सुवर्णाक्षरे
पळवाट
उपसरपंच साहेबांची शेतीच्या कामामुळे चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं पर्यावसान मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. एक दिवस ते म्हणाले, ‘’आता तुम्हाला माझ्या घरी यायलाच हवं. बघा तरी आम्ही किती डेव्हलपमेंट केली आहे ते!’’ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सारं प्रसन्न करणारं. घराकडे जो रस्ता जातो त्याच्या दुतर्फा छान नारळाची झाडं लावली होती. आंबा, चिक्कू, पपई सगळी फळझाडं होती पण विशेष म्हणजे डाळींबाची बाग केली होती. त्याला अर्धा-अर्धा किलोचं एक अशी पंधरा-वीस डाळींब लगडलेली. शेतात सार्या आधुनिक सोयी केलेल्या. सर्वत्र ठिबक सिंचनाने सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली.
कलींगड, ढोबळी मिरची यांना मल्चींग पेपर लावून घेतलेला. सगळ्या पिकांना वेळच्यावेळी खत, पाणी... पाणी कमी पडू नये यासाठी मोठी विहिर होतीच. शिवाय दोन बोर सुद्धा घेतलेल्या. त्यामुळे एकदम छान, आधुनिक शेती. सारं सारं हिरवंगार. मन खरंच खूप प्रसन्न झालं आणि इतकी शेती सांभाळायची म्हणजे गडी हवेच! पण त्यांच्या घरातली माणसेच सर्व शेतात आवडीने काम करत असल्याने गडी एकच! सिझन आला... खूप काम वाढले की प्रसंगानुसार कामावर गडी बोलवायचे. खरंच पाहून खूप समाधान झालं.
आणि केवळ शेती दाखवली असे नाही तर जेवणही अगदी झक्कास केलं. त्यांनी सांगितलं, ‘‘शेतातल्यासारखं जेवण करा.’’ रानातली ताजी भेंडी तोडून आली. भरली वांगी, मिरचीचा ठेचा, भाकरी, कांदा, सोबत रानमेवाही दिला. मनाबरोबर पोटही तृप्त झालं. सारं झाल्यावर ‘वानावळा’ म्हणून घरच्या भाज्या भेंडी, गवार, मिरची, वांगी, लिंबू, मेथीही सोबत भरभरून दिले...
निघताना उपसरपंचाच्या बायकोला, उमा वहिनींना मी सवयीनं विचारलं, ‘‘वॉशरूम कुठं आहे?’’ त्यांनी प्रश्नार्थक चेहरा केला. मी समजले आणि विचारले की, ‘‘शौचालय कुठं आहे?’’ त्या एक मिनिट माझ्याकडं पाहतच राहिल्या. मग म्हणाल्या, ‘‘त्या तिकडं, लांब आहे.’’ मी म्हटलं, ‘‘चालेल, जाऊया.’’ त्या तिकडे न्यायला अजिबात उत्सुक नव्हत्या पण मी पुन्हा म्हटले की, ‘’जाऊ या, चला...’’ तेव्हा त्या नाईलाजास्तव मला तिकडे घेऊन गेल्या. बाहेरून तर शौचालय चांगले बांधलेले दिसत होते पण त्याला कुलूप होते. शेत ह्यांचं, माणसंही इथं घरातलीच राहणारी, गडी केवळ एक, मग कुलूप का लावलं मला कळेना... तोवर उमा वहिनींनी शौचालयाचं दार उघडून दिलं... तर प्रथमदर्शनी नजरेत भरल्या त्या आधुनिक टाइल्स लावलेल्या. तोपर्यंत उमा वहिनी म्हणाल्या, ‘’थांबा जरा...’’ आणि त्यांनी बोरजवळून एक बादली भरून आणली. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘आत पाण्याची सोय नाही? टाकीही दिसत नाही. मग तुम्ही?’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कोणीच वापरत नाही.’’ मग मी म्हणाले, ‘‘अहो, मग बांधला कशाला?’’ त्यांचे उत्तर ऐकून मला काय बोलावे तेच कळेना. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही सारे वावरात जातो पण सरकारचा फतवा निघाला ना शौचालय नसले तर फॉर्म भरता येणार नाही, म्हणून बांधून ठेवला. तेवढ्यासाठी तिकिट नको जायला.’’ म्हणजे एकप्रकारची पळवाटच वाटली मला.
यासंदर्भात टीव्हीवर विद्या बालन एक जाहिरात करते. ती खूपच बोलकी आहे. सून पाणी प्यायला घुंघट बाजूला करते तर लगेच सासरा सूचवतो, ‘आपल्याकडे असं चालत नाही.’ त्यावर विद्या बालन छान, मार्मिक प्रश्न विचारते, ‘‘घुंघटही काढलेलं चालत नाही मग सून अशी उघड्यावर शौचाला जाते तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही...?’’ अशा आशयाची बोलकी, झणझणीत अंजन घालणारी जाहिरात...
इथं तर केवळ नियम आहे म्हणून, केवळ दाखवण्यासाठी शौचालय बांधले. याला काय म्हणावे? सारी आधुनिकता मग मला फिकी वाटू लागली.
नियम काढतात... पण पळवाटाही शोधतात. मूळ उद्देश साध्य होत नाही, हेच यावरून दिसते. यासाठी मानसिकता बदलायला हवी...
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- सुवर्णा जाधव, मुंबई
पळवाट
उपसरपंच साहेबांची शेतीच्या कामामुळे चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं पर्यावसान मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. एक दिवस ते म्हणाले, ‘’आता तुम्हाला माझ्या घरी यायलाच हवं. बघा तरी आम्ही किती डेव्हलपमेंट केली आहे ते!’’ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सारं प्रसन्न करणारं. घराकडे जो रस्ता जातो त्याच्या दुतर्फा छान नारळाची झाडं लावली होती. आंबा, चिक्कू, पपई सगळी फळझाडं होती पण विशेष म्हणजे डाळींबाची बाग केली होती. त्याला अर्धा-अर्धा किलोचं एक अशी पंधरा-वीस डाळींब लगडलेली. शेतात सार्या आधुनिक सोयी केलेल्या. सर्वत्र ठिबक सिंचनाने सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली.
कलींगड, ढोबळी मिरची यांना मल्चींग पेपर लावून घेतलेला. सगळ्या पिकांना वेळच्यावेळी खत, पाणी... पाणी कमी पडू नये यासाठी मोठी विहिर होतीच. शिवाय दोन बोर सुद्धा घेतलेल्या. त्यामुळे एकदम छान, आधुनिक शेती. सारं सारं हिरवंगार. मन खरंच खूप प्रसन्न झालं आणि इतकी शेती सांभाळायची म्हणजे गडी हवेच! पण त्यांच्या घरातली माणसेच सर्व शेतात आवडीने काम करत असल्याने गडी एकच! सिझन आला... खूप काम वाढले की प्रसंगानुसार कामावर गडी बोलवायचे. खरंच पाहून खूप समाधान झालं.
आणि केवळ शेती दाखवली असे नाही तर जेवणही अगदी झक्कास केलं. त्यांनी सांगितलं, ‘‘शेतातल्यासारखं जेवण करा.’’ रानातली ताजी भेंडी तोडून आली. भरली वांगी, मिरचीचा ठेचा, भाकरी, कांदा, सोबत रानमेवाही दिला. मनाबरोबर पोटही तृप्त झालं. सारं झाल्यावर ‘वानावळा’ म्हणून घरच्या भाज्या भेंडी, गवार, मिरची, वांगी, लिंबू, मेथीही सोबत भरभरून दिले...
निघताना उपसरपंचाच्या बायकोला, उमा वहिनींना मी सवयीनं विचारलं, ‘‘वॉशरूम कुठं आहे?’’ त्यांनी प्रश्नार्थक चेहरा केला. मी समजले आणि विचारले की, ‘‘शौचालय कुठं आहे?’’ त्या एक मिनिट माझ्याकडं पाहतच राहिल्या. मग म्हणाल्या, ‘‘त्या तिकडं, लांब आहे.’’ मी म्हटलं, ‘‘चालेल, जाऊया.’’ त्या तिकडे न्यायला अजिबात उत्सुक नव्हत्या पण मी पुन्हा म्हटले की, ‘’जाऊ या, चला...’’ तेव्हा त्या नाईलाजास्तव मला तिकडे घेऊन गेल्या. बाहेरून तर शौचालय चांगले बांधलेले दिसत होते पण त्याला कुलूप होते. शेत ह्यांचं, माणसंही इथं घरातलीच राहणारी, गडी केवळ एक, मग कुलूप का लावलं मला कळेना... तोवर उमा वहिनींनी शौचालयाचं दार उघडून दिलं... तर प्रथमदर्शनी नजरेत भरल्या त्या आधुनिक टाइल्स लावलेल्या. तोपर्यंत उमा वहिनी म्हणाल्या, ‘’थांबा जरा...’’ आणि त्यांनी बोरजवळून एक बादली भरून आणली. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘आत पाण्याची सोय नाही? टाकीही दिसत नाही. मग तुम्ही?’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कोणीच वापरत नाही.’’ मग मी म्हणाले, ‘‘अहो, मग बांधला कशाला?’’ त्यांचे उत्तर ऐकून मला काय बोलावे तेच कळेना. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही सारे वावरात जातो पण सरकारचा फतवा निघाला ना शौचालय नसले तर फॉर्म भरता येणार नाही, म्हणून बांधून ठेवला. तेवढ्यासाठी तिकिट नको जायला.’’ म्हणजे एकप्रकारची पळवाटच वाटली मला.
यासंदर्भात टीव्हीवर विद्या बालन एक जाहिरात करते. ती खूपच बोलकी आहे. सून पाणी प्यायला घुंघट बाजूला करते तर लगेच सासरा सूचवतो, ‘आपल्याकडे असं चालत नाही.’ त्यावर विद्या बालन छान, मार्मिक प्रश्न विचारते, ‘‘घुंघटही काढलेलं चालत नाही मग सून अशी उघड्यावर शौचाला जाते तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही...?’’ अशा आशयाची बोलकी, झणझणीत अंजन घालणारी जाहिरात...
इथं तर केवळ नियम आहे म्हणून, केवळ दाखवण्यासाठी शौचालय बांधले. याला काय म्हणावे? सारी आधुनिकता मग मला फिकी वाटू लागली.
नियम काढतात... पण पळवाटाही शोधतात. मूळ उद्देश साध्य होत नाही, हेच यावरून दिसते. यासाठी मानसिकता बदलायला हवी...
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- सुवर्णा जाधव, मुंबई
No comments:
Post a Comment