Monday, May 30, 2016

‘ताई’ नावाची गझल


‘साहित्य चपराक’, जून 2016

हैदराबादचा दौरा करून आम्ही परतलो तोच पुढचं निमंत्रण हजर होतंच. परभणी. मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं शहर. दोन माणसं ‘परभणीला या’ असं अंतःकरणापासून म्हणत होती. एक श्री. संतोष धारासूरकर. ते दादाचे काकाच आहेत. त्यांचं ‘दिलासा’ नावाचं दैनिक आहे. माणूस उत्तम संपादक व पत्रकार! दुसरी व्यक्ती होती आमची ताई सौ. अर्चना डावरे. (अर्थात ती ताई नंतर झाली. परभणीला जाईपर्यंत तिची माझी ओळखही नव्हती. ‘चपराक’साठी ती लिहिते एवढेच मी पाहत होतो. उत्तम लिहिते हेही लक्षात आलं होतं.) तर काका व ताई. दोघांचे सतत फोन. प्रेमळ आग्रह. शेवटी दादा म्हणाला, ‘‘सर, निदान एक दिवस तरी जाऊन येऊ.’’ मी ‘हो’ म्हणालो. दादा व मी. आयुष्यात एक गोष्ट टाळूच शकत नाही आम्ही दोघं. आपुलकीनं आलेलं निमंत्रण. असो.
दि. 24 मे 2016. रात्रीच्या साडेनऊच्या गाडीची तिकिटं बुक केलेली. ‘प्रसन्न ट्रॅव्हल्स्’ची ती बस. रात्री आठची वेळ. दादा व तुषार उथळे पाटील माझ्याकडे आले. आम्ही जेवण घेतलं. नारायण पेठेतलं माझं ऑफिस ते शनिवारवाड्यापुढील रस्ता. कुंभारवाड्याकडे जाणारा. तिथं बस येणार होती. तिथं चालत जाईपर्यंत घामाघूम झालो दादा व मी. पुण्यातला उन्हाळा. तोही आता नागपूरच्या उन्हाळ्याशी स्पर्धा करू पाहतो आहे. तर तिथं ट्रॅव्हल्स कंपनीची छोटी बस आली. त्यातून संगमवाडी पुलापर्यंत गेलो. तिथं मोठी मुख्य बस येणार होती. ‘‘सर, आता आपली ‘चपराक’चीच एक व्हॅन घेऊया...’’ दादा म्हणाला. दुजोरा दिला मी त्याला; मात्र आता वाटतं, होईल तेव्हा होईल हे. आहे काय अन् नाही काय? मात्र आमचे हे दौरे. अक्षरशः एकेक माणूस जोडण्यासाठी करतो आम्ही ते. पैशासाठी नाहीत होत हे दौरे. माणसांसाठी होतात. त्यासाठी हक्काचं वाहन हवं. दादाला तसं वाटतं. असो. तर संगमपूलाजवळ प्रसन्न ट्रव्हल्स्चं वाहनतळ. गाडीला अजून वेळ होता; अन् दादा इकडे ‘सुरू’ झाला. सुरू झाला म्हणजे काय? तर कविता म्हणू लागला. अनेक कविता, तुकोबांचे अभंग. हे सगळं तोंडपाठ त्याला. ‘बालभारती’च्या पुस्तकातली एक कविता. ती त्यानं निवडली. रात्री सव्वा दहा वाजले असावेत. उजवीकडे आकाशात चंद्र. पौर्णिमेचा असावा इतका मोठा. बर्‍यापैकी वारं वाहत होतं.
प्रवासी मी दिगंताचा
युगे युगे माझी वाट
मज चालायचे असो
सुख-दुःख, माळ घाट
झेप गरूडाची अंगी
शस्त्र विज्ञानाचे हाती
श्रमशास्त्राच्या युतीने
पृथ्वी करीन थांबती
चंद्र सूर्य ग्रह तारे
तुडविन पायदळी
स्वर्गातूनी सुरासूर
पाठविन मी पाताळी
वारा करीन गुलाम
वर्षा बांधिन दाराशी
माझे वैभव पाहूनी
लक्ष्मी लाजेल स्वतःशी
जे जे असेल अज्ञात
घेता करूनिया ज्ञात
पाठिवरी मात्र हवा
कुण्या प्रेमळाचा हात


‘‘क्या बात है!’’ मी दाद दिली. तर गाडीत चढलो व चाटच पडलो. काय तरी गाडीचा थाटमाट! एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील रूमसारखा. स्लीपर कोच होती ती. सातशे रूपये तिकिट. दादाला वाटलं, हैदराबादला जाताना खूप हाल झाले. आता प्रवासात ‘हाल हाल’ नको; मात्र वाटतं तसं होईलच असं नाही प्रत्येकवेळी. गाडी अप्रतिम; मात्र रात्रभर झोपेचं नाव नाही. खाली गादी. समोर टीव्ही. डोक्यावर ए. सी. सगळं काही होतं. नव्हती एकच गोष्ट. झोप. दादालाही व मलाही. त्यामुळं एक लक्षात आलंय आता. पंचतारांकित सुविधा व झोप यांचा काही आपापसात संबंध नाही. एकतर गाडी इतकी हलत होती. रस्त्यात वळणं खूप. गाडी वळली की आम्ही झोपल्या झोपल्याच वळायचो. आधीच वरचा बर्थ. मला तर खाली पडायची भीती वाटायला लागली. जेमतेम तासभर झोप मिळाली असेल. सकाळी ‘मानवत’ हे गाव लागलं. मराठवाड्यातलं. तसं दादानं मला उठवलं. माझे गुरू कै. बाबू महाराज मानवतकर (दलाल). त्यांचं हे गाव. पुसटसं दिसलं मला ते गाव. तेवढ्यावर मी समाधान मानलं. खरंतर मानवतला जायचं होतं; मात्र आमच्याकडे वेळ काढायला वाव नव्हता. परभणीत पोहोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले असावेत. धारासूरकर काकांचे पहाटेपासूनच एसएमएस व फोन येत होते. त्यांची कार घेऊन ते घ्यायला आले. बालाजी मंदीर, शिवाजी चौक परिसरातील काकांचं घर. थोडावेळ बसलो गप्पा मारत. संकष्टी चतुर्थी होती त्यादिवशी. शिवाय बुधवार. दर बुधवारी गणपतीला जायची सवय. आंघोळ केली व दादा अन् मी बाहेर पडलो. एक किलोमीटरवर गणेश मंदीर. मुख्य बाजारपेठेतला रस्ता. त्यावरून चालत गेलो. मंदिरात गर्दी. अथर्वशीर्षाचं पठण चालू होतं. दर्शन घेऊन बाहेर पडलो. रिक्षा केली. परभणीतले रिक्षावाले काका. अत्यंत प्रेमळ माणसं होती ती! अत्यंत प्रामाणिक! काकांच्या घरी आलो. जेवण केलं. काकांचे धाकटे बंधू सुहास काका. तेही सोबतीला होते. आता कुठं जायचं होतं? तर अर्चनाताईकडेच; मात्र तिच्या घराचं नेमकं नुतनीकरण चालू होतं. तशी ती मध्यमवर्गीय गृहिणी. त्यात शिक्षिका. लग्नानंतर वीस वर्षांनी घराचं नुतनीकरण होत असलेलं. त्यात तिचा किती जीव गुंतला असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यात आदल्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीच्या सासूबाई. त्या बिचार्‍या जिन्यातून पडल्या. त्यांना ऍडमिट केलेलं. त्यामुळे ताईचे फोन येत राहिले. दिलगिरीचे. दुसरीकडे चंद्रकांत जोशी काका. उदगीरला ग्रंथपाल होते ते. निवृत्त झालेत आता. त्यांचेही सकाळपासून फोन येत होते. त्यांचे परभणीतले काही तरूण मित्र. सगळे लेखक, अभ्यासक व कवी. त्यांची भेट घालून द्यायची होती त्यांना. तर जोशी काकांच्या छोटेखानी बंगल्यापर्यंत गेलो. धारासूरकर काकांच्या कारमधून. कोण कोण आलं होतं तिथं? तर राजेश रेवले, माणिक पुरी, कैलास सुरवसे, मारूती डोईफोडे, हनुमान व्हरगुळे, का. रा. चव्हाण, पी. जी. पुरी अशी सगळी मंडळी. सुंदर गप्पा रंगल्या. जोशी काकांचं खूप प्रोत्साहन असतं या मंडळींना. बहुतांशी शिक्षक होते त्यातले. त्यांनी एक साहित्य प्रतिष्ठानच काढलंय. काय नाव असावं त्याचं? कल्पना करता येणार नाही इतकं सुंदर नाव! ‘शब्दलळा!’   ही सगळीच मंडळी खूप कष्टातून वर आलेली. गरिबीशी लढलेली. असं असलं तरी आपल्या मराठवाड्याच्या मातीचा एक गुणधर्म आहे. प्रेम, आपुलकी अन् आदरातिथ्य!! मराठवाड्यासाठी जीव तुटतो तो यामुळं!! तर प्रत्येकजण भरभरून बोलला आमच्याशी त्यादिवशी. प्रत्येकाला साहित्याची उत्तम जाण. आश्‍चर्य वाटलं त्यांच्या साहित्यप्रेमाचं. दादासुद्धा त्यांना सांगत राहिला. ‘चपराक’ची वाटचाल कशी झाली ते! काही कमी सोसलेलं नाही दादानंसुद्धा!! बर्‍याचदा तो या गोष्टी मला सांगतो. त्यावर विश्‍वास बसत नाही माझा कधीकधी. तर त्यादिवशी एक तरूण माझ्यासमोर बसला होता. काळासावळा; मात्र स्मार्ट! बारीक अंगकाठीचा. त्यानं त्याची एक कविता वाचायला दिली मला. स्त्रीभ्रूण हत्येवरची. विलक्षण कविता होती. मी ताबडतोब ती दादाला दाखवली. का. रा. चव्हाण हा तो तरूण. त्याला मी आग्रह केला. म्हटलं, ‘‘दादा, म्हणा ती कविता.’’ म्हटली त्यानं ती कविता.
सुंदर म्हणे हो जग हे, मला डोळ्यांनी पाहू द्या...
आई बाबा हो मला, गडे, जन्मास येऊ द्या...

आई गर्भी या मरणे, माझ्याच का हो लेखी...?
जीव घेऊनिया माझा, का हो मिरवावी शेखी...?
पंख कापू नको गं आई, उंच भरारी गं घेऊ द्या...!
उभयता मजवरूनि, हे दिसमास जाऊ द्या...!

मी पाहिल जवळूनि, माझी कशी ती आई?
लेकी जोजवी कशी ती, अन् गाते कशी अंगाई?
कुशीची ऊब पित्याची, ते गोड सुख घेऊ द्या!
मांडीवरी बसण्याचे, ते सोनेरी दिस पाहू द्या!

अहो, मी ही सांगते ना, ओळख नवी मिळविन
चंद्र तारे ग्रह सारे, पायदळी तुडविन
आस जिजा सावित्रीची, मजही धडे गिरवू द्या!
महाराष्ट्र स्वागताला, मजही गडे येऊ द्या!

विवाह व शिक्षणाची, करू नकाच हो चिंता
अबला नसे मी नारी, घालविन पराधीनता
अन् घोर वादळांचे दिन, झळा उन्हाच्या साहू द्या!
मग येण्या बळही पायी, दूध भात घास खाऊ द्या!


सर्वांनीच कवितेला दाद दिली. ‘‘तुमच्या चारपाच कविता पाठवून द्या...’’ दादा म्हणालाच ताबडतोब चव्हाणांना. चव्हाण हे खरोखर एक प्रतिभावान कवी आहेत. स्त्रीभ्रूण हत्या हा केवढा गंभीर सामाजिक प्रश्‍न! त्यावर अनेक कविता केल्यात या तरूणानं. थोड्यावेळानं आम्ही जोशी काका-काकुंचा निरोप घेतला. मग गेलो धारासूरकर काकांच्या कार्यालयात. ‘समर्थ दिलासा’ या त्यांच्या दैनिकाचं ते कार्यालय. परभणीतील स्टेडीयम परिसर. तिथं हे कार्यालय. काका हाडाचे संपादक व पत्रकार. मोठं काम आहे पत्रकारितेत त्यांचं. दैनिक ‘सकाळ’मध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली त्यांनी. काही जिल्ह्यात जाऊन काम करावं लागलं त्यासाठी. तिथं रहावं लागलं. ‘दिलासा’ हे त्यांच्या सासर्‍यांचं वृत्तपत्र. काकांचा पत्रकारितेतला अनुभव दांडगा. त्यामुळं ‘दिलासा’ची सूत्रं आपोआपच त्यांच्याकडं आली. परभणी व हिंगोली जिल्हा. इथल्या अनेक प्रश्‍नांवर त्यांनी ‘दिलासा’त लिहिलं. विकासाचे प्रश्‍न व त्यात येणारे अडथळे. खूप अभ्यासपूर्ण व निर्भयपणे लिहिलं त्यांनी त्यावर. कार्यालयातले काही अंक आम्ही चाळले. शेती, सिंचन, शहरातल्या पायाभूत सुविधा या सगळ्यावर त्यांनी लिहिलेलं दिसलं. काका तसा मोकळाढाकळा माणूस. अनेक माणसं कार्यालयात येत होती. हक्कानं काकांशी बोलत होती. परभणीत ‘दिलासा’ घरोघर जातो. त्याचा हा परिणाम. तिथं चहा घेतला. तिथून पुन्हा काकांच्या घरी. दरम्यान अर्चनाताईचा फोन आलेला. ती तिच्या नवर्‍यासह भेटायला येणार होती.
दुपारी साधारण अडीचचा सुमार. अर्चनाताई आली. गिरीश हा तिचा नवरा. तोही बरोबर होता. ‘‘अरे वा! मला वाटलं, एकच भाऊ येणार आहे. इथं तर दोन भाऊ आलेत.’’ येताक्षणी ताई म्हणाली. आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेलो तिला; मात्र तिच्या या पहिल्याच वाक्यानं तिनं जिंकून घेतलं आम्हाला. ती उत्तम लेखिका आहे. कवयित्री आहे. परभणीचं सांस्कृतिक वर्तुळ. तिथं चौफेर वावर असतो तिचा. चांगलं वाचन. चांगला अभ्यास. शिक्षिका तर आहेच ती; मात्र अहंकाराचा कुठंही मागमूस नाही. परभणीतले साहित्यिक उपक्रम. खूप सक्रिय आहे तिथं ती. घडाघडा बोलणारी आहे ती; मात्र तो बोलाचाच भात व बोलाचीच कढी असला प्रकार नाही. तिचा नवरा गिरीश. तोही अत्यंत उमद्या मनाचा! तिच्यासारखाच. बुद्धिमान! अभ्यासू! तोही प्राध्यापक आहे. दोघांना साहित्याची आवड. बायकोला सतत प्रोत्साहन देणार हा त्याबाबतीत. साहित्यावरचं प्रेम. तो या दोघांना जोडणारा दुवा. त्यामुळं त्यांचं नातं टवटवीत आहे. एकानं बोललेलं दुसर्‍याला समजतं. ‘साहित्य’ हा विषय काही फावल्या वेळात करायचा उद्योग नाही त्यांच्यासाठी. गंभीरपणे पाहतात दोघंही त्याच्याकडं. ‘चपराक’ त्यांच्याकडं नियमित जातोच. मला आश्‍चर्य कशाचं वाटलं? तर माझी दोन विस्तृत ग्रंथपरीक्षण. ‘शांताराम’ व ‘लस्ट फॉर लालबाग‘ या कादंबर्‍यांवरची. ‘चपराक’मध्ये आलेली. ती दोघांनी वाचली होती. मे चा ‘चपराक’चा अंक. त्यात अर्चनाताईचाही लेख होता. परभणी शहरावर लिहिलेला. अतिशय अभ्यासपूर्ण लेख! त्याबद्दल मीही माझी प्रतिक्रिया दिली. मला प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांचं कौतुक वाटत आलं आहे. अनेकदा वाचक कसलीच प्रतिक्रिया देत नाहीत. लेखकानंसुद्धा लेखक व प्रतिक्रिया देणारा वाचक या दोन्ही भूमिका निभावल्या पाहिजेत. त्यात खूप कमी लेखकांना घरातून प्रोत्साहन असतं. पिकतं तिथं विकत नाही. अशावेळी लेखकाचे मायबाप कोण? तर वाचकच. वाचकांनी लेखकांशी संवाद साधत राहिलं पाहिजे. तर त्यादिवशी याच सगळ्या विषयांवर बोललो आम्ही. ‘चपराक’चे सभासद कसे वाढतील? परभणीत ‘चपराक’चं एखादं कार्यालय सुरू करता येईल का? मराठवाड्यातले चांगले लेखक व कवी. त्यांची पुस्तकं ‘चपराक’तर्फे काढता येतील का? हे करायचं तर आर्थिक गुंतवणूक करावी लागेल का? यावर बोललो आम्ही. आता हे भविष्यात कधी होईल? आजच नाही सांगता येणार; मात्र आम्ही सगळे गंभीर आहोत त्याबद्दल. गिरीश व अर्चनाताई.  दोघांचं एक दुःख होतं. त्यांनी बोलून दाखवलं ते. मराठवाड्यातले व विशेषतः परभणीतले लेखक व कवी. त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही हे त्यांचं दुःख. त्यातूनही एखादं पुस्तक काढायचं असेल तर? तर अगदी मुद्रित शोधन (प्रूफ रिडींग) ते छपाई. इथपर्यंत अडचणी असतात तिथं. प्रकाशकांची संख्या तर नसल्यासारखीच. असली तर नगण्यच. तर प्रश्‍न असा मराठी साहित्याचा आहे. प्रश्‍न महाराष्ट्रात सगळीकडे नवनवीन प्रकाशकांना उभं करण्याचाही आहे. प्रश्‍न महाराष्ट्र जोडण्याचा आहे. प्रश्‍न गुणवान, प्रामाणिक माणसं एकत्र आणण्याचा आहे. त्याकडे गंभीरपणे न पाहून कसं चालेल? बरं, हे करताना आर्थिक व्यवहारही पारदर्शी हवेत. नपेक्षा दादाला काही कमी प्रस्ताव नव्हते आले पैशांचे! पुण्यातले एकदोन राजकीय पुढारी. सांगायलाच हवं असं नाही, मात्र लाखो रूपये द्यायला तयार होते ते त्याला ‘चपराक’साठी. अगदी ऑफिस द्यायला तयार होते. हे सगळं त्यानं नाकारलं. आजही दहा हजार रूपये भाडं भरतो तो कार्यालयाचं. एक काळ तर कसा होता? तो चक्क चालत यायचा. कुठून? तर बावधनहून शुक्रवार पेठेपर्यंत. बारा-तेरा किलोमिटरची पायपीट! का? तर बसपुरतेही पैसे नसायचे. आज परिस्थिती नक्कीच तशी नाही. खूपच बरी आहे; मात्र पैसे कसे उभे करायचे हा प्रश्‍न असतोच. माणसं उभी करणं व पैसे उभे करणं. सोपं नसतंच बर्‍याचदा. तर त्यादिवशी गंभीरपणे बोललो आम्ही या विषयावर. सुरूवात तरी झाली. हे काय कमी होतं? नंतर दादानं अर्चनाताईला पुस्तकं भेट दिली. ‘चपराक’ तर्फे काढलेली. पंचवीसएक पुस्तकं होती ती. लहानमोठी; मात्र वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली. लेख, कादंबर्‍या, काव्यसंग्रह. असं सगळं काही होतं त्यात. ताई अर्थातच सुखावली. उत्सुकतेनं पाहिली देखील काही पुस्तकं तिनं. तसाच एक संच दादानं त्यांच्या काकांनाही भेट दिला. शंभर एक पुस्तकं काढली आहेत दादानं आत्तापर्यंत. तेही साप्ताहिक व मासिकाचा व्याप सांभाळून! ‘तेथे पाहिजे जातीचे। येरा गबाळ्याचे नोहे काम॥ दुसरं काही नाही.
तर ताईनं पुढचा कार्यक्रम ठरवलेला. परभणीतलं तिचं प्राणप्रिय वाचनालय! गणेश वाचनालय. तिथं तिनं संध्याकाळी निमंत्रित केलं होतं आम्हाला. परभणीतले काही लेखक, भाषांतरकार. त्यांनाही तिनं बोलवून घेतलं होतं तिथं. तर तो दिवस होता दि. 25 मे 2016. वेळ सायंकाळी सहाची. पोहोचलो आम्ही तिथं. ताईनं आमच्या आधीच तिथं जाऊन सगळी पूर्वतयारी केलेली. आधी तिनं ग्रंथपालांशी आमची ओळख करून दिली. संदीप पेडगावकर हे ग्रंथपाल आहेत तिथं. त्याआधी त्यांचे वडील श्री. पद्माकर पेडगावकर. ते तिथं ग्रंथापाल होते. या दोघांनी सर्वस्व दिलंय या ग्रंथालयाला. खूप जुनं आहे गणेश वाचनालय. किती जुनं? तर 1901 ची स्थापना आहे ग्रंथालयाची. कोण कोण आलं होतं तिथं? विनोदी कवी व कथालेखक सर्वश्री दिवाकर खोडवे, भाषांतरकार व लेखक अनंतराव उमरीकर, पद्माकर पेडगावकर, संदीप पेडगावकर, विनोदी कथालेखक आनंद देशपांडे, कथालेखक बा. बा. कोटंबे, स्तंभलेखक कृ. ना. मातेकर, संतोष अहंकारी, नाट्यकलावंत अर्चना चिक्षे, श्री. इनामदार अशी मंडळी हजर होती. खोडवे काका विनोदी कविता करतात. कशावर? तर नवरा बायकोच्या नात्यावर. ताईने त्यांना आग्रह केला, ‘‘दा, एखादी कविता म्हणा...’’ अन् त्यांनी ऐकवली एक चारोळी.
देवा, शांत, न भांडणारी बायको देतोस का?
अरे वत्सा! अशी सापडल्यास मी केली नसती का?

माझ्या बाजूला होते उमरीकर काका. ‘मुनेरमाणुष’ ही बंगाली कादंबरी. तिचं भाषांतरही केलंय त्यांनी. ग्रंथालयात त्यांचं आणखी एक पुस्तक होतं. ते चाळत होतो. (नाव विसरलो पुस्तकाचं.) तर त्या पुस्तकातील शेर व काव्यपंक्ती. त्यांनी लक्ष वेधून घेतलं माझं. पुस्तकात त्यांनीच उद्धृत केलेल्या त्या काव्यपंक्ती. मी त्यांनाच म्हणून दाखवू लागलो. जणू काही मीच लिहिल्या होत्या त्या. आता असं लिहायला सामान्य प्रतिभा लागते का? खूप मोठा कवी असणार तो!
कोणती जागा जिथं नाही गझल
जाहल्या माझ्या दिशा दाही गझल
काळजाचे रक्त थोडे शिंपले
रंगल्या तेव्हा कुठे काही गझल

आता गझलेबद्दल एक उर्दू शायर काय म्हणतो? त्याचं नाव त्या पुस्तकात शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते नव्हतं त्या पानावर.
हमसे पुछो की गझल क्या है
गझल का फन क्या है
चंद लब्जों में
कोई आग छिपायी जाए

आणखी काही काव्यपंक्ती होत्या त्याच पानावर.
माझी जगण्याची न्यारीच रीत आहे
पोटात भूक माझ्या, ओठात गीत आहे

उमरीकर काकांनी लिहिलेली एकांकिका ‘मोगलाई धमाल.’ या एकपात्रीचे अनेक प्रयोग झालेत. काकांचं शिक्षण कुठं झालं? तर हैदराबादमध्ये. हैदराबाद हे मराठवाड्याला शिक्षणासाठी सोयीस्कर. काकांना हैदराबादमधील निजामाबद्दल विचारलं मी. काकांचं शिक्षण झालं ते कॉलेज. उस्मानिया विद्यापीठाच्या अंतर्गतच येतं ते. निजाम या विद्यापीठाचा संस्थापक. कसा होता हा निजाम? एवढं मोठं विद्यापीठ काढलं त्यानं; मात्र नंतर रजाकारांना का पाठिंबा दिला त्यानं? भारतापासून वेगळं व्हायचा का प्रयत्न केला? माझ्या मनात घोळत असलेले हे प्रश्‍न. विचारले मी काकांना. ‘‘निजामानं विद्यापीठ काढलं. मोठं काम केलं. सुरूवातीला तो चांगला होता; मात्र नंतर बिथरला.’’ काका म्हणाले. (हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठ. जगप्रसिद्ध आहे ते. निजामानं ते खूप आधी काढलं. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्याही खूप आधी.) तरीही माझं समाधान झालं नाही. कालपरवा ते झालं. वनखात्याची परीक्षा देत असलेला माझा एक तरूण, बुद्धिमान मित्र. गौरव पाटील. तो माझ्याकडे आला परवा. त्याला छेडलं मी या विषयावर. ‘‘निजामाचा सल्लागार होता एक. काय बरं त्याचं नाव?’’ गौरवला नाव आठवेना. ‘‘कासीम रिझवी’’ मी म्हणालो. ‘‘हां, त्यानं सल्ले दिले निजामाला’’ गौरव म्हणाला. मग डोक्यात काहीसा प्रकाश पडला. निजाम का बिथरला? उत्तर मिळालं त्याचं. कासीम रिझवी. क्रूरच होता तो. त्यानंच रझाकारांची संघटना बांधली व हैदराबाद संस्थानातील हिंदुंवर अत्याचार केले. ‘‘निजाम मात्र फाळणीनंतरही भारतातच राहिला होता’’ उमरीकर काका म्हणाले. निजामानं बदसल्ले ऐकले नसते तर? भारतातून फुटून निघण्याचा प्रयत्न केला नसता तर? तर खरोखर भारतातल्या शिक्षण क्षेत्राचा एक जनक मानला गेला असतो तो. त्याची पुण्याई मोठी होती त्याबाबतीत.
नंतर आम्ही गणेश वाचनालय पाहिलं. टुमदार इमारत! एकेक करून जमा केलेली ती अफाट ग्रंंथसंपदा! किती ग्रंथ असावेत तिथं? तब्बल ऐंशी हजार! ग्रंथ खरेदी चालूच असते. संपत्तीत भर पडत असते. कदाचित लाखभर ग्रंथ होतील काही दिवसात. संदीप पेडगावकर व आनंद देशपांडे. दोघांनी आम्हाला ग्रंथालय दाखवलं. मला तिथं दिसला ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. रशियन राज्यक्रांतीवरचा. दोन प्रती होत्या त्याच्या तिथं. ‘‘या ग्रंथाची पारायणं केलीत मी’’ मी देशपांड्यांना म्हणालो. एक अप्रतिम इंग्रजी चरित्रग्रंथही होता तिथं. नेताजी सुभाषचंद्र बोसांवरचा. आसुसल्यासारखा चाळला मी तो. दादालाही दाखवला. या गडबडीत मी दौर्‍याची टिपणं काढायचा कंटाळा केला. त्या इंग्रजी ग्रंथाचं नावही विसरलो त्यामुळं. आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे, दुसरं काही नाही. (आळस हा माणसाचा शत्रू आहे असं पंडित नेहरू म्हणायचे आणि गांधीजींनी सांगितलं, शत्रूवरही प्रेम करा - इति घनश्याम दादा). तर तिथं दादा व मी. दोघांचे सत्कार केले वाचनालयानं. एक अप्रतिम स्मृतिचिन्ह! ते भेट दिलं आम्हाला. त्यावर घड्याळ आहे व गणपतीची अप्रतिम प्रतिमा! नारायण पेठेतलं माझं ऑफिस. तिथं मी हे स्मृतिचिन्ह लावलंय. आल्याबरोबर पहिलं काम केलं मी ते. या सगळ्यामागं होती अर्चनाताईची आपुलकी. माणसांबद्दल तिला वाटत असणारा जिव्हाळा. दोन तास होतो आम्ही ग्रंथालयात. ताईला आता आमच्या पोटापाण्याची चिंता होती. तिनं दुपारीच ठरवलं होतं. आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जायचं. खरंतर तिच्याही आधी हे ठरवलं होतं तिच्या नवर्‍यानं म्हणजेच गिरीशनं. मग ग्रंथालयापासून रिक्षा केली आम्ही. एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. या असल्या धावपळीच्या दिनक्रमात ताईनं काय करावं? तर मेंदी काढून घेतली होती हातावर! ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुरते गं’ अशी तिची अवस्था. का? तर तिच्या लग्नाचा विसावा वाढदिवस. तो दोन दिवसांवर आलेला. तिनं तिच्या संसारात रंग भरले होते व मेंदीनं तिच्या हातावर! तर रिक्षातून हॉटेलकडे जात होतो. ‘‘तुमच्या नवर्‍याचा सगळ्यात मोठा गुण काय आहे सांगतो. तो बायकोच्या माणसांना मनापासून सांभाळतो’’ मी ताईला म्हणालो. ‘‘देवाची देणगी आहे ती मला  मिळालेली’’ ताईची प्रतिक्रिया होती. तेवढ्यात धारासूरकर काकांचा ताईला फोन आला. त्यांच्या कार्यालयाकडे यायला त्यांनी सांगितलं. त्यांची कार होतीच. तिच्यातून हॉटेलकडे निघालो. बर्‍यापैकी शहराबाहेर असलेलं हॉटेल. नाव काय? तर ‘वाटिका!’ कशी सुंदर नावं सुचतात बघा परभणीकरांना! हॉटेल होतं ते अगदी त्याच्या नावाप्रमाणंच. विस्तीर्ण हिरवळ. छोटी झाडं. शांत वातावरण. जेवणाचा दर्जा उत्तम. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ताई आम्हाला योगानंद सरस्वतींच्या मठात घेऊन गेली. आता योगानंद सरस्वती कोण? तर माझ्या बाबांचे (बाबू महाराज मानवतकरांचे) गुरू. माझी मठात जाण्याची इच्छा. दुपारी व्यक्त केलेली. ती तिनं बरोबर लक्षात ठेवली. धारासूरकर काकांना तिनं सांगितलं. मठाकडं गाडी घ्यायला. गुरूंपुढं नतमस्तक झाली ती आमच्यासह. तिथून हॉटेल वाटिका. तिथं ताईचा नवरा व मुलगी शरू. दोघेही आलेले. शरू आईसारखीच. अत्यंत निष्पाप! अभ्यासात अतिशय हुशार! तिनं आईचा एक अल्बम सोबत आणलेला. मोठ्या अभिमानानं तिनं हातात दिला आमच्या तो.  त्यात कौटुंबिक फोटो होतेच; मात्र प्रामुख्याने होते ताईचे फोटो. परभणीच्या प्रत्येक साहित्यित उपक्रमात तिचा पुढाकार असलेले फोटो. फोटोंमधून ती भाषणं करताना दिसत होती. सूत्रसंचालन करताना दिसत होती. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत होती. त्यांचे सत्कार करताना दिसत होती. एका फोटोवर दादाची व माझी नजर खिळून राहिली. तो होता ताईचा व तिच्या लेकराचा फोटो. तिचं सगळं आईपण! ते त्या फोटोत व्यक्त झालेलं. तिचा मुलगा चारूहास. कुठं असतो तो? तर पुण्यात. मुक्तांगणला इंजिनिअरिंंग करतोय सध्या. सव्वासहा फूट उंच झालाय आता! इतका सुंदर फोटो! आई व मुलातलं नातं सांगणारा. यापूर्वी खरंच पाहिला नव्हता मी असा फोटो! तर गप्पाटप्पा करत जेवण केलं सर्वांनी. ‘‘ताई तुमच्या कादंबरीचं लेखन लवकरात लवकर पाठवा. ‘चपराक’कडून प्रकाशित करू आपण’’ दादा म्हणाला. हे सगळं लवकरात लवकर घडून यावं एवढंच आता वाटतं. ‘‘आता पुण्यात या. पुण्यात आलात की असंच कुठंतरी शांतपणे जाऊया एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला’’ मी ताई व गिरीशला म्हणालो. दोघांनी मान्य केलं ते. तसंही चारूहासला भेटायला अधूनमधून पुण्यात येतातच दोघंही.
तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. साडेनऊला बस. ताई बस स्टॅन्डपर्यंत आली नवर्‍यासह. बस सुटेपर्यंत थोडावेळ बोलत राहिलो आम्ही. बसचं बुकिंग गिरीशनंच केलेलं. ते पैसे दादानं परत केले गिरीशला. घेत नव्हते बिचारे ते दोघं हे पैसेही. हट्टानं परत दिले आम्ही. उगीचच काय! सोन्यासारखी निष्पाप माणसं ती. त्याचा गैरफायदा घ्यायचा की काय? शेवटी निरोप घेतला ताईचा. ‘‘सकाळी पोहचलात की फोन करा’’ ताई आवर्जून म्हणाली. रात्रीचे पावणेदहा वाजलेले. बस हलली एकदाची. ताई थांबून राहिली बस हलेपर्यंत. कसलं नातं म्हणायचं हे? बहिणीचं हे असं नात. ते मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाशीच जोडलं नाही. साधं कारण. माझ्याशीच कुणी ते जोडलं नाही. माझ्याशी असलेली नाती. ती तोडली काहींनी. काहींना मी तोडलं. ताईचं तसं नाही. पहिल्या भेटीतच विश्‍वास टाकून मोकळी झाली ती आमच्यावर. रात्री दादा व मी दोघांना शांत झोप लागली. पहाटे सव्वासहाची वेळ. संगम पुलावर थांबली बस. तिथून नारायण पेठेत यायचं होतं. किती पैसे सांगावेत एका रिक्षावाल्यानं? तर 180 रूपये! परभणीतले रिक्षावाले आठवले मला. एवढ्या अंतरासाठी फार तर पन्नास साठ रूपये घेतले असते त्यांनी. त्यापेक्षा एक रूपया नसता घेतला जास्त. ‘‘आम्ही पुणेकरच आहोत भाऊ’’ मी त्या रिक्षावाल्याला म्हणालो. दादा तर असा संतापला. ‘बाबा आढावांना पत्रच लिहितो’ म्हणाला. माझंही डोकं चालेना. कसलं पुरोगामित्व आणि कसलं काय? पुढारी पुरोगामी अन् अनुयायी ‘पैसागामी’!! चांगला धंदा आहे! थोड्याच अंतरावर एक रिक्षावाला मिळाला. मेहनतीच्या पैशांवर विश्‍वास असावा त्याचा. मीटरप्रमाणे पैसे द्या म्हणाला. आम्ही तेच तर म्हणत होतो की. अशांना दहा रूपये जास्त दिलेले परवडतात. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल; मात्र इतरांना कशाला द्यायची फुटकी कवडी तरी?
तर सात वाजता नारायण पेठेत आलो. दादाला म्हटलं, ‘‘चल, आधी चहा घेऊ.’’ मग माझ्या दुचाकीवर सोडलं त्याला आमच्या कार्यालयात. त्याला बिचार्‍याला पुढच्या अंकाचं टेन्शन! त्याला सोडून पुन्हा माझ्या कार्यालयात आलो. हा लेख लिहायला घेतला लगेच. लिहिताना ताईचे उल्लेख येतच होते. मला गझल आठवली. उमरीकर काकांच्या पुस्तकातली. मला वाटलं, अर्चना ताई ही सुद्धा एक गझलच आहे. आपल्या भावंडांच्या यातनांवर फुंकर मारणारी गझल! ती ताईपणाची गझल आहे! आईपणाची गझल आहे! पत्नी म्हणून तिच्या नवर्‍याचीही गझल आहे! व परभणीच्या सुसंस्कृत चेहर्‍याचीही गझल आहे! तर लेख लिहिता लिहिता डोळे अश्रूंना हाका मारू लागले. आयुष्यात जोडलेल्या नात्यांचे अर्थ लावत बसलो काही क्षण. सोबतीला होतं एक नातं. कदाचित आयुष्यभरासाठी जोडलेलं. का जोडलं असावं मीही हे नातं? कदाचित माझं असह्य एकाकीपण असेल! कदाचित मी पूर्वायुष्यात केलेल्या घोडचुका असतील! कदाचित मी त्यांचं प्रायश्‍चित घेऊ पाहत असेल! कदाचित मी पूर्वायुष्यात सोसलेल्या भीषण यातना असतील! त्यात माझ्या शरीराचे लचके तुटले असतील! माझ्या मनाचे लचके तुटले असतील! मी पूर्वायुष्यात दिलेल्या सगळ्या सत्त्वपरीक्षा. त्याच मला आठवत राहिल्या काही क्षण अन् ऐकू आलं ते एकच वाक्य, ‘सकाळी पोहचलात की फोन करा.’ मग म्हटलं करू फोन तिला. सांगू ‘पोहोचलो’ म्हणून. मग म्हटलं एसएमएस करू! सकाळी नऊ वाजता एसएमएस केला मी तिला.
ताई, पहाटे सव्वासहा वाजता सुखरूप पोहोचलो. तुझे व तुझ्या नवरोबाचे खूप खूप ऋणी आहोत. तुझ्या लेकरालाही नक्की भेटेन मी.
सद्गुरूंची कृपा आहे. ते आपल्या पाठिशी आहेत.
वाटचाल करत राहू.
तुम्हा सर्वांचा विश्‍वासू,
- महेश मांगले
थोड्या वेळानं आलंच तिचंं उत्तर. वाचू लागलो.
दा, आपण आल्याने आमचाही आनंद द्विगुणीत झाला.
नक्कीच परत एकदा निवांत भेटूच.
सदिच्छा आणि शुभेच्छा भरभरून आहेतच.
मग पुन्हा छोटं उत्तर दिलं मी तिला.
ओके. योग येईल तेव्हा नक्की भेटू.
- महेश उर्फ दा.
तर हे सगळं असं आहे. लिहावंसं वाटलं, लिहिलं. मांडावंसं वाटलं मांडलं. ताई हे वाचेल, तेव्हा कदाचित अश्रू अनावर होतील तिला. मात्र ते आनंदाचे अश्रू असतील. समाधानाचे अश्रू असतील. शिवाय कधीकधी असं होतंच की हो! लिहिणार्‍याच्या डोळ्यातही अश्रू असतात अन् वाचणार्‍याच्याही! ‘अश्रूंचं नातं’ म्हणता येईल याला! यापेक्षा अधिक काही नाही.
तर दादा मला पुन्हा परभणीला नेणारच आहे. शिवाय ताईनंही आम्हाला शब्द दिलाय, ती आम्हाला ‘गुंज’ या गावी घेऊन जाणार आहे. योगानंद सरस्वतींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. दोनदोनदा सांगितलंय मला तिनं हे. तर परभणीचा पुढचा मुक्काम शक्य असेल तर ताई तुझ्या घरी. तुझा नवरोबा व तुझ्या लेकरांच्या सानिध्यात. तसंही तुझ्या घराचं नुतनीकरण झालंच आहे अन् पाहुण्यांसाठी तुम्ही नवराबायको एक रूम राखून ठेवणार नाही, असं होणारच नाही. शिवाय परभणीकर आहात तुम्ही. पुणेकर असतात तर गोष्ट वेगळी होती.
आता गुणगुणत असतो तीच गझल अधूनमधून.
काळजाचे रक्त थोडे शिंपले
रंगल्या तेव्हा कुठे काही गझल

नाही शिंपलं काळजाचं रक्त तर गझल रंगणार कशी? अन् नाही शिंपडलं काळजाचं रक्त तर नाती तरी अर्थपूर्ण होणार कशी?
- महेश मांगले
9822070785

‘साहित्य चपराक’, जून 2016


5 comments: