सरांनी गे्रगरीला स्वच्छ सांगितलं, ‘‘त्याची संगत सोड. नाहीतर त्याच्यामुळं तुही पकडला जाशील.’’ आणखी काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘देशाबाहेर पड व जग फिरून ये. फार बोलू नकोस. गरज असेल तेवढीच माहिती लोकांना द्यावी.... ऍन्ड आस्क पीपल फॉर हेल्प. मदत मागायला लाजू नकोस. यू विल बी ऑल राईट.... सगळं नीट होईल. काळजी करू नकोस. तुझं आयुष्य ही एका विलक्षण धाडसाची कहाणी असेल.... आत्ता कुठं तुझ्या कहाणीची सुरूवात होतेय.’’ पुढं सहा महिन्यांनी काय घडलं? तर ग्रेगरीचा तो कैदी मित्र पकडला गेला. सरांनी सांगितलं होतं तसंच घडलं. त्यांनी ग्रेगरीला याबाबतीत सावध केलं नसतं तर? ग्रेगरी मित्रांच्या बाबतीत तसा भाबडा. तो स्वतःहून त्या मित्रापासून कधीच दूर गेला नसता; मात्र तो धोका सरांमुळं टळला. सरांकडेच जावं असं त्याला का वाटलं? याचं उत्तर तो देतो. ‘‘तसं का वाटलं हे मला तेव्हा समजलं नव्हतं. आजही नाही सांगता येणार... आय जस्ट हॅड टू स्पीक टू हिम. काहीही करून मला त्यांना भेटायचं होतं.’’ त्यावेळी पोलीस गे्रगरीला शोधत होते. सरांचं विद्यापीठ शहराच्या टोकाला. धोका पत्करून हा तिथपर्यंत गेला. आश्‍चर्य असं, सर त्याची वाटच पहात होते. ‘‘तू माझ्याकडं येशील हे माहीत होतं मला..’’ त्यांचं पहिलंच वाक्य होतं. त्याची पूर्वीची प्रेयसी क्लेरा व पहिली पत्नी एकीकडे व दुसरीकडं हे सर. दोघांच्या दृष्टिकोनात जमीन-आस्मानाचं अंतर. त्या दोघी केवळ अपघातानं ग्रेगरीच्या आयुष्यात आल्या होत्या का? सरांचं नक्कीच तसं नव्हतं. सरांना ग्रेगरीची कुवत कळली होती का? आवाका समजला होता का? नक्कीच! मात्र त्यासाठी माणसांची पारख व मानवी आयुष्याची अफाट समज असायला लागते. सरांकडे ती होती.
तर कादंबरी अशी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत पुढे जाते. क्षणभरही खाली ठेववत नाही. आता हा ग्रेगरी ‘शांताराम’ कधी झाला? तर तो मुंबईत आल्यानंतर. तुरूंगातून पळाल्यानंतर काय घडलं? तर न्युझीलंड, आफ्रिका, आशिया, युरोप. ग्रेगरी असा सगळीकडं भटकत राहिला. रेड कॉर्नर नोटीस होतीच. मग नकली पासपोर्ट व बनावट कागद पत्रं. त्याच्या आधारे तो देशोदेशींच्या सुरक्षा व्यवस्थेला हूल देत राहिला. असं करत तो एकदाचा आला ते आपल्या मुंबईत. साल होतं 1982. विमानतळावर तो उतरला. कुठं जायचं? काय करायचं? माहीत नव्हतं. विमानतळावर प्रभाकर खाडे उभा होता. नियतीच्या रूपात जणू गे्रगरीची वाटच पहात होता तो. ग्रेगरीचा महाराष्ट्रातला पहिला मित्र. दोघं जीवाभावाचे यारदोस्त झाले. जळगावमधील ‘सुंदर’ हे प्रभाकरचं गाव. प्रभाकरनं आधी ग्रेगरीला झोपडी मिळूवन दिली. कुठं? तर मुंबईत कुलाब्याच्या झोपडपट्टीत. ग्रेगरीनं इथं मुंबईतल्या झोपडपट्टीतलं सगळं मानवी आयुष्यच वाचकांपुढे उभं केलं आहे. काही दिवसांनी प्रभाकरनं ठरवलं. तो ग्रेगरीला सुंदर या आपल्या गावी घेऊन गेला. हा तिथं राहिला चक्क सहाएक महिने. तिथल्या माणसात मिसळून गेला. शेतात राबला. मराठी शिकू लागला. प्रभाकरचे वडील किसनबाबा व आई रखमाबाई. दोघांशीही ग्रेगरीची गट्टी जमली. रखमाबाईला ग्रेगरीचं नाव मात्र खटकू लागलं. पटकन् उच्चार तर करता आला पाहिजे. त्याचं टोपणनावही तिला रूचेना. मग एका क्षणी त्या माऊलीनं त्याला सांगितलं, ‘‘आजपासून तू आमचा शांताराम.’’ शांतारामच का? तर काही प्रसंगात तो शांतपणे विचार करत असताना ती त्याला पाहत होती. ग्रेगरी शांताराम झाला. भारत नावाच्या या देशात मग तो मिसळून गेला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबई हे त्याचं घरच झालं. हिंदी तर उत्तम शिकलाच शिवाय मराठीवर प्रेम जडलं ते आजतागायत. शांतारामचं मराठीत भाषांतर होतंय हे कळलं तेव्हा त्याला स्वर्ग दोन बोटे उरला. भाषांतरकार अपर्णा वेलणकर. त्यांना तो भेटला. त्यांचा जिगरी मित्रही झाला. शांतारामध्ये एकापेक्षा एक असे प्रसंग येतात. ही चौदाशे पानं आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो व संपूर्ण शांताराममय होऊन जातो. काहीवेळा अटळपणे डोळ्यात अश्रू उभे राहतात.
ही कहाणी इथंच संपत नाही. सत्य हे अद्भूतच असतं. ग्रेगरीनं कुलाब्याच्या झोपडपट्टीत मोफत दवाखाना चालवला. दवाखाना म्हणजे काय? तर त्याची एवढीशी झोपडी हाच दवाखाना. सकाळी उपचारासाठी रांग लागे. हा पूर्ण मोफत उपचार करे. रूपयाही घेत नसे. अगदी गंभीर जखमांवर टाके घालण्यापासून त्यानं उपचार केले. यासाठी गोळ्या-औषधं, इंजेक्शन्स वगैरे हा कुठून पैदा करत होता? तर खार जवळच्या फाट्यावर रेल्वे साईडिंगचं एक आवार होतं. तिथं कुष्ठरोग्यांची वस्ती होती. त्यांच्याकडून हा औषधे आणत असे. आता इतकी भारी भारी औषधं तिथं कुठून येत? हे मुळापासून वाचलं तर आश्‍चर्यानं टाळूला चिकटलेली जीभ पुन्हा मूळ पदावर येणं कठीण. या औषधांचा खर्च करणारी व्यक्ती कोण होती? हेही पुस्तकातच वाचलेलं बरं. ग्रेगरी मुंबईत येताच पक्का मुंबईकर झाला. मात्र त्याला एक जाणीव झाली होती. हे शहर निष्पापांचं नाही. ‘‘मुंबईत येऊन फार काळ लोटला नसला तरी पैशाच्या तालावर नाचणार्‍या या शहराचा भ्रष्ट, विकला गेलेला चेहरा मी अनेकदा पाहिला होता’’ तो एकेठिकाणी स्वच्छच म्हणतो. याकाळात त्यानं मुंबईतलं अर्थकारण पाहिलं. विशेषतः देशी-विदेशी चलनाच्या काळ्या बाजाराचं त्यानं निरीक्षण केलं. त्याचा अभ्यास केला. त्याला हे गरजेचं होतं. कारण तो अंडरवर्ल्डमध्ये वावरत होता. याच काळ्या बाजारात काम करत होता. हे सगळं ग्रंथात  तो मांडतो. कसलाच आडपडदा ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट तो त्यातल्या असंख्य बारकाव्यानिशी मांडतो. ती कुठंही कंटाळवाणी होत नाही. समजायला जड होत नाही. मुंबईबद्दल त्यानं खूप लिहिलंय या ग्रंथात. अपर्णा वेलणकरांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘ग्रेगरीची मुंबई माझ्या ओळखीची नव्हती.’ ग्रेगरीला सगळी मुंबई पाठ! अगदी तळहातावरच्या रेषा पाहाव्यात अशी. मध्ये पुलाखालून किती पाणी वाहून गेलं? तीस वर्षे उलटून गेली. आजही तो मुंबईत येतोच येतो. जगभर फिरत असतो; मात्र त्याच्या मनात भावना एकच असते, मुंबई हेच आपलं खरं घर आहे. आता तो गँगस्टर राहिलेला नाही. त्या नरकयातनांतून तो कधीच बाहेर पडला. उरलेला तुरूंगवासही भोगून झाला. तुरूंगातच शांताराम बरचसं लिहून झालं. पुढं त्यानं एक मल्टिमीडिया कंपनी स्थापन केली. 2003 साल. या साली शांताराम बाजारात आलं. त्यानं खपाचे उच्चांक गाठले. आता जगभर कुठंही तो मोठमोठ्या हॉटेलात उतरतो. मुंबईत आला की वरळीतलं एक मोठं हॉटेल. ते त्याच्या दिमतीला हजर असतं; मात्र इतक्या अफाट यशाचा ग्रेगरीवर काही परिणाम झालाय का? होय! एक उलटा परिणाम झालाय. तो अधिक नम्र झालाय. अधिक समंजस झालाय.  अधिक सुसंस्कृत, शहाणा व प्रगल्भ झालाय. आजही तो मुंबईतील त्याची झोपडपट्टी विसरलेला नाही. तो नरकवासच होता; मात्र तिथल्या जिवाभावाच्या माणसांना तो विसरलेला नाही. तो प्रभाकर खाडेला व त्याच्या सुंदर गावाला विसरलेला नाही. प्रभाकरच्या भयानक मृत्युची आठवण आजही त्याला येते. त्याचं आजचं यश पाहायला प्रभाकर नाही, ही जाणीव त्याला रडवत राहते; मात्र आईच्या कुशीत मुल निश्‍चिंत असतं तसा हा आजही मुंबईच्या कुशीत गेला की निश्‍चिंत होतो. ‘‘कितीदा मुंबईच्या प्रेमात पागल झालो होतो? त्या वेड्या शहरावरून जीव ओवाळून टाकायला शिकलो होतो’’ तो एके ठिकाणी म्हणतो. अर्थात त्याचं त्यावेळचं मुंबईतलं आयुष्य भयानक होतं. असुरक्षित होतं. धोकादायकसुद्धा. मात्र मुंबईत तो मोकळा श्‍वास घेऊ शकला. याचं एकमेव कारण, या शहराचा स्वभाव व इथली माणसं. इथं सहवासात आलेल्या प्रत्येक माणसावर ग्रेगरीनं प्रेम केलं. इथल्या माणसांनीही त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. त्यानं तोपर्यंत व्यवहारी जग पाहिलं होतं. अव्यवहारी माणसं तो मुंबईतच पाहत होता. त्याला एक समजलं होतं, ही माणसं अव्यवहारी आहेत, म्हणूनच निष्पाप आहेत व म्हणूनच अत्यंत विश्‍वासार्ह!
मुंबईत ग्रेगरी माफिया टोळीत काम करू लागला. स्मगलर व गन रनरही झाला तो हे काम करताना. याचवेळी तो कार्ला सारानेनच्या प्रेमात पडला. आता ही बया कोण? तर ती मुंबईत  वेश्या व्यवसाय करत होती तेव्हा. कार्ला बुद्धिमान, कवी मनाची; मात्र वस्ताद! ग्रेगरी मात्र तिच्या अखंड प्रेमात! दोघांच्या शृंगाराची वर्णनं ग्रेगरीनं केली आहेत. ती वर्णनं मराठीत आणताना अपर्णा वेलणकरांची मराठी भाषा. ती खरोखर ‘अमृतातेही पैजा जिंके’ होते. अर्थात हा संपूर्ण भाषांतरीत ग्रंथच अमृतातेही पैजा जिंके असा! तर कार्लाची सुद्धा एक कहाणी आहेच. ती मुळातूनच वाचलेली बरी. कार्ला ही मुंबईत अंडरवर्ल्डसाठीच काम करत होती तेव्हा. अमेरिकेत तिच्याकडून एकाचा खूनही झालेला. याच बयेनं ग्रेगरीला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा रस्ता दाखवला. ते एक मोठं गूढच होतं. ते लक्षात आलं तेव्हा ग्रेगरीला धक्का बसला; मात्र महाराज ‘दिल’ देऊन बसले होते तिला. असं काय पाहिलं कार्लामध्ये गे्रगरीनं? सौंदर्य होतंच पण बुद्धिमत्ता व सौंदर्य असं ते जालीम मिश्रण होतं. शिवाय कार्लामध्ये खूप सच्चेपणा होता. ग्रेगरीच्या झोपडपट्टीत कॉलराची साथ आली. माणसं पटापट मरून पडू लागली. ग्रेगरी रात्रंदिवस आजारी माणसांवर उपचार करू लागला. तेव्हा ही बया सरळ ग्रेगरीकडे आली. त्याच्या झोपडपट्टीत राहिली व आजारी माणसांसाठी तहानभूक हरपून रात्रंदिवस राबली. धोके होते यात. कॉलराला तीसुद्धा बळी पडू शकली असती; मात्र ती बधली नाही. ग्रेगरी प्रभावीत झाला तो या प्रसंगामुळे. शिवाय कार्लासुद्धा भारताच्या प्रेमात होतीच.’’ .... कुणाही भारतीयाला भेटा, एकच गोष्ट लक्षात येईल - प्रेमाचा शोध भले भारतात लागला नसेल; पण प्रेम करण्याची कला अख्ख्या जगात फक्त भारतीय माणसालाच गवसली आहे’’ ग्रेगरीचंच हे एक वाक्य.
मुंबईत ग्रेगरी संपर्कात आला तो कादर खानच्या. कादर खान हा माफिया डॉन. त्यानं ग्रेगरीला मुलासारखं मानलं. पित्याच्या प्रेमासाठी ग्रेगरी नेहमीच आसुसलेला. ते त्याच्या वाट्याला मात्र आलं नाही. मग कादर खानमध्येच तो वडिलांची छबी पाहू लागला. कादर अत्यंत बुद्धिमान! चांगलं वाचन असलेला. वैचारिक उंची असलेला. या दोघांमधील चर्चा ग्रंथात आहेत. अगदी या ब्रह्मांडाची निर्मिती ते नैतिक-अनैतिक, पाप-पुण्याच्या संकल्पना इथंपर्यंत दोघं चर्चा करत. दोन गँगस्टर्समध्ये ही असली चर्चा? बरं, ही चर्चा वैचारिक उंचीचं टोक गाठणारी! मोठमोठ्या तत्त्वज्ञांनाही लाज वाटावी अशी! तर कादर व ग्रेगरी. दोघांचे सूर जुळत गेले. मग अफगाणिस्तानमधले प्रसंग ग्रेगरीनं सांगितले आहेत. तिथल्या मुजाहिदीनांना मदत करणं. कादरला ते धर्मकर्तव्य वाटलं. तो त्यासाठी अफगाणिस्तानात गेला. सोबत ग्रेगरी. पुन्हा जिवंत येण्याची खात्री नव्हतीच. काय काय झालं अफगाणिस्तानात? सगळ्या वादळी व रक्तरंजित घटना! आधी ही मंडळी गेली पाकिस्तानात. तिथं कराचीत राहिली. गे्रगरीनं इथं कराचीच वर्णन केलंय. विश्‍वास बसू नयेत अशी वर्णनं ग्रेगरी करतो. कराचीत शस्त्रास्त्रांचा खुलेआम व्यापार चाले. त्याची वर्णनं ग्रेगरी करतो. तिथला काळाबाजार. त्याचं वर्णन करतो. त्यातलं अर्थकारण सांगतो. शस्त्रास्त्र व्यवहारातील दलालांचा सुळसुळाट! तो तिथं त्यानं पाहिला. ग्रेगरीचं निरीक्षण घारीसारखं. स्मरणशक्ती तर अफाटच. कराचीतली ही वर्णनं अत्यंत चौफेर आहेत. कराचीचा सगळा ‘सातबारा’च तो मांडतो. हे सगळं तो त्यातल्या राजकारणासह सांगतो हे विशेष! मुळातच ग्रेगरीला आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण जबरदस्त! अगदी आजही एखादी आंतरराष्ट्रीय जबाबदारी तो पार पाडू शकतो. यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. ग्रेगरीच्या अभ्यासाचा आवाकाच तेवढा मोठा! तर कराचीत ही सगळी मंडळी आयएसआयच्या तावडीत सापडता सापडता वाचली. यामागे होता अब्दुल गनी. हा कोण? तर कादरच्याच गँगमधला माफिया. अस्तनीतला निखारा. विषारी सापच. त्यानं कराचीत कादर व ग्रेगरीसह सगळ्यांना ठार मारायचं ठरवलं. त्याचे पाकिस्तानमध्ये लागेबांधे होते. ते त्यानं यासाठी वापरले. हे सगळं तो मुंबईत बसून करत होता; मात्र दैव बलवत्तर होतं कादरसह सर्वांचं. त्यांना ऐनवेळी हा प्लॅन समजला. काही क्षणात मृत्यू प्रत्यक्ष समोर हजर झाला असता; मात्र सगळे निसटले. तिथून पुढं अफगाणिस्तानमधला प्रवास. कंदाहार हे अफगाणिस्तानमधलं शहर. तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर ‘शहर-इ-साफा’ या पर्वतरांगा. तिथं या लढवय्या मुजाहिदीनांसह ग्रेगरी राहिला. तब्बल दोन महिने! या दोन महिन्यात काय काय घडलं? तर तो मृत्युचं थैमान पाहत होता. मृत्युशीच दोन हात करत होता. स्वत: अर्धमेल्या व अर्धपोटी अवस्थेत स्वत:चं दोन-दोन बाटल्या रक्त सलाईनद्वारे सहकार्‍यांच्या शरीरात चढवत होता. त्याचे सहकारी सुद्धा कुठकुठले होते? अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, इरान, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया व अगदी पाकिस्तानातले सुद्धा. कादरच्या नेतृत्वाखाली तिथं ते लढले. तिथल्या मुजाहिदीनांना शक्य तेवढी मदत केली. या सगळ्या प्रवासात व प्रसंगात ग्रेगरी माणसांचे स्वभाव टिपत राहिला. त्याचे हे सगळे सहकारी सुद्धा बुद्धिमान होते हे विशेष! शूर होतेच ते! प्रश्‍नच नाही; मात्र त्यांचे आपापसातले संवादच खूप काही सांगून जातात. सोविएत रशियाच्या विरूद्ध अफगाण मुजाहिदीन का पेटून उठले? खरं तर अफगाणिस्तानात रशियानं बरीच विकासाची कामे केली होती. पूल बांधले होते. रस्ते बांधले होते. शाळा बांधल्या होत्या. कॉलेजं बांधली होती. पिण्याच्या-सिंचनाच्या पाण्यासाठी धरणं बांधली होती. विजेची गरज भागवली होती; मात्र हे करता करता त्यांनी सगळ्या अफगाणिस्तानवरच कब्जा केला. तिथं स्थानिक अफगाण कम्युनिस्टांचं कळसूत्री सरकार स्थापन केलं. ‘कम्युनिझम’ कसा वाढेल हा तो प्रयत्न होता. आता हा सोव्हिएत रशियाचा साम्राज्यवादच आहे अशी या ग्रेगरीबरोबरच्या बुद्धिमान तरूणांची पक्की धारणाच झाली व ते मग मुजाहिदीनांना मदत करू लागले. आता हे अफगाण मुजाहिदीन होते कसे? तर जीवाला जीव देणारे. ‘‘इन अफगाण लोगों के साथ जिना शायद मुश्किल है, लेकिन साथ मे मरने के लिए इन अफगाणियोंसे अच्छे दोस्त पुरी दुनियामें नही मिलेंगे।’’ अहमद जादेह नावाचा ग्रेगरीचा एक मित्र. याच ग्रुपमधला. त्याचं हे वाक्य. आता हा माफिया डॉन कादरखान. तो सुद्धा मुळचा अफगाणीच. ‘‘अफगाणिस्तानात लायक लोकांच्या हातात नेतृत्व सोपवण्याची पद्धत आहे - हे लोक उत्तम वक्ते असतात. आर्थिक व्यवहार अत्यंत कुशलपणे हाताळू शकतात आणि वेळ येईल तेव्हा शस्त्र घेऊन रणातही उतरतात. माझ्या देशात कुणालाही वारसा हक्कानं नेतृत्वावर हक्क सांगता येत नाही. एखाद्या नेत्याची मुलं नालायक निपजली तर नेतृत्वाची सूत्र टोळीतल्या लायक तरूणांच्या हाती जातात’’ हे कादर खानचंच वाक्य.
अफगाणिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी काय घडलं? कादरच्या या ग्रुपनं ’क्वेट्टा’ शहरात सुमारे एक महिना मुक्काम केला. हे पाकिस्तानातलं शहर. ग्रेगरीनं इथं काय करावं? क्वेट्ट्यात सेंट्रल  लायब्ररी होती. आयुब नावाचा एक पाकिस्तानी तरूण. तो या लायब्ररीतून गे्रगरीला पुस्तकं आणून देई. हा संपूर्ण महिना ग्रेगरी रात्रंदिवस वाचत राहिला. ब्रिटिशपूर्व काळात त्या भागात आलेल्या भटक्या संशोधकांनी लिहिलेली प्रवासवर्णनं, प्राचीन ग्रीक महाकाव्यांच्या दुर्मीळ आवृत्या, शेक्सपिअरचं साहित्य, डॉन्टेच्या ‘द डिव्हाईन कॉमेडी’चं अत्युत्कट भाषांतर! हे सगळं ग्रेगरी वाचत राहिला. एका हातात ग्रंथ व एका हातात बंदूक! मात्र आज त्याला कोणी विचारलं तर? तर तो अगदी ठामपणे सांगेल, ग्रंथ व लेखणी हे दोन्ही जगातल्या कोणत्याही बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी असतात म्हणून.
अफगाण मुजाहिदीन. त्यांच्या मते साम्राज्यवादी रशियानं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं. तसं करून त्यांनी सगळा मार्क्सवाद व लेनीनवाद पायदळी तुडवला होता. त्या तरूणांच्या दृष्टिनं हे बरोबर होतं; मात्र नाण्याला दोन बाजू असतात. तशीच अफगाणिस्तानमधली परिस्थिती होती. अफगाणिस्तान हा रशियाचा शेजारी. 1921 साली एक महत्त्वाची घटना घडली. रशियात लेनीन सत्तेवर होता. त्यानं अफगाणिस्तानबरोबर एक लष्करी करार केला. परस्पर सहकार्याचा तो करार. आता अफगाणिस्तामध्ये दोन प्रवृत्ती नांदतच होत्या. पुराणमतवादी व प्रागतिक. अगदी कुराणमतवादी असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. 1978 मध्ये अफगाणिस्तानमध्ये लष्करी क्रांती झाली; मात्र सत्ता ‘पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान’च्या ताब्यात गेली. या पक्षात मार्क्सवादाकडे झुकलेले बुद्धिवादी प्रागतिक तरूण होते. अमेरिकेचा पाठिंबा मात्र पुराणमतवाद्यांना. मग पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं रशियाला अफगाणिस्तानात पाचारण केलं. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. त्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला? तर 1921 सालच्या रूसो-अफगाण कराराचा. त्याआधारे रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसलं. या सैन्याविरूद्ध अमेरिका कारस्थानं करू लागली. मुजाहिदीन व रशियन सैन्यात होणार्‍या धुमश्‍चक्री व लढाया. अमेरिकेनं आधी त्या लांबूनच पाहिल्या. रशियाचा शक्तिपात होऊ दिला. मग अफगाण मुजाहिदीनांना सगळ्या प्रकारची मदत सुरू केली. यात पाकिस्तान अमेरिकेच्या पाठिशी होताच. रशियाचा निर्णय कितीही म्हटलं तरी त्यांच्या  अंगलट आला. कारण स्वतःचे दीड ते दोन लाख सैन्य! ते वर्षानुवर्षे अफगाणिस्तानमध्ये पोसत राहणं! हे सगळं त्यांना जड जावू लागलं. मुजाहिदीनांमध्येही बुद्धिमान तरूण होते व पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान या पक्षातही. एकाला अमेरिकेचा साम्राज्यवाद खटकत होता. दुसर्‍याला रशियाचा. पिपल्स पार्टी हा कम्युनिस्ट पक्ष नव्हता हे खरं; मात्र डावीकडे झुकलेला होताच. अमेरिकेची झोप त्यामुळंच उडाली होती. ही सगळी रणधुमाळी. त्यात ग्रेगरी अडकला. खरंतर तोही डावीकडे झुकलेला; मात्र यावेळी तो अफगाणातील उजव्यांच्या बाजूने होता. हे सगळं अपरिहार्यपणे त्याच्या वाट्याला आलेलं. ते कसं? ते या आत्मचरित्रातच वाचलेलं बरं! तसंही कितीतरी आंतरराष्ट्रीय राजकारण. ते या आत्मचरित्रात वाचायला मिळतंच. त्यातले सगळेच गुंते ग्रेगरी बर्‍याचदा नेमकेपणे सांगतो. हे राजकारण नेमकं कसं आहे हे त्याला अतिशय उत्तमपणे कळत होतं. याचं कारण त्याची स्वतंत्र बुद्धिमत्ता. स्वतःचा अभ्यास. मग या ग्रंथात अमेरिका-व्हिएतनाम युद्ध येतं. अफगाणिस्तामधले अमेरिका व रशियातले शह-काटशह येतात. इराणमधली इस्लामी क्रांतीसुद्धा येते. मोहम्मद मेलबाफ हा ग्रेगरीचा मित्र. तो इराणचा. आयातुल्ला खोमेनीनं इराणच्या शहाविरूद्ध उठाव केला. खोमेनीचा पाठिराखा होता तेव्हा मेलबाफ; मात्र खोमेनीनं सुद्धा ‘इस्लामी क्रांती’च्या नावाखाली विश्‍वासघातच केला असं मेलबाफ म्हणतो. खोमेनीकडे इराणची सत्ता आली; मात्र त्या सत्तेनं मेलबाफसारख्या तरूणांना अमानुष छळ व मनःस्तापाशिवाय काहीच दिलं नाही. खलीद अन्सारी. हा ग्रेगरीचा आणखी एक मित्र. तो कडवा पॅलेस्टिनी. लेबनॉनमधल्या एका हत्याकांडात त्याचं सर्व कुटुंबच ठार झालं. खरंतर त्याचे आईवडील प्रसिद्ध विचारवंत. पॅलेस्टिनी मुक्ती लढ्यात लढणारे. वडील इस्त्रायलच्या तुरूंगात वारले. नंतर कुटुंबही संपलं. खलिद मग दुःख व शोकाने वेडा व्हायचाच बाकी राहिला. शेवटी मुंबईनंच त्याला आश्रय दिला. खलिदचं शिक्षण कुठं झालं? तर न्युयॉर्कमध्ये. त्याच्या प्रबंधाचा विषय काय होता? तर ‘प्राचीन जगातला असंघटित व्यापार व त्या व्यापाराची समांतर अर्थव्यवस्था.’ पुढं लेखणी गेली, हातात आली बंदुक. नियतीनं खलीदला पॅलेस्टिनी अतिरेकी चळवळीकडे खेचून नेलं. मग ट्युनिशिया, लिबिया, सिरीया इथं लष्करी प्रशिक्षण. या आत्मचरित्रात अशी अनेक खरीखुरी पात्रं आहेत. आत्मचरित्राच्या शेवटी तर श्रीलंका व एलटीटीईचा विषय देखील येतो. इतकंच नाही तर मुंबईतल्या मराठी-अमराठी वादाबद्दलही त्यानं लिहिलं आहे. यात त्यानं मराठी माणसांची बाजू घेतली आहे; मात्र त्यापलीकडं जाऊन त्यानं एक मुद्दा मांडला आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. ‘‘मुंबईच्या झोपडपट्टीत फक्त मराठीच माणसं राहतात असं नाही. पंजाबी, तमिळ, कर्नाटकी, बंगाली, आसामी.... अगदी काश्मीरीसुद्धा राहतात त्या उकीरड्यात आणि ही माणसं फक्त हिंदू आहेत असंही नाही तर शिख आहेत, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध आहेत. पारशी आणि जैनसुद्धा आहेत. मुंबईतला प्रश्‍न हा काही फक्त हिंदू-मराठी माणसांचा प्रश्‍न नाही. खरा प्रश्‍न इथं राहणार्‍या गरीब भारतीय लोकांचा आहे. मुंबई गरीबांची आहे तशी श्रीमंतांचीही आहे; पण मुंबईत श्रीमंत माणसं मुठभर आहेत आणि गरीब कचर्‍यासारखे सगळीकडे पसरलेले आहेत’’ ग्रेगरी म्हणतो. एका गुजराती चित्रपट निर्मात्याशी या विषयावर ग्रेगरीचा वाद-प्रतिवाद झाला. त्यावेळचं त्याच हे वाक्य. त्याचवेळी मुंबईतल्या मराठी माणसांची बाजू घेताना काय म्हणतो तो? ‘‘महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून मुंबईत मराठी लोक जगायला आलेले. त्यांची अवस्था भयानक आहे. दोनवेळचं जेवण मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः वेठबिगारासारखी कामं करावी लागतात. इतरांची घाण उपसावी लागते. भारतातल्या इतर ठिकाणाहून आलेले लोक पैशाच्या जोरावर मराठी माणसांना मुंबईत पायाखाली तुडवतात, हे पाहून त्यांना संताप येणारच. त्यांना काय, जगाच्या पाठीवर कुणालाच हा अन्याय सहन नाही होणार’’ ग्रेगरीचं निरिक्षण हे असं आहे. त्यातून आलेली मतं ही अशी आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण समजतं. मग स्थानिक राजकारण समजत नाही का? तसं अजिबातच नाही. प्रत्येक गोष्टीतलं ‘सत्य’. ते शोधण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला तेच महत्त्वाचं वाटतं. एक लेखक व एक माणूस म्हणून. मग ते त्याच्या स्वतःसाठी कितीही अप्रिय वा कटू असू दे. त्याच्याइतकं दुसरं महत्त्वाचं त्याला काहीही वाटत नाही. तो मुंबईत होता तेव्हा बरंच काही घडलं. इंदिरा गांधींची हत्या. ती त्याचवेळी झाली. गे्रगरीनं त्याबद्दलही लिहिलंय इथं. खलिस्तानची चळवळ त्याला माहीत आहे. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ त्याला माहीत आहे. भारतीयांच्या आयुष्यात इंदिरा गांधींचं स्थान किती महत्त्वाचं होतं? ग्रेगरीनं ते एकदोन प्रसंगातूनच उत्तमपणे सांगितलंय.
ग्रेगरीचं ‘मराठी प्रेम’ अस्सल! अगदी ठाकरे कुटुंबीयांनीही दाद द्यावी इतकं अस्सल! मुळात तो त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात कसा आला नाही हेच समजत नाही. शिवसेनेचे उल्लेख आत्मचरित्रात आहेत त्याच्या; मात्र शिवसेनेचा फार खोलात जाऊन त्यानं अभ्यास केलेला नाही. तेव्हा त्याच्याकडे यासाठी उसंतही नव्हती व त्याची ती गरजही नव्हती तेव्हा; मात्र मुंबईतल्या मराठी माणसाच्या वेदना त्याला कळत होत्या यात तिळमात्र शंका नाही. ग्रेगरी अस्सल ‘मराठी मुंबईकर’ झाला म्हणजे नेमकं काय झालं? याचं उदाहरणच दिलं पाहिजे. एकदा तो फ्लोरा फाऊंटन चौकाच्या (हुतात्मा चौक) दिशेनं रमत गमत चालला होता. तेवढ्यात एक टॅक्सी करकचून ब्रेक दाबून त्याच्या शेजारून चालू लागली. ग्रेगरीनं भाड्याला नकार दिला; मात्र टॅक्सी ड्रायव्हर मुजोर. त्याला ग्रेगरीला छेडण्याची हुक्की आली. ‘‘अरे गोरे भेंचोद, टॅक्सी एम्टी है दिखता है क्या? और ये क्या कर रहे हो? इतने धुप में पैदल? बकरी के माफिक क्यूं घुमता है रस्ते पे आँ?’’ ड्रायव्हर ग्रेगरीला म्हणाला. ‘शांताराम’ नावाचं ते रसायन त्याला कुठून माहीत असणार? शिवाय ग्रेगरीला हिंदी समजत असणार हे त्याच्या गावीही नव्हतं. म्हणूनच तो एवढा शूर झाला होता. आता चेंडू ग्रेगरीच्या कोर्टात होता. ‘‘काय पायजे? अं? काय पायजे’’ गे्रगरीनं सरळ मराठीत त्याला विचारलं. ‘‘काय पायजे? आं?’’ टॅक्सी ड्रायव्हर हडबडत तेच वाक्य म्हणाला. आ वासला त्यानं आश्‍चर्यानं! मग ग्रेगरीचे जोरदार शाब्दिक फटके सुरू झाले. ‘‘काय पायजे तुला? आं? काय प्रॉब्लम आहे?’’ ग्रेगरी त्याच्या अंगावर चालून जात डाफरला. ग्रेगरीचा पुढचा शाब्दिक हल्ला तर भन्नाटच होता. ‘‘मराठी नाय समजत? मग आला कशाला इथे? ही मुंबई आहे. आमची मुंबई. मराठी बोलता येत नसेल तर र्‍हातो कशाला इथे? तुझ्या भेंचोद डोक्यात बकरीएवढा तरी मेंदू आहे का?’’ टॅक्सीवाल्याची मुजोरीच उतरली. ‘‘यू स्पीक मराठी, बाबा?’’ त्यानं विचारलं. ‘‘गोरा चेहरा, काला मन’’ ग्रेगरी उत्तरला. ग्रेगरीला इथंच थांबायचं नव्हतं. अशा अनेकांचा माज त्याने उतरवलेला होता. नंतर स्वतःच्या चेहर्‍याभोवती आणि छातीपुढं उजव्या बोटानं वर्तुळाकार खुणा करत ग्रेगरी म्हणाला, ‘‘बाहर से गोरा हॅूं; लेकिन अंदर से पुरा हिंदुस्थानी हूँ; समझ गये तुम? मै रोड पे चल रहा हॅूं; टाईमपास कर रहा हूँ। तुम्हे कोई प्रॉब्लेम? तुम कोई रियल टुरिस्ट क्यूँ नहीं पकड लेते? आं? मेरे जैसे भेंचोद हिंदुस्थानी लोगों को अकेला छोड दो भाईसाब, प्लीज!!’’ टॅक्सीवाला कडेकडेने सुसाट निघून गेला हे वेगळं सांगायला नको. तर शांताराम हा असा आहे. त्याचं मराठीपण व भारतीयत्व असं उसळून येतं! त्याच्या शेपटीवर कोणी पाय ठेवला की!
‘शांताराम’ ही एक मोठी ठेवच आहे साहित्यातली. समग्र मानवी आयुष्य ग्रेगरीनं वाचकांपुढे ठेवलंय. त्यातल्या भीषण मानवी यातना व दुःखं, हाल-अपेष्टा, उत्कट सुखं, माणसातलं देवत्व व पिशाच्च वृत्ती, विकार महाकाव्याच्या तोडीचे. अगदी महाभारतासारख्या ग्रंथाची आठवण यावी असे. याच्या भाषांतरासाठी अक्षरशः अफाट बौद्धिक कष्ट उपसले ते अपर्णा वेलणकरांनी! प्रकाश अकोलकर, रवींद्र राऊळ, नाशकातले सुप्रसिद्ध शायर बाबा आदम मुल्ला, डॉ. जी. एम. शेख, स्वराली परांजपे, धनश्री देवळे-देवधर, स्निग्धा शेवडे, मेघना ढोके, सुषमा देशपांडे, उमेश परिपूर्ण व मेहता प्रकाशनचे अनिल व सुनील मेहता या सर्वांच्या सहकार्याने वेलणकर मराठी साहित्यातलं हे सर्वोत्कृष्ट भाषांतर करू शकल्या. ग्रंथातली ग्रेगरीची एकेक वाक्य देखील महाकाव्यात शोभावीत अशी. ‘मनातलं तुंबळ युद्ध आतून माझं रक्त काढू लागलं होतं’, ‘माझ्या आयुष्याची सूत्रं माझ्या हातून कधीच निसटून गेली होती. नियतीच्या चक्रात भरकटत राहणं आता अपरिहार्य होतं,’ ‘भीती आणि दहशतीच्या हिंस्त्र श्‍वापदांनी माझ्या मनावर कब्जा केला होता‘, ‘अख्खं जग उन्मळून टाकणार्‍या भीषण, रौद्र वादळात सापडलेल्या थरथरत्या नाजूक वेलींसारखं माझं भविष्य माझ्याच पावलांशी थरथरताना मला जाणवत होतं’, ‘इट वॉज द लँड, व्हेअर द हार्ट इज किंग’, ‘भारत हा दिलदार लोकांचा देश आहे’, ‘तुरूंगवास ही खरी मनाची परीक्षा. नंतर शरीराची‘, ‘प्रेम म्हणजे क्षमेचं वचन! खात्री!!’, ‘ढगांनी झाकोळलेल्या रात्रीच्या अंधारात नियतीची पावलं वाजलेली मी स्पष्ट ऐकली. त्या आवाजात मैदान सोडून पळून जाण्याची धमकी होती.... आणि पाय रोवून लढाईला तयार राहण्याचं आव्हानही!’, ‘कुणा तिसर्‍याच्याच प्राक्तनाचे खिळे माझ्या कपाळावर ठोकण्याचा हा डाव कोणी आखला?’, ‘कार्लाच्या सुंदर डोळ्यांमध्ये मी आकंठ बुडून गेलो होतो; पण तिच्या नजरेतला अर्थ मी समजू शकलो नाही. अनेक गुपितांनी काठोकाठ भरलेली तिची नजर मी वाचू शकलो नाही’, ‘एखाद्या माणसाकडून एकेक करून सार्‍या आशा, सारी स्वप्नं हिरावून घेतली जात नाहीत, तोवर त्याच्या ‘आत’ कसकसल्या दगडांचा पक्का पाया आहे हे कसं कळणार?’, ‘ब्रिटिशांनी घालून दिलेल्या व्यवस्थेवर कुणीही शहाणा माणूस विश्‍वास ठेवत नाही’, ‘चक्रव्यूहात आपला पाय फसत चालला आहे या कुरतडणार्‍या जाणिवेनं पहिला दंश केला होता’, ‘एखाद्या ठिकाणी किती पैसा जमावा यालाही मर्यादा असते’, ‘कोवळ्या स्वप्नांच्या रूजवणीचे वाफे सांभाळणारी बागच आहे मुंबई म्हणजे’, ‘कितीतरी दिवसांनी मुंबईत रात्रीचा भटकत निघालो होतो. त्या रात्री मी पुन्हा नव्यानं मुंबईच्या प्रेमात पडलो. आसूसलेल्या प्रियकरासारखा तिला भेटत.... भिडत राहिलो’.
ग्रेगरीचा एक मित्र. स्कॉर्पिओ जॉर्ज. त्याचं एक वाक्य आलंय, ‘‘नियती आपल्याला नेहमीच दोन पर्याय देते. त्यातला एक आपण निवडावा असा असतो आणि दुसरा जो आपण प्रत्यक्षात आपण निवडतो.’’
सरतेशेवटी आणखी एक. ग्रेगरीचं हे आत्मचरित्रात्मक महाकाव्य! त्यानं ते एका व्यक्तिला अर्पण केलंय. ती आहे त्याची ‘आई!!’
तर मूळ नऊशे पानी इंग्रजी ग्रंथाचं हे रसरशीत मराठी भाषांतर संग्राह्य आहेच हे वेगळं सांगायला नको.

शांताराम
मूळ लेखक:  ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवाद:  अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 1412 मूल्य: रु. 800/-

- महेश मांगले 
९८२२०७०७८५ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)


1 comment:

  1. मांगले सर,
    सविस्तर व अप्रतिम परिक्षण!

    ReplyDelete